पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याबरोबर झालेल्या भेटीदरम्यान संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 12 JAN 2026 1:25PM by PIB Mumbai

महामहीम, सन्मानीय

माझे मित्र,

चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ  आणि उभय देशांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमातील मित्रांनो,

नमस्कार! गुटन टाग!!

आज स्वामी विवेकानंद जयंतीदिनी भारतात चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ  यांचे स्वागत करणे, ही माझ्यासाठी एक विशेष आनंदाची गोष्ट आहे. आणि हा एक अनोखा योगायोगही आहे. याचे कारण म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी  तत्वज्ञान, ज्ञान यांच्या माध्यमातून  भारत आणि जर्मनीमध्ये  एक सेतू निर्माण केला होता.  चॅन्सलर मर्झ यांच्या आजच्या भेटीमुळे त्या सेतूला नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास मिळत आहे आणि हे संबंध नव्याने  विस्तारत आहेत.  चॅन्सलर  यांची ही केवळ भारताचीच नाही तर आशियामधलीही पहिली भेट आहे. भारताशी असलेल्या संबंधांना ते किती महत्त्व देतात याची ही एक शक्तिशाली साक्ष आहे. त्यांचे असलेले वैयक्तिक लक्ष आणि वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जर्मनीशी असलेली मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे. गुजरातमध्ये, आम्ही म्हणतो, "आवकरो मीठो आपजे रे," म्हणजे, "प्रेमाने आणि आपुलकीच्या भावनेने  स्वागत करावे." याच भावनेने आम्ही चॅन्सलर मेर्झ यांचे भारतात मनापासून स्वागत करतो.

मित्रांनो

चॅन्सलर मर्झ यांच्या या भारत भेटीची ही वेळही विशेष आहे. गेल्या वर्षी  उभय देशांनी आपल्या धोरणात्मक भागीदारीची 25 वर्षे साजरी केली आणि यावर्षी आपण राजनैतिक संबंधांची 75 वर्षे साजरी करत आहोत. हे टप्पे केवळ सरलेल्या काळाची पदचिन्हे अथवा कामगिरी नाहीत. तर ते आपल्या सामायिक महत्त्वाकांक्षा, परस्परांवर असलेला  विश्वास आणि सतत मजबूत होत असलेल्या सहकार्याचे प्रतीक आहेत. भारत आणि जर्मनीसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थांमधील घनिष्ठ सहकार्य संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे. वृद्धिंगत होत असलेल्या व्यापार आणि गुंतवणूक संबंधांमुळे आपल्या धोरणात्मक भागीदारीला नवीन चालना मिळाली आहे. आमचा द्विपक्षीय व्यापार आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे, सध्या तो 50  अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. दोन हजारपेक्षा जास्त  जर्मन कंपन्यांची भारतात दीर्घकाळ उपस्थिती आहे. यावरून  त्यांचा भारतावरील अढळ विश्वास आणि  इथे असलेली अमर्याद क्षमता दर्शवते. आज सकाळी भारत-जर्मनी सीईओ फोरममध्ये हे स्पष्टपणे दिसून आले.

मित्रांनो,

भारत आणि जर्मनीमधील तंत्रज्ञान सहकार्य दरवर्षी बळकट होत आहे आणि त्याचा परिणाम आज जमिनी स्तरावर झालेल्या कामातून स्पष्टपणे दिसून येत आहे. भारत आणि जर्मनी अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात समान प्राधान्ये सामायिक करतात. या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी, आम्ही भारत-जर्मनी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमासाठी एक सामान्य व्यासपीठ म्हणून काम करेल. आम्ही हवामान, ऊर्जा, शहरांचा विकास आणि शहरी गतिशीलता यासारख्या क्षेत्रात संयुक्तपणे नवीन प्रकल्प राबवत आहोत. दोन्ही देशांच्या कंपन्यांना हरित हायड्रोजनमध्ये सहभागी करून घेणारा हा नवीन मेगा प्रकल्प ऊर्जा भविष्यासाठी "गेम-चेंजर" ठरेल. भारत आणि जर्मनी सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक आहेत. भारत आणि जर्मनी सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी एकत्रित काम करत आहेत. आज या सर्व विषयांवर स्वाक्षरी करण्यात आलेले सामंजस्य करार आपल्या सहकार्याला नवीन गती आणि बळकटी देतील.

