पंतप्रधान कार्यालय

लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तराचा मजकूर

Posted On: 02 JUL 2024 9:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जुलै 2024

 

माननीय सभापती जी,

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी उपस्थित आहे.  

माननीय सभापती जी,

माननीय राष्ट्रपतीजींनी आपल्या अभिभाषणात विकसित भारताच्या संकल्पाचा विस्तार केला आहे. माननीय राष्ट्रपती महोदयांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. राष्ट्रपतीजींनी आपल्या सर्वांना आणि देशाला मार्गदर्शन केले आहे, त्याबद्दल मी राष्ट्रपतीजींचे मनःपूर्वक आभार मानतो.

माननीय सभापती जी,

काल आणि आज अनेक सन्माननीय सदस्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपली मते मांडली आहेत.  मला विशेषतः, जे पहिल्यांदाच खासदार म्हणून आपल्यात आले आहेत आणि त्यातील काही आदरणीय सहकाऱ्यांनी संसदेच्या सर्व नियमांचे पालन करत आपली मते मांडली, त्यांची वागणूक अनुभवी खासदारासारखी होती.  आणि म्हणूनच पहिल्यांदाच येऊनही त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे आणि या चर्चेत त्यांनी आपल्या विचारांनी अधिक मोलाचा वाटा उचलला आहे.

माननीय सभापती जी,

देशाने यशस्वी निवडणूक मोहीम राबवून जगाला दाखवून दिले आहे की ही जगातील सर्वात मोठी निवडणूक मोहीम होती. देशातील जनतेने जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेत आम्हाला निवडून दिले आहे.

आणि माननीय सभापती जी,

काही लोकांची व्यथा मी समजू शकतो की, सतत खोटे बोलूनही त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आणि ही लोकशाहीची जगातील सर्वात मोठी निवडणूक मोहीम, माननीय सभापती जी, आणि भारतातील जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा देशसेवा करण्याची संधी दिली आहे.  लोकशाही जगतासाठी ही एक अतिशय महत्त्वाची घटना आहे, अतिशय अभिमानास्पद घटना आहे.

माननीय सभापती जी,

देशातील जनतेने प्रत्येक कसोटीवर पारखून घेतल्यानंतर आम्हाला हा जनादेश दिला आहे.  जनतेने आमची मागील 10 वर्षांची कामगिरी (ट्रॅक रेकॉर्ड) पाहिली आहे.  'जनसेवा हीच पहिली सेवा' या मंत्राची पूर्तता करत आम्ही गरिबांच्या कल्याणासाठी समर्पण भावनेने केलेल्या कामामुळे 10 वर्षात 25 कोटी गरीब जनता गरिबीतून बाहेर आल्याचे जनतेने पाहिले आहे.  देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात इतक्या कमी कालावधीत इतक्या लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचा हा यशस्वी प्रयत्न या निवडणुकीत आमच्यासाठी वरदान ठरला आहे.

माननीय सभापती जी,

2014 मध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा विजयी झालो तेव्हा निवडणूक प्रचारातही आम्ही भ्रष्टाचार अजिबात खपवून घेणार नाही (भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण ठेवणार) असे सांगितले होते. आणि आज मला अभिमान वाटतो की आमच्या सरकारने भ्रष्टाचारामुळे त्रस्त असलेल्या देशातील सामान्य माणसाला मदत केली आहे, भ्रष्टाचाराने देशाला वाळवी प्रमाणे पोखरुन टाकले आहे….अशा परिस्थितीत भ्रष्टाचाराबाबत आमच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणासाठी आज देशाने आशीर्वाद दिले आहेत.

माननीय सभापती जी,

आज भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली आहे.  आज जगात भारताचा गौरव होत आहे आणि प्रत्येक भारतीयाला, जगाच्या भारताकडे पाहण्याच्या अभिमानास्पद दृष्टिकोनाचा अनुभव येत आहे.

माननीय सभापती जी,

देश प्रथम, भारत प्रथम हे आमचे एकमेव ध्येय देशवासीयांनी पाहिले आहे.  आमचे प्रत्येक धोरण, आमचे प्रत्येक निर्णय, आमच्या प्रत्येक कामाचा एकच मापदंड आहे की भारत प्रथम आणि भारत प्रथम या भावनेने आम्ही देशात आवश्यक सुधारणा सातत्याने सुरू ठेवल्या आहेत.  'सबका साथ सबका विकास' या मंत्राने गेल्या 10 वर्षांत आमचे सरकार देशातील सर्व जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

माननीय सभापती जी,

भारतीय राज्यघटनेच्या तत्वानुसार सर्व धर्मांच्या समानतेचा विचार सर्वोच्च ठेवून देशसेवा करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा तत्त्वांना आम्ही समर्पित आहोत.

माननीय सभापती जी,

या देशाने अनुनयाचे राजकारणही प्रदीर्घ काळ पाहिले आहे, या देशाने दीर्घकाळ अनुनयाच्या राज्यकारभाराचा नमुनाही पाहिला आहे.  देशात पहिल्यांदाच आम्ही धर्मनिरपेक्षतेच्या दिशेने पूर्ण प्रयत्न केले आणि आम्ही अनुनयाच्या दृष्टीने नाही, तर समाधान करणे आणि समाधान करण्याच्या विचाराने वाटचाल केली.  आणि जेव्हा आपण समाधानाबद्दल बोलतो तेव्हा याचा अर्थ प्रत्येक योजनेची संपृक्तता.  शेवटच्या माणसापर्यंत शासन पोहोचण्याची आमची जी संकल्पना आहे ती  पूर्ण करणे.  आणि जेव्हा आपण संपृक्ततेचे तत्त्व पाळतो तेव्हा संपृक्तता हा खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय असतो.  संपृक्तता म्हणजे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता असते आणि यामुळेच देशातील जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा निवडून देऊन आमच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब केले आहे.       

माननीय सभापती जी,

अनुनयाने हा देश उद्ध्वस्त केला आहे आणि म्हणूनच सर्वांनाच न्याय, कुणाचाही अनुनय नाही हे तत्व आपण पाळले आहे.

माननीय सभापती जी,

आमचा 10 वर्षांचा कार्यकाळ पाहिल्यानंतर आणि पारखून घेतल्यानंतर भारतातील जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

आम्हाला पुन्हा एकदा 140 कोटी देशवासीयांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

माननीय सभापती जी,

भारतातील लोक किती प्रगल्भ आहेत, भारतातील लोक त्यांच्या विवेकबुद्धीचा किती विवेकपूर्ण आणि उच्च आदर्शांसह वापर करतात हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे.  आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज तिसऱ्यांदा आम्ही आपल्या समोर, देशवासीयांसमोर नम्रपणे सेवा करण्यासाठी हजर झालो आहोत.

माननीय सभापती जी,

देशातील जनतेने आमची धोरणे पाहिली आहेत.  देशातील जनतेने आमच्या हेतूंवर आणि आमच्या निष्ठेवर विश्वास ठेवला आहे.

माननीय सभापती जी,

या निवडणुकीत देशवासीयांचा आशीर्वाद घेण्यासाठी, एक मोठा संकल्प घेऊन आम्ही जनतेमध्ये गेलो.  आणि आम्ही विकसित भारताच्या आमच्या संकल्पासाठी आशीर्वाद मागितले.  आम्ही विकसित भारत घडवण्याच्या वचनबद्धतेने, चांगल्या हेतूने आणि सामान्य लोकांचे कल्याण करण्याच्या उद्देशाने गेलो होतो.  विकसित भारतासाठीचा आमचा संकल्प अधिक बळकट करून जनतेने आम्हाला पुन्हा एकदा विजयी करून देशातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे.

आदरणीय सभापती जी,

देशाचा विकास होतो तेव्हा कोट्यवधी लोकांची स्वप्नं पूर्ण होतात. देशाचा विकास होतो तेव्हा कोट्यवधी लोकांचे संकल्प पूर्ण होतात.

आदरणीय सभापती जी,  

देशाचा विकास होतो तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी, त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मजबूत पायाभरणी केली जाते.

आदरणीय सभापती जी,   

विकसित भारताचा थेट लाभ म्हणजे आपल्या नागरिकांचा सन्मान, आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारणे हे आपण विकसित भारत असल्यामुळेच देशातील कोट्यवधी लोकांच्या नशिबी येत आहेत. स्वातंत्र्यानंतर माझ्या देशातील सामान्य नागरिक या बाबींपासून वंचित राहिला होता.

आदरणीय सभापती जी,

भारत विकसित होतो तेव्हा आपल्या गावांची आणि शहरांची स्थितीही चांगलीच सुधारते. गावातील जीवनात अभिमान असतो, प्रतिष्ठा सुद्धा असते आणि विकासाच्या नवनव्या संधी सुद्धा असतात. विकसित भारतात आपल्या शहरांचा विकास ही एक संधी म्हणून उदयास येते, आणि अशा वेळी भारतातील शहरेसुद्धा जगाच्या विकासाच्या प्रवासात बरोबरीने विकसित होतील, हे आपले स्वप्न आहे.

आदरणीय सभापती जी,

विकसित भारत म्हणजे कोट्यवधी नागरिकांना कोट्यवधी संधी उपलब्ध होतात. अनेक संधी उपलब्ध होत राहतात आणि प्रत्येक नागरिक आपले कौशल्य, क्षमता आणि स्रोतांनुसार विकासाची नवीन शिखरे गाठू शकतो.

