पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या 'नमो भारत' प्रादेशिक जलद परिवहन व्यवस्था (आर आर टी एस) चे केले उद्घाटन आणि दिल्ली-मीरत नमो भारत कॉरिडॉर राष्ट्राला केला समर्पित
आज उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देश जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या एका नव्या युगाचा साक्षीदार होत आहे: पंतप्रधान
मीरत मेट्रो, नमो भारत रेल्वेगाडी आणि 'रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम'(प्रादेशिक जलद परिवहन व्यवस्था) च्या नवीन विभागाच्या उद्घाटनामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रा मधील(एनसीआर) लोकांचे जीवन अधिक सोपे, सुरळीत आणि सोयीस्कर होईल: पंतप्रधान
आमची कार्यसंस्कृती अशी आहे की, एकदा एखाद्या कामाची पायाभरणी झाली की, ते पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक केली जाते; म्हणूनच आता प्रकल्प पूर्वीप्रमाणे प्रलंबित राहत नाहीत: पंतप्रधान
नमो भारत असो वा मेट्रो सेवा, मला या दोन्हींची पायाभरणी करण्याची संधी मिळाली होती आणि आज त्यांचे उद्घाटन करण्याचे भाग्यही मला लाभले आहे: पंतप्रधान
देशात पहिल्यांदाच असे घडत आहे की, नमो भारत आणि मेट्रो गाडी एकाच स्थानकावरुन आणि एकाच रुळावरुन धावतील: पंतप्रधान
एकाच फलाटावरून शहरात प्रवास करता येईल आणि त्याच स्थानकावरून थेट दिल्लीला ये-जा करता येईल: पंतप्रधान
जगातील अनेक विकसित देश आज भारतासोबत व्यापार करार करत आहेत: पंतप्रधान
आज विकसित देश भारताशी भागीदारी करण्यास उत्सुक आहेत. कारण त्यांना भारताच्या विकासामध्ये स्वतःचे भविष्य दिसत आहे आणि भारताच्या युवा शक्तीमध्ये त्यांना आशा दिसत आहे: पंतप्रधान
21 व्या शतकातील आव्हानांवर उपाय देऊ शकते अशी शक्ती भारत आहे, असे आज जगाला वाटते: पंतप्रधान
मीरत-हापूर क्षेत्र आणि आसपासच्या परिसराने सुरुवातीपासूनच चौधरी चरण सिंगजींची दूरदृष्टी पाहिली आहे आणि आमच्या सरकारचे हे भाग्य आहे की, आम्हाला चौधरी चरण सिंगजींना 'भारतरत्न' प्रदान करण्याचा बहुमान मिळाला: पंतप्रधान
Posted On:
22 FEB 2026 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीरत इथे 'नमो भारत रॅपिड रेल' या द्रुतगती रेल्वे सेवेचे आणि 'मीरत मेट्रो' मार्गाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचे वर्णन त्यांनी, ‘विकसित उत्तर प्रदेश’ आणि ‘विकसित भारत’ यासाठी एका नवीन ऊर्जेचा संचार असे केले. रॅपिड रेल आणि मेट्रो सेवा एकाच दिवशी एकाच फलाटावरून सुरू होण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे.
'विकसित भारता'मध्ये दळणवळण-संपर्क व्यवस्था कशी असेल, याची एक सुरेख चुणूक हा प्रकल्प दाखवतो, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. ही एकात्मिक प्रणाली शहरांतर्गत प्रवासासाठी मेट्रोचा आणि "ट्विन सिटीज" अर्थात दोन शहरे जोडणे या संकल्पनेला गती देण्यासाठी नमो भारत रेल्वेगाडीचा वापर करते. 'डबल इंजिन' सरकारची कार्यसंस्कृती अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, आता प्रकल्प अर्धवट लटकत राहत नाहीत. या दोन्ही सेवांची पायाभरणी आणि उद्घाटन आपण स्वतः केले आहे असे म्हणत, ज्या कामाची पायाभरणी त्यांचे सरकार करते, ते काम पूर्णही करते, असे त्यांनी ठासून सांगितले.
या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी मीरत मेट्रोने प्रवास केला आणि विद्यार्थी तसेच प्रवाशांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी या प्रकल्पाचा ‘नारी-शक्ती’चे प्रतीक म्हणून गौरव केला, कारण या सेवेतील बहुतेक चालक आणि स्टेशन नियंत्रक कर्मचारी वर्ग, महिला आहेत. त्यांनी देशातील पहिल्या 'नमो भारत रॅपिड रेल' सेवेबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेचे अभिनंदन केले.
मीरतशी असलेल्या विशेष नात्याचे स्मरण करताना, 2014, 2019 आणि 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांच्या प्रचार मोहिमा या क्रांतीकारी भूमीतून सुरू झाल्याचे नमूद केले. त्यांनी या प्रदेशातल्या शेतकरी, कारागीर आणि उद्योजकांचे त्यांच्या सातत्यपूर्ण शुभेच्छांबद्दल आभार मानले. '2014 पूर्वी केवळ पाच शहरांमध्ये मेट्रो सेवा पोहोचली होती, पण आता मेट्रो 25 हून अधिक शहरांमध्ये धावते आहे, ज्यामुळे भारत जगातला तिसरे सर्वांत मोठे वाहतूक जाळे असलेला देश ठरला आहे,' असे मोदींनी नमूद केले. "या प्रकल्पाचे एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय रेल्वे, मेट्रो आणि सराई काले खान, आनंद विहार, गाझियाबाद आणि मीरत येथील बसस्थानकांचे एकत्रीकरण. भारतात पहिल्यांदाच नमो भारत आणि मेट्रो रेल्वे एकाच मार्गावर आणि स्थानकावर धावणार आहेत," असेही मोदी यांनी अधोरेखित केले. या एकत्रीकरणामुळे प्रवाशांना शहरामध्ये प्रवास करता येईल किंवा थेट दिल्ली गाठता येईल, त्यामुळे कामगार आणि विद्यार्थ्यांना दिल्लीत भाड्याने घर घेऊन राहाण्याची सक्ती संपून जाईल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
उत्तर प्रदेश ही श्रम आणि निर्माणाची भूमी असल्याचे सांगून, पंतप्रधानांनी राज्यातील शेतकरी आणि कारागीर यांनी वारसा आणि विकासाचा मंत्र यशस्वीरित्या अंगिकारला आहे. त्यांनी नमूद केले की भारताची जागतिक ताकद वाढत असताना विकसित देश भारताच्या युवाशक्तीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी करारांवर स्वाक्षरी करण्यास उत्सुक आहेत. "आज, भारताकडे 21 व्या शतकातील आव्हाने सोडवण्यास सक्षम असलेली महाशक्ती म्हणून पाहते, त्याचा फायदा थेट उत्तर प्रदेशातील नागरिकांना होतो," असे मोदी म्हणाले.
"महामार्ग, मालवाहतूक मार्ग आणि जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये सरकारने केलेली गुंतवणूक ही व्यापक प्रमाणात रोजगार संधी निर्माण करत आहेत. या प्रकल्पांमुळे नवे उद्योग आणि व्यवसाय या प्रदेशामध्ये आकर्षित होत आहेत," असेही पंतप्रधानांनी सांगितले.
एमएसएमई क्षेत्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी 10,000 कोटी रुपयांच्या निधी घोषणा चालू वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये केली, ज्यामुळे एमएसएमईंना कर्ज देणे सुलभ होणार आहे, हे अधोरेखित केले. त्यांनी, महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना विणकरांना जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यास मदत करणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. कुरिअरद्वारे वस्तू पाठवण्याची 10 लाखांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे मीरत आणि संपूर्ण उत्तर प्रदेशातील लघु उद्योजकांना ऑनलाईन अॅपमार्फत अमेरिका आणि युरोप या देशांतील ग्राहकांना थेट विक्री करता येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.
चौधरी चरण सिंह जी यांच्या दूरदृष्टीचा सन्मान करण्यासाठी सरकारने त्यांना भारत रत्न पुरस्काराने गौरवले. त्यांच्याकडून प्रेरणा घेत, डबल इंजिन सरकार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अन्न प्रक्रिया आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे काम करत आहे. या योजनेअंतर्गत 95,000 हजार कोटी रुपये उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना यापूर्वीच प्रदान केले आहेत, असेही मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे यावर भर देत, दंगली आणि गुन्हेगारीच्या काळापासून आज प्रतिष्ठेच्या ब्रह्मोस, मोबाईल उत्पादन आणि पर्यटन याकडे तो वळला असल्याचे लक्षात आणून दिले. आज गुन्हेगार तुरुंगात आहेत, मुलींच्या मानसन्मानाचे रक्षण केले जाते आहे आणि सुधारित कायदा आणि सुव्यवस्थेमुळे मोठी आर्थिक लाट आली आहे आणि उत्पादनातही तेजी निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशचे रूपांतर उत्पादन केंद्रामध्ये होत आहे आणि नुकतेच राज्यातील पहिल्या सेमीकंडक्टर कारखान्याची पायाभरणीही झाली. विकसित भारतासाठी विकसित उत्तर प्रदेश गरजेचा असल्याचे भाषणाचा शेवट करताना सांगितले.
* * *
शैलेश पाटील/आशुतोष सावे/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2231551)
अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam