पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी  राजकीय पक्षांच्या नेत्यांशी साधला संवाद


प्रत्येकाचे प्राण वाचवण्याला सरकारचे प्राधान्य -पंतप्रधान

आजच्या चर्चेतून विधायक आणि सकारात्मक राजकारणाचे प्रतिबिंब , भारताचा मजबूत लोकशाही पाया आणि सहकारी संघराज्याची भावनेला अधिक बळकटी मिळाली : पंतप्रधान

देशातील परिस्थिती ‘सामाजिक आणीबाणी’ सारखी आहे; त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज असून आपण दक्ष रहायला हवे : पंतप्रधान

राज्ये, जिल्हा प्रशासन व तज्ज्ञांनी विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याची  केली सूचना -पंतप्रधान

नेत्यांनी दिले अभिप्राय, धोरणात्मक उपाययोजना सुचवल्या , लॉकडाऊन आणि पुढील वाटचालीबाबत केली चर्चा

Posted On: 08 APR 2020 5:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संसदेतील राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जग सध्या कोविड -19  च्या गंभीर आव्हानाचा सामना करत आहे. सध्याची परिस्थिती मानवजातीच्या इतिहासामधील एक युग बदलणारी घटना आहे आणि त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी आपण विकसित होण्याची गरज आहे. या महामारीच्या विरोधातील लढ्यात केंद्राबरोबर एकत्रितपणे काम करण्याच्या राज्य सरकारांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या लढाईत संयुक्त आघाडी उघडण्यासाठी देशातील सर्व राजकारण्यांनी एकत्रित येऊन विधायक आणि सकारात्मक राजकारण केल्याचे सम्पूर्ण देशाने पाहिले, असे त्यांनी नमूद केले. या संकटाला सामोरे जाताना  प्रत्येक नागरिक आपुलकी, शिस्त, समर्पण आणि बांधिलकीच्या भावनेने देत असलेल्या योगदानाचे, मग ते सामाजिक अंतर, जनता कर्फ्यू किंवा लॉकडाउनचे पालन असेल, या सर्व प्रयनांचे त्यांनी कौतुक केले.

संसाधनांच्या कमतरतेच्या रूपाने उदयोन्मुख परिस्थितीचा परिणाम पंतप्रधानांनी अधोरेखित केला. तरीही भारत अद्याप  विषाणूच्या प्रसाराच्या वेगावर नियंत्रण ठेवणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक आहे. परिस्थिती सतत बदलत राहते, त्यामुळे प्रत्येकाने कायम दक्ष राहणे आवश्यक आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

देशातील परिस्थिती ‘सामाजिक आणीबाणी ’ सारखीच असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशाला कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत आणि सतत दक्ष  राहणे आवश्यक आहे. ते म्हणाले की अनेक राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि तज्ञांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची सूचना केली आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की या बदलत्या परिस्थितीत देशाने आपली कार्यसंस्कृती आणि कार्यशैलीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाचा जीव वाचवण्यास सरकारचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. देश कोविड -19 मुळे उद्भवलेल्या गंभीर आर्थिक आव्हानांना सामोरा जात आहे आणि सरकार या आव्हानांवर  मात करण्यासाठी वचनबद्ध आहे असे ते म्हणले.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभ वितरित करण्याच्या सद्यस्थितीबरोबरच उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सविस्तर सादरीकरण केले.

या बैठकीबद्दल नेत्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले, त्यांनी  वेळेवर  केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आणि या  संकटाच्या वेळी संपूर्ण देश त्यांच्यामागे एकजुटीने उभा असल्याचे सांगितले. त्यांनी आरोग्य कर्मचार्‍यांचे आरोग्य आणि मनोबल वाढविणे, चाचणी सुविधा वाढविणे, छोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करण्याची गरज तसेच उपासमार आणि कुपोषणाच्या आव्हानांचा सामना करण्याबाबत चर्चा केली. या महामारीविरोधातल्या लढ्यात देशाच्या क्षमता वाढविण्यासाठी आर्थिक आणि अन्य  धोरणात्मक उपायांबाबतही चर्चा झाली. लॉकडाउन वाढविण्याबाबत आणि लॉकडाउन संपल्यानंतर टप्प्याटप्प्याने मार्ग खुले करण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या.

विधायक सूचना आणि अभिप्रायाबद्दल पंतप्रधानांनी नेत्यांचे आभार मानले आणि या लढ्यात सरकारला मदत करण्याप्रति त्यांची बांधिलकी देशाचा लोकशाही पाया आणि  सहकारी संघराज्य भावनेला बळकटी देते असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील राजकीय पक्षांचे नेते या संवादात सहभागी झाले होते.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor



(Release ID: 1612268) Visitor Counter : 270