आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम – पर्वतमाला प्रकल्पांतर्गत उत्तराखंड मधील गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी (12.4 किमी) दरम्यान रोपवे प्रकल्प विकसित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 05 MAR 2025 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 05 मार्च 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी दरम्यान 12.4 किमी लांबीचा रोपवे प्रकल्प विकसित करायला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर (डीबीएफओटी), अर्थात बांधा-वापर-हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित केला जाणार असून, त्यासाठी एकूण 2,730.13 कोटी रुपये भांडवली खर्च होईल.

हेमकुंड साहिब जी पर्यंत पोहोचण्यासाठी, सध्या गोविंदघाटपासून 21 किलोमीटरची चढाई पायी, खेचरावर अथवा पालखीने पार केली जाते. हा प्रवास आव्हानात्मक आहे. हेमकुंड साहिब जी येथे  भेट देणारे भाविक, आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी ही रोप-वे योजना आखली असून, तो कार्यान्वित झाल्यावर गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी दरम्यान सर्व प्रकारच्या हवामानात शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण सुविधा उपलब्ध होईल.

सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा रोप-वे विकसित करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प गोविंदघाट ते घांगरिया (10.55  किमी) दरम्यान मोनोकेबल डिटॅचेबल गोंडोला (एमडीजी) तंत्रज्ञानावर आधारित असेल, जो घांगरिया ते हेमकुंड साहिब जी पर्यंत सर्वात प्रगत ट्रायकेबल डिटॅचेबल गोंडोला (3S) तंत्रज्ञानाशी अखंडपणे जोडला जाईल, जो प्रति दिशा प्रति तास 1,100 प्रवासी (पीपीपीएचपीडी) आणि दिवसाला 11,000 प्रवासी वाहतूक करण्याच्या दृष्टीने डिझाईन केला जाईल.

रोप-वे प्रकल्पामुळे बांधकाम आणि परिचालनादरम्यान, तसेच आदरातिथ्य, पर्यटन, फूड् अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) आणि पर्यटन यासारख्या पर्यटनाशी संलग्न उद्योगांमध्ये वर्षभर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.

रोपवे प्रकल्पाचा विकास, हे समतोल सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देणे, यात्रेकरूंसाठी शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण सुविधा उपलब्ध करणे आणि या प्रदेशाच्या वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे, या दिशेने महत्वाचे पाऊल आहे.

हेमकुंड साहिब जी, हे उत्तराखंड राज्यातील चामोली जिल्ह्यात 15,000 फूट उंचीवर वसलेले यात्रेकरूंचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र आहे. या पवित्र स्थळी स्थापन केलेला गुरुद्वारा मे ते सप्टेंबर, असे वर्षातील सुमारे 5 महिने खुला असतो आणि या ठिकाणी दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाख भाविक भेट देतात. हेमकुंड साहिब जी चा मार्ग, हा प्राचीन गढवाल हिमालयातील, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या प्रसिद्ध व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, या राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वारही आहे.

 
S.Tupe/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2108485) Visitor Counter : 67