पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाला केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2026 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,9 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्नमधील मार्व्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित केले. विशेष आदराची भावना दर्शवत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतीय समुदायाने केलेल्या अगत्यशील स्वागताबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच, पंतप्रधान अल्बानीज यांच्या विशेष उपस्थितीबद्दल आणि भारतीय समुदायाच्या कल्याणासह भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांप्रती त्यांच्या दृढ वचनबद्धतेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या दशकात द्विपक्षीय भागीदारीमध्ये झालेली उल्लेखनीय प्रगती पंतप्रधानांनी अधोरेखित केली. दोन्ही अर्थव्यवस्थांमधील परस्पर पूरकतेमुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाला एक सुरक्षित, समृद्ध आणि सक्षम भागीदारीला आकार देणारे नैसर्गिक भागीदार बनले आहेत यावर त्यांनी भर दिला .
पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचे द्विपक्षीय संबंधांमधील योगदान अधोरेखित करताना, त्यांना दोन्ही देशांमधील 'जिवंत दुवा' असे संबोधले. त्यांनी नमूद केले की, हा समुदाय ऑस्ट्रेलियाच्या सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असतानाच त्याने आपली सांस्कृतिक परंपरा जपली आहे आणि स्थानिक लोकांसोबत आपली संस्कृती, जिव्हाळा व चैतन्य सामायिक करत आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांची मोठी संख्या आणि भारतात कॅम्पस सुरू करणाऱ्या ऑस्ट्रेलियन विद्यापीठांची वाढती संख्या या गोष्टींचा उल्लेख करत, ते म्हणाले की शिक्षण हा या द्विपक्षीय संबंधांचा एक अतिशय भक्कम आधारस्तंभ आहे.
पंतप्रधानांनी भारतात वेगाने होत असलेली प्रगती अधोरेखित केली जी सातत्यपूर्ण उच्च विकासदर, धोरणात्मक सुधारणा, डिजिटल क्रांती आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासावर आधारित आहे. त्यांनी नमूद केले की, देश दळणवळण तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर्स, स्मार्टफोन निर्मिती आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत संरक्षण सामग्रीची निर्यात यांसारख्या क्षेत्रांत मोठी प्रगती करत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भारताची लोकशाही ताकद आणि त्यासोबतच येथील प्रतिभा , तंत्रज्ञान व नवोन्मेष यामुळे जागतिक भागीदारांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. भारताचा दृष्टिकोन केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याचा नसून, आपल्या मित्रदेशांना आणि भागीदारांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आहे, यावरही त्यांनी भर दिला. 2047 पर्यंत 'विकसित भारत' उभारणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या कल्पना आणि अनुभवाच्या माध्यमातून योगदान देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी भारतीय समुदायाला केले. पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल [लिंक]
या कार्यक्रमाला विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, संशोधक, समुदाय नेते आणि सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी अशा विविध क्षेत्रांतील भारतीय समुदायातील सदस्य उपस्थित होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांचे वैशिष्ट्य असलेले इथल्या लोकांमधील गहिरे संबंध या मेळाव्यात पहायला मिळाले. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय वंशाचे सुमारे दहा लाख लोक राहत आहेत.
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2283040)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam