उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या 'लुक ईस्ट' धोरणाचे 'अॅक्ट ईस्ट'मध्ये परिवर्तन झाले असून, या धोरणाने ईशान्य भारतात प्रचंड प्रगती घडवल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन


अरुणाचल प्रदेशातील कामले जिल्ह्यात, कांपोरिजो सर्कल येथे आयोजित पहिल्या संयुक्त मेगा न्योकुम युलो महोत्सवाला उपराष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 26 FEB 2025 4:12PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे की, काही दशकांपूर्वी भारत सरकारने 'लुक ईस्ट' धोरण आणले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे रूपांतर 'अॅक्ट ईस्ट'मध्ये केले, कारण केवळ पाहणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष कृती महत्वाची आहे, आणि जेव्हा एखादे काम केले जाते, तेव्हा आपल्याला लक्षणीय बदल दिसून येतो, मग तो हवाई प्रवास असो, विमानतळ असो, रेल्वे कनेक्टिव्हिटी (दळणवळण) असो, रस्ते कनेक्टिव्हिटी असो किंवा अगदी 4 जी नेटवर्कची उपलब्धता असो. हे सर्व बदल अरुणाचल प्रदेशातील प्रगती दर्शवत आहेत, असे उपराष्ट्रपती  म्हणाले.  अरुणाचल प्रदेशातील कामले जिल्ह्यात, कांपोरिजो सर्कल येथे आयोजित पहिल्या संयुक्त मेगा न्योकुम युलो महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थितांना संबोधित करत होते.

अरुणाचल प्रदेशाची 50,000 मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. एक मेगावॅट वीज निर्मितीसाठी  10 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे, म्हणजेच अरुणाचल प्रदेशाकडे 5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीची क्षमता आहे, असे ते म्हणाले.

किरेन जी यांच्याकडे नक्कीच काही तरी जादू आहे. त्यांनी पंतप्रधानांकडे पाठपुरावा केला, आणि आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा, सहकार्य करावे आणि आपली संस्कृती जपावी, असे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर मला आज या ठिकाणी उपस्थित राहताना अत्यंत आनंद वाटत आहे.” उपराष्ट्रपती म्हणाले.

या महत्वाच्या घडामोडींचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले की, भारताच्या इतिहासात प्रथमच बौद्ध समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला असून बौद्ध नेत्याला कॅबिनेट मंत्रिपदही देण्यात आले आहे. या ऐतिहासिक घडामोडींनी जगाला एक कणखर संदेश दिला आहे, असे ते म्हणाले. या प्रगतीमुळे भारत हा अतुलनीय देश असून आपण राष्ट्रवादाने सदैव प्रेरित राहायला हवे, या वस्तुस्थितीला पुष्टी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही परिस्थितीत आपण राष्ट्रहित, देशा प्रति समर्पण अथवा देशसेवा करण्याच्या संकल्पाशी तडजोड करू शकत नाही, असे ते म्हणाले.

देशातील सांस्कृतिक एकतेचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले की, जगात भारतासारखा अन्य कोणताही देश नाही. आज आपण ‘न्योकुम युलो’ साजरा करत असताना होळी, बैसाखी, लोहडी, बिहू, पोंगल आणि नवन्ना यासारखे सण देखील देशभरात साजरे केले जातील. आपण भारताच्या कोणत्याही भागात असलो, तरी आपले विचार आणि परंपरा एकच आहेत, असे उपराष्ट्रपती  म्हणाले.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2106473)