पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अजमेर येथून विकासकामांचे उद्घाटन व देशव्यापी HPV लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

Posted On: 28 FEB 2026 2:17PM by PIB Mumbai

 

भारत माता की जय|

भारत माता की जय|

भारत माता की जय|

तीर्थक्षेत्र पुष्कर आणि सावित्री मातेच्या या पवित्र भूमीवर, आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहाण्याची, आपले आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची संधी मिळाली आहे. या व्यासपीठावरून मी सुरसुराच्या तेजा धामला, पृथ्वीराजची भूमी अजमेरला नमस्कार करतो.

माझ्याबरोबर म्हणा,

तीर्थक्षेत्र पुष्कर चा विजय असो,

तीर्थक्षेत्र पुष्कर चा विजय असो,

वीर तेजाजी महाराजांचा विजय असो,

वीर तेजाजी महाराजांचा विजय असो,

भगवान देव नारायणांचा जयजयकार.

भगवान देव नारायणांचा जयजयकार.

वरूण अवतार  झुलेलाल भगवानांचा जयजयकार असो.

 झुलेलाल भगवानांचा जयजयकार असो. 

व्यासपीठावर असलेले राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री बहन वसुंधराराजे, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझा सहकारी भगीरथ चौधरी, उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा, दिया कुमारी, संसदेतील माझे सहकारी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड, उपस्थित अन्य मंत्री, अन्य गणमान्य व्यक्ती आणि राजस्थानच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. मी सर्व पूजनीय संत मंडळीचा आभारी आहे, की  आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

मित्रांनो,

अजमेर श्रद्धा आणि शौर्याची भूमी आहे. इथे तीर्थस्थानही आहेत आणि क्रांतिकारकांच्या पाऊलखुणाही आहेत. कालच मी इस्रायलचा दौरा पूर्ण करून मायदेशी परतलो आहे. राजस्थानचे सुपुत्र मेजर दलपत सिंह यांच्या शौर्याचे आजही इस्रायलचे लोक अभिमानाने स्मरण करतात. इस्रायलच्या संसदेतही मला, मेजर दलपत सिंह यांच्या शौर्याला आदरांजली वाहण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. राजस्थानच्या शूर ठाकुरांनी इस्रालयचे हैफा शहर स्वतंत्र करण्यात बजावलेल्या भूमिकेचा गौरव करण्याची संधीही मला मिळाली.

मित्रांनो,

अलीकडेच, राजस्थानमध्ये भाजपच्या डबल इंजिन सरकारने दोन वर्ष पूर्ण केली, आज राजस्थान विकासाच्या नव्या मार्गावर अग्रेसर आहे, याचा मला आनंद वाटतो. भाजप सरकार विकासाची जी आश्वासने देऊन तुमच्या सेवेत रुजू झाले होते, ती वेगाने पूर्ण होत आहेत. आणि आज विकासाच्या या मोहिमेला वेग देण्याचा दिवस आहे. काही वेळापूर्वी इथे राजस्थानच्या विकासाशी निगडीत सुमारे 17 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण प्रत्येक क्षेत्राला नवी ताकद मिळते आहे. हे सर्व प्रकल्प राजस्थानच्या नागरिकांसाठी सोयीसुविधा वृद्धिंगत करतील आणि राजस्थानच्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतील.

मित्रांनो,

भाजपाचे डबल इंजिन सरकार सातत्याने युवा शक्तीचे सक्षमीकरण करते आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत राजस्थानमध्ये नोकरभरतीत भ्रष्टाचार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या बातम्याच सातत्याने येत होत्या. आता राजस्थानमध्ये प्रश्नपत्रिका फुटीला आळा घालण्यात आला आहे, दोषींवर कडक कारवाई केली जात आहे. आज या व्यासपीठावरून राजस्थानच्या 21 हजाराहून अधिक तरुणांसाठी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली. हा महत्त्वाचा बदल आहे. या बदलासाठी, नव्या नोकऱ्यांसाठी, सर्व विकास कामांसाठी मी राजस्थानच्या सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आज शूर महिलांच्या भूमीतून मला देशभरातल्या सर्व मुलींसाठी एक महत्त्वाची मोहिम सुरू करण्याची संधी मिळते आहे. इथून, अजमेरमधून एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात होत आहे. ही मोहिम देशाच्या स्त्रीशक्तीच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

मित्रांनो,

आपल्या सर्वांना माहीतच आहे की, घरात जेव्हा आई आजारी पडते तेव्हा घराची घडी विस्कटते. जर आई निरोगी असेल तर कुटुंब प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यास सक्षम असतात. त्याच जाणीवेतून भाजपा सरकारने महिलांना बळ देणाऱ्या अनेक योजना राबवल्या आहेत.

