पंतप्रधान कार्यालय

नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंचावर पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 17 FEB 2021 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2021

नमस्कार !

यावेळी नॅसकॉमचा तंत्रज्ञान आणि नेतृत्व मंच माझ्या दृष्टीने अतिशय खास आहे. हा एक असा काळ आहे जेव्हा जग भारताकडे पूर्वीपेक्षा अधिक आशेने आणि विश्वासाने पाहत आहे.

आपल्याकडे म्हटले आहे- ना दैन्यम्, ना पलायनम्! म्हणजे आव्हान कितीही कठीण असूदे , आपण स्वतःला कमकुवत समजायचे नाही आणि आव्हानांना घाबरून पळूनही जायचे नाही. कोरोनाच्या काळात भारताचे ज्ञान-विज्ञान, आपल्या तंत्रज्ञानाने केवळ स्वतःला सिद्ध केले नाही तर स्वतःला विकसितही केले . एक काळ होता जेव्हा आपण कांजिण्यांच्या लसीसाठी अन्य देशांवर अवलंबून होतो. .एक काळ असाही आहे जेव्हा आपण जगातील अनेक देशांना भारतात बनलेली कोरोना प्रतिबंधक लस पुरवत आहोत. कोरोनाच्या काळात भारताने जे उपाय सुचवले ते आज संपूर्ण जगासाठी प्रेरणा आहेत. आणि जसे आता तुम्हा सर्वांचे विचार ऐकण्याची मला संधी मिळाली आणि काही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले, यातही भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाने कमाल करून दाखवली आहे. जेव्हा चिप्स काम करत नव्हत्या, तेव्हा तुमच्या कोड ने काम सुरु ठेवले. जेव्हा संपूर्ण देश घराच्या चार भिंतीपुरता सीमित झाला तेव्हा तुम्ही घरातूनच उद्योग व्यवस्थित सांभाळत होतात. मागील वर्षाचे आकडे जगाला भलेही आश्चर्यचकित करणारे असतील, मात्र तुमच्या क्षमता पाहता भारताच्या जनतेला हे अगदी स्वाभाविक वाटते.

मित्रांनो ,

अशा परिस्थितीत जेव्हा प्रत्येक क्षेत्र कोरोनामुळे प्रभावित होते, तेव्हाही तुम्ही सुमारे 2 टक्के वाढ नोंदवली. जेव्हा नकारात्मक वाढीची भीती वर्तवली जात होती तेव्हाही भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाने आपल्या महसुलात 4 अब्ज डॉलरची वाढ केली हे खरोखरच प्रशंसनीय आहे, आणि तुम्ही सर्वजण अभिनंदनाला पात्र आहात. या दरम्यान लाखो नवीन रोजगार निर्माण करून भारताच्या विकासाचा मजबूत स्तंभ असल्याचे माहिती तंत्रज्ञान उद्योगाने सिद्ध केले आहे . आज तमाम आकडेवारी, प्रत्येक निर्देशांक हे दाखवत आहे की माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा हा वाढीचा वेग असाच नवी शिखरे गाठत राहील.

मित्रांनो

नवा भारत, प्रत्येक भारतवासी, प्रगतीसाठी आतुर आहे. आमचे सरकार नव्या भारताची, भारताच्या युवकांची ही भावना जाणते . 130 कोटींहून अधिक भारतीयांची स्वप्ने आम्हाला वेगाने पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात . नव्या भारताशी निगडित सरकारकडून जितक्या अपेक्षा आहेत, तेवढ्याच तुमच्याकडून देखील आहेत, देशातल्या खासगी क्षेत्राकडून देखील आहेत.

मित्रांनो

भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाने आपला ठसा जागतिक मंचावर अनेक वर्षांपूर्वी उमटवला होता. संपूर्ण जगाला सेवा आणि उपाय देण्यात आपले भारतीय तज्ञ नेतृत्व करत होते, योगदान देत होते. मात्र काही कारणास्तव भारताची जी विशाल देशांतर्गत जी बाजारपेठ आहे , त्याचा लाभ माहिती तंत्रज्ञान उद्योगाला मिळाला नाही. यामुळे भारतात डिजिटल दरी वाढत गेली. एक प्रकारे आपण म्हणू शकतो - दीया तले अंधेरा असे आपल्या बाबतीत घडले होते. आमच्या सरकारची धोरणे आणि निर्णय साक्षीदार आहेत की मागील वर्षात आमच्या सरकारने हा दृष्टिकोन बदलला आहे.

