पंतप्रधान कार्यालय

नुतनीकरण केलेल्या जालियनवाला बाग स्मारकाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 28 AUG 2021 10:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2021

पंजाबचे राज्यपाल श्री व्ही पी सिंह बदनोरजी, पंजाबचे  मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले  माझे सहकारी श्री जी किशन रेड्डीजी, श्री अर्जुन राम मेघवालजी, श्री सोम प्रकाशजी, संसदेतले माझे सहकारी श्री श्वैत मलिकजी, कार्यक्रमात सहभागी सर्व आदरणीय मुख्यमंत्री महोदय, लोक-प्रतिनीधी, शहीदांचे कुटुंबिय, बंधू आणि भगिनींनो!

पंजाबच्या वीर भूमीला, जलियनवाला बागच्या  पवित्र मातीला, माझे अनेक-अनेक प्रणाम! भारतमातेच्या त्या पूत्रांनाही नमन, ज्यांच्या हृद्यात धगधगती स्वातंत्र्याची ज्वाला विझवण्यासाठी अमानुषपणाच्या साऱ्या मर्यादा पार करण्यात आल्या. ते निरागस  बालक-बालिका, त्या भगीनी, ते बंधू, ज्यांची स्वप्नं  आजही जालियनवाला बागच्या भिंतीवरच्या गोळ्यांच्या निशानींमधे दिसतात. ती शहीदांची विहिर, ज्यात अगणित  माता-बहिणींची ममता हिरावली गेली. त्यांचं जीवन हिरावून घेतलं गेलं. त्यांची स्वप्नं चिरडली गेली. त्या सर्वांचं आज आपण स्मरण करत आहोत.

बंधूंनो आणि भगिनींनो,

जालियनवाला बाग, ते स्थान आहे, ज्याने सरदार उधम सिंह, सरदार भगत सिंह, यासारख्या असंख्य क्रांतिकारक, बलिदान देणाऱ्या, सेनानींना  हिंदुस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावण्याची प्रेरणा दिली. 13 एप्रिल 1919 ची ती  10 मिनटं, आपल्या स्वातंत्र्यलढ्याची ती  सत्यगाथा, चिरगाथा बनली, त्यामुळे आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करु शकत आहोत. अशात स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात जलियनवाला बाग स्मारकाचं  आधुनिक रूप देशाला मिळणं, आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठा प्रेरणादायी क्षण आहे.  माझं सौभाग्य राहिलं आहे की मला अनेकदा जालियनवाला बागेच्या या पवित्र भूमीत येण्याचं, इथली पवित्र माती कपाळाला लावण्याचं सौभाग्य मिळालं आहे. नुतनीकरणाचं आज जे काम झालं आहे, त्याने बलिदानाच्या अमर गाथा आणखी जीवंत केल्या आहेत. इथे जी वेगवेगळी दालनं बनवली आहेत, भितींमधे हुतात्म्यांची चित्र कोरली आहेत, शहीद उधम सिंहजी यांचा पुतळा आहे, हे सगळं आपल्याला त्या कालखंडात घेऊन जातं.  जालियनवाला बाग नरसंहारा आधी या स्थानावर पवित्र बैसाखीची जत्रा भरत असे. याच दिवशी गुरु गोविन्द सिंहजी यांनी 'सर्बत दा भला' या भावनेसह  खालसा पंथांची स्थापना केली होती. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात  जालियनवाला बागेचं हे नवं स्वरूप देशवासियांना या पवित्र स्थानाच्या इतिहासाबाबत, त्याच्या भूतकाळाबाबत खूप काही जाणून घेण्यासाठी प्रेरित करेल.  हे स्थान नव्या पिढीला सतत आठवण करून देईल की आपला स्वातंत्र्याचा प्रवास कसा होता, इथवर पोहचण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय काय केलं, किती त्याग, किती बलिदान, अखंड संघर्ष..  राष्ट्रा प्रति आपलं कर्तव्य काय असायला हवं, आपल्या प्रत्येक कामात कसं देशाला सर्वोच्च ठेवायला हवं, याचीही प्रेरणा नव्या ऊर्जेसह, या स्थानामुळे मिळेल.