मित्रांनो,

आपण 2014 पूर्वीचा काळ अनुभवला आहे, जेव्हा शौचालयाच्या अभावापायी किती यातना सहन कराव्या लागल्या, किती अपमान झेलावा लागला. मुली शाळा सोडून देत होत्या कारण त्यांच्यासाठी वेगळ्या शौचालयाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. गरीब मुलींना सॅनिटरी पॅडस् परवडत नव्हत्या. यापूर्वी ज्यांची सत्ता होती त्यांच्यासाठी या गोष्टी अगदीच क्षुल्लक होत्या. त्यामुळेच या प्रश्नांवर चर्चादेखील होत नसे. पण आमच्यासाठी हा माता भगिनींना आजार जडवणारा, त्यांच्या अवमानाशी निगडीत असलेला संवेदनशील मुद्दा आहे. त्यासाठी आम्ही कालबद्ध कार्यक्रमाद्वारे उपाय शोधले.

मित्रांनो,

गर्भावस्थेदरम्यान कुपोषणामुळे आईच्या जीवाला मोठा धोका पोहोचतो. आम्ही सुरक्षित मातृत्वासाठी योजना सुरू केली, आईला पोषक आहार मिळावा यासाठी गर्भवती बहि‍णींच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याची योजना सुरू केली. आई धुराने खोकून बेजार होई पण तक्रारीचा सूर काढत नसे. आम्ही ठरवले हे चालणार नाही. आणि म्हणून उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. हे सर्व शक्य झाले, कारण भाजपा सरकार सत्तेसाठी नव्हे तर संवेदनशीलतेने काम करते.

मित्रांनो,

21 व्या शतकातील पाव शतक संपले आहे. राजस्थानच्या विकासासाठी आजचा काळ महत्त्वाचा आहे. भाजपाचे डबल इंजिन सरकार, राजस्थानच्या परंपरा आणि विकास दोन्ही एकत्र घेऊन चालते आहे. आपण सर्व जाणतोच की, चांगले रस्ते, चांगली रेल्वे आणि हवाई वाहातूक सेवा यांमुळे केवळ प्रवास सुलभ होतो असे नाही तर संपूर्ण प्रदेशाचे नशीब बदलते. जेव्हा गावागावांपर्यंत चांगले रस्ते पोहोचतात, तेव्हा शेतकरी आपले पीक चांगल्या किंमतीला विकू शकतो. व्यापाऱ्याला सहजपणे माल गावाबाहेर पाठवता येतो. आणि आपल्या अजमेर-पुष्कर क्षेत्राची पर्यटन क्षमता कोणाला माहित नाही. चांगल्या दळणवळणाच्या सोयींचा पर्यटनावर सर्वांधिक चांगला परिणाम होतो. जेव्हा प्रवास सोपा होतो तेव्हा अधिकाधिक लोक पर्यटनासाठी येतात.

आणि मित्रांनो,

जेव्हा पर्यटक येतात तेव्हा स्वाभाविकपणे हॉटेल जोमाने चालतात, ढाब्यांची भरभराट होते. कचोरी आणि दाल बाटी यांची जास्त विक्री होते, इथे राजस्थानच्या कारागीर निर्मित वस्तू विकल्या जातात, टॅक्सी चालते, स्थलमार्गदर्शकांना काम मिळते. म्हणजेच एक पर्यटक कितीतरी कुटुंबांसाठी उपजीविकेचा मार्ग ठरतो. आमचे सरकार याच विचाराने राजस्थानच्या आधुनिक दळणवळणाच्या सोयींवर भर देत आहे.

मित्रांनो,

राजस्थानच्या दळणवळण सुविधेचा विस्तार होईल, तसे तसे इथे गुंतवणुकीच्या संधीही सातत्याने वाढतील. दिल्ली-मुंबई व्यापार परिक्षेत्राभोवती, उद्योगांसाठी खूप मोठ्या पायाभूत सुविधेची निर्मीती होत आहे. म्हणजे राजस्थानला संधीची भूमी होण्यासाठी डबल इंजिन सरकार शक्य त्या सर्व प्रकारे काम करते आहे.

मित्रहो,

राजस्थानच्या माता-भगिनी,आपल्या मुलांना पाळण्यातच राष्ट्र भक्तीचे बाळकडू देतात. देशाचा सन्मान काय असतो हे राजस्थानची ही भूमी जाणते आणि म्हणूनच आज राजस्थानच्या या धरतीवर आपणाला आणखी एक बाब सांगण्यासाठी आलो आहे.

मित्रहो,

दिल्लीत नुकतीच जगातली सर्वात मोठी एआय परिषद झाली.कृत्रिम प्रज्ञा, जगातल्या अनेक देशांचे पंतप्रधान,अनेक देशांचे राष्ट्रपती, अनेक देशांचे मंत्री,या कार्यक्रमात आले होते.जगातल्या मोठ्या-मोठ्या कंपन्या,त्या कंपन्यांचे प्रमुख सर्वजण एका मंचावर आले होते.सर्वांनी मनमोकळेपणाने भारताची प्रशंसा केली. मी राजस्थानच्या बंधू-भगिनींना एक विचारू इच्छितो. जेव्हा जगभरातले इतके सर्वजण भारताची प्रशंसा करतात हे ऐकून आपल्याला अभिमान वाटतो की नाही ? आपल्याला अभिमान वाटतो की नाही ? आपल्याला अभिमान वाटतो की नाही ? आपली मान अभिमानाने उंचावली की नाही ? अभिमानाने आपली मान उंचावली की नाही ?

मित्रहो,

आपणाला अभिमान वाटला मात्र निराशेच्या गर्तेत गेलेल्या,सातत्याच्या पराभवाने खचलेल्या काँग्रेसने काय केले, हे आपण पाहिलेच आहे. जगभरातल्या पाहुण्यांसमोर, काँग्रेसने देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परदेशी पाहुण्यांसमोर देशाची मानहानी करण्यासाठी मोठे नाटक केले.

मित्रहो,

काँग्रेसचा संपूर्ण देशात सातत्याने पराभव होत आहे आणि त्या रागात याचा बदला ते भारताला बदनाम करून घेत आहेत. एकेकाळी काँग्रेस आयएनसी म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस होती मात्र आता ती आयएनसी उरली नाही, आज ती आयएनसी ऐवजी एमएमसी, एमएमसी बनली आहे. एमएमसी म्हणजे मुस्लीम लीग माओवादी काँग्रेस झाली आहे.

राजस्थानच्या माझ्या वीरांनो,  

मुस्लीम लीग भारताचा द्वेष करत होती याला इतिहास साक्षी आहे आणि म्हणूनच मुस्लीम लीगने देशाचे विभाजन केले. आज काँग्रेसही तेच करत आहे. माओवादीही, भारताची समृद्धी, आपले संविधान आणि आपल्या यशस्वी लोकशाहीचा तिरस्कार करतात, ते दबा धरून हल्ला करतात, काँग्रेसही देशाला बदनाम करण्यासाठी कोठेही घुसते. काँग्रेसच्या या दुष्कर्माना देश कधीही माफ करणार नाही.

मित्रहो,

देशाची बदनामी करणे, देशाच्या सैन्याला कमकुवत करणे ही काँग्रेसची जुनी खोड आहे. जरा आठवा,ही काँग्रेस आहे जिने आपल्या सैन्याच्या जवानांना शस्त्र आणि अगदी वर्दीसाठी ताटकळत ठेवले होते. ही तीच काँग्रेस आहे जिने वर्षानुवर्षे आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांना वन रॅन्क वन पेन्शन पासून वंचित ठेवले होते. ही तीच काँग्रेस आहे जिच्या राजवटीत परदेशातून होणाऱ्या संरक्षण करारात मोठे-मोठे घोटाळे होत असत.

मित्रहो,

गेल्या 11 वर्षांमध्ये भारताच्या लष्कराने प्रत्येक आघाडीवर,देशाच्या शत्रूवर कठोर प्रहार केला आहे.आपले लष्कर प्रत्येक मिशनमध्ये,प्रत्येक आघाडीवर विजयी झाले आहे.सर्जिकल स्ट्राईक पासून ते ऑपरेशन सिंदूर पर्यंत आपल्या शौर्याचा झेंडा फडकविला आहे मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी यातही शत्रूचा खोटेपणा पुढे रेटला. देशासाठी जे शुभ आहे, चांगले आहे, ज्यामुळे देशाचे हित साधले जाणार आहे, त्या सगळ्याला काँग्रेस विरोध करते. म्हणूनच आज देश काँग्रेसला धडा शिकवत आहे.