मित्रांनो ,

आमचे सरकार देखील हे चांगले जाणून आहे की बंधनांमध्ये भविष्यातील नेतृत्व विकसित होऊ शकत नाही. म्हणूनच सरकारकडून तंत्रज्ञान उद्योगाला अनावश्यक नियमनांमधून, बंधनांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय डिजिटल दळणवळण धोरण हा देखील असाच एक मोठा प्रयत्न होता. भारताला जागतिक सॉफ्टवेअर उत्पादन केंद्र बनवण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनवण्यात आले. सुधारणांची ही मालिका कोरोना काळातही सुरु राहिली. कोरोना काळातच अन्य सेवा पुरवठादार (OSP) मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली ज्याचा आता तुमच्या चर्चेत उल्लेख झाला. यामुळे नव्या परिस्थितींमध्ये तुमच्यासाठी काम करणे सोपे झाले , तुमच्या कामांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागला. आजही , जसे तुमच्यापैकी काही मित्रांनी आता सांगितले, 90 टक्क्यांहून अधिक लोक आपल्या घरातूनच काम करत आहेत. एवढेच नाही , काही लोक तर आपल्या मूळ गावातून काम करता आहेत. ही एक खूप मोठी ताकद बनणार आहे. 12 महत्वपूर्ण सेवा क्षेत्रांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचे फायदे तुम्हाला देखील मिळायला सुरुवात झाली आहे.

मित्रांनो,

दोन दिवसांपूर्वीच आणखी एक महत्वपूर्ण धोरणात्मक सुधारणा करण्यात आली आहे, ज्याचे तुम्ही सर्वानी स्वागत केले आहे. नकाशा आणि भू-अवकाशीय डेटा नियमन मुक्त करून ते उद्योगासाठी खुले करणे एक खूप महत्वपूर्ण पाऊल आहे. हे एक असे पाऊल आहे जी या मंचाची संकल्पना आहे - 'भविष्याला आकार देणे l', मला वाटते की एक प्रकारे तुमच्या शिखर परिषदेचे जे काम आहे ते सरकारने केले आहे, यामुळे आपली टेक स्टार्टअप परिसंस्था बळकट होईल. हे असे पाऊल आहे जे केवळ आयटी उद्योगच नाही तर आत्मनिर्भर भारताच्या व्यापक मिशनला मज़बूत बनवते. मला आठवतंय , तुमच्यापैकी अनेक उद्योजक नकाशा आणि भू-अवकाशीय डाटाशी संबंधित मर्यादा आणि लाल फितीशी संबंधित बाबी वेगवेगळ्या मंचावर मांडत आले आहेत.

आता एक गोष्ट सांगू, या सर्व बाबींमध्ये जो सर्वात मोठा लाल दिवा दाखवला जात होता तो सुरक्षेशी संबंधित होता. जर या गोष्टी खुल्या झाल्या तर सुरक्षा संकटात येईल. असे वारंवार येत होते मात्र सुरक्षेशी संबंधित समस्या हाताळण्यासाठी आत्मविश्वास एक खूप मोठी ताकद असते. आणि आज भारत आत्मविश्वासाने भरलेला देश आहे. सीमेवर आपण हे पाहत आहोत आणि त्यामुळेच अशा प्रकारचे निर्णय घेणे शक्य होते, हे निर्णय केवळ तंत्रज्ञानाच्या कक्षेपुरते मर्यादित नाहीत, हे निर्णय केवळ प्रशासकीय सुधारणा आहेत असे नाही, हे निर्णय म्हणजे सरकार एक धोरण नियमांपासून मागे हटले असे नाही, तर हे निर्णय भारताच्या सामर्थ्याचे परिचालक आहेत. भारताला विश्वास आहे कि हे निर्णय घेतल्यानंतरही आपण देशाला सुरक्षित ठेवू शकू आणि देशातील युवकांना जगात दबदबा निर्माण करण्याची संधी देखील देतील. माझीही जेव्हा तुम्हा सर्वांशी चर्चा व्हायची तेव्हा या समस्येची जाणीव मला व्हायची. आपल्या युवा उद्योजकांना, आपल्या स्टार्टअप्सना, जगभरात निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवे याच विचाराने हा निर्णय घेण्यात आला. सरकारचा देशातील नागरिकांवर, आपल्या स्टार्टअप्सवर आणि नवसंशोधकांवर पूर्ण विश्वास आहे. याच विश्वासासह स्वयं-प्रमाणीकरणाला प्रोत्साहित केले जात आहे.

