पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवा रायपूर येथे शांती शिखर- ब्रह्माकुमारी ध्यान केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 01 NOV 2025 1:23PM by PIB Mumbai

 

ॐ शांती! छत्तीसगडचे राज्यपाल रमन डेका जी, राज्याचे लोकप्रिय आणि ऊर्जावान मुख्यमंत्री विष्णू देव साय जी, राजयोगिनी भगिनी जयंती जी, राजयोगी मृत्युंजय जी, सर्व ब्रह्मकुमारी भगिनी, येथे उपस्थित असलेले इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!

आजचा दिवस खूप विशेष आहे. आज आपले छत्तीसगड आपल्या स्थापनेची 25 वर्षे पूर्ण करत आहे. छत्तीसगडच्या बरोबरीनेच झारखंड आणि उत्तराखंडच्या स्थापनेलाही 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज देशातील आणखी काही राज्ये आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत. मी या सर्व राज्यांच्या रहिवाशांना स्थापना दिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा देतो. राज्याच्या विकासातून देशाचा विकास, याच मंत्रावर चालत आपण भारताला विकसित बनवण्याच्या अभियानात गुंतलो आहोत.

मित्रांनो,

विकसित भारताच्या या महत्त्वाच्या  प्रवासात ब्रह्मकुमारीसारख्या संस्थेची खूप मोठी भूमिका आहे. माझे तर हे भाग्य आहे की, मी गेल्या अनेक दशकांपासून तुमच्या सर्वांसोबत जोडलेला आहे. मी इथे पाहुणा नाही, मी तुमचाच आहे. मी या आध्यात्मिक चळवळीला  वटवृक्षाप्रमाणे विस्तारताना पाहिले आहे. 2011 मध्ये अहमदाबादमध्ये फ्यूचर ऑफ पॉवरचा तो कार्यक्रम, 2012 मध्ये संस्थेच्या स्थापनेची 75 वर्षे, 2013 मध्ये प्रयागराजचा कार्यक्रम, आबू  ला जाणे असो किंवा गुजरातमध्ये कार्यक्रमाला जाणे असो, हे तर माझ्यासाठी खूपच दैनंदिन जीवनाच्या भागाप्रमाणे  झाले होते. दिल्लीला आल्यानंतरही, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी जोडलेले अभियान असो, स्वच्छ भारत अभियान असो, किंवा मग जल जन अभियानअसो, या सर्वांशी जोडले जाण्याची संधी असो, मी ज्या ज्या वेळी तुमच्यामध्ये आलो आहे, तेव्हा मी तुमच्या प्रयत्नांकडे खूप गांभीर्याने पाहिले आहे. मला नेहमी अनुभव आला आहे की, इथे शब्द कमी आणि सेवा जास्त आहे.

मित्रांनो,

या संस्थेशी माझी असलेली जवळीक, विशेषतः जानकी दादींचे प्रेम, राजयोगिनी दादी हृदय मोहिनीजींचे मार्गदर्शन, हा माझ्या आयुष्यातील विशेष आठवणींचा  भाग आहे. मी खूप भाग्यवान ठरलो आहे..मी 'शांती शिखर' या संकल्पनेत त्यांचे विचार साकार होताना, मूर्त रूप घेताना पाहत आहे. शांती शिखर – academy for a peaceful world.” मी हे नक्कीच म्हणू शकतो की, आगामी काळात ही संस्था विश्व शांतीसाठीच्या सार्थ प्रयत्नांचे प्रमुख केंद्र बनेल. मी तुम्हा सर्वांना, आणि देश-विदेशातील ब्रह्मकुमारी परिवाराशी जोडलेल्या सर्व लोकांना, या प्रशंसनीय कार्यासाठी खूप-खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

आपल्याकडे म्हटले जाते: आचारः परमो धर्म, आचारः परमं तपः। आचारः परमं ज्ञानम्, आचारात् किं न साध्यते॥ अर्थात आचरण हाच सर्वात मोठा धर्म आहे, आचरण हेच सर्वात मोठे तप आहे आणि आचरण हेच सर्वात मोठे ज्ञान आहे. आचरणाने काय साध्य होऊ शकत नाही? म्हणजे, बदल तेव्हाच होतो, जेव्हा आपल्या वक्तव्याला आचरणातही उतरवले जाते. आणि हाच ब्रह्मकुमारी संस्थेच्या आध्यात्मिक शक्तीचा स्रोत आहे. इथे प्रत्येक भगिनी आधी कठोर तप आणि साधनेमध्ये स्वतःची खडतर चाचणी घेते . तुमची ओळख तर विश्व आणि ब्रह्मांडात शांतीच्या प्रयत्नांशी जोडलेली आहे. तुमचे पहिले संबोधनच आहे - ॐ शांती! ॐ म्हणजे, ब्रह्म आणि संपूर्ण ब्रह्मांड! शांती म्हणजे, शांतीची कामना! आणि म्हणूनच, ब्रह्मकुमारीच्या विचारांचा प्रत्येकाच्या अंतर्मनावर एवढा प्रभाव पडतो.

