पंतप्रधान कार्यालय

धर्म चक्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 04 JUL 2020 6:17PM by PIB Mumbai

 

आदरणीय राष्ट्रपती राम नाथ कोविंद जी, इतर मान्यवर अतिथीगण. सर्वात प्रथम आपल्या सर्वांना आषाढ पौर्णिमेनिमित्त सदिच्छा देवून मी आपलं भाषण सुरू करू इच्छितो. आषाढामध्ये येणा-या पौर्णिमेला ‘गुरू पौर्णिमा’ या नावानंही ओळखलं जातं. आजचा दिवस हा ज्यांनी आपल्याला शिकवलं, त्या गुरूंचे स्मरण करण्याचा दिवस आहे. या भावनेबरोबरच आपण भगवान बुद्ध यांना श्रद्धांजली देवू या.

आजच्या दिनी मंगोलियाच्या सरकारला मंगोलियन कंजूरच्या प्रती सादर करण्यात येत आहेत, त्याबद्दल मला विशेष आनंद होत आहे. मंगोलियामध्ये मंगोलियन कंजूरचा अतिशय सन्मान केला जातो. बहुतांश मठांमध्ये याची एक प्रत असते.

मित्रांनो, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आठ शिकवणुकीमुळे अनेक समाज आणि राष्ट्रांना आपल्या कल्याणाचा मार्ग दाखवला आहे. यामध्ये करूणा आणि दया यांना अतिशय महत्व देण्यात आलं आहे. भगवान बुद्धांचा उपदेश आपल्या विचार आणि आचार अशा दोन्हीमध्ये साधेपणा असावा, याचे महत्व विशद करणारा आहे. साधेपणाचे विशेष कौतुक बुद्धांनी केले आहे. बौद्ध धर्म आपल्याला सर्वांचा आदर करण्याची शिकवण देतो. लोकांविषयी आदर, गरीबांविषयी आदराची भावना, महिलांचा सन्मान करणे. शांती आणि अहिंसा यांचा सन्मान करणे, याचा उपदेश मिळतो. यामुळेच बौद्ध धर्माचे उपदेश म्हणजे या शाश्वत, चिरस्थायी ग्रहाचे साधन आहेत.

मित्रांनो, भगवान बुद्धांनी सारनाथमध्ये आपल्या पहिल्या उपदेशामध्ये आणि त्यानंतर दिलेल्या उपदेशांमध्ये दोन गोष्टींचा आवर्जुन उल्लेख केला आहे. त्या म्हणजे - आशा आणि उद्देश! त्यांना या दोन्हींच्यामध्ये अगदी सखोल, अतूट संबंध जाणवला होता. आशेतूनच उद्देशाची भावना निर्माण होते. भगवान बुद्धांसाठी ही गोष्ट मानवाला होणारी पीडा, त्रास दूर करण्यासारखे होते. सद्यस्थितीमध्ये या दोन्हीतला संबंध आपल्याला समजून घेतला पाहिजे आणि आपण काहीही, अगदी अशक्य वाटणारीही गोष्ट करू शकतो; ती करावीच, यासाठी आशा पल्लवीत केल्या पाहिजेत.

मित्रांनो, 21 व्या शतकाविषयी मी खूप आशावादी आहे. ही आशा, अशी उमेद मला युवा मित्रांकडून, आपल्या तरूण पिढीकडून मिळते. आशा, नवाचार आणि करूणा कशा प्रकारे दुःखं दूर करू शकतात, हे पहायचं असेल आणि जर आपण याकडे एक चांगले उदाहरण म्हणून पाहू इच्छित असाल, तर आमच्या स्टार्ट-अप क्षेत्राकडे एकदा जरूर एक नजर टाकली पाहिजे. अतिशय प्रतिभावान युवक जागतिक समस्यांवर तोडगे, समाधान शोधत आहेत. स्टार्ट-अप क्षेत्राच्या वृद्धीसाठी भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

भगवान बुद्धांच्या विचारांबरोबर आपण कायम जोडलेले असावे, असा आग्रह मी आपल्या युवा मित्रांना करतो. भगवान बुद्धांचे विचार त्यांना सदोदित प्रेरणा देणारे आणि पुढील वाटचालीत दिशादर्शक म्हणून उपयोगी ठरणारे आहेत. काहीवेळा तर बुद्धांचे विचार आपल्या मनाला शांत करतील आणि आनंदही देतील. वास्तविक, भगवान बुद्धांचा ‘‘अपः दीपो भवः’’ हा उपदेश म्हणजे आपण स्वतःच आपले मार्गदर्शक आहात आणि हा एक स्व-व्यवस्थापनाचा अद्भूत पाठ आहे.

मित्रांनो, आज संपूर्ण जग विलक्षण आव्हानांशी सामना करीत आहे. या संकटांचे स्थायी समाधान भगवान बुद्धांच्या आदर्शातून मिळू शकतात. भगवान बुद्धांचे आदर्श त्या काळामध्ये जितके प्रासंगिक होते तितकेच ते आजच्या वर्तमानातही लागू पडतात- आजही प्रासंगिक ठरतात. इतकंच नाही तर भविष्यातही प्रासंगिक राहतील.

मित्रांनो, बौद्ध वारसा लाभलेल्या स्थानांबरोबर अधिकाधिक लोकांनी जोडले जावे, ही तर काळाची गरज-मागणी आहे. आपल्या भारतामध्ये बौद्ध धर्माशी संबंधित अनेक स्थळे आहेत. माझा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहराला लोक कोणत्या रूपात जाणतात, हे आपल्याला माहिती आहे का? ‘सारनाथचे गृहशहर’ या रुपात वाराणसीची ओळख सांगितली जाते. बौद्ध स्थाने एकमेकांशी जोडण्याकडे आपण विशेष लक्ष देवू इच्छितो. कुशीनगरचे विमानतळ ‘‘आंतरराष्ट्रीय विमानतळ’’ करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यामुळे अनेक लोकांना, तीर्थयात्रेकरूंना आणि पर्यटकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये आर्थिक विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत.

भारत आपली प्रतीक्षा करीत आहे!!

मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. भगवान बुद्धांच्या विचारांनी, उज्ज्वल भविष्यासाठी एकजूट व्हावे आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने आपल्याला खूप काही चांगले करण्याची प्रेरणा मिळावी.

धन्यवाद!

खूप खूप धन्यवाद !!

***

B.Gokhale/ S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636456) Visitor Counter : 254