मित्रांनो

मागील 6 वर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाने जी उत्पादने, जे उपाय तयार केले आहेत त्यांना आम्ही प्रशासनात महत्वपूर्ण स्थान दिले आहे. विशेषतः डिजिटल इंडियाने, डिजिटल तंत्रज्ञानाने सामान्यातील सामान्य भारतीयाला सशक्त केले आहे , सरकारशी जोडले आहे. आज डेटाचे लोकशाहीकरण करण्यात आले आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहचवली जात आहे. आज शेकडो सरकारी सेवा ऑनलाइन पुरवल्या जात आहेत. प्रशासनात तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला सुविधांबरोबरच भ्रष्टाचारापासून मोठा दिलासा मिळत आहे. आपली फिनटेक उत्पादने आणि UPI सारखे डिजिटल प्लँटफॉर्मची चर्चा तर आज जगभरात होत आहे. जागतिक बँकेसह सर्वचजण याच्या सामर्थ्याची चर्चा करत आहेत. 3-4 वर्षात रोख व्यवहारांकडून आपण रोकडविरहित व्यवहारांकडे कसे वळलो हे सर्वांसमोर आहे. जितके डिजिटल व्यवहार जास्त होत आहेत , तेवढे काळ्या पैशाचे स्रोत कमी होत आहेत. ट्रिनिटी आणि DBT यामुळे आज गरीबाच्या हक्काचे पै न पै त्याच्यापर्यंत कोणत्याही गळतीशिवाय पोहचू शकत आहेत.

मित्रांनो,

पारदर्शकता सुशासनाची सर्वात महत्वाची अट आहे. हाच बदल आता देशाच्या शासन व्यवस्थेत होत आहे. हेच कारण आहे की प्रत्येक सर्वेक्षणात भारत सरकार वर जनतेचा विश्वास सातत्याने अधिक मजबूत होत आहे. आता सरकारी कामकाज सरकारी रजिस्टरांमधून बाहेर पडून डॅशबोर्डवर आणण्यात आले आहे. प्रयत्न असा आहे कि सरकार आणि सरकारी विभागाचे प्रत्येक काम देशाचा सामान्य नागरिक आपल्या फोनवर पाहू शकेल. जे काही काम असेल ते देशासमोर असावे.

मित्रांनो,

सरकारी खरेदीसंदर्भात यापूर्वी कशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते , हे आपल्यापैकी कोण आहे ज्याला माहित नाही, आम्ही देखील चर्चेत तेच म्हणायचो, तेच ऐकायचो, आम्ही देखील चिंता व्यक्त करत होतो . आता आज डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत संपूर्ण पारदर्शकतेसह सरकारी e-marketplace म्हणजे GeM च्या माध्यमातून खरेदी केली जात आहे . आज बहुतांश सरकारी निविदा ऑनलाइन मागवलेल्या जात आहेत. आपले पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प असतील, किंवा गरीबांची घरे , प्रत्येक प्रकल्पाचे जिओ-टॅगिंग केले जात आहे जेणेकरून ते वेळेवर पूर्ण केले जाऊ शकतील. इथपर्यंत की आज गावांमधील घरांचे मॅपिंग ड्रोन द्वारे केले जात आहे. कर संबंधित प्रकरणांमध्ये देखील मानवी हस्तक्षेप कमी केला जात आहे. फेसलेस व्यवस्था विकसित केली जात आहे . तंत्रज्ञानामुळे सामान्य माणसाला जलद, सटीक आणि पारदर्शक व्यवस्था देणे म्हणजेच किमान सरकार, कमाल शासन, मी तरी याचा असा अर्थ घेतो.

