गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) अंतर्गत अहमदाबाद इथे 188 निर्वासित बंधू-भगिनींना नागरिकत्व प्रमाणपत्रे केली प्रदान 



सीएए निर्वासितांना  केवळ नागरिकत्व प्रदान करण्यासाठीच नाही तर त्यांना न्याय आणि अधिकार देण्यासाठी देखील आहे


ज्यांना पूर्वी निर्वासित म्हटले जात होते ते आजपासून भारतमातेच्या कुटुंबात सामिल झाले आहेत


तीन पिढ्यांपासून अन्याय सहन करणाऱ्या  कोट्यवधी निर्वासितांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी न्याय दिला आहे.


ज्यांचा निर्वासित हा दर्जा आहे त्यांनी घाबरू नये, त्यांनी नागरिकत्वासाठी मोकळेपणाने अर्ज करावा

प्रविष्टि तिथि: 18 AUG 2024 5:54PM by PIB Mumbai


केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) अंतर्गत अहमदाबाद इथे  188 निर्वासित बंधू-भगिनींना नागरिकत्व प्रमाणपत्रांचे वितरण केले.

आपल्या भाषणात  अमित शाह म्हणाले की, सीएए हा कायदा देशात स्थायिक झालेल्या लाखो निर्वासितांना केवळ नागरिकत्व देण्यासाठीच नाही, तर लाखो निर्वासितांना न्याय आणि अधिकार देण्यासाठी आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे 1947 ते 2014 पर्यंत देशात आश्रय घेतलेल्या लोकांना त्यांचे अधिकार आणि न्याय मिळाला नाही, असे ते म्हणाले.  या लोकांना ते पूर्वी राहात असलेल्या शेजारी देशांमध्येच नव्हे तर येथेही छळ  सहन करावा लागला, असे त्यांनी सांगितले.  शाह म्हणाले की, या कोट्यवधी लोक तीन पिढ्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत होते, मात्र विरोधकांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे त्यांना न्याय मिळाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लाखो आणि करोडो लोकांना न्याय मिळवून दिला आहे, असे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री म्हणाले की कायदा हा लोकांसाठी असतो आणि लोक कायद्यासाठी नाहीत.  सीएएबाबत देशात अफवा पसरवण्यात आल्या. मात्र, हा कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही आणि हिंदू, जैन, शीख, बौद्ध निर्वासितांना नागरिकत्व देणारा हा कायदा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.  आजही काही राज्य सरकारे जनतेची दिशाभूल करत आहेत, असे त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांनी देशभरातील निर्वासितांना आवाहन केले की त्यांनी नागरिकत्वासाठी कोणतीही काळजी न करता अर्ज करावा आणि यामुळे त्यांच्या नोकऱ्या, घरे इत्यादी पूर्वीप्रमाणेच अबाधित राहतील.

फाळणी झाली त्यावेळी बांगलादेशात 27 टक्के हिंदू होते, आज केवळ 9 टक्के उरले आहेत.  उरलेले हिंदू कुठे गेले?, असा सवाल अमित शाह यांनी केला.  त्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या आश्रयाला आलेल्या लोकांना स्वाभिमानाचे जीवन जगण्याचा आणि स्वतःच्या  इच्छेनुसार धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. जर त्यांच्या देशात सन्मानाने जगू शकत नाहीत आणि आमच्या आश्रयाला येत आहेत, तर आम्ही बघ्याची भूमिका घेऊन राहू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. हे नरेंद्र मोदी सरकार असून या सरकारमध्ये या लोकांना नक्कीच न्याय मिळेल, असे त्यांनी नमूद केले. 

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2046450) आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Manipuri , Assamese , Bengali , Gujarati , Tamil , Telugu , Kannada