पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारत – कोरिया प्रजासत्ताक यांच्यात शाश्वततेच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत संयुक्त निवेदन

Posted On: 20 APR 2026 10:55PM by PIB Mumbai

भारत आणि कोरिया प्रजासत्ताक पुढे 'दोन्ही बाजू' म्हणून उल्लेख केला जाईल, त्या भारत प्रजासत्ताक आणि कोरिया प्रजासत्ताक यांनी हवामान बदल, सागरी आणि आर्क्टिक प्रश्नांवर व्यावहारिक सहकार्याच्या माध्यमातून जागतिक शाश्वतता आव्हानांना सामोरे जाण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्यावर सहमती व्यक्त केली आहे.
पर्यावरणपूरक राष्ट्र देश म्हणून, दोन्ही बाजूंनी पर्यावरणाच्या संदर्भात शाश्वत विकासासाठीच्या 2030 अजेंड्याची एकात्मिक पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, दोन्ही बाजूंनी पर्यावरणीय बाबी आणि हवामान बदलावर सहकार्याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये जमीन, हवा, पाणी, जैवविविधता आणि कचरा यांसारख्या नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनाचा समावेश आहे.


हवामान बदलाच्या समस्यांवर सहकार्य


नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आपला पाठिंबा तसेच पॅरिस कराराप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करत, दोन्ही बाजूंनी मानवता आणि निसर्ग यांच्या शाश्वततेसाठी धोका निर्माण करत असलेल्या अभूतपूर्व हवामान संकटाचा सामना करण्यासाठी हवामानबदल रोखण्यासाठीच्या कृतीवर प्रकर्षाने भर देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मान्य केले.
या संदर्भात, दोन्ही बाजूंनी पॅरिस कराराच्या कलम 6.2 अंतर्गत सहकार्याबाबतचा सामंजस्य करार (एमओसी) निष्कर्षाप्रत पोहोचल्याचे स्वागत केले. हा करार गुंतवणूक-चालित शमन प्रकल्पांसाठी सहयोगी दृष्टिकोन स्थापित करणारा, त्यांच्या संबंधित राष्ट्रीय निर्धारित योगदानाच्या पूर्ततेला प्रोत्साहन देणारा आणि हवामानसंबंधित कृतीबाबत त्यांची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणारा आहे. दोन्ही बाजू कार्बन बाजार, कलम 6.2  चा सहयोगाचा दृष्टिकोन, नवीकरणीय ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या अवलंबासह हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सहकार्याला प्रोत्साहन देतील.

पर्यावरणविषयक सहकार्य आणि शाश्वत विकास


पर्यावरणाप्रती जबाबदार राष्ट्रे म्हणून, भारत आणि कोरिया प्रजासत्ताक (आरओके) यांनी हवामान आणि पर्यावरण क्षेत्रातील सहकार्यासाठी सामंजस्य कराराच्या माध्यमातून संस्थात्मक सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरिया प्रजासत्ताक सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत (आयएसए) सामील झाल्याचे भारताकडून स्वागत करण्यात आले. कोरिया प्रजासत्ताकाच्या बाजूने भारताच्या ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट (जीजीजीआय) सदस्यत्वाचे स्वागत करण्यात आले.

महासागर आणि सागरी शाश्वतता

आर्थिक विकास, पर्यावरणाचा समतोल आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने असलेले महासागरांचे महत्त्व ओळखून, दोन्ही बाजूंनी सागरी विज्ञान, शाश्वत मत्स्यव्यवसाय, किनारी परिसंस्थांचे संरक्षण आणि सागरी प्रदूषण प्रतिबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यास सहमती दर्शवली.

दोन्ही बाजू नील अर्थव्यवस्थेतील सहकार्यात वाढ करणार असून दोन्ही देशांमधील वैज्ञानिक संस्था तसेच सागरी संस्था यांच्यात अधिक जवळून माहितीची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देतील.

आर्क्टिक संशोधन आणि ध्रुवीय सहकार्य

भारत आणि कोरिया प्रजासत्ताक यांनी आर्क्टिक संशोधन आणि वैज्ञानिक सहकार्यामध्ये आपला सहभाग वाढत असल्याचे नमूद केले. हवामान बदलाविषयीचे आकलन वाढवण्यासाठी आर्क्टिक हा एक महत्त्वाचा प्रदेश असल्याचे दोन्ही देशांनी मान्य करत आर्क्टिक विज्ञान व आर्क्टिक जहाजवाहतूक यांसह आर्क्टिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवली.

दोन्ही बाजू आपापल्या आर्क्टिक संशोधन संस्थांमध्ये अधिक घनिष्ठ सहकार्याला प्रोत्साहन देतील तसेच संयुक्त संशोधन उपक्रम, वैज्ञानिक आदानप्रदान तसेच आंतरराष्ट्रीय ध्रुवीय संशोधन कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या संधींचा शोध घेतील.

भावी वाटचालीची दिशा


दोन्ही बाजूंनी शाश्वत विकास आणि हवामान कृतीमध्ये योगदान देणाऱ्या व्यावहारिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.


या संयुक्त निवेदनात मांडण्यात आलेली विस्तारित सहकार्याची रुपरेषा इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि त्यापलीकडेही शाश्वत विकासाला सहाय्यक ठरू शकेल अशा नावीन्यपूर्ण आणि विस्तारक्षम उपायांच्या विकासात योगदान देईल, असा विश्वास भारत आणि कोरिया प्रजासत्ताकाने व्यक्त केला.

***

NehaKulkarni / ManjiriGanoo / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2254047) अभ्यागत कक्ष : 9