मित्रांनो ,

आज जगात भारतीय तंत्रज्ञानाची जी प्रतिमा आहे , जी ओळख आहे ती पाहता देशाला तुमच्याकडून खूप जास्त आशा आहेत , खूप अपेक्षा आहेत . तुम्ही हे सुनिश्चित केले आहे की आपले तंत्रज्ञान जास्तीत जास्त स्वदेशी निर्मित असावे. माझी तुम्हाला विनंती आहे कि तुमच्या उपायांमध्येही आता मेक फॉर इंडियाची प्रतिमा असायला हवी. जर आपल्याला विविध क्षेत्रात भारतीय तंत्रज्ञान नेतृत्व पुढे न्यायचे असेल, ही गती कायम राखायची असेल तर आपल्याला आपल्या स्पर्धात्मकतेचे नवे मापदंड बनवावे लागतील. आपल्याला स्वतःशी स्पर्धा करावी लागेल. जागतिक तंत्रज्ञान नेतृत्व बनण्यासाठी नवसंशोधन आणि उद्योगाबरोबरच भारतीय आयटी उद्योगाला सर्वोत्कृष्टता संस्कृति आणि संस्था निर्मिती वर तेवढेच लक्ष द्यावे लागेल. या अनुषंगाने मी आपल्या स्टार्टअप संस्थापकांना एक खास संदेश देतो. स्वतःला केवळ मूल्यांकन आणि निष्कासन रणनीतीपर्यंत मर्यादित ठेवू नका.

या शतकाच्या अखेरपर्यंत तगून राहणाऱ्या संस्था कशा तयार करता येतील याचा विचार करा. तुम्ही जागतिक दर्जाची उत्पादने कशी तयार करु शकता जी उत्कृष्टतेबाबत जागतिक मापदंड निश्चित करेल. या दोन उद्दीष्टांबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, त्यांच्याशिवाय आपण नेहमीच अनुयायी राहू , जागतिक नेता बनणार नाही.

मित्रांनो

यावर्षी आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहोत. नवी उद्दिष्टे ठरवण्याची, ती साध्य करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावण्याची ही अगदी योग्य वेळ आहे. यापुढे 25-26 वर्षानंतर जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करेल, तेव्हा किती नवी जागतिक दर्जाची उत्पादने आपण दिली असतील, किती जागतिक नेते आपण निर्माण केले असतील, यावर विचार करून आपल्याला आतापासूनच काम करावे लागेल. तुम्ही उद्दिष्ट ठरवा, देश तुमच्याबरोबर आहे. भारताची एवढी मोठी लोकसंख्या तुमची खूप मोठी ताकद आहे. मागील महिन्यांमध्ये आपण पाहिले आहे कि कशा प्रकारे भारतीय लोकांमध्ये तंत्रज्ञान उपयांबाबत उत्साह वाढला आहे. लोक नवीन उत्पादनांची प्रतीक्षा करत आहेत. लोकांना नवीन गोष्टी वापरून पाहायच्या आहेत. विशेषतः भारतीय ॲप्लीकेशन  बाबत त्यांच्यात एक उत्साह आहे. देशाने निर्धार केला आहे . तुम्हीही ठरवा.

मित्रांनो,

21 व्या शतकात भारताच्या आव्हानांच्या उपायांसाठी सक्रिय तंत्रज्ञान तोडगा देणे ही आयटी उद्योग, टेक उद्योग , नवसंशोधक , संशोधक , युवकांची खूप मोठी जबाबदारी आहे. आता जसे आपल्या शेतीत पाणी आणि खताच्या आवश्यकतेपेक्षा अधिक वापरामुळे खूप मोठ्या समस्या उद्भवतात. उद्योगांनी यासाठी स्मार्ट तंत्रज्ञानावर काम करायला नको का , जे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत प्रत्येक पिकाच्या बाबतीत पाणी आणि खताच्या आवश्यकतेबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊ शकतील. केवळ तंत्रज्ञान निर्माण करून चालणार नाही , भारतात ते व्यापक स्तरावर स्वीकारले जाईल असे संशोधन आपल्याला करायचे आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि निरोगी डेटाच्या सामर्थ्यातून गरीबातील गरीब व्यक्तीला कसा लाभ मिळेल यासाठी देखील आज भारत तुमच्याकडे पाहत आहे. टेलिमेडिसिन प्रभावी बनवण्यासाठी देखील तुमच्याकडून सर्वोत्तम उपायांची अपेक्षा देश करत आहे.