आदरणीय सभापती जी,

आज तुमच्या माध्यमातून मी देशवासियांना ग्वाही देतो की विकसित भारताचा जो संकल्प आम्ही केला आहे, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, निष्ठापूर्वक प्रयत्न करू, आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि त्यासाठी आमच्या वेळेचा प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक कण विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पित करू. आम्ही देशातील जनतेला सांगितले होते 24 ×7 हे 2047. आज मी या सभागृहात पुन्हा एकदा सांगतो की आम्ही ते काम नक्कीच पूर्ण करू.

आदरणीय सभापती जी,

2014 सालचे ते दिवस आठवा, 2014 वर्षातले ते दिवस आठवले तर लक्षात येईल की आपल्या देशातील जनतेचा आत्मविश्वास हरवला होता, देश निराशेच्या गर्तेत बुडाला होता. अशा परिस्थितीत 2014 पूर्वी देशाचे जे सर्वात मोठे नुकसान झाले, जो सर्वात मोठा ठेवा गमावला, तो म्हणजे देशवासीयांचा आत्मविश्वास. आणि जेव्हा एखादी व्यक्ती विश्वास आणि आत्मविश्वास गमावते, तेव्हा त्या व्यक्तीसाठी, त्या समाजासाठी, त्या देशासाठी ठामपणे उभे राहणे कठीण वाटू लागते. आणि अशा वेळी सर्वसामान्य माणसाच्या तोंडून शब्दबाहेर पडतात, या देशाचे काहीही होऊ शकत नाही. त्या वेळी सगळीकडे हेच शब्द कानावर पडत होते. या देशाचे काहीही होऊ शकत नाही. 2014 सालापूर्वी हेच शब्द ऐकू आले होते. एका अर्थाने हेच शब्द भारतीयांच्या निराशेची ओळख ठरले होते. त्यावेळी आम्ही वर्तमानपत्र उघडले की दररोज फक्त घोटाळ्यांच्या बातम्या वाचायला मिळत होत्या. आणि हा काळ होता शेकडो कोटी रूपयांच्या घोटाळ्यांचा, रोज नवनवीन घोटाळे, घोटाळ्यांशी घोटाळ्यांची स्पर्धा, घोटाळेबाजांचे घोटाळे. आणि दिल्लीतून एक रुपया रवाना झाला तर जनतेपर्यंत त्यातले फक्त १५ पैसे पोहोचतात, हेही निर्लज्जपणे जाहीरपणे मान्य करण्यात आले. एका रुपयात 85 पैशांचा घोटाळा. घोटाळ्यांच्या त्या काळाने देशाला निराशेच्या गर्तेत लोटले होते. धोरणांना पक्षाघात होऊन ती लुळी पडली होती. घराणेशाही इतकी बोकाळली होती की सर्वसामान्य तरुणांनी तर आशाच सोडली होती. आपली शिफारस करणारे कोणी नसेल तर जगणे कठीण होईल, असे वाटू लागले होते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. गरीबांना घर घेण्यासाठी हजारो रुपयांची लाच द्यावी लागत होती.

आदरणीय सभापती जी,

अहो, गॅस कनेक्शनसाठी भल्याभल्यांना संसद सदस्य आणि खासदारांच्या घराच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या आणि ते सुद्धा त्यांना त्यांचा हिस्सा दिल्याशिवाय गॅस कनेक्शन मिळत नव्हते.

आदरणीय सभापती जी,

बाजारातील दुकानांमध्ये मोफत रेशनचा फलक कधी टांगला जाईल माहीती नसे. रेशनवरचे हक्काचे धान्य मिळत नसे, त्यासाठीही लाच द्यावी लागत असे. आणि आमचे बहुतेक बंधुभगिनी इतके निराश झाले होते की अनेकांना आपल्या नशिबाला दोष देऊन आपले जीवन संपवावे लागत असे.

आदरणीय सभापती जी,

2014 सालापूर्वी एक काळ असा होता जेव्हा ते सहा शब्द भारतातील लोकांच्या मनात घर करून होते. समाज निराशेच्या गर्तेत बुडाला होता. अशा वेळी देशातील जनतेने आम्हाला सेवेसाठी निवडले आणि त्याच क्षणी देशात परिवर्तनाचे युग सुरू झाले. आणि 10 वर्षात मी म्हणेन की माझ्या सरकारने अनेक बाबतीत यश मिळवले आहे. या यशामुळे, या कामगिरीमुळे देश निराशेच्या गर्तेतून बाहेर आला, आणि आशा आणि विश्वासाने उभा राहिला. देशाचा आत्मविश्वास हळूहळू शिगेला पोहोचला आणि त्यामुळेच त्या काळात नकोसे वाटणारे ते शब्द देशाच्या तरुण पिढीच्या शब्दकोशातून बाहेर पडू लागले. हळूहळू देशाचे मनही स्थिरावले. 2014 सालापूर्वी, या देशाचे काहीही होऊ शकत नाही, असे म्हणणारे, आता, या देशात सर्व काही होऊ शकते, या देशात सर्व काही शक्य आहे, असे म्हणू लागले. हा आत्मविश्वास देण्याचे काम आम्ही केले. सर्वप्रथम आम्ही वेगवान 5G आणले. आज देश म्हणू लागला की 5G वेगाने काम करू लागले आहे. भारत काहीही करू शकतो हे देश आता अभिमानाने सांगू लागला आहे.

आदरणीय सभापती जी,

एक काळ असा होता जेव्हा कोळसा घोटाळ्यात अनेक मोठ्या नावांचे हात काळे झाले होते. आज कोळशाचे जास्तीत जास्त उत्पादन आणि जास्तीत जास्त संवर्धनाचे, उत्पादनाचे विक्रम झाले आहेत, आणि त्यामुळे देश आता म्हणू लागला आहे – आता भारत काहीही करू शकतो.

आदरणीय सभापती जी,

2014 पूर्वी एक काळ असा होता जेव्हा फोन बँकिंगद्वारे मोठे बँक घोटाळे केले जात होते. बँकेची तिजोरी आपली वैयक्तिक मालमत्ता असावी, अशा थाटात लुटली गेली होती.

आदरणीय सभापती जी,

2014  नंतर धोरणात बदल, निर्णयात गती, निष्ठा, प्रामाणिकपणा या सर्वांचाच हा परिणाम आहे की जगातील चांगल्या बँकांमध्ये आज भारतातील बँकांचे स्थान निर्माण झाले. आज भारतातील बँक सर्वाधिक नफा मिळवणारी बँक बनली आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी.

आदरणीय सभापती जी,

2014 पूर्वी असा देखील एक काळ होता जेव्हा दहशतवादी येऊन मनाला वाटेल तिथे, जिथे हवं तिथे, जेव्हा हवं तिथे हल्ला करू शकत होते. 2014 नंतर स्थिती अशी झाली की जेव्हा त्या काळी 2014 पूर्वी निष्पाप लोक मारले जात होते. भारताच्या कानाकोपऱ्यांना लक्ष्य केले जात होते आणि सरकारे गप्प बसून राहात होती, तोंड उघडायला देखील तयार नव्हती. आज 2014 नंतरचा भारत घरात घुसून मारतो, सर्जिकल स्ट्राइक करतो, एयर स्ट्राइक करतो आणि दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांना देखील सामर्थ्य दाखवून दिले आहे.

आज आदरणीय सभापती जी,

देशातील  एक-एक नागरिक हे जाणून आहे की आपल्या सुरक्षिततेसाठी भारत काहीही करू शकतो.

आदरणीय सभापती जी,

कलम 370, त्याची पूजा करणाऱ्या लोकांनी मतपेढीच्या राजकारणाचे हत्यार बनवणाऱ्यांनी 370 ने जम्मू-काश्मीरची जी काही परिस्थिती केली होती, तेथील लोकांचे अधिकार हिरावून घेतले होते, भारताच्या राज्यघटनेला जम्मू-काश्मीरच्या सीमेत प्रवेश करता येत नव्हता आणि इथे राज्यघटना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या लोकांमध्ये ही राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची हिंमत नव्हती. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत असायचे आणि 370 चा तो काळ होता, सैन्यदलांवर दगडफेक केली जायची आणि लोक निराशेत बुडून जाऊन म्हणायचे, आता तर जम्मू-काश्मीरमध्ये काहीही होऊ शकणार नाही. आज 370व्या कलमाची भिंत कोसळली आहे, दगडफेक बंद झाली आहे, लोकशाही मजबूत आहे आणि लोक हिरीरीने भारताच्या राज्यघटनेवर विश्वास ठेवत, भारताच्या तिरंगा ध्वजावर विश्वास ठेवत, भारताच्या लोकशाहीवर विश्वास ठेवत, उत्साहाने मतदान करण्यासाठी पुढे येत आहेत, हे अगदी स्पष्ट दिसत आहे. 

आदरणीय सभापती जी, 

140 कोटी देशवासीयांमध्ये हा विश्वास निर्माण होणे ही अपेक्षा आणि जेव्हा विश्वास निर्माण होतो तो विकासाचे चालक बल बनतो. या विश्वासाने विकासाला गती देणाऱ्या चालक बलाचे काम केले आहे.

आदरणीय सभापती जी, 

हा विश्वास विकसित भारत, 'संकल्प से सिद्धी' चा विश्वास आहे.