मित्रहो,

राजस्थानमध्ये तर आपण काँग्रेसच्या कुशासनाचा जवळून अनुभव घेतला आहे. इथे जितका काळ काँग्रेस राहिली, तेव्हा भ्रष्टाचार आणि अंतर्गत कलहात बुडालेली होती. काँग्रेसने आपल्या शेतकऱ्यांनाही नेहमीच धोका दिला आहे. काँग्रेसने दशकानुदशके सिंचन प्रकल्प कसे रखडविले होते ते जरा आपण आठवा.यामुळे राजस्थानच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ईआरसीपी  प्रकल्प काँग्रेस सरकारांनी फक्त फाईली आणि घोषणा यामध्येच अडकवून ठेवला होता. आमच्या सरकारने सत्तेवर येताच ही योजना बासनातून काढून वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला.

मित्रहो,

आमच्या सरकारने हाती घेतलेल्या नदी जोड अभियानाचा सर्वात मोठा लाभ राजस्थानला मिळणार आहे.सुधारित पार्वती-कालीसिंध –चंबळ जोड प्रकल्प असो,यमुना-राजस्थान जोड प्रकल्प असो,अशा अनेक सिंचन प्रकल्पांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डबल इंजिन सरकार कटिबद्ध आहे. आजही झालावाड,बारां,कोटा आणि बूंदी जिल्ह्यासाठी पाण्याच्या अनेक प्रकल्पांवर काम सुरु आहे.राजस्थानमध्ये भूजल पातळी वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मित्रहो,

राजस्थानचे सामर्थ्य ओळखून भाजपा सरकार योजनांची आखणी करत आहे,त्या लागू करत आहे.राजस्थान आता सौरउर्जेच्या सामर्थ्यावर समृद्धी आणणारी भूमी बनली आहे याचा मला आनंद आहे. आपल्या राजस्थानमध्ये उन्हाची कमतरता नाही हे आपण सर्वजण जाणतोच.आता हेच ऊन सामान्य माणसाच्या घरासाठी बचत आणि कमाईचेही साधन ठरत आहे आणि यामध्ये सर्वात मोठी भूमिका आहे ती पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज  योजनेची.राजस्थानचे भाग्य बदलण्याची क्षमता या योजनेत आहे.लोकांना आपल्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसविण्यासाठी भाजपा सरकार,78 हजार रूपयांचे सहाय्य देते.सरकार थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करते.स्वातंत्र्यानंतरचे सर्व अर्थसंकल्प,सर्व योजना पहा, मध्यमवर्गाचा लाभ होईल अशा योजना आपल्याला दिसून येणार नाहीत मात्र आज या कुटुंबांना सरकार सौर पॅनेल बसविण्यासाठी थेट 78 हजार रूपयांचे सहाय्य देत आहे.सर्वात जास्त लाभ मध्यम वर्ग घेत आहे.याद्वारे घरातच एक छोटेसे वीज घर तयार होते.दिवसा सूर्य प्रकाशातून वीज तयार होते, त्याचा घरासाठी वापर होतो आणि जास्तीची वीज ही विजेच्या ग्रीडमध्ये जाते. ज्या घरात वीज निर्माण होते त्यालाही त्याचा लाभ होतो.

मित्रहो,

आज राजस्थानमध्ये सव्वा लाखाहून जास्त कुटुंबे या योजनेशी जोडली गेली आहेत आणि या योजनेमुळे अनेक घरांमध्ये विजेचे बिल जवळजवळ शून्य येत आहे.म्हणजे बचत जास्त आणि खर्च कमी झाला.

मित्रहो,

विकसित राजस्थानद्वारे विकसित भारत हा मंत्र घेऊन आम्ही सातत्याने काम करत आहोत.आज ज्या योजनांवर काम सुरु झाले आहे त्या योजना विकसित राजस्थानचा पाया  अधिक भक्कम करतील.जेव्हा राजस्थान विकसित होईल तेव्हा इथल्या प्रत्येक कुटुंबांचे जीवन समृद्ध होईल.आपणा सर्वांना पुन्हा एकदा विकास प्रकल्पांसाठी खूप-खूप शुभेच्छा.माझ्या समवेत म्हणा-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरमची 150 वर्षे देश साजरी करत आहे माझ्या समवेत म्हणा -

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

खूप-खूप धन्यवाद.

***

नेहा कुलकर्णी / निलिमा चितळे / विजयालक्ष्मी साळवी-साने/परशुराम कोर
 


(Release ID: 2234133) अभ्यागत कक्ष : 35