मित्रांनो,

शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या बाबतीत देखील टेक-उद्योगाला असे उपाय देशाला द्यावे लागतील जे देशाच्या मोठया लोकसंख्येसाठी सुलभ असतील. आज देशात अटल टिंकरिंग लैब , अटल इंक्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून तंत्रज्ञानासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये वातावरण निर्माण केले जात आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबरोबरच कौशल्यावर देखील तेवढाच भर दिला जात आहे. हे प्रयत्न उद्योगांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाहीत. मी आणखी एक गोष्ट सांगेन कि तुम्ही तुमच्या सीएसआर उपक्रमाच्या परिणामांकडेही लक्ष द्या. जर तुमच्या सीएसआर कार्याचा भर देशातील मागास क्षेत्रांच्या मुलांवर असेल , तुम्ही त्यांना डिजिटल शिक्षणाशी जास्त जोडले, त्यांच्यात विश्लेषणात्मक विचार विकसित केलेत तर ते खूप मोठे परिवर्तन घडवून आणेल. सरकार आपल्याकडून प्रयत्न करत आहे मात्र यात तुमच्याकडूनही साथ मिळाली तर आपण कुठच्या कुठे जाऊ. भारतात कल्पनांची कमतरता नाही, त्याला मार्गदर्शक हवे आहेत जे त्यांना कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी मदत करतील.

मित्रांनो

आत्मनिर्भर भारताची मोठी केंद्रे आता देशातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरात तयार होत आहेत. हीच छोटी शहरे आज आयटी आधारित तंत्रज्ञानाची मागणी आणि वाढीची केंद्र बनत आहेत. देशातील या छोट्या शहरांमधील युवक अद्भुत इनोवेटर्स म्हणून समोर येत आहेत. सरकारचा देखील या छोट्या शहरांमध्ये उत्तम पायाभूत सुविधा निर्मितीवर भर आहे जेणेकरून तिथे राहणाऱ्या देशवासीयांबरोबरच तुमच्यासारख्या उद्योजकांची देखील गैरसोय होऊ नये. जितके जास्त तुम्ही या छोट्या शहरे, कसबांकडे जाल तेवढा त्यांचा अधिक विकास होईल.

मित्रांनो,

मला विश्वास आहे कि पुढील 3 दिवसात तुम्ही वर्तमान आणि भविष्यातील अशा उपायांवर गंभीर चर्चा कराल. सरकार नेहमीप्रमाणे तुमच्या सूचनांवर गांभीर्याने विचार करेल. मी एक गोष्ट अवश्य सांगेन , गेल्या वेळी 15 ऑगस्टला जेव्हा मी लाल किल्ल्यावरून भाषण देत होतो , तुम्ही ऐकले असेल, मी देशासमोर एक लक्ष्य ठेवले होते, की एक हजार दिवसात भारतातील 6 लाख गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे काम पूर्ण करायचे आहे. आता ऑप्टिकल फायबर नेटवर्कचा एक सांगाडा होईल आणि मी मागे लागलो आहे त्यामुळे आपण ते पूर्ण करूही. राज्य देखील आपल्याबरोबर जोडली जातील. मात्र त्यानंतरचे जे काम आहे ते तुमच्या बुद्धीशी निगडित आहे.ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या पायाभूत सुविधाचा भारतातील गरीब व्यक्ती कसा वापर करतील, वापरण्यास सुलभ नवी उत्पादने कशी येतील, गावातील व्यक्ती सरकार, बाजा, शिक्षण, आरोग्य याच्याशी कशी जोडली जाईल . यातून त्यांचे आयुष्य बदलण्याचा खूप मोठा मार्ग कसा निर्माण होईल , हे काम आतापासून तुमच्याकडील छोटे छोटे स्टार्टअपनी अशी उत्पादने आणावीत. गावात ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहचेल आणि गावाच्या या 10 गरज पूर्ण होतील , गावातील मुलांच्या जीवनात हा बदल घडून आणण्यासाठी व्यवस्था तयार असेल.

तुम्ही पहा, किती मोठी संधी आहे, आणि म्हणूनच मी तुम्हाला निमंत्रण देतो, सरकार हे काम करत आहे , ठरवा, आपल्याला नेतृत्व दीर्घकाळापर्यंत घेऊन जायचे आहे,  प्रत्येक क्षेत्रात हवे आहे संपूर्ण सामर्थ्यानिशी हवे आहे आणि या नेतृत्व मंचाच्या बैठकीत चिंतनातून जे अमृत निघेल , ते संपूर्ण देशासाठी उपयुक्त ठरेल.

याच अपेक्षेसह पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना शुभेच्छा

खूप-खूप आभार !!

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1698974) Visitor Counter : 294