सांस्कृतिक मंत्रालय
मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या,युनेस्कोच्या प्रातिनिधीक यादीत दीपावलीच्या सणाचा समावेश करण्यात आला
दीपावलीच्या कालविशिष्ट चैतन्यदायी भावनेला निरंतर तेवत ठेवणाऱ्या भारतासाठी आणि जगभरातील भारतीय समुदायांसाठी हा अत्यंत एक अभिमानास्पद क्षण आहे: गजेंद्र सिंह शेखावत
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 5:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025
भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या निरंतर परंपरेपैकी एक असलेल्या दीपावलीच्या सणाला; नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आज झालेल्या युनेस्कोच्या आंतरशासकीय समितीच्या विसाव्या सत्रादरम्यान मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधीक यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल, सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच 194 सदस्य देशांतील प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि युनेस्कोच्या जागतिक नेटवर्कचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या संबंधीची नोंदणी स्वीकारण्यात आली.
दीपावलीच्या सणाचा समावेश हा भारतासाठी तसेच जगभरातील त्या सर्व समुदायांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, जे दीपावलीचा शाश्वत आत्मा जिवंत ठेवतात, असे यावेळी उपस्थित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना संबोधित करताना, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री म्हणाले. मंत्र्यांनी नमूद केले की हा सण “तमसो मा ज्योतिर्गमय” अर्थात अंधःकारातून प्रकाशाकडे जाण्याचा सार्वत्रिक संदेश देतो, जो आशा, नवचैतन्य आणि सामंजस्याचे प्रतीक आहे.

पारंपारिक दिवे तयार करणारे कुंभार, उत्सवासाठी सजावट करणारे कारागीर, शेतकरी, मिठाई बनवणारे हलवाई, पुजारी आणि सनातन रीतिरिवाजांचे पालन करणारी घरे अशा लाखो लोकांच्या योगदानातून दीपावलीचे स्वरूप खुलत जाते; असे या उत्सवाचे चैतन्यदायी आणि लोककेंद्रित स्वरूप अधोरेखित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. ही मान्यता म्हणजे या परंपरेचा वारसाला टिकवून ठेवणाऱ्या सामूहिक सांस्कृतिक श्रमांना वाहिलेली आदरांजली आहे, असेही मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
आग्नेय आशिया, आफ्रिका, आखाती देश, युरोप आणि कॅरिबियन देशांमधील भारतीय समुदायाच्या उत्सव साजरा करण्यामुळे दीपावलीचा संदेश सर्व विश्वभरात पोहोचला आहे आणि त्याने सांस्कृतिक पूल मजबूत केले आहेत,असेही जगभरातील भारतीय समुदायांच्या उत्साही भूमिकेची नोंद करून प्रशंसा करत केंद्रीय मंत्री म्हणाले.
या नोंदीमुळे भावी पिढ्यांपर्यंत या वारशाचे संरक्षण आणि हस्तांतरण करण्याची नवी जबाबदारी येते. केंद्रीय मंत्र्यांनी नागरिकांना दिवाळीत प्रतिबिंबित होणाऱ्या सर्वसमावेशकता आणि एकतेच्या भावनेचा स्वीकार करण्याचे आणि भारताच्या समृद्ध अमूर्त सांस्कृतिक परंपरांना पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी केले.
दीपावलीच्या सणाला समृद्ध सांस्कृतिक महत्त्वा् आहे आणि विविध प्रदेश, समुदाय आणि जागतिक भारतीय समुदायांमध्ये साजरा केला जाणारा लोकांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा सण आहे, जो एकता, नवोन्मेष आणि सामाजिक बंधुभावाचे तत्व दर्शवितो. दिवे लावणे, रांगोळी काढणे, पारंपारिक हस्तकला, विधी, सामुदायिक मेळावे आणि ज्ञानाचे परंपरागत प्रसारण यासारख्या विविध पद्धती या सणाचे चिरस्थायी चैतन्य, काळ आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता दर्शवतात.
संगीत नाटक अकादमीमार्फत सांस्कृतिक मंत्रालयाने तयार केलेले हे नामांकन, भारतातील अभ्यासक, कारागीर, कृषी समुदाय, अनिवासी भारतीय गट, विशेष गरजा असलेल्या व्यक्ती(दिव्यांग), पारलिंगी समुदाय, सांस्कृतिक संघटना आणि परंपरा धारकांचा समावेश असलेल्या लोकांच्या देशव्यापी व्यापक सल्लामसलतीनंतर तयार करण्यात आले. त्यांच्या सामूहिक साक्षात्कारांनी दीपावलीचे सर्व समावेशक स्वरूप, त्यातील समुदाय-नेतृत्वाचे सातत्य आणि कुंभार आणि रांगोळी कलाकारांपासून ते मिठाई बनवणारे, फुलवाले आणि कारागीरांपर्यंतच्या उपजीविकेच्या विस्तृत परिसंस्थेवर प्रकाश टाकला.
संस्कृती मंत्रालयाने या निर्णयाचे स्वागत केले असून पुढे म्हटले आहे, की या नोंदीमुळे भारताच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाबद्दल जगभरात आदर वाढेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी समुदाय-आधारित परंपरा जतन करण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल.

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201620)
आगंतुक पटल : 8