मित्रांनो,

आपला इतिहास जपणं हे प्रत्येक राष्ट्राचं दायित्व असतं. इतिहासातल्या घटना, आपल्याला शिकवतातही  आणि पुढे जाण्याची दिशाही देतात.  जालियनवाला बागेसारखी आणखी एक वेदना आपण फाळणीच्या वेळीही सोसली आहे.  पंजाबच्या कष्टाळू आणि दिलखुलास लोकांनी तर फाळणीची वेदना सर्वाधिक भोगली आहे.  फाळणीच्या वेळी जे काही झालं त्याची वेदना आजही हिन्‍दुस्‍तानातल्या प्रत्येक कोपऱ्यात विशेषत: पंजाबमधल्या कुटुंबांमधे आपल्याला जाणवते. कोणत्याही देशासाठी आपल्या भूतकाळातील अशा वेदनादायी घटना दुर्लक्षित करणं योग्य नाही. येणाऱ्या पिढ्यांनी हे लक्षात ठेवावं  यासाठी, भारताने 14 ऑगस्ट रोजी दरवर्षी 'फाळणी वेदना  स्मृति दिवस' पाळण्याचं ठरवलं आहे. 'फाळणी वेदना स्मृति दिवस' भावी पिढ्यांना याची आठवण करून देत राहिल की किती मोठी किंमत देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. फाळणी वेळी कोट्यवधी भारतीयांनी सोससेला त्रास, वेदना ते समजू शकतील. 

मित्रांनो,

गुरुवाणी आपल्याला शिकवते- सुखु होवै सेव कमाणीआ।

अर्थात्, दुसऱ्यांची सेवा करुनच सुख मिळतं. स्वत:बरोबरच आपल्या माणसांची वेदना समजून घेऊ तेव्हाच आपण सुखी होतो. यामुळेच, जगभरात कुठेही आज कोणाताही भारतीय संकटात सापडला तर भारत संपूर्ण सामर्थ्यानीशी त्याच्या मदतीसाठी उभा राहतो. कोरोना कालखंड असो किंवा मग अफगाणिस्तानातलं वर्तमान संकट, जगानं भारताच्या मदतीचा निरंतर अनुभव घेतला आहे.  ऑपरेशन देवी शक्ति अंतर्गत अफगाणिस्तानातून शेकडो मित्रांना भारतात आणलं जात आहे. आव्हानं खूप आहेत. काळ कठिण आहे. परन्तु गुरुकृपाही कायम आपल्यावर होत आहे. आपण लोकांबरोबरच पवित्र गुरुग्रंथ साहेब यांचं 'स्वरूप'ही माथ्यावर घेऊन भारतात आणलं आहे.

मित्रांनो,

देशानं गेल्या काही वर्षात आपली ही जबाबदारी पार पाडण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न केले आहेत. आपल्या गुरुंनी दिलेल्या मानवतेच्या शिकवणुकीनुसार देशाने अशा परिस्थितीने छळलेल्या, अपल्या लोकांसाठी नवे कायदे बनवले आहेत.

मित्रांनो,

ज्याप्रकारे आज जगात  परिस्थिती निर्माण होत आहे, त्यावरुन एक भारत, श्रेष्ठ भारतचं महत्वही आपल्याला आकळतं. राष्ट्र म्हणून प्रत्येक पातळीवर आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास का गरजेचा आहे, किती आवश्यक आहे याची आठवण या घटना आपल्याला करुन देतात.

यासाठीच, स्वातंत्र्याचं 75 वं वर्ष साजरं करत असताना आपण राष्ट्राचा पाया मजबूत करणं, त्यावर गर्व करणं आवश्यक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज याच संकल्पासह पुढे जात आहे.  अमृत महोत्सवात आज गावागावात स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण केलं जात आहे. त्यांना  सन्मानित केलं जात आहे. देशात जिथेही स्वातंत्र्याचा महत्वपूर्ण टप्पा आहे, त्याला पुढे आणण्याकरिता एका समर्पित विचारासह प्रयत्न केले जात आहेत. देशाच्या राष्ट्र-नायकांशी संबंधित स्थानं आज संरक्षित करण्याबरोबरच त्यास नवे आयामही जोडले जात आहेत. जालियनवाला बागे प्रमाणेच स्वातंत्र्यासंबंधित राष्ट्रीय स्मारकांचही नुतनीकरण सुरु आहे. अलाहाबाद संग्रहालयात 1857 ते 1947 दरम्यानच्या प्रत्येक क्रांतीकारक घटना दर्शवणारे  देशातले पहिले संवादी संग्रहालय दालन, लवकरच पूर्ण होईल.  क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांना समर्पित हे 'आझाद दालन', सशस्त्र क्रांती संबंधित त्या काळातील दस्‍तावेज, काही वस्तू यांचाही एक डिजिटल अनुभव देईल. याचप्रकारे कोलकात्यात बिप्लॉबी भारत गॅलरीतही क्रांती चिन्हांना भावी पिढ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून  आकर्षक बनवलं जात आहे.  याआधी सरकार द्वारे आज़ाद हिंद फौजेचे योगदानही इतिहासाच्या मागच्या पानातून काढून समोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नेताजींनी अंदमानात पहिल्यांदा जिथे तिरंगा फडकवला, त्या स्थानाला ही नवी ओळख देण्यात आली आहे. सोबतच अंदमान   द्वीपांची नावंही स्वातंत्र्य संग्रामाला  समर्पित केली आहेत.

