पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी 'आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान' चे केले उद्‌घाटन

Posted On: 26 JUN 2020 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जून 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानचे उद्‌घाटन केले. या अंतर्गत स्थलांतरित कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाईल.

या प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोविड -19 महामारीमुळे उद्‌भवलेल्या अडचणींना मागे टाकण्यास प्रत्येकजण सक्षम होईल. जोपर्यंत लस सापडत नाही तोपर्यंत दो गज की दूरी अर्थात सुरक्षित अंतर राखणे, मास्कने चेहरा झाकणे हे सर्वात चांगले प्रतिबंधात्मक उपाय आहेत, यावर त्यांनी भर दिला.

या महामारी दरम्यान उत्तर प्रदेशने ज्या पद्धतीने आपत्तीचे संधीत रूपांतर केले, ज्या प्रकारे लोक सहभागी झालेत्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, इतर राज्यांनाही आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानमधून बरेच काही शिकायला मिळेल आणि त्यापासून ते प्रेरित होतील. 

जगभरात कोरोनाचे असे मोठे संकट  असताना उत्तर प्रदेशने दाखवलेल्या धैर्य आणि शहाणपणाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ते म्हणाले की ज्या पद्धतीने राज्याने ही परिस्थिती हाताळली,आणि त्यात यश मिळवले ते अभूतपूर्व आहे आणि प्रशंसनीय आहे.

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील डॉक्टर, निमवैद्यकीय, स्वच्छता कर्मचारी, पोलिस, आशा, अंगणवाडी सेविका, बँका आणि टपाल कार्यालये, वाहतूक सेवा, कामगार यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी शेकडो श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची सोय करुन  परप्रांतीय क्षेत्रात कामधंदा करणाऱ्या राज्यातील कामगारांना परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचे  कौतुक केले.

ते म्हणाले की, गेल्या काही आठवड्यात देशभरातून 30 लाखाहून अधिक स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावी परतले आहेत .

पंतप्रधान म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य जाणले आणि त्यांच्या सरकारने या परिस्थितीच्या  पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर काम केले.

उत्तर प्रदेशातील गरीबांची उपासमार होणार नाही यासाठी राज्य सरकारने केलेल्या अभूतपूर्व कार्याची  पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीबआणि स्थलांतरित कामगारांना मोफत शिधा देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तातडीने कृती केली. शिधापत्रिका नसलेल्यांना देखील शिधावाटप करण्यात आले. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील 75 लाख गरीब महिलांच्या जनधन खात्यातही सुमारे 5 हजार कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की भारताला आत्मनिर्भरच्या मार्गावर जलद गतीने घेऊन जाण्यात तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियानातसुद्धा  उत्तर प्रदेश अग्रेसर आहे. ते म्हणाले की गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत कामगारांचे उत्पन्न  वाढवण्यासाठी अनेक कामे खेड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहेत. यापैकी सुमारे 60 लाख लोकांना ग्रामीण विकासाशी संबंधित योजनांतर्गत एमएसएमईमध्ये रोजगार दिला जात आहे असे ते म्हणाले. याशिवाय हजारो लोकांना स्वयंरोजगार पुरवण्यासाठी मुद्रा योजनेंतर्गत 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

मोदी म्हणाले की, आत्मनिर्भर रोजगार अभियानांतर्गत देशभरात अशा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगांचे समूह तयार केले जातील तेव्हा उत्तर प्रदेशाला मोठा फायदा होईल.

पंतप्रधानांनी कृषी क्षेत्रात नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारणा अधोरेखित केल्या. यामध्येशेां शेतकर्ना कायद्यांतर्गत विविध बंधनातून मुक्त केले गेले.  ते म्हणाले की, आता शेतकरी भारतात कुठेही विक्री करण्यासाठी मोकळे आहेत आणि ते आपला भाव ठरवू शकतात.

पंतप्रधान म्हणाले की  पशुधनासाठी अनेक नवीन पावले उचलली जात आहेत. पशुधन आणि दुग्ध  क्षेत्रासाठी 15 हजार कोटी रुपयांचा विशेष पायाभूत सुविधा निधी तयार करण्यात आला आहे.

पंतप्रधानांनी कुशीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्याचाही उल्लेख केला. बौद्ध स्थळांच्या यात्रेला   प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे पूर्वांचलमधील हवाई संपर्क बळकट होईल आणि महात्मा बुद्धाचे देश-विदेशातील कोट्यवधी  भाविक उत्तर प्रदेशात सहज पोहोचू शकतील.

पंतप्रधान म्हणाले की केवळ तीन वर्षात गरीबांसाठी 30 लाखाहून अधिक पक्की घरे बांधण्यात आली आहेत, उत्तर प्रदेश उघड्यावरील शौचापासून मुक्त घोषित करण्यात आले आहे, उत्तर प्रदेश सरकारने 3 लाख तरुणांना पारदर्शक पद्धतीने सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत.

मोदी यांनी राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि मागील 3 वर्षात पूर्वांचल प्रदेशात एन्सेफलायटीसच्या रुग्णांची संख्या 90  टक्क्यांनी कशी कमी झाली याचा उल्लेख केला.

वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या अभूतपूर्व सुधारणांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

पंतप्रधानांनी गोंडा येथील बचतगटाचे नेतृत्व करणाऱ्या विनीता पाल, बहराइच जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी टिळक राम, संत कबीर नगर जिल्ह्यातील उद्योजक अमरेंद्र कुमार यांच्यासारख्या  विविध लाभार्थी आणि हितधारकांशी त्यांच्या अनुभवांबाबत संवाद साधला. त्यांनी मुंबईहून परतलेले कुर्बान अली, गोरखपूर जिल्ह्यातून आलेले नागेंद्र सिंह, जालौन  जिल्ह्यातील दीपू यांच्यासारख्या विविध स्थलांतरित कामगारांशी देखील संवाद साधला.

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634532) Visitor Counter : 274