पंतप्रधान कार्यालय

आसाममध्ये पंतप्रधानांनी केला 'महाबाहु-ब्रह्मपुत्र’चा प्रारंभ आणि दोन पुलांची केली पायाभरणी


आसामसह ईशान्य भारताची प्रगती, विकास आणि संपर्क सुविधा वाढवण्याला सरकारचे प्राधान्य - पंतप्रधान

रो पॅक्स सेवा अत्यंत मोठे अंतर कमी करेल- पंतप्रधान

Posted On: 18 FEB 2021 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये महाबाहु-ब्रह्मपुत्र प्रकल्पाचा प्रारंभ केला आणि दोन पुलांची पायाभरणी केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आसाम आणि मेघालायचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

महाबाहु-ब्रह्मपुत्रचा आरंभ प्रसंगी त्यांनी नेमाती - माजुली बेटे, उत्तर - गुवाहाटी - दक्षिण गुवाहाटी आणि धुबरी- हातसिंगीमारी दरम्यानच्या रो पॅक्स जहाज वाहतुकीचे उद्‌घाटन केले. त्यांनी जोगीघोपा येथे अंतर्देशीय जल वाहतूक टर्मिनलचा शिलान्यास आणि ब्रह्मपुत्रा नदीवर विविध पर्यटक जेट्टी आणि इज ऑफ डुइंग बिझनेससाठी डिजिटल उपायांचा प्रारंभ केला.

याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी काल साजरा झालेल्या शेतीशी निगडीत अली-आय-लिगांग उत्सवासाठी माईसिंग समुदायाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, वर्षानुवर्षे ही पवित्र नदी सामाजिकरण आणि संपर्कासाठी समान राहिली आहे. ब्रह्मपुत्रावर संपर्क सुविधेशी संबंधित इतके काम यापूर्वी झालेले नाही, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, या कारणास्तव आसाम आणि ईशान्येकडील अन्य भागात संपर्क हे मोठे आव्हान राहिले आहे. त्यांनी सांगितले की, आता या संपूर्ण प्रदेशातील भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या असलेले अंतर कमी करण्यासाठी प्रकल्पांचे काम शीघ्र गतीने सुरू आहे. त्यांनी सांगितले की, असामसह संपूर्ण सांस्कृतिक एकात्मता अलिकडच्या वर्षात बळकट झाली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, डॉ. भुपेन हजारीका सेतू, बोगीबील पूल, सराईघाट पूल यांसारखे अनेक पूल आज आसामचे जीवन सुकर करीत आहेत. त्यांनी सांगितले की, यामुळे देशाची सुरक्षा बळकट होण्यासोबतच आपल्या जवानांना उत्तम सोय उपलब्ध होते आहे. आसाम आणि ईशान्येला जोडण्याची मोहीम आज आणखी पुढे नेण्यात आली आहे. या कार्यासाठी आसामचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. माजुलीला आसामचा पहिला हेलिपॅड मिळाला आहे आणि आता वेगवान आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध होत आहे. कालीबारीला जोरहाटशी जोडणाऱ्या 8 किमी. लांबीच्या पुलाच्या भूमीपूजनासह दीर्घकाळची प्रलंबित मागणी पूर्ण व्हायला सुरुवात झाली आहे. हा सोयीचा आणि शक्यतांचा पूल ठरणार आहे" असे पंतप्रधान म्हणाले.

त्याचप्रमाणे मेघालयातील धुबरी ते फुलबारी हा 19 किमी. लांबीचा पूल बराक खोऱ्यातील संपर्क सुधारेल आणि मेघालय, मणिपूर, मिझोरम आणि आसाममधील अंतर कमी करेल.।पंतप्रधानांनी निदर्शनाला आणून दिले की , आज आसाम आणि मेघालयमधील अंतर रस्त्याने सुमारे 250 किमी. आहे, ते कमी होऊन फक्त 19-20 किमी. राहील.

महाबहु- ब्रह्मपुत्रा कार्यक्रमाबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, या माध्यमातून ब्राह्मपुत्राच्या पाण्याद्वारे बंदर विकासातून जल संपर्क सुविधा मजबूत करेल. आज सुरू करण्यात आलेल्या तीन रो - पॅक्स सेवांमुळे इतक्या मोठ्या स्तरावर रो पॅक्स सेवेशी जोडले गेलेले आसाम राज्य देशातील अग्रणी राज्य झाले आहे. यामुळे चार पर्यटन जेट्टीसह आसामसह ईशान्येकडील संपर्क सुविधेत लक्षणीय सुधारणा होईल.