बंधूंनो आणि भगिनींनो,

स्वातंत्र्याच्या महायज्ञात आपल्या आदिवासी समाजाचं खूप मोठं  योगदान आहे.  जनजाती समुदायांच्या  त्‍याग आणि बलिदानाच्या अमर गाथा आजही आपल्याला प्रेरणा देतात.  इतिहासाच्या पुस्तकात यांनाही मिळायला हवं होतं तितकं स्थान मिळालं नाही. देशातल्या 9 राज्यांमधे सध्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचा संघर्ष दाखवणाऱ्या संग्रहायलाबाबतही काम सुरु आहे.

मित्रांनो,

सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांसाठीही राष्ट्रीय स्मारक असायला हवं अशीही देशाची आकांक्षा होती. मला समाधान आहे की राष्ट्रीय युद्धस्मारक (नॅशनल वॉर मेमोरियल)  आजच्या तरुणांमधे राष्ट्र संरक्षण आणि देशासाठी सगळं काही ओवाळून टाकण्याची भावना जागवत आहे. देश सुरक्षित ठेवण्यासाठी पंजाबसह देशातल्या कानाकोपऱ्यातून शहीद झालेल्या आपल्या वीर सैनिकांना आज योग्य स्थान आणि उचित सन्मान मिळाला आहे.  याचप्रकारे, आपले पोलिसांमधले जवान, आपले निमलष्करी दल, यांच्यासाठीही स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकांपश्चातही कोणतही   राष्ट्रीय स्मारक नव्हतं. आज पोलिस आणि निमलष्करी दलांना समर्पित राष्ट्रीय स्मारकही  देशाच्या नव्या पिढीला प्रेरित करत आहे.

मित्रांनो,

पंजाबमधे तर क्वचितच असं  एखादं गाव, अशी एखादी गल्ली असेल, जिथे शौर्य और शूरवीरतेची गाथा नसेल.  गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर चालत, पंजाबचे मुलंमुली, भारतमातेकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांसमोर पर्वतासम उभे ठाकतात. आपला हा वारसा अधिक समृद्ध व्हावा, यासाठी निरंतर प्रयत्न केले जात आहेत. गुरु नानक देवजी यांचा 550 वा प्रकाशोत्सव असो, गुरु गोविंद सिंहजी यांचा 350 वा प्रकाशोत्सव असो, किंवा मग  गुरु तेगबहादुरजी यांचा 400 वा प्रकाशोत्सव असो, सौभाग्याची बाब म्हणजे हे महत्वाचे टप्पे गेल्या 7 वर्षातच आले आहेत.  केंद्र सरकारने प्रयत्न केला आहे की  देशातच नाही तर संपूर्ण जगात या  पावनपवित्र पर्वांच्या  माध्यमातून आपल्या गुरुंच्या शिकवणीचा विस्तार व्हावा. आपला हा समृद्ध वारसा पुढल्या पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अविरत काम सुरु आहे.  सुल्तानपुर लोधीला ऐतिहासिक वारसा शहर बनवण्याचं काम असो, करतारपुर कॉरिडोरचं निर्माण असो, हे याच प्रयत्नांचा भाग आहेत. जगभरातल्या देशांबरोबर पंजाबचा विमानवाहतूक संपर्क असो किंवा  देशभरात आपली जी  गुरुस्थानं आहेत, त्यांना जोडणारे मार्ग असोत त्यांना सशक्त केलं आहे. स्वदेश दर्शन योजने अंतर्गत आनंदपुर साहेब - फतेहगढ़ साहेब - फिरोजपूर - अमृतसर- खटकड़कला - कलानौर - पटियाला हे ऐतिहासिक वारसा स्थळे अर्थात हैरिटेज सर्किट  विकसित केले जात आहेत. आपला हा  समृद्ध वारसा भावी पिढयांनाही प्रेरित करत राहावा आणि पर्यटनाच्या रूपात  रोजगाराचाही स्रोत व्हावा हा प्रयत्न आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ पूर्ण  देशासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. या अमृतकाळात आपल्याला वारसा आणि विकास सोबतीने घेऊन पुढे जायचं आहे. पंजाबची भूमी यासाठी नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहिली आहे.  पंजाबनं प्रत्येक स्तरावर प्रगती करणं आज गरजेचं आहे. आपल्या देशानं चहु दिशांनी प्रगती करायला हवी. यासाठी आपण मिळून काम करायला हवं.  'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, आणि सबका प्रयास' या भावनेसह आपण काम करत राहायला हवं. मला पूर्ण विश्वास आहे की जलियनवाला बागची ही भूमी आपल्याला, आपल्या संकल्पांकरता सतत ऊर्जा देत राहिल, आणि देश आपलं लक्ष्य लवकर पूर्ण करेल.  याच मनोकामनेसह पुन्हा एकदा या आधुनिक स्मारकाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद!

 

M.Chopade/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1750178) Visitor Counter : 227