आदरणीय सभापती जी,

जेव्हा स्वातंत्र्याचा संग्राम सुरू होता आणि जी भावना देशात होती. जो जोश होता, उत्साह होता, आकांक्षा होत्या, जो विश्वास होता की स्वातंत्र्य मिळवणारच, आज देशातील कोट्यवधी लोकांमध्ये तो विश्वास निर्माण झाला आहे ज्या विश्वासामुळे आज विकसित भारत बनणे एका प्रकारे त्याचा मजबूत पाया या निवडणुकीत त्याची पायाभरणी झाली आहे. जी तळमळ स्वातंत्र्य चळवळीत होती तीच तळमळ  विकसित भारताचे हे स्वप्न साकार करण्यामध्ये आहे.

आदरणीय सभापती जी,

आज भारताची उद्दिष्टे अतिशय विशाल आहेत आणि आज 10 वर्षात भारत अशा स्थितीत पोहोचला आहे की आपल्याला आपल्याशीच स्पर्धा करावी लागेल, आपल्याला आपले जुने विक्रम मोडावे लागतील आणि आपल्याला आपल्या विकासाच्या प्रवासाला नव्या उंचीवर न्यायचे आहे. गेल्या 10 वर्षात भारताने विकासाची जी शिखरे गाठली आहेत ती आपल्या स्पर्धात्मकतेची खूण, एक मापदंड बनली आहे. गेल्या 10 वर्षात आपण जो वेग प्राप्त केला आहे, आता त्याच वेगाचे आणखी जास्त वेगात रुपांतर करण्याबरोबर आपली स्पर्धा आहे आणि त्याच वेगाने आपण देशाच्या इच्छा पूर्ण करू असा विश्वास आहे.

आदरणीय सभापती जी,

आम्ही प्रत्येक यशाला, प्रत्येक क्षेत्राला पुढच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ.

आदरणीय सभापती जी,

10 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला 10 वर्षाच्या लहानशा कालावधीत आम्ही 10 व्या क्रमांकावरील अर्थव्यवस्थेला 5व्या क्रमांकावर घेऊन गेलो. आता आम्ही पुढच्या स्तरावर जाण्यासाठी ज्या गतीने निघालो आहोत, आता आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जाणार आहोत.

आदरणीय सभापती जी,

10 वर्षात आम्ही भारताला मोबाईल फोनचा मोठा उत्पादक बनवले आहे. भारताला मोबाईल फोनचा मोठा निर्यातदार बनवले. आता हेच काम आमच्या या कार्यकाळात सेमीकंडक्टर आणि इतर क्षेत्रात आम्ही करणार आहोत. जगातील महत्त्वाच्या कामात ज्या चिप्स वापरल्या  जातील, त्या चिप माझ्या भारताच्या मातीत तयार झालेल्या असतील. माझ्या भारताच्या तरुणांच्या  बुद्धीचा परिणाम असतील. माझ्या भारताच्या तरुणांच्या कष्टाचा परिणाम असेल, हा विश्वास आमच्या हृदयात आहे.

आदरणीय सभापती जी,

आम्ही आधुनिक भारताच्या दिशेने देखील जाऊ. आम्ही विकासाची नवी उंची गाठू, मात्र आमचे पाय जमिनीवरच राहतील, आमचे पाय देशातील जनसामान्यांच्या जीवनाशी जोडलेले असतील आणि आम्ही चार कोटी गरिबांसाठी घरे बांधलेली आहेत. येणाऱ्या या कार्यकाळात जलद गतीने आणखी तीन कोटी घरे बनवून या देशात कोणालाही घराशिवाय राहायला लागू नये याची आम्ही काळजी घेऊ.  

आदरणीय सभापती जी,

दहा वर्षात महिला बचत गटांमध्ये आम्ही देशातील कोट्यावधी भगिनींना उद्योजकता क्षेत्रात अतिशय यशस्वी रित्या पुढे नेले आहे. आता आम्हाला पुढच्या स्तरावर जायचे आहे. आता आमच्या महिला बचत गटांमध्ये ज्या भगिनी काम करत आहेत, त्यांचे आर्थिक व्यवहार आम्हाला वाढवायचे आहेत, त्यांचा विस्तार करायचा आहे की आम्ही अतिशय कमी कालावधीत तीन कोटी अशा भगिनींना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प घेऊन वाटचाल करणार आहोत.

आदरणीय सभापती जी,

मी यापूर्वी देखील सांगितले आहे, आज मी त्याचा पुनरुच्चार करत आहे- आमच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थ आहे, आम्ही तीन पट वेगाने काम करू. आमच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थ आहे आम्ही तिप्पट ताकद लावणार आहोत. आमच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थ आहे आम्ही तिप्पट फलनिष्पत्ती घेऊन येऊ.

आदरणीय सभापती जी,

रालोआचे तिसऱ्यांदा सरकारमध्ये येणे एक ऐतिहासिक घटना आहे. स्वातंत्र्यानंतर हे भाग्य दुसऱ्यांदा या देशात लाभले आहे आणि 60 वर्षांनी लाभले आहे. याचा अर्थ ही सिद्धी किती कठोर परिश्रमांनी प्राप्त होत असते. किती अभूतपूर्व विश्वास संपादन केल्यानंतर होते. अशाच प्रकारे हे राजकारणाच्या खेळाने होत नाही. जनसामान्यांच्या सेवेतून प्राप्त होते.
आदरणीय अध्यक्ष जी,

जनतेने आम्हाला स्थैर्य आणि  निरंतरता यासाठी जनादेश दिला आहे. आदरणीय अध्यक्ष  जी, लोकसभा निवडणुकीबरोबरच लोकांना काही गोष्टी जरा धूसर दिसू लागल्या आहेत.  लोकसभा निवडणुकीसोबतच आपल्या देशात चार राज्यांमधील निवडणुकाही झाल्या आणि आदरणीय अध्यक्ष महोदय, या चारही राज्यांमध्ये रालोआला अभूतपूर्व यश मिळाले आहे. आम्ही मोठा विजय मिळवला आहे. महाप्रभू जगन्नाथजींची भूमी ओरिसाने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

आंध्र प्रदेशमध्ये रालोआने  सर्व जागा जिंकल्या आहेत. सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही हे दृष्टीस पडत नाहीत.

आदरणीय अध्यक्ष जी,

अरुणाचल प्रदेशमध्ये  आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करू. सिक्कीम मध्ये रालोआने पुन्हा एकदा सरकार स्थापन केले आहे. अलिकडेच  6 महिन्यांपूर्वी  आदरणीय अध्यक्ष  जी, तुमचे गृह राज्य  राजस्‍थान, मध्‍य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये आम्ही मोठा विजय मिळवला आहे .

आदरणीय अध्यक्ष जी,

आम्हाला नवनवीन क्षेत्रात जनतेचे प्रेम मिळत आहे , जनतेचा आशीर्वाद मिळत आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

भाजपने यावेळी केरळमध्ये खाते उघडले आहे आणि मोठ्या अभिमानाने केरळमधील आमचे खासदार  आमच्यासोबत बसले आहेत. तामिळनाडूतील अनेक जागांवर भाजपने आपले अस्तित्व नोंदवले  आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्यावेळच्या तुलनेत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. आगामी काळात तीन राज्यांमध्ये निवडणुका आहेत. मी त्या  तीन राज्यांबद्दल बोलत आहे जिथे निवडणुका होत आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड… इथे निवडणुका होणार आहेत.

आदरणीय अध्यक्ष जी,

मागील  विधानसभा निवडणुकीत  आम्हाला या तीन राज्यांमध्ये जेवढी मते मिळाली, त्यापेक्षा अधिक  या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही राज्यांमध्ये मिळाली.

आदरणीय अध्यक्ष जी,

पंजाबमध्येही आमची कामगिरी अभूतपूर्व झाली आणि आम्हाला आघाडी मिळाली . जनतेचे  भरपूर आशिर्वाद आमच्यासोबत आहेत.

आदरणीय अध्यक्ष जी,

2024 च्या निवडणुकीत  काँग्रेससाठीही या देशातील जनतेने जनादेश दिला आहे आणि या देशाचा जनादेश आहे की तुम्ही तिथेच बसा, विरोधी पक्षातच  बसा आणि युक्तिवाद संपला की आरडाओरडा करत रहा.

आदरणीय अध्यक्ष जी,

काँग्रेसच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे,  सलग तीनवेळा काँग्रेसला 100 चा आकडा पार करता आलेला नाही. काँग्रेसच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा पराभव आहे. तिसरी सर्वात वाईट कामगिरी आहे . काँग्रेसने आपला पराभव मान्य केला असता, जनतेचा जनादेश मान्य करून आत्मपरीक्षण केले असते तर बरे झाले असते... मात्र हे जणू शीर्षासन करण्यात व्यग्र आहेत आणि काँग्रेस आणि त्यांची यंत्रणा रात्रंदिवस वीज जाळून भारतातील नागरिकांच्या  मनात हे रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांनी आमचा पराभव केला आहे.

अध्यक्ष जी, 

असे का होत आहे? माझ्या सामान्य जीवनातील अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो. एक लहान मुलगा  सायकलवरून निघाला आहे आणि तो मुलगा  सायकलवरून पडतो,  सायकलवरून घसरतो, रडायला लागतो,  तेवढ्यात एक  मोठी व्यक्ती त्याच्याकडे येते आणि त्याला म्हणते,  बघ मुंगी मेली, बघ, पक्षी उडून गेला, तू ते छान सायकल चालवतोस, अरे तू पडला नाहीस … असे करून आपण त्याचे डोके शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे लक्ष दुसरीकडे वळवून आपण त्याला खुश   करतो. तर  आजकाल मुलाला खुश  करण्याचे काम सुरू आहे आणि सध्या काँग्रेसचे लोक आणि त्यांची यंत्रणा हे खुश  करण्याचे काम करत आहेत.

आदरणीय अध्यक्ष जी,

1984 ची ती निवडणूक आठवा, त्यानंतर या देशात 10 लोकसभा निवडणुका झाल्या… 10 लोकसभा निवडणुका झाल्या… 1984 नंतर 10 लोकसभा निवडणुका होऊनही काँग्रेसला 250 चा आकडा गाठता आलेला नाही. यावेळी कसे तरी 99 पर्यंत गेले  आहोत.

आदरणीय अध्यक्ष जी,

मला एक किस्सा आठवला… एक मुलगा 99 गुण घेऊन अभिमानाने फिरत होता आणि तो सगळ्यांना दाखवत होता की त्याला किती गुण  मिळाले आहेत,  लोक देखील 99 ऐकून  त्याचे कौतुक करायचे आणि त्याला शाबासकी द्यायचे. तेवढ्यात त्याचे शिक्षक आले आणि त्यांनी विचारले कशाबद्दल मिठाई  वाटत आहात ? त्याने 100 पैकी 99 नाही मिळवले,  त्याला 543 मधून 99 मिळाले आहेत. आता त्या बालिश बुद्धीला कोण समजावणार की तू अपयशाचा विश्वविक्रम केला आहेस.

आदरणीय अध्यक्ष  जी,

काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यांनी  शोले चित्रपटालाही  मागे टाकले  आहे. तुम्हा सर्वांना शोले चित्रपटातील मौसी  जी आठवत असेल…  तिसऱ्यांदा हरले आहेत पण मौसी , ही गोष्ट खरी आहे, तिसऱ्यांदाच तर  हरले , पण मौसी , हा नैतिक विजय तर आहे ना ?

आदरणीय अध्यक्ष  जी,

13 राज्यांमध्ये 0 जागा मिळाल्या आहेत , अरे मौसी 13 राज्यांमध्ये  0 जागा मिळाल्या पण हीरो तर आहे  ना?

आदरणीय अध्यक्ष  जी,

अहो, पक्षाची लूट जरी संपली  आहे, अरे मौसी , मात्र पक्ष अजून श्वास तर घेत आहे. मी काँग्रेसवाल्यांना सांगेन,   खोटा विजय साजरा करून जनादेशकडे दुर्लक्ष करू नका. खोट्या विजयाच्या नशेत जनादेश बुडवू  नका, हुरळून जाऊ नका . देशवासीयांचा जनादेश समजून तो स्वीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.

आदरणीय अध्यक्ष  जी,

काँग्रेसच्या सहकारी पक्षांनी या निवडणुकीचे विश्लेषण केले आहे की नाही हे मला माहीत नाही. या सहकार्यासाठी देखील ही निवडणूक एक संदेश आहे.

आदरणीय अध्यक्ष  जी,

आता  2024 पासून काँग्रेस पक्ष परजीवी म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून असलेला  काँग्रेस पक्ष म्हणून ओळखला जाईल. 2024 पासून जी  काँग्रेस आहे ती परजीवी काँग्रेस आहे आणि परजीवी तो असतो जो ज्या शरीरावर  त्या शरीरासह राहतो, हा परजीवी त्यालाच खाऊन टाकतो. काँग्रेस देखील ज्या पक्षाशी आघाडी  करतो, त्या पक्षाचीच  मते खातो आणि आपल्या मित्र पक्षाच्या मदतीने  फोफावतो आणि म्हणूनच काँग्रेस परजीवी काँग्रेस बनली आहे. जेव्हा मी परजीवी म्हणतो तेव्हा मी तथ्याच्या आधारावर म्हणतो.

माननीय सभापती महोदय,

मला आपल्या माध्यमातून सदनापुढे आणि या सदनाच्या माध्यमातून देशासमोर काही आकडेवारी ठेवायची आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होती किंवा जिथे काँग्रेस हा प्रमुख पक्ष होता आणि त्याच्या भागीदाराला 1-2-3 जागा होत्या, त्या ठिकाणी काँग्रेसचा स्ट्राइक रेट (जिंकण्याची टक्केवारी) केवळ 26 टक्के राहिला आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणी तो कोणाच्या तरी आधाराने, कनिष्ठ भागीदार होता, कुठल्यातरी पक्षाने त्याला संधी दिली, अशा राज्यांमध्ये, जिथे काँग्रेस कनिष्ठ भागीदार आहे, त्या ठिकाणी त्यांचा स्ट्राइक रेट 50 टक्के आहे. आणि काँग्रेसच्या 99 जागांपैकी बहुतेक जागा त्यांच्या मित्रपक्षांनी जिंकल्या आहेत. आणि म्हणूनच मी म्हणतो, ही परजीवी काँग्रेस आहे. 16 राज्यांमध्ये जिथे काँग्रेस एकट्याने लढली, त्या ठिकाणी या निवडणुकांमध्ये त्यांच्या मतदारांची टक्केवारी घटली आहे.

माननीय अध्यक्ष महोदय.

गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढली, आणि 64 पैकी केवळ 2 जागा जिंकल्या. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की, या निवडणुकांमध्ये काँग्रेस पूर्णपणे परजीवी बनली आहे, आणि आपल्या मित्र पक्षांच्या खांद्यावर चढून त्यांनी जागांचा हा आकडा गाठला आहे. काँग्रेसने आपल्या मित्र पक्षांची मते खाल्ली नसती, तर लोकसभेच्या एवढ्या जागा जिंकणे त्यांना मोठे कठीण गेले असते. 

माननीय अध्यक्ष महोदय,

अशा वेळी संधी चालून आली आहे, देशाने विकासाचा मार्ग निवडला आहे, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प देशाने केला आहे. तेव्हा भारताला संघटित होऊन समृद्धीचा नवा प्रवास आखावा लागेल. अशा वेळी सहा-सहा दशके हिंदुस्तानात राज्य करणारा काँग्रेस पक्ष अराजकता पसरवण्यात मग्न आहे, हे देशाचे दुर्दैव आहे. ते दक्षिणेत जाऊन उत्तरेकडील लोकांविरोधात बोलतात, ते उत्तरेत जाऊन दक्षिणेविरुद्ध वीष पसरवतात, ते पश्चिमेकडील लोकांविरुद्ध बोलतात, ते महापुरुषांच्या विरोधात बोलतात. त्यांनी भाषेच्या आधारावर फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ज्या नेत्यांनी देशाचा काही भाग भारतापासून वेगळा करण्याचा पुरस्कार केला होता, त्या नेत्यांना संसदेचे तिकीट देण्याचे पाप काँग्रेस पक्षाने केले. आम्हाला हे पहावे लागले, हे आमचे दुर्दैव आहे. एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात उभे करण्यासाठी काँग्रेस पक्ष उघडपणे रोज नवनवीन कथानक तयार करत आहे. नवनवीन अफवा पसरवत आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

देशाच्या एका भागातील लोकांना हीन ठरवण्याच्या प्रवृत्तीलाही काँग्रेसचे लोक प्रोत्साहन देत आहेत.

माननीय अध्यक्ष महोदय,

देशात आर्थिक अराजकता पसरवण्याच्या दिशेनेही काँग्रेसचा नियोजनपूर्वक प्रयत्न सुरु आहे. निवडणुकांदरम्यान राज्यांमध्ये ज्या गोष्टींची चर्चा झाली, ते त्यांच्या राज्यांमध्ये ज्या प्रकारची आर्थिक पावले उचलत आहेत, तो मार्ग देशाला आर्थिक अराजकतेकडे नेणारा आहे. त्यांच्या राज्यांचा देशावर आर्थिक बोजा पडावा यासाठी जाणीवपूर्वक हा खेळ खेळला जात आहे. आपल्या मनाजोगा निकाल आला नाही, तर 4 जूनला देश पेटवून दिला जाईल, असे व्यासपीठावरून उघडपणे जाहीर करण्यात आले होते. लोक एकत्र येतील, आणि अराजकता पसरवतील, असे  आवाहन अधिकृतपणे करण्यात आले होते. अराजकता पसरवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. CAA बाबत जी अराजकता पसरवली गेली, देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा जो खेळ खेळला गेला, संपूर्ण परिसंस्था यावर जोर देत राहिली, जेणे करून त्यांचे राजकीय उद्दिष्ट पूर्ण होईल.

माननीय अध्यक्ष महोदय,

देशाला दंगलींच्या खाईत ढकलण्याचे प्रयत्नही संपूर्ण देशाने पहिले आहेत.

माननीय अध्यक्ष महोदय,

आजकाल सहानुभूती मिळवण्यासाठी एक नवीन नाटक सुरू झाले आहे, एक नवीन खेळ खेळला जात आहे, मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. एक मुलगा शाळेतून घरी आला आणि जोरजोरात रडू लागला. त्याची आई सुद्धा घाबरली. म्हणाली, काय झालं, तो खूप रडू लागला आणि मग म्हणाला, आई, आज मला शाळेत सर्वांनी खूप मारलं. आज मला शाळेत याने मारले, आज मला शाळेत त्याने मारले, आज अमक्याने मला शाळेत मारले. आणि तो जोरजोरात रडू लागला, आई काळजीत पडली. तिने विचारले, बाळ, पण काय झाले होते, तो काहीच बोलत नव्हता, फक्त रडत होता, मला मारले, मला मारले. मुलगा हे सांगत नव्हता, की आज शाळेत त्याने कोणालातरी आई वरून शिवी दिली होती. त्याने हे सांगितले नाही, की त्याने कोणाची तरी पुस्तके फाडली होती. तो हे बोलला नाही, की त्याने शिक्षकांना चोर म्हटले होते. त्याने हे सांगितले नाही, की त्याने कोणाचा तरी डबा चोरून खाल्ला होता. आपण काल सदनात हाच पोरखेळ पहिला होता. काल इथे बाल बुद्धीचा आक्रोश सुरु होता, मला मारले, याने मला मारले, त्याने मला मारले, मला इथे मारले, तिथे मारले, असे सुरु होते.

माननीय अध्यक्ष महोदय,

सहानुभूती मिळवण्यासाठी हे नवे नाटक सुरू आहे. मात्र हजारो कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ते जामिनावर बाहेर असल्याचे सत्य देशाला माहीत आहे. ओबीसी प्रवर्गातील लोकांना चोर म्हटल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल बेजबाबदार वक्तव्य केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली होती. थोर स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. देशातील सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांवर हत्येचा आरोप केल्या प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू आहे. अनेक नेते, अधिकारी आणि संस्थांशी खोटे बोलल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर असून या प्रकरणांचे खटले सुरू आहेत.

माननीय अध्यक्ष महोदय,

बाल बुद्धीला ना बोलण्याचे ताळतंत्र असते, ना व्यवहार ज्ञान असते. आणि जेव्हा ही बाल बुद्धी एखाद्याचा ताबा घेते, तेव्हा सदनात कोणाला तरी ते मिठी मारतात. ही बाल बुद्धी जेव्हा आपल्या सीमा ओलांडते, तेव्हा ते सदनात बसून डोळे मारतात, डोळे मारतात. आदरणीय अध्यक्ष महोदय, यांचे सत्य आता संपूर्ण देशाला समजले आहे. म्हणूनच आज देश त्यांना सांगत आहे की, हे तुम्हाला शक्य नाही, तुमच्याने हे होणार नाही.

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

तुलसीदासजी यांनी म्हटलं आहे, अखिलेश जी... तुलसीदास जी यांनी म्हटलं आहे की असत्य घेणे असत्य देणे म्हणजे खोटे अन्न आणि खोटेच चघळणे. तुलसीदासजी म्हणतात असत्य घेणे असत्य देणे म्हणजे खोटे अन्न आणि खोटेच चघळणे. काँग्रेसने असत्य हे राजकारणाचे शस्त्र बनविले आहे. काँग्रेसकडून असत्य बोलले जात आहे. जसे नरभक्षक पशूच्या तोंडी रक्त लागते, त्याचप्रमाणे आदरणीय अध्यक्ष महोदय, काँग्रेसच्या तोंडी असत्याचे रक्त लागले आहे. देशात काल 1 जुलै रोजी खटाखट दिवसही साजरा करण्यात आला. 1 जुलै रोजी लोक आपल्या बँकेत तपासणी होते की 8500 रुपये जमा झाले की नाही. या असत्य कथनाचा परिणाम पहा की काँग्रेस लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहे. माता-भगिनींना दर महिन्यात 8500 रुपये देण्याच्या असत्य वचनामुळे या मातांच्या भगिनींच्या मनावर जी जखम झाली आहे ती शाप बनून  काँग्रेसचा विनाश करेल. 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

ईव्हीएमबद्दल खोटे, राज्यघटनेबद्दल असत्य, आरक्षणाबद्दल खोटे, त्याआधी राफेलबद्दल खोटे, एचएएलबद्दल असत्य, एलआयसीबाबत खोटे, बँकांबद्दल खोटे सांगत कर्मचाऱ्यांनाही भडकवण्याचे प्रयत्न झाले. त्यांची हिंमत इतकी वाढली की काल सभागृहाचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. सभागृहात काल अग्निवीरबाबत खोटे संगितले गेले. एमएसपी दिला जात नाही इथवर काल इथे प्रचंड खोटे संगितले गेले.

अध्यक्ष महोदय,

राज्यघटनेच्या प्रतिष्ठेशी खेळ हे सभागृहाचे दुर्दैव असून लोकसभेत अनेकदा जिंकून आलेल्या लोकांना सभागृहाच्या प्रतिष्ठेचा खेळ मांडणे शोभत नाही

आदरणीय अध्यक्ष महोदय,

जो पक्ष साठ वर्षांपासून इथे अस्तित्वात आहे, ज्याला सरकारचा कारभार चालवणे माहीत आहे. ज्यांच्याकडे अनुभवी नेत्यांची साखळी आहे. ते जेव्हा या अराजकाच्या मार्गावर जातात, असत्याचा मार्ग निवडतात, तेव्हा देश गंभीर संकटाकडे जात असल्याचा पुरावा समोर येतो.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

सभागृहाच्या प्रतिष्ठेशी खेळणे हा आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांचा अपमान आहे, या देशातील महापुरुषांचा अपमान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सुपुत्रांचा हा अपमान आहे.

आणि म्हणून आदरणीय अध्यक्ष महोदय,

मला माहित आहे की आपण खूप दयाळू आहात, आपण उदार मनाचे स्वामी आहात, आपण संकटाच्या वेळीही हलक्याफुलक्या गोड हास्यासह सर्व गोष्टी सांभाळून घेता.

पण आदरणीय अध्यक्ष महोदय,

आता जे घडत आहे आणि काल जे काही घडले होते ते गांभीर्याने घेतल्याशिवाय आपण संसदीय लोकशाहीचे रक्षण करू शकणार नाही.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या वागण्याकडे यापुढे बालबुद्धी समजत, बालिश बुद्धिमत्ता म्हणत दुर्लक्षित करता कामा नये, अजिबात दुर्लक्षित करता कामा नये. आणि मी हे सांगतोय कारण यामागचा उद्देश प्रामाणिक नसून याच्या हेतूमागचा  धोका गंभीर आहे आणि मला देशवासियांनाही जागरूक करू इच्छित आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या लोकांच्या असत्य कथनामुळे आपल्या देशातील नागरिकांच्या सद्सद्विवेक बुद्धीबाबत शंका निर्माण केली जाते. त्यांचे असत्य बोलणे हे देशाच्या सामान्य सद्सद्विवेक बुद्धीला थापट मारण्यासारखी निर्लज्ज कृती आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

हे कृत्य देशाच्या महान परंपरांना मारक आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या सभागृहाची प्रतिष्ठा वाचवण्याची खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. सभागृहात सुरू झालेल्या असत्याच्या पायंड्यावर आपण कठोर कारवाई कराल हीच देशवासीयांची आणि या सभागृहाचीही अपेक्षा आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

काँग्रेसने राज्यघटना आणि आरक्षणाबाबत कायमच असत्य सांगितले आहे. आज मी 140 कोटी देशवासियांसमोर सत्य मांडण्यास इच्छित आहे, मला ते अत्यंत नम्रतेने मांडायचे आहे. देशवासीयांनीही हे सत्य जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आणीबाणीचे हे 50 वे वर्ष आहे. आणीबाणी केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसेपोटी आणि हुकूमशाही मानसिकतेमुळे देशावर लादलेली हुकूमशाही होती. आणि काँग्रेसने क्रौर्याचे सर्व मापदंड ओलांडले. त्यांनी आपल्याच देशवासियांवर क्रौर्याचे पंजे पसरवले होते आणि देशाची मजबूत वीण उसवून  टाकण्याचे पाप केले होते.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

सरकार पाडणे, प्रसारमाध्यमांना दडपून टाकणे अशाप्रकारे घडणारी कृती राज्यघटनेच्या भावनेच्या विरोधात, राज्यघटनेच्या कलमांविरुद्ध, राज्यघटनेच्या प्रत्येक शब्दाविरुद्ध होती. ही तिच मंडळी आहेत ज्यांनी सुरुवातीपासूनच देशातील दलित आणि मागासवर्गीयांवर घोर अन्याय केला आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आणि याच कारणासाठी काँग्रेसच्या दलितविरोधी, मागासवर्गीयविरोधी मानसिकतेमुळे बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरुजींच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. दलित आणि मागासवर्गीयांवर नेहरुजींनी कसा अन्याय केला हे त्यांनी उघडकीस आणले होते. आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा देताना जी कारणे स्पष्ट केली होती, त्यातून त्यांचे चारित्र्य दिसून येते. बाबासाहेब आंबेडकर जी म्हणाले होते, अनुसूचित जातींबाबत सरकारकडून होत असलेल्या उपेक्षेमुळे मी आपल्या आतून उत्पन्न होणारा क्रोध थांबवू शकत नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत. अनुसूचित जातीच्या या उपेक्षेमुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रोध निर्माण केला. बाबासाहेबांनी केलेल्या या थेट हल्ल्यानंतर, बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी नेहरूजींनी आपले सर्व सामर्थ्य वापरले.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

कटकारस्थान करून सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करण्यात आला.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

केवळ पराभवच केला नाही तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही हार साजरी केली, जल्लोष केला आणि त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या आनंदाबद्दल एका पत्रात उल्लेख आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, बाबासाहेबांप्रमाणेच दलित नेते बाबू जगजीवन राम जी यांनाही त्यांचे हक्क प्रदान केले गेले नाहीत. आणीबाणीपश्चात जगजीवन राम जी पंतप्रधान बनण्याची शक्यता होती. जगजीवन राम जी कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान होऊ नयेत, हे इंदिरा गांधीजींनी पक्के ठरवले होते आणि जगजीवन राम कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान होऊ नयेत, असा उल्लेख एका पुस्तकात केला गेला आहे. तसे झाले तर त्यांना आयुष्यभर या पदावरून दूर करता येणार नाहीत. इंदिरा गांधींचे हे वचन त्या पुस्तकात उद्धृत आहे. काँग्रेसने चौधरी चरणसिंग जी यांनाही अशीच वागणूक दिली. त्यांनाही सोडले नव्हते. मागासवर्गीयांचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बिहारचे सुपुत्र सीताराम केसरी यांनाही अपमानास्पद वागणूक देण्याचे पाप याच काँग्रेसने केले.