मित्रांनो,

संरक्षण आणि सुरक्षेतील वाढते सहकार्य म्हणजे आपल्या परस्पर विश्वासाचे आणि सामायिक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. संरक्षण व्यापार प्रक्रिया सुलभ केल्याबद्दल मी चॅन्सलर मर्झ यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही संरक्षण उद्योगांमधील सहकार्य वाढविण्यासाठी, सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी नवीन संधी उघडण्यासाठी एका पथदर्शक कार्यक्रम तयार करणार आहे. मित्रांनो, यामुळे सह-विकास आणि सह-निर्मितीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

मित्रांनो,

भारत आणि जर्मनीमध्ये ऐतिहासिक आणि समाजात थेट लोकां-लोकांमध्ये खोलवर संबंध निर्माण झाले आहेत. रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याने जर्मनीच्या बौद्धिक जगताला एक नवीन दृष्टी दिली. स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीने जर्मनीसह संपूर्ण युरोपला प्रेरणा दिली. आणि मॅडम कामा यांनी जर्मनीमध्ये प्रथमच भारताच्या स्वातंत्र्याचा ध्वज फडकवून आपल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेला जागतिक मान्यता दिली. आज, आपण या ऐतिहासिक संबंधाचे आधुनिक भागीदारीत रूपांतर करत आहोत. स्थलांतर, गतिशीलता आणि कौशल्ये वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भारतातील प्रतिभावंत युवक  जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. जागतिक कौशल्य भागीदारीबाबत आज जारी करण्यात आलेला संयुक्त आशय जाहीरनामा या विश्वासाचे प्रतीक आहे. यामुळे विशेषतः आरोग्यसेवा व्यावसायिकांना येणेजाणे सुलभ होईल. आज, आम्ही क्रीडा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. हे एक नवीन पिढीतील तरुणांना जोडण्यासाठी  प्रभावी माध्यम ठरेल. आज तयार करण्यात आलेला उच्च शिक्षणावरील व्यापक  पथदर्शी कार्यक्रमामुळे शिक्षण क्षेत्रातील आमच्या भागीदारीला एक नवीन दिशा मिळेल. जर्मन विद्यापीठांना भारतात त्यांचे परिसर सुरू  करण्यासाठी मी आमंत्रित करतो. भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त  भेटीची परवानगी असल्याचे जाहीर केल्याबद्दल मी चॅन्सलर मर्झ यांचे आभार मानतो. यामुळे उभय देशांमधील लोकांमधील ऋणानुबंध आणखी मजबूत होईल. मला आनंद आहे की,  जर्मन सागरी संग्रहालय आता गुजरातमधील लोथल येथे बांधल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाशी जोडले जात आहे. दोन्ही देशांच्या सागरी इतिहासाला जोडणारे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे आणि जर्मनीशी घनिष्ठ सहकार्य आहे. या महत्त्वाच्या विषयावर आज स्वाक्षरी होत असलेला सामंजस्य करार आमचा सहकार्य आणखी मजबूत करेल.

मित्रांनो,

भारत आणि जर्मनी नेहमीच खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत आहेत. आमच्या मैत्रीचा परिणाम जागतिक व्यासपीठावरही दिसून येतो. घाना, कॅमेरून आणि मलावी सारख्या देशांमध्ये संयुक्त प्रकल्पांसह आमची त्रिपक्षीय विकास भागीदारी जगासाठी एक यशस्वी मॉडेल आहे. आम्ही जागतिक दक्षिणेतील देशांच्या विकासासाठी आमचे सामायिक प्रयत्न सुरू ठेवू. दोन्ही देशांसाठी इंडो-पॅसिफिक हे उच्च प्राधान्य आहे. या प्रदेशात आमचे समन्वय वाढविण्यासाठी आम्ही सल्लामसलत यंत्रणा सुरू करत आहोत. आज, आम्ही युक्रेन आणि गाझासह अनेक जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली. भारताने नेहमीच सर्व समस्या आणि वाद हे शांततापूर्ण मार्गाने  सोडविण्यासाठी आग्रह धरला आहे आणि या दिशेने केलेल्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. दहशतवाद हा संपूर्ण मानवतेसाठी गंभीर धोका आहे, याविषयी आमचे एकमत आहे  आणि जर्मनी एकत्रितपणे आणि पूर्ण दृढनिश्चयाने  दहशतवादाच्या विरोधात लढत राहतील.

जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावर भारत आणि जर्मनी सहमत आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्यासाठी जी 4 द्वारे केलेले आमचे संयुक्त प्रयत्न या दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत.

महामहिम,

140 कोटी  भारतीयांच्या वतीने, मी पुन्हा एकदा तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. मला विश्वास आहे की, आजच्या चर्चेतून भारत-जर्मनी भागीदारीला नवीन ऊर्जा आणि स्पष्ट दिशा मिळेल. तुमच्या या भेटीबद्दल, तुमच्या वैयक्तिक संबंधांबद्दल आणि भारताशी असलेल्या तुमच्या दृढ मैत्रीबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.

दाके शोन!!

***

नेहा कुलकर्णी / सुवर्णा बेडेकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2215774) अभ्यागत कक्ष : 22