गेल्या अनेक वर्षात संपर्क सुविधांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे राज्य समृध्दीपासून वंचित राहिले असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, पायाभूत सुविधा ढासळल्या आणि जलमार्ग जवळजवळ संपले त्यामुळे अशांतता निर्माण झाली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात या चुकांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली, असे मोदी म्हणाले. अलीकडच्या वर्षात आसाममध्ये मल्टी- मॉडेल कनेक्टिव्हिटी पुनर्स्थापित करण्यासाठी पावले उचलण्यात आली. आसाम आणि ईशान्येला अन्य पूर्व आशियायी देशांशी सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंधांचे  केंद्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पंतप्रधानांनी सांगितले की, आंतर्देशीय जलमार्गाचे काम येथे मोठा प्रभाव पाडणार आहे. ते म्हणाले की, जल संपर्क वाढविण्यासाठी नुकताच बांगलादेशसोबत एक करार करण्यात आला आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक नदीला जोडण्यासाठी हुगळी नदीच्या पलीकडे भारत बांगलादेश प्रोटोकॉल मार्गावर काम सुरू आहे. ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडल्यास या अरुंद क्षेत्राने जोडलेल्या प्रदेशाचे अवलंबित्व कमी होईल. पुढे ते म्हणाले की, जोगीघोपा आयडब्ल्यूटी टर्मिनल आसामला हल्दीया बंदर आणि कोलकात्याशी जलमार्गाने जोडेल आणि हा पर्यायी रस्ता आणखी मजबूत करेल. या टर्मिनलवर भूतान आणि बांगलादेशच्या मालवाहू जहाजांना आणि जोगीघोपा मल्टिमॉडेल लॉजीस्टिक पार्कच्या मालवाहू जहाजांना ब्रह्मपुत्रा नदीवरील विविध ठिकाणांवर ये - जा करण्यासाठी सुविधा मिळेल.

पंतप्रधान म्हणाले की, नवे मार्ग सर्वसामान्य लोकांच्या सोयीसाठी आणि प्रदेशाच्या विकासासाठी तयार करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, माजुली ते नेमाटी दरम्यान रो-पॅक्स सेवा असा एक मार्ग आहे, ज्यामुळे रस्ते प्रवासाचे सुमारे 425 किमीचे अंतर कमी होऊन ते फक्त 12 किमीपर्यंत येईल. या मार्गावर दोन जहाजे चालविण्यात येत आहेत, जी एका वेळेला 1600 प्रवासी आणि डझनभर वाहनांची वाहतूक करतात. ते म्हणाले की, गुवाहाटीमध्ये सुरू झालेली अशाच प्रकारची सुविधा उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीमधील अंतर 40 किमीवरून 3 किमीपर्यंत कमी करेल.

पंतप्रधान म्हणाले की, वापरकर्त्यांना अचूक माहिती मिळावी यासाठी आज इ-पोर्टल्स सुरू करण्यात येत आहेत. कार-डी पोर्टल राष्ट्रीय जलमार्गावरील सर्व मालवाहू जहाजे आणि क्रूझ वाहतुकीचा डेटा यासंदर्भातली माहिती वास्तविक वेळेनुसार एकत्रित करण्यास मदत करेल. हे पोर्टल जलमार्गांच्या पायाभूत सुविधांशी संबंधित माहितीदेखील पुरवेल. त्यांनी सांगितले की, जे इथे व्यवसायासाठी येवू इच्छितात त्यांना जीआयएस आधारित इंडिया मॅप पोर्टल मदत करेल.

पंतप्रधान म्हणाले की, आसामसह ईशान्येकडे जलमार्ग, रेल्वे आणि महामार्ग संपर्क सुविधेप्रमाणेच इंटरनेट संपर्क सुविधा तितकीच महत्वाची असून त्यावर सातत्यानं काम सुरू आहे. त्यांनी जाहीर केले की, शेकडो कोटींची गुंतवणूक असलेले ईशान्येमधील पाहिले डेटा केंद्र गुवाहाटीमध्ये उभारले जाणार आहे. हे डेटा सेंटर 8 राज्यांसाठी डेटा केंद्र हब म्हणून काम करेल आणि माहिती तंत्रज्ञान सेवा आधारित उद्योग, बीपीओ परिसंस्था आणि स्टार्ट अप, इ- प्रशासनाच्या माध्यमातून आसामसह ईशान्येला बळकटी देतील.

पंतप्रधानांनी सांगितले की, ईशान्य भारतासह संपूर्ण देशासाठी सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या दृष्टीकोनातून सरकार काम करीत आहे. माजुली प्रदेशाची सांस्कृतिक खोली आणि समृद्धी, आसामी संस्कृती आणि स्थानिक जैवविविधता त्यांनी नमूद केली. सांस्कृतिक विद्यापीठाची स्थापना, माजुलीला जैवविविधता वारसास्थळाचा दर्जा, तेजपूर-माजुली-शिवसागर हेरीटेज सर्कीट, नमामी ब्रह्मपुत्रा, नमामी बराक या उचललेल्या पावलांची यादी पंतप्रधानांनी दिली. या पावलांमुळे आसामची ओळख आणखी समृद्ध होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी आशा व्यक्त केली की, आज सुरू झालेल्या संपर्क सुविधां संबंधित प्रकल्पांमुळे पर्यटनाचे नवे मार्ग खुले होतील आणि आसाम क्रूझ पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण म्हणून उदयाला येईल. पंतप्रधानांनी समारोपावेळी सांगितले की, आसाम, ईशान्येला आत्मनिर्भर भारताचा मजबूत स्तंभ बनविण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम केले पाहिजे.

 

S.Tupe/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699166) Visitor Counter : 215