रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेने 1 दशलक्षाहून अधिक गरजू व्यक्तींना शिजविलेले गरम अन्न मोफत पुरविले

कोविड – 19 लॉकडाऊनच्या काळात 313 ठिकाणी अन्न वाटप

Posted On: 11 APR 2020 4:59PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

कोविड 19 लॉकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वेच्या विविध रेल्वेसेवांमधील म्हणजेच आयआरसीटीसी, आरपीएफ, विभागीय रेल्वे आणि रेल्वेचे अन्य कर्मचारी सामाजिक कार्याची बांधिलकी कायम ठेवत निःस्वार्थीपणे आणि ऐच्छिकपणे गरजू लोकांना गरम अन्न पुरविण्यासाठी अथक काम करीत आहेत. आयआरसीटीसीच्या स्वयंपाकघरांमधून, आरपीएफच्या मदतीने आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने 28 मार्च 2020 पासून रेल्वेच्या वतीने दुपारच्या जेवणासाठी शिजवलेले अन्न, कागदी पत्रावळ्या आणि रात्रीच्या जेवणासाठी अन्नाची पाकिटे मोठ्या प्रमाणावर पुरविण्यात येत आहेत.

अन्न वितरण उपक्रम 10.2 लाखापर्यंत पोहोचून आज 1 दशलक्षाचा टप्पा ओलांडला आहे. गरीब, लहान मुले, कूली, स्थलांतरित मजूर, निराधार व्यक्ती आणि अन्नाच्या शोधात असलेल्या प्रत्येकाला रेल्वेस्थानकांच्या आसपास आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात हे अन्न वितरित केले जात आहे. तर, गरजू लोकांना अन्न देताना सामाजिक अंतर आणि स्वच्छता पाळली जाण्याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे.

आयआरसीटीसीच्या नवी दिल्ली, बंगळुरू, हुबळी, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, भुसावळ, हावडा, पटना, गया, रांची, कटिहार, दिनदयाळ उपाध्याय नगर, बलासोर, विजयवाडा, खुर्दा, काटपाडी, तिरुचिरापल्ली, धनबाद, गुवाहाटी, समस्तीपूर, प्रयागराज, इटारसी, विशाखापट्टणम, चेंगलपट्टू, पुणे, हाजीपूर, रायपूर आणि टाटानगर येथील स्वयंपाकघरांमधून तसेच विविध विभागांमधून जसे की, उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिण आणि दक्षिण मध्य विभागांमधून जवळपास 10.2 लाख जणांना   शिजवलेले अन्न काल 10 एप्रिल 2020 पर्यंत वितरित करण्यात आले आहे. यापैकी 60 टक्के शिजवलेले अन्न आयआरसीटीसीकडून पुरविण्यात आले आहे, साधारण 2.3 लाख जणांना अन्न आरपीएफच्या स्वतःच्या माध्यमातून पुरविण्यात आले आणि जवळपास 2 लाख जणांना अन्न रेल्वेबरोबर काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांनी पुरविले आहे.

अन्नाचे वितरण आरपीएफ, जीआरपी, झोनचे व्यावसायिक विभाग, राज्य सरकारे आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने केले जात आहे. जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या भागातील गरजू लोकांच्या गरजा भागविण्यासाठी स्टेशन परिसराच्या पलिकडेही आयआरसीटीसीच्या कामाचा प्रसार वाढविण्यासाठी संबंधित विभागांचे जीएम/डीआरएम देखील आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत.

आयआरसीटीसीच्या, स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या स्वयंपाकघरांमधून तयार होणारे अन्न गरजू लोकांपर्यंत वितरित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाची या कामात मोठी भूमिका आहे.  74 ठिकाणी 5419 लोकांपर्यंत 28 मार्चला अन्न पुरवठा सुरू केल्यापासून

 अन्न वितरित करण्याचा हा आकडा दररोज वाढतच गेला आहे. कालपर्यंत अंदाजे 6.5 लाख जणांना  आरपीएफच्या माध्यमातून 313 ठिकाणी  अन्न वितरीत करण्यात आले आहे. अन्नाच्या वितरणामध्ये आयआरसीटीसीने तयार केलेल्या काही पदार्थ देखील असतात.

रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योगमंत्री श्री पियूष गोयल यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना गरजू लोकांना अन्न आणि इतर मदतीसाठी केलेले प्रयत्न आणखी वाढविण्यास सांगितले आहे. याबरोबरच आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान सहायता निधीसाठी 20 कोटी रुपये जमा केले आहेत. 2019 - 20 च्या सीएसआर फंडातून 1.5 कोटी रुपये, 2020 – 21 च्या सीएसआर फंडातून 6.5 कोटी आणि देणगी 12 कोटी रुपये दिले आहेत. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनीही या योगदानाचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट केले होते की, ``कोरोना व्हायरसचा पराभव करण्यातील योगदानाबद्दल मी @IRCTC आयआरसीटीसी अधिकारी कुटुंबाचे कौतुक करतो. #IndiaFightsCorona.

 

G.Chippalkatti/S.Shaikh/P.Kor



(Release ID: 1613333) Visitor Counter : 276