ग्रामीण विकास मंत्रालय
कौशल्य ते राष्ट्रीय सन्मान : भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी डी डी यू -जी के वाय मधील सहा युवक विशेष अतिथी म्हणून निमंत्रित
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2026 4:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026
ग्रामीण कौशल्य विकासाचा परिवर्तनकारी प्रभाव अधोरेखित करणारी एक महत्त्वपूर्ण बाब ठरलेली, 'दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने'चे (डी डी यू - जी के वाय) सहा लाभार्थी - जे पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओदिशा, मिझोराम आणि नागालँडचे प्रतिनिधित्व करतात - त्यांना 15 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
या निवडलेल्या लाभार्थ्यांना लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळा आणि राष्ट्रपती भवनात भारताच्या माननीय राष्ट्रपती महोदयांनी आयोजित केलेल्या प्रतिष्ठित घरगुती स्नेहभोजनास उपस्थित राहण्यासाठी इंडिया पोस्टद्वारे अधिकृत निमंत्रण पत्रे प्राप्त झाली आहेत. हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कामगिरीची दखलच नव्हे, तर कौशल्ये, शाश्वत उपजीविका आणि सन्मानजनक रोजगार यांद्वारे डी डी यू - जी के वाय ने घडवून आणलेल्या परिवर्तनाची राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेली दखल म्हणून सिद्ध होत आहे.

हे तरुण लाल किल्ल्यावरील राष्ट्रीय सोहळ्यास उपस्थित राहतील आणि राष्ट्रपती भवनातील स्नेहभोजनात सहभागी होतील. या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमांमधील त्यांची उपस्थिती ही ग्रामीण कौशल्य विकास परिसंस्थेसाठी आणि डी डी यू -जी के वाय च्या माध्यमातून यशस्वी झालेल्या या तरुण गुणवंतांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.

डी डी यू -जी के वाय हा भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या 'दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान' (डी ए वाय-एन आर एल एम) अंतर्गत राबविला जाणारा, रोजगाराशी संलग्न एक प्रमुख कौशल्य विकास कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील गरीब युवकांना उद्योगांसाठी आवश्यक असलेली कौशल्ये तसेच राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे प्रदान करतो, तसेच त्यांना शाश्वत आणि सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो.

डी डी यू -जी के वाय च्या माध्यमातून देशभरातील ग्रामीण भागातील लाखो युवकांना उपजीविकेच्या दीर्घकालीन संधींशी जोडले गेले आहे. या कार्यक्रमामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनणे तसेच भारताच्या विकासगाथेत सक्रिय योगदान देणे शक्य झाले आहे.
या सहा लाभार्थ्यांना दिलेले निमंत्रण ही कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या आणि शाश्वत उपजीविकेला चालना देण्याच्या या योजनेच्या यशाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ओळख आहे. कौशल्य विकास म्हणजे केवळ रोजगार मिळवणे नव्हे, तर त्यापलीकडे झेप घेत ग्रामीण तरुणांसाठी सन्मानजनक करिअर, आर्थिक स्वातंत्र्य आणि अधिक सुरक्षित भविष्य घडविणे ठरत आहे, हे यातून दिसून येते.

निवडलेल्या लाभार्थ्यांची जिद्द आणि कठोर परिश्रम, तसेच संबंधित राज्य ग्रामीण उपजीविका मोहीमा (एस आर एल एम), प्रकल्प अंमलबजावणी संस्था (पी आय ए) आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांचे एकत्रित प्रयत्न या कामगिरीच्या माध्यमातून दिसून येतात.
हा सन्मान भारतातील लाखो ग्रामीण तरुणांना प्रेरणा देईल आणि कौशल्यांमुळे संधी निर्माण होतात, शाश्वत उपजीविकेमुळे स्वावलंबन येते आणि सक्षम तरुण 'विकसित भारता'च्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला गती देतात हा दृष्टिकोन अधिक सशक्त होईल.
नेहा कुलकर्णी/संदेश नाईक/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2293825)
आगंतुक पटल : 11