निती आयोग

अटल इनोव्हेशन मिशन कडून भारत-ऑस्ट्रेलिया चक्राकार अर्थव्यवस्था (अपव्यय टाळून वस्तूंचा पुनर्वापर करणारी अर्थव्यवस्था) हॅकेथॉनचे आयोजन

Posted On: 26 OCT 2020 7:36PM by PIB Mumbai

 

अटल इनोव्हेशन मिशनने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था,सिसीरोच्या सहकार्याने 7 आणि 8 डिसेंबरला चक्राकार अर्थव्यवस्था (अपव्यय टाळून वस्तूंचा पुनर्वापर करणारी अर्थव्यवस्था) या विषयावर भारत- ऑस्ट्रेलिया चक्राकार अर्थव्यवस्था हॅकेथॉन (आय एसीई)चे आयोजन केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये  चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कल्पक मार्ग शोधण्याच्या दृष्टीने  उभय देशांच्या पंतप्रधानांमध्ये 4 जून रोजी झालेल्या आभासी परिषदेत या हॅकेथॉनची संकल्पना निर्माण झाली.

यामध्ये दोन्ही देशांचे प्रतिभावान विद्यार्थी, स्टार्ट अप आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कल्पक तंत्रज्ञान उपाय ओळखून त्यांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

या हॅकेथॉनच्या महत्वाच्या संकल्पना अशा आहेत-

- वाया जाणारे पॅकेजींग कमी व्हावे यासाठी नव कल्पना

- अन्न पुरवठा साखळीतली नासाडी टाळण्यासाठी नव कल्पना

-प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी संधी निर्माण करणे

 - महत्वाचे उर्जा धातू आणि ई-कचरा यांचा पुनर्वापर

निवडण्यात आलेले विद्यार्थी, स्टार्ट अप/ एमएसएमई यांना हॅकेथॉनसाठी संधी देण्यात येईल,त्यानंतर प्रत्येक संकल्पनेसाठी, प्रत्येक देशातून  दोन विजेत्यांची( एक विद्यार्थी आणि एक स्टार्ट अप/ एमएसएमई) 11 डिसेंबरला  बक्षीस समारंभात  घोषणा करण्यात येईल.

चक्राकार अर्थव्यवस्थेच्या  आव्हानांची दखल घेऊन  वाया जाणाऱ्या  गोष्टी केवळ टाळूनच नव्हे तर त्यांचा पुनर्वापर करणाऱ्या उपाय निर्मितीच्या शोधात असल्याचे अटल इनोव्हेशन मिशन आणि नीती आयोगाचे अतिरिक्त सचिव आर रामानन यांनी या हॅकेथॉनची सुरवात करताना सांगितले.

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दशकांपासून द्विपक्षीय संबंध असून उभय देशातल्या सहकार्याने अनेक क्षेत्रात लक्षणीय परिणाम झाल्याचे सिसिरोचे भू आणि जल विभाग प्रमुख डॉ पॉल बेर्टेच यांनी सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया एकत्र येऊन मानवजातीच्या इतिहासातल्या या सर्वात आव्हानात्मक काळात संशोधन आणि विकास प्रयत्नांत मोलाची भर घालू शकतात असे ते म्हणाले.

दीर्घावधीत चक्राकार अर्थव्यवस्था  मॉडेल अधिक रोजगार आणि उच्च विकास दर देऊ शकेल असे डॉ  हेन्झ यांनी सांगितले. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, नवोउन्मेशाला चालना मिळून पर्यावरणविषयक मोठा फायदाही यामुळे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपला  आर्थिक विकास पर्यावरण सुसंगत आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी हा महत्वाचा उपक्रम असल्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ  राजीव कुमार यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाचा संशोधन आणि विकासविषयक पाया आणि भारताचे प्रमाण आणि फारसे खर्चिक नसणारे नवोन्मेश यांचा मेळ महत्वाचा असल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी अधोरेखित केले.

पारितोषिक विजेत्या भारतीय विद्यार्थी आणि  स्टार्ट अप/एमएसएमई संघाला  अनुक्रमे 2 लाख आणि 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.त्याच बरोबर हॅकेथॉननंतर उत्पादन विकासाची संधीही उपलब्ध होईल.

पारितोषिक विजेत्या ऑस्ट्रेलियन विद्यार्थ्याला 3500 ऑस्ट्रेलियन डॉलर्स आणि विजेत्या ऑस्ट्रेलियन स्टार्ट अप/एमएसएमई संघाला 9500 ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे  पारितोषिक देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. इच्छुक  http://aimapp2.aim.gov.in/iace/.   द्वारेही अर्ज करू शकतात.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667656) Visitor Counter : 249