 

आदरणीय सभापती महोदय,

काँग्रेस पक्ष प्रारंभ पासूनच आरक्षणाचा कडवा विरोध करत आला आहे. नेहरूजींनी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्पष्ट शब्दात आरक्षणाचा विरोध केला होता. काँग्रेसच्या एक पंतप्रधान, श्रीमती इंदिरा गांधीजी यांनी मंडल आयोगाचा अहवाल अनेक वर्षांपर्यंत बासनात गुंडाळून ठेवला होता.

आदरणीय सभापती महोदय,

काँग्रेस पक्षाचे तिसरे पंतप्रधान श्रीमान राजीव गांधी, जेव्हा ते विरोधी पक्षात होते, त्यांचे सर्वात मोठे भाषण आरक्षणाविरोधात होते. ते भाषण आजही संसदेच्या दस्तऐवजात उपलब्ध आहे. आणि म्हणूनच, आदरणीय सभापती महोदय, मी आज एका गंभीर विषयाकडे आपले आणि देशवासीयांचे ध्यान आकर्षित करू इच्छितो. काल जे झाले, ते या देशातील कोटी कोटी देशवासी येणाऱ्या कैक शतकांपर्यंत माफ करू शकणार नाहीत.

आदरणीय सभापती महोदय,

131 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद जी यांनी शिकागोमध्ये म्हटले होते. मला अभिमान आहे की, मी त्या धर्माचा आहे, ज्या धर्माने संपूर्ण जगाला सहिष्णुता आणि वैश्विक स्वीकृतीची शिकवण दिली आहे. 131 वर्षांपूर्वी हिंदू धर्माबाबत हे विचार विवेकानंदजी यांनी अमेरिकेतील शिकागो येथे जगभरातील दिग्गजांसमोर मांडले होते.

आदरणीय सभापती महोदय,

हिंदू सहनशील आहेत, हिंदू आपुलकी बाळगून जगणारा समुदाय आहे. याच कारणामुळे भारताची लोकशाही, भारताची इतकी सारी विविधता, त्याची विराटता याच कारणाने समृद्ध झाली आहे आणि पुढेही समृद्ध होत राहणार आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आज हिंदूंवर खोटे आरोप करण्याचे षडयंत्र केले जात आहे, गंभीर षडयंत्र केले जात आहे, ही खूपच गंभीर बाब आहे. आदरणीय सभापती महोदय, हिंदू हिंसक आहेत असे म्हटले गेले, हे आहेत तुमचे संस्कार, हे आहे तुमचे चारित्र्य, हे आहेत तुमचे विचार, ही आहे तुमची घृणा, या देशातील हिंदू विरोधातील हे कारनामे.

आदरणीय सभापती महोदय,

हा देश अनेक शतके हे विसरणार नाही. काही दिवसांपूर्वी, हिंदूंमध्ये जी शक्तीची कल्पना आहे, त्याचा विनाश करण्याची घोषणा करण्यात आली होती. तुम्ही कोणत्या शक्तीच्या विनाशाबाबत बोलत आहात. हा देश कैक शतकांपासून शक्तीचा उपासक आहे. हा माझा बंगाल दुर्गा मातेची पूजा करतो आहे, शक्तीची उपासना करत आहे. हा बंगाल काली मातेची उपासना करतो आहे, समर्पित भावाने उपासना करत आहे. तुम्ही त्या शक्तीच्या विनाशाबाबत बोलत आहात. हे तेच लोक आहेत, ज्यांनी हिंदू आतंकवाद हा शब्द तयार करण्याचा प्रयत्न केला होता. यांचे सोबती हिंदू धर्माची तुलना डेंग्यू मलेरिया अशा शब्दांशी करतील आणि हे लोक टाळ्या वाजवतील, हे देश कधीच माफ करणार नाही.

आदरणीय सभापती महोदय,

 विचारपूर्वक तयार केलेल्या एका रणनीतीनुसार, यांची संपूर्ण प्रणाली हिंदू परंपरा, हिंदू समाज, या देशाची संस्कृती, या देशाचा वारसा यांना कमी लेखणे, याबाबत अपशब्द वापरणे, त्यांचा अपमान करणे, हिंदूंची टर उडवणे, याला फॅशन बनवले आहे, आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना संरक्षण देण्याचे काम हे तत्व करत आहेत.

आदरणीय सभापती महोदय,

आम्ही लहानपणापासून शिकत आलो आहोत. छोट्या गावातील असो की शहरातील असो, गरीब असो की श्रीमंत असो, या देशातील प्रत्येक मूल हे जाणते. ईश्वराचे प्रत्येक रूप, आदरणीय सभापती महोदय, ईश्वराचे प्रत्येक रूप दर्शन घेण्यासाठी असते. ईश्वराचे कोणतेही रूप व्यक्तिगत स्वार्थासाठी, प्रदर्शनासाठी नसते. ज्याचे दर्शन घेतले जाते त्याचे प्रदर्शन केले जात नाही.

आदरणीय सभापती महोदय,

आपल्या देवी देवतांचा अपमान 140 कोटी देशवासीयांच्या मनाला खोल जखम करत आहे. व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी ईश्वराच्या रूपांचा अशाप्रकारे खेळ.. आदरणीय सभापती महोदय, हा देश कसे माफ करू शकतो.

आदरणीय सभापती महोदय,

सदनातील कालच्या दृश्यांना पाहून आता हिंदू समाजाला विचार करावा लागेल की, हे अपमानजनक विधान केवळ संयोग होता की कोणत्या प्रयोगाची तयारी आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपली सेनादले देशाचा अभिमान आहेत. संपूर्ण देशाला सेनादलांच्या साहस आणि वीरतेचा अभिमान आहे. आणि आज संपूर्ण देश पाहत आहे की आपली सेनादले, आपले संरक्षण क्षेत्र यात स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांमध्ये घडल्या नाहीत इतक्या सुधारणा आता घडत आहेत. आपल्या सेनादलांना आधुनिक बनवले जात आहे. आपली सेनादले प्रत्येक आव्हानाला चोख उत्तर देऊ शकतील यासाठी युद्धाचे सामर्थ्य असलेली सेनादले तयार करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, देशाच्या सुरक्षेचे उद्दिष्ट ठेवून सुधारणा करत आहोत, पावले उचलत आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक गोष्टी बदलल्या आहेत. लष्कर प्रमुखांचे पद नव्याने तयार झाल्यानंतर एकीकरण आणखी सशक्त झाले आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आपल्या सशस्त्र सेनादलात त्यांच्या सहयोगाने जे बऱ्याच काळापासून युद्धशास्त्राच्या तज्ञांचे मत होते की, भारतात थिएटर कमांड आवश्यक आहे. आज मी आनंदपूर्वक सांगू शकतो की लष्कर प्रमुख प्रणाली तयार केल्यानंतर देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक थिएटर कमांड च्या दिशेने प्रगती होत आहे.

आदरणीय सभापती महोदय,

आत्मनिर्भर भारत, अंतर्गत आपल्या सेनादलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी खूप मोठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली जात आहे. आपल्या देशाचे सैन्य तरुण असले पाहिजे. सैन्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी असते. आपल्याला आपल्या तरुणांवर विश्वास असला पाहिजे. सैन्यात तरुणांची ताकद वाढवली पाहिजे आणि म्हणूनच युद्ध सक्षम सैन्य तयार करण्यासाठी आम्ही सतत सुधार करत आहोत. वेळोवेळी सुधारणा न केल्यामुळे आपल्या सैन्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पण या गोष्टी सार्वजनिकरित्या बोलणे योग्य नाही म्हणून मी माझ्या तोंडाला कुलूप लावून बसलो आहे.

