आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोरोनामुक्तांच्या एकूण संख्येने ओलांडला 50 लाखांचा महत्त्वपूर्ण टप्पा


गेल्या फक्त 11 दिवसांत यापैकी 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत 5 पटींपेक्षा अधिक

Posted On: 28 SEP 2020 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर  2020

 

भारतातील कोरोनामुक्त व्यक्तींच्या संख्येने आज 50 लाखांचा महत्त्वाचा टप्पा पार केला (50,16,520).

कोविडमधून बरे होणाऱ्या रुग्णांची रोजची संख्या मोठी असल्याने, कोरोनामुक्त व्यक्तींची दररोज मोठ्या संख्येने नोंद करण्याचा भारताचा शिरस्ता कायम आहे. देशात गेल्या चोवीस तासांत 74,893 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्तीचे प्रमाण अतिशय उच्च असून, एका दिवसात 90,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाल्याची कामगिरीही भारताने नोंदविली आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत 5 पटींपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या दरात होणाऱ्या वाढीचे प्रमाणही सातत्याने वाढत असल्याने, बरे झालेल्यांच्या संख्येत एका महिन्यात जवळपास 100% इतकी वाढ नोंदविली गेली आहे.

रुग्ण बरे होण्याचा देशातील दर आणखी वाढून 82.58% इतका झाला आहे.

15 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुक्तीचा दर राष्ट्रीय पातळीवरील सरासरी दरापेक्षा अधिक आहे.

नव्याने कोरोनामुक्त झालेल्यांपैकी 73% व्यक्ती, पुढील दहा राज्यांमधील आहेत- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, केरळ, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पंजाब.

कोरोनातून नव्याने बरे झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 13,000 इतकी आहे.

जून 2020 मध्ये कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख होती, त्यानंतर हे प्रमाण वेगाने वाढत गेले आहे. गेल्या फक्त 11 दिवसांत 10 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी एकत्रितपणे आणि काळजीपूर्वक उचललेल्या प्रभावी पावलांमुळेच ही कौतुकास्पद कामगिरी करण्यात यश आले आहे. वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, प्रमाणित उपचारप्रणालीच्या प्रोटोकॉलचे पालन आणि डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी, तसेच आघाडीच्या कोविडयोद्ध्यांनी समर्पणाच्या भावनेतून केलेले निष्ठापूर्वक प्रयत्न यामुळे सरकारच्या सर्वांगीण प्रयत्नांना उत्तम जोड मिळाली आहे.

कोरोनातून बरे झालेल्यांपैकी 78% व्यक्तींची नोंद 10  राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेली दिसते.

कोरोनामुक्त व्यक्तींची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असून त्याखालोखाल आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्येही मोठी संख्या नोंदविली गेली आहे.

गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाचे 82,170 नवे रुग्ण नोंदविले गेले आहेत.

या नव्या रुग्णांपैकी 79% रुग्ण दहा राज्यांमध्ये एकवटले गेले आहेत. महाराष्ट्रात 18,000 पेक्षा अधिक, तर कर्नाटकात 9,000 पेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

गेल्या चोवीस तासांत 1,039 व्यक्ती कोरोनामुळे दगावल्या.

नव्याने नोंदल्या गेलेल्या या मृत्यूंपैकी 84% मृत्यू, 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदले गेले आहेत. काल नोंदलेल्यापैकी 36% म्हणजे 380 मृत्यू महाराष्ट्रात झाले, तर त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि कर्नाटकात अनुक्रमे 80 आणि 79 जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले.

उचित शारीरिक अंतराच्या नियमाचे काटेकोर पालन, हातांची नियमित स्वच्छता, श्वासोच्छवासविषयक योग्य आचरण आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क/ चेहरा झाकून घेणारे आवरण याचा वापर- या सर्व गोष्टींचे पालन करण्याविषयीची दक्षता पुनःपुन्हा सांगण्यात येत आहे.  

 

     

U.Ujgare/J.Waishampayan/P.Malandkar  

                                                                                                                        

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659737) Visitor Counter : 177