पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून गोष्टी सांगण्याचे महत्त्व अधोरेखित

Posted On: 27 SEP 2020 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  27 सप्टेंबर  2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमात गोष्टी सांगण्याबाबत चर्चा केली आणि याचे महत्त्व अधोरेखित केले. गोष्टींचा इतिहास हा मानवी संस्कृती इतकाच प्राचीन असल्याचे त्यांनी नमूद केले आणि जिथे आत्मा आहे तिथे कथा आहे, असे सांगितले. घरातील ज्येष्ठ सदस्यांकडून गोष्टी सांगण्याच्या परंपरेचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. प्रवासादरम्यान अनेक बालकांशी संवाद साधायची संधी मिळाल्यावर त्यांना असे दिसून आले की या बालकांचे आयुष्य विनोदांनी खूप मोठ्या  प्रमाणावर व्यापून टाकले होते मात्र, त्यांना गोष्टी या प्रकारांची फारशी माहिती नव्हती. देशातील गोष्टी सांगण्याची  किंवा किस्सागोई अर्थात किस्से कथन करण्याच्या समृद्ध परंपरेबाबत पंतप्रधानांनी सांगितले की भारताने हितोपदेश आणि पंचतंत्राच्या परंपरेचे संवर्धन केले आहे, ज्या गोष्टी प्राणी, पक्षी आणि पऱ्यांच्या काल्पनिक विश्वातून ज्ञान देण्याचे काम करत असतात. कथा या धार्मिक गोष्टी सांगण्याच्या प्राचीन प्रकाराचा त्यांनी तमिळनाडू आणि केरळमधील गोष्ट आणि संगीत यांचे मिश्रण असलेल्या विल्लू पाटचे उदाहरण देत उल्लेख केला आणि कठपुतली या अतिशय सचेतनभाव असलेल्या पंरपरेबाबत सांगितले. विज्ञान आणि काल्पनिक विज्ञान यावर आधारित कथाकथनाची लोकप्रियता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. गाथास्टोरी डॉट इन सह किस्सागोई या कला प्रकाराला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली.  आयआयएमचे माजी विद्यार्थी अमर व्यास चालवत असलेले गाथास्टोरी डॉट इन, वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी मराठीतून सुरू केलेला उपक्रम, चेन्नईच्या श्रीविद्या वीर राघवन यांच्याकडून आपल्या संस्कृतीशी संबंधित गोष्टींना लोकप्रिय करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी होणारे प्रयत्न, गीता रामानुजन यांचा कथालय डॉट ओआरजी हा उपक्रम, इंडियन स्टोरी टेलिंग नेटवर्क आणि बंगळूरुमध्ये महात्मा गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या कथांबाबत जिव्हाळा असलेल्या विक्रम श्रीधर यांच्याकडून सुरू असलेले प्रयत्न यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी अपर्णा अत्रेय आणि बंगळूरु स्टोरी टेलिंग सोसायटीच्या इतर सदस्यांशी यावेळी संवाद साधला. या समूहाने यावेळी राजा कृष्णदेव राय आणि त्यांचे मंत्री तेनाली राम यांची एक गोष्ट देखील या संवादादरम्यान सांगितली. महापुरुष आणि महान स्त्री व्यक्तिमत्वांच्या आयुष्याचा प्रभाव त्यांच्या कथांच्या माध्यमातून नव्या पिढीवर निर्माण करण्यासाठी उपाय शोधण्याचे आवाहन त्यांनी गोष्टी सांगणाऱ्यांना केले. कथाकथनाची कला प्रत्येक घरात लोकप्रिय झाली पाहिजे आणि मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे हा सार्वजनिक जीवनाचा एक भाग बनला पाहिजे, असे ते म्हणाले. कुटुंबातील सदस्यांनी दर आठवड्याला करुणा, संवेदनशीलता, शौर्य, त्याग, धाडस इत्यादींसारखे विषय निवडले पाहिजेत आणि प्रत्येक सदस्याने त्या विषयावर एक गोष्ट सांगितली पाहिजे.

आपला देश लवकरच आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीचे 75वे वर्ष साजरे करणार आहे असे त्यांनी सांगितले आणि कथाकथनकारांनी आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणादायी घटनांची माहिती गोष्टींच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. 1857 ते 1947 पासून घडलेल्या प्रत्येक मोठ्या आणि लहान घटनांची माहिती गोष्टींच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी सुचवले.

 

B.Gokhale/S.Patil/ P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659555) Visitor Counter : 159