आदरणीय सभापती महोदय,

देशाचे संरक्षण एक गंभीर मुद्दा असतो. आदरणीय सभापती महोदय, अशा सुधारणांचा उद्देश, कोणत्याही परिस्थितीत आता युद्धाचे स्वरूप बदलत आहे. संसाधने बदलत आहेत, शस्त्रे बदलत आहेत, तंत्रज्ञान बदलत आहे. अशात आपण आपल्या सेनादलांना या आव्हानांच्या अनुरूप तयार करणे ही खूप मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी निभावण्यासाठी अपशब्द ऐकून देखील, खोटे आरोप सहन करून देखील तोंडाला कुलूप लावून आम्ही काम करत आहोत. अशा परिस्थितीत देशाच्या सेनेला आधुनिक बनवणे, सशक्त बनवणे आवश्यक असताना, अशावेळी काँग्रेस काय करत आहे? ते खोट्या गोष्टी पसरवत आहेत. ते संरक्षण सुधारणेच्या प्रयत्नांना कमकुवत करण्याचे षडयंत्र रचत आहेत.

आदरणीय सभापती महोदय,

खरे तर काँग्रेस पक्षातील लोक कधीच भारतीय सेनेला ताकदवान झालेले पाहू शकत नाहीत. आदरणीय सभापती महोदय, नेहरूजींच्या काळात देशाची सेना किती कमजोर होती, हे सर्वांना ठाऊक आहे. आपल्या सेनेत काँग्रेसने जे लाखो करोडो रुपयांचे घोटाळे केले आहेत, याच मार्गाने देशाची सेनादले कमजोर बनवली आहेत. त्यांनी या देशाच्या सेनेला कमजोर बनवले आहे. नौदल असो, लष्कर असो किंवा वायुदल, सेनेच्या प्रत्येक आवश्यकतेमध्ये यांनी देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनच भ्रष्टाचाराची परंपरा जोपासली आहे. जीप घोटाळा असो, पाणबुडी घोटाळा असो, बोफोर्स घोटाळा असो, या सर्व घोटाळ्यांनी देशाच्या सेनेची ताकद वाढणे अवूरुद्ध केले आहे. तोही एक काळ होता, आदरणीय सभापती महोदय, काँग्रेसच्या कार्यकाळात आपल्या सेनेजवळ बुलेटप्रूफ जॅकेट देखील नव्हते. यांनी सत्तेत असताना तर देशाच्या सेनेला बरबाद केलेच केले, पण हे कारनामे  विरोधी पक्ष झाल्यावर देखील सुरूच राहिले. विरोधी पक्ष बनल्यावर देखील सैन्याला कमजोर करण्याचे नेहमीच प्रयत्न केले जात राहिले. जेव्हा काँग्रेस पक्षाचे सरकार होते तेव्हा फायटर जेट घेतले नाहीत, आणि जेव्हा आम्ही प्रयत्न केला तर काँग्रेस सगळीकडे षडयंत्र रचायला सज्ज झाली. फायटर जेट वायुदलापर्यंत पोहोचू नयेत यासाठी षडयंत्र रचले गेले आणि आदरणीय सभापती महोदय, बालबुद्धी  पहा की राफेल चे छोटे छोटे खेळणे बनवून ते उडवण्यात हे लोक आनंद मानत होते देशाच्या सेनेची खिल्ली उडवत होते.

सभापती महोदय,

काँग्रेस अशा प्रत्येक पावलाला, प्रत्येक सुधारणेला विरोध करते, ज्यामुळे भारतीय सैन्य अधिक मजबूत होईल, अधिक सशक्त होईल.

आदरणीय सभापती महोदय,

तुम्ही मला बोलायला  वेळ दिल्याबद्दल आणि वेळ वाढवून दिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो.

आदरणीय सभापती महोदय,

आता काँग्रेसच्या लोकांना कळून चुकले आहे की, आपल्या तरुणांची ऊर्जा, आपल्या सैनिकांचा आत्मविश्वास हीच आपल्या सैन्यदलाची सर्वात मोठी ताकद आहे आणि आता यावर हल्ला करून,सैन्यात भरतीबद्दल खोटे बोलून एक नवी पद्धत अमंलात आणली जात आहे. लोकांनी,देशातील तरुणांनी आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सैन्यात भरती होऊ नये, म्हणून त्यांना थोपवण्यासाठीचे हे षडयंत्र आहे.

आदरणीय सभापती महोदय,

मला या सभागृहाच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहे की, काँग्रेस कोणासाठी आपल्या सैन्याला कमकुवत करू इच्छिते ?  काँग्रेसचे लोक कोणाच्या फायद्यासाठी भारतीय सैन्याबाबत इतके खोटे बोलत आहेत?

आदरणीय सभापती महोदय,

वन रँक वन पेन्शनबाबत देशातील शूर जवानांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न झाला.

आदरणीय सभापती महोदय,

आपल्या देशात इंदिरा गांधी यांनी वन रँक वन पेन्शनची व्यवस्था रद्द केली होती. अनेक दशकांपासून काँग्रेसने ही वन रँक वन पेन्शन लागू होऊ दिली नाही आणि निवडणुका आल्या की निवृत्त लष्करी वीरांना 500 कोटी रुपये दाखवून मूर्ख बनवण्याचा प्रयत्नही केला गेला. पण वन रँक वन पेन्शन शक्य तितकी पुढे ढकलण्याचा त्यांचा हेतू होता. एनडीए सरकारने वन रँक वन पेन्शन लागू केली आणि आदरणीय अध्यक्ष महोदय, भारताकडे कितीही मर्यादित संसाधने असली तरी, कोरोनाचा खडतर लढा असतानाही, एक लाख वीस हजार कोटी रुपये वन रँक वन पेन्शन म्हणून आपल्या माजी सैनिकांना देण्यात आले.

आदरणीय सभापती महोदय,

आदरणीय राष्ट्रपती महोदयांनीही आपल्या अभिभाषणात पेपर फुटीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मी देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला, देशातील प्रत्येक तरुणाला सांगेन की अशा घटना होऊ नये यासाठी सरकार अत्यंत गंभीर आहे आणि आम्ही युद्धपातळीवर आमची जबाबदारी पार पाडण्यासाठी एकामागोमाग एक पावले उचलत आहोत. तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. नीट परिक्षेप्रकरणी देशभरात सातत्याने अटकसत्र चालू  आहे. म्हणूनच याबाबत केंद्र सरकारने यापूर्वीच कडक कायदा केला आहे. आणि परीक्षा आयोजित करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले देखील उचलली जात आहेत.

आदरणीय सभापती महोदय, 

एनडीए सरकारने गेल्या 10 वर्षात विकासाचा सर्वात मोठा संकल्प केला आहे. आज भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा आपला संकल्प आहे. आज स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा आपला संकल्प आहे.

आदरणीय सभापती महोदय,

प्रत्येक गरीबाला घरे देण्याचा आमचा संकल्प आहे.

आदरणीय सभापती महोदय,

जगामध्ये भारत एक महाशक्ती उदयास येत असताना, आपल्या सैन्यालाही स्वावलंबी बनविण्याचा आपला दृढ निश्चय आहे.

आदरणीय सभापती महोदय,

हे युग हरित युग आहे. हा हरित युगाचा काळ आहे आणि म्हणूनच जागतिक तापमानवाढीशी लढा देणाऱ्या जगाला मोठी ताकद देण्याचे काम भारताने हाती घेतले आहे. नवीकरणीय उर्जेचा भारत पॉवर हाऊस बनावा या दिशेने आम्ही एकामागोमाग एक पाऊल टाकत आहे आणि ते साध्य करण्याचा आमचा निर्धार आहे.

आदरणीय सभापती महोदय,

भारताचे भविष्य हे ग्रीन हायड्रोजनशी आणि  ई-वाहनांशी जोडलेले आहे.  म्हणूनच भारताला ग्रीन हायड्रोजनचे केंद्र बनवण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत.

आदरणीय सभापती महोदय,

आज 21वे शतक हे भारताचे शतक बनवण्यासाठी आम्ही घेतलेल्या संकल्पांमध्ये पायाभूत सुविधांचाही मोठा वाटा आहे. म्हणूनच आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील. याबाबतीत आपल्याला जगातील जे काही निर्देशांक आहेत त्यांच्या बरोबरीला पोहोचायचे आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

भारतात पायाभूत सुविधांमध्ये जेवढी गुंतवणूक झाली आहे, तेवढी यापूर्वी कधीच नव्हती आणि त्याचा लाभ आज देशवासीय घेत आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, त्याचा आता विस्तार झाला पाहिजे, त्याला नवे रूप मिळायला हवे, आधुनिक भारताच्या गरजेनुसार कौशल्य विकास व्हायला हवा आणि त्या आधारावर भारत इंडस्ट्री 4.0 मध्ये एक नेतृत्व म्हणून उदयास आला पाहिजे आणि आम्ही आमच्या तरुणांचे भविष्य सुधारण्यासाठी त्या दिशेने काम करत आहोत.

आदरणीय सभापती महोदय,

गेल्या 18 वर्षात केलेला एक अभ्यास आहे, हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. हा अभ्यास सांगतो की, आज गेल्या 18 वर्षात खाजगी क्षेत्रात रोजगार निर्मितीचा सर्वात मोठा विक्रम नोंदवला गेला आहे, 18 वर्षातील सर्वात मोठा असा हा विक्रम झाला आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आज भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली संपूर्ण जगासाठी एक उदाहरण बनली आहे. मी जेव्हा जेव्हा जी-20 गटात जातो तेव्हा जगातील लोक,जगातील श्रीमंत देशही भारताच्या डिजिटल इंडिया चळवळीबद्दल, डिजिटल पेमेंटबद्दल आश्चर्यचकित होतात आणि आम्हाला मोठ्या कुतूहलाने विचारतात की ही भारताच्या यशाची खुप मोठी गाथा कशी शक्य आहे ?

