पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान शुक्रवार 26 जून रोजी ‘आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान’ सुरु करणार

Posted On: 25 JUN 2020 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2020

कोविड-19 महामारीचा सामान्य लोक आणि विशेषत: स्थलांतरित मजुरांवर विपरीत परिणाम झाला आहे. मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर अनेक राज्यात परत आले आहेत. स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण मजुरांना मूलभूत सुविधा आणि उदरनिर्वाहाचे साधन पुरवण्याची गरज यामुळे कोविड -19 ला आळा घालण्याचे आव्हान अधिक तीव्र झाले आहे. विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. देशाच्या मागास भागात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देतानाच रोजगार निर्मितीसाठी 20 जून रोजी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू करण्यात आले.

उत्तर प्रदेशात सुमारे तीस लाख स्थलांतरित मजूर परत आले आहेत. उत्तर प्रदेशात 31 जिल्ह्यांमध्ये 25 हजारांहून अधिक परत आलेले स्थलांतरित मजूर आहेत. यात पाच आकांक्षी  जिल्ह्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश सरकारने आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानहा अभिनव उपक्रम  राबविण्याची संकल्पना मांडली ज्यात उद्योग आणि इतर संस्थांसह भागीदारी निर्माण  करताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे कार्यक्रम एकत्रपणे राबविले जातील.  हे अभियान रोजगार उपलब्ध करून देणे, स्थानिक उद्योजकतेला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक संस्था व इतर संस्थांशी भागीदारी निर्माण करण्यावर प्रामुख्याने केंद्रित आहे.

पंतप्रधान 26 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे या अभियानाची सुरूवात करणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील संबंधित मंत्रालयांचे मंत्रीदेखील आभासी उद्‌घाटनात सहभागी होतील. पंतप्रधान उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्यांच्या ग्रामस्थांशी संवाद साधतील. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करत उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यातील गावे सामायिक सेवा केंद्रे आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून  या कार्यक्रमात सहभागी होतील.

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634440) Visitor Counter : 187