मित्रांनो,

विश्व शांतीची संकल्पना, हा भारताच्या मूलभूत विचारांचा पाया आहे, एक भाग आहे. हे भारताच्या आध्यात्मिक चेतनेचे प्रकट रूप आहे. कारण, आम्ही ते आहोत, जे जीवात शिवाला पाहतो. आम्ही ते आहोत, जे स्व चा विस्तार सर्वस्वापर्यंत करत राहतात.आपल्याकडे प्रत्येक धार्मिक विधी  ज्या उद्घोषाने  पूर्ण होतो, तो उद्घोष आहे - जगाचे कल्याण होऊ दे! तो उद्घोष आहे - प्राणिमात्रांमध्ये सद्भावना असो! असे उदात्त विचार, असे उदात्त चिंतन, जगाच्या कल्याणाच्या भावनेचा श्रद्धेशी असा सहज संगम, हा आपली सभ्यता आणि परंपरेचा स्थायीभाव आहे.

आपले अध्यात्म आपल्याला केवळ शांतीचा पाठ शिकवत नाही, तर ते आपल्याला प्रत्येक पावलावर शांतीचा मार्ग देखील दाखवते.आत्म संयमातून आत्मज्ञान, आत्मज्ञानातून आत्म-साक्षात्कार आणि आत्म-साक्षात्कारातून आत्मशांती. याच मार्गावर चालत, शांती शिखर अकॅडमीमध्ये साधक  जागतिक शांतीचे माध्यम बनतील.

मित्रांनो,

जागतिक शांततेच्या मिशनमध्ये विचारांना जेवढे महत्त्व असते, तेवढीच मोठी भूमिका व्यावहारिक धोरणे आणि प्रयत्नांचीही असते. भारत आज या दिशेने आपली भूमिका पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा  प्रयत्न करत आहे. आज जगात कुठेही संकट येते, कोणतीही आपत्ती येते, तेव्हा भारत एक भरवशाचा साथीदार  म्हणून मदतीसाठी पुढे येतो, त्वरित पोहोचतो.भारत हा ' First Responder ' असतो.

मित्रांनो,

आज पर्यावरणाशी संबंधित आव्हानांच्या काळात भारत संपूर्ण जगात निसर्ग संरक्षणाचा प्रमुख आवाज बनलेला आहे.

हे खूप आवश्यक आहे की, आपल्याला निसर्गाने जे काही दिले आहे, आपण त्याचे संरक्षण करावे, आपण त्याचे संवर्धन करावे. आणि हे तेव्हाच होईल, जेव्हा आपण निसर्गासोबत  मिळून जगायला शिकू.आपल्या शास्त्रांनी आणि प्रजापिता ने आपल्याला हेच शिकवले आहे. आपण नद्यांना आई मानतो. आपण पाण्याला देवता मानतो. आपण झाडात  परमात्म्याचे दर्शन करतो.याच भावनेने निसर्ग आणि त्याच्या साधनसंपत्तीचा उपयोग, निसर्गाकडून केवळ घेण्याचा भाव नव्हे, तर त्याला परत करण्याची  वृत्ती, आज हीच जीवनशैली जगाला सुरक्षित भवितव्याची हमी देत आहे.

मित्रांनो,

भारत आतापासूनच भविष्याविषयीच्या आपल्या जबाबदाऱ्या विचारात देखील घेत आहे आणि त्या पूर्ण देखील करत आहे. One Sun, One World, One Grid सारखे भारताचे उपक्रम, One Earth, One Family, One Future चा भारताचा दृष्टिकोन, यांच्यासोबत जग जोडले जात आहे. भारताने भू-राजकीय सीमांच्या पलीकडे जात मानवजातीसाठी मिशन LiFE देखील सुरू केले आहे.

मित्रांनो,

समाजाला सतत सशक्त करण्यामध्ये ब्रह्मकुमारीसारख्या संस्थांची महत्त्वाची  भूमिका आहे. मला विश्वास आहे की, शांती शिखरसारख्या संस्था भारताच्या प्रयत्नांना नवीन ऊर्जा देतील. आणि या संस्थेतून निर्माण झालेली  ऊर्जा, देश आणि जगातील लाखो-करोडो लोकांना विश्व शांतीच्या या विचाराशी जोडेल. पंतप्रधान झाल्यानंतर जगात मी जिथे-जिथे गेलो आहे, एकही देश असा नसेल, जिथे विमानतळावर  किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी ब्रह्मकुमारीचे लोक मला भेटले नसतील किंवा त्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असल्या नसतील. अशी एकही घटना  नसेल.आणि यातून मला आपलेपणाची  जाणीव तर होतेच, पण तुमच्या शक्तीचाही अंदाज येतो, आणि मी तर शक्तीचा पुजारी आहे.

तुम्ही मला या पवित्र शुभ प्रसंगी  तुमच्यामध्ये येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा खूप-खूप आभारी आहे. पण ज्या स्वप्नांना घेऊन तुम्ही चालला आहात, ती स्वप्ने नाहीत. मी नेहमी अनुभवले आहे की, ते तुमचे संकल्प  असतात, आणि मला पूर्ण विश्वास आहे की, तुमचे संकल्प नक्कीच पूर्ण होतील.

याच भावनेने, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे 'शांती शिखर अकॅडमी फॉर ए पीसफुल वर्ल्ड' साठी खूप-खूप अभिनंदन करतो. खूप-खूप शुभेच्छा देतो. खूप-खूप धन्यवाद! ॐ शांती!

***

सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2185428) Visitor Counter : 5