आदरणीय अध्यक्ष महोदय,

भारत जसजसा प्रगती करत आहे तसतशी स्पर्धाही वाढत आहे आणि आव्हानेही वाढत आहेत आणि हे स्वाभाविक आहे. ज्यांना भारताच्या प्रगतीत खोळंबा घालायचा आहे, जे भारताच्या प्रगतीकडे एक आव्हान म्हणून पाहतात, ते चुकीचे डावपेच अवलंबत आहेत. आणि ते भारतातील लोकशाही, लोकसंख्या आणि विविधतेवर हल्ला करत आहेत आणि ही चिंता फक्त माझी नाही, केवळ सरकारची नाही, आणि केवळ कोषागार व्यवस्थापनाची चिंता नाहीये.

आदरणीय सभापती महोदय,

देशातील जनता आणि माननीय सर्वोच्च न्यायालयासह सर्वांनाच या गोष्टींची चिंता आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत जे भाष्य केल आहे ते मला आज सभागृहासमोर ठेवायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे हे भाष्य देशातील करोडो जनतेवर कोणत्या प्रकारचे संकट येण्याची शक्यता आहे याकडे लक्ष वेधणारे आहे.

आदरणीय सभापती महोदय,

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात अतिशय गांभीर्याने म्हटले आहे आणि मी ते भाष्य तुम्हाला वाचून दाखवतो. असे दिसते की, या महान देशाच्या प्रगतीवर शंका घेण्याचा, त्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वोच्च न्यायालय पुढे म्हणत आहे की– असे सर्व प्रयत्न अगदी सुरुवातीपासूनच थांबवले पाहिजेत. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी आहे.

आदरणीय सभापती जी,

सर्वोच्च न्यायालयाने जी भावना व्यक्त केली आहे, त्याविषयी सभागृहातील आम्ही इकडची मंडळी असो अथवा त्या बाजूची मंडळी असोत, किंवा सभागृहाच्या बाहेर, सर्वांनाच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

आदरणीय सभापती जी,

भारतामध्येही काही लोक, अशा शक्तींना मदत करत आहेत. देशवासियांनी अशा शक्तिंपासून सावधान, दक्ष राहण्याची गरज आहे.

आदरणीय सभापती जी,

वर्ष 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर देशासमोर अनेक खूप मोठी आव्हाने होती, त्यामध्ये कॉंग्रेसबरोबरच कॉंग्रेसची इको- सिस्टिम म्हणजेच परिसंस्था हेही एक आव्हान होते. या परिसंस्थेच्या अन्न-पाण्यावर पोसलेल्या, त्या परिसंस्थेच्या जीवावर कॉंग्रसच्या मदतीने ही परिसंस्था 70 वर्षांपर्यत फळफळली, फोफावली आहे. सभापती जी, मी आज या परिसंस्थेला इशारा देत आहे. मी  या परिसंस्थेला चेतावणी देवू इच्छितो, या परिसंस्थेने जो निश्चय केला आहे की, देशाची विकास यात्रा रोखून धरण्यात येईल, देशाच्या प्रगतीची गाडी, रूळावरू घसरवण्यात येईल. त्यांच्या या निश्चयाला, त्यांच्या या परिसंस्थेला मला सांगण्याची इच्छा आहे की, त्यांचा अशा प्रत्येक प्रयत्नांना , त्यांच्याच  भाषेमध्ये उत्तर मिळेल. हा देश राष्ट्रविरोधी कारवाया कधीही स्वीकार करणार नाही.

आदरणीय सभापती जी,

हा असा  काळ आहे,  ज्यावेळी संपूर्ण जग भारताच्या होणा-या प्रगतीविषयी गांभीर्याने विचार करीत आहे, भारतामध्ये घडणा-या प्रत्येक बारिक-सारीक गोष्टीं विचारात घेतल्या जात आहेत.

आदरणीय सभापती जी,

आता निवडणुका झाल्या आहेत. 140 कोटी देशवासियांनी पाच वर्षांसाठी आपला निर्णय, ‘जनादेश’ दिला आहे. आता गरज आहे की, विकसित भारताच्या निर्माणासाठी, या संकल्पाला सिद्धीमध्ये परिवर्तित  करण्यासाठी या सभागृहातील  सर्व सन्माननीय सदस्यांचे योगदान मिळाले पाहिजे.  या विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपणही जबाबदारीने पुढे यावे, असे आवाहन मी आज सर्वांना करीत आहे. देशहितासाठी आपण सर्वजण मिळून वाटचाल करायची आहे, आणि देशवासियांच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यामध्ये  कोणतीही कमतरता राहणार नाही, असे आपल्याला कार्य करायचे आहे.

आदरणीय सभापती जी,

आजच्या कालखंडामध्ये सकारात्मक राजकारणाची भारताला खूप आवश्यकता आहे. आणि मी आमच्या सर्व सहकारी पक्षांनाही सांगू इच्छितो, इंडी आघाडीमधील पक्षाच्या लोकांना सांगू इच्छितो की, तुम्हीही यासाठी मैदानामध्ये उतरावे, चांगल्या- सुप्रशासनासाठी स्पर्धा करावी. जिथे -जिथे तुमची सरकारे आहेत, त्यांनी एनडीए सरकारबरोबर मिळून सुप्रशासनासाठी स्पर्धा करावी. कामे, योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्पर्धा करावी, लोकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यामध्ये स्पर्धा केली जावी. देशाचे भले होईल आणि आपलेही भले होईल.

आदरणीय सभापती जी,

तुम्ही चांगल्या कामासाठी एनडीएबरोबर स्पर्धा करावी, तुम्ही सुधारणा करण्याविषयी पुढे येण्याचे धाडस दाखवावे. जिथे -जिथे तुमची सरकारे आहेत, तिथे तिथे सुधारणा घडवून आणण्यासाठी काही पावले पुढे टाकावीत आणि परदेशी गुंतवणूकीला आकर्षित  करावे. आपआपल्या राज्यांमध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात यावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. त्यांना ही एक प्रकारची संधी आहे. त्यांचीही काही राज्यांमध्ये सरकारे आहेतच. आणि यासाठी विरोधकांनी भाजपाच्या सरकारांबरोबर स्पर्धा करावी. एनडीए सरकारांबरोबर स्पर्धा जरूर करावी. ही स्पर्धा सकारात्मक असावी. ज्या लोकांना जिथे सेवा करण्याची संधी मिळाली आहे, तिथे त्यांना रोजगार वृद्धीसाठी स्पर्धा करावी. कोणते सरकार जास्तीत जास्त रोजगार देत आहे, याविषयी स्पर्धा करण्यासाठी तुम्ही मैदानात उतरावे, अशी एक सुदृढ स्पर्धा व्हावी.

आदरणीय सभापती जी,

आपल्याकडे असेही म्हटले आहे की, ‘गहना कर्मणोगति।‘ याचा अर्थ असा आहे की, कर्माची गती खूप गहन, सखोल असते. म्हणूनच आक्षेप, असत्य, खोटीनाटी चर्चा असे करण्यापेक्षा कर्माने, कुशलतेने आणि समर्पणाच्या भावनेने सेवाभावनेने  लोकांचे मन जिंकण्याचे प्रयत्न केले गेले पाहिजेत.

आदरणीय सभापती जी,

आत्ता ही चर्चा होत असतानाच, एक दुःखद बातमी  आली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये अनेक लोकांना प्राण गमवावे, लागल्याची माहिती मिळाली आहे. ज्या लोकांना या अपघातामध्ये प्राण गमवावे लागले, त्यांच्या कुटुंबियांविषयी मी आपल्या सह-संवेदना व्यक्त करतो. सर्व जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी इच्छा व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली प्रशासनाने मदत कार्य आणि इतर बचाव कार्य तातडीने सुरू केले आहे. केंद्र सरकारमधील वरिष्ठ उत्तर प्रदेश सरकारशी सातत्याने संपर्कात आहेत. या सभागृहाच्या माध्यमातून मी सर्वांना विश्वास देतो की, या दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल.

आदरणीय सभापती जी,

आज एक प्रदीर्घ चर्चा अनुभवली आणि आपण पाहिले की, मी पहिल्यांदा लोकसभेमध्ये पंतप्रधान म्हणून इथे  आलो ते सेवा करण्यासाठी;  तुम्ही लोकांनी संधी दिली, त्यावेळी मला अशा प्रकारे सामना करावा लागला होता. 2019 मध्येही मला असाच सामना करावा लागला होता. मला राज्यसभेमध्येही या प्रकारे संघर्ष करावा लागला आणि म्हणूनच आता तर ही एक गोष्टही अधिक मजबूत झाली आहे. माझा निश्चयही तितकाच मजबूत आहे. माझा आवाजही मजबूत आहे आणि माझे संकल्पही मजबूत आहेत.

आदरणीय सभापती जी,

त्यांनी संख्येचा दावा कितीही केला तरी हरकत नाही, 2014 मध्ये ज्यावेळी आम्ही आलो, त्यावेळी राज्यसभेमध्ये आमची शक्ती खूप कमी होती आणि अध्यक्षांचा कलही दुसरीकडे होता. परंतु ताठ मानेने आम्ही देशाची सेवा करण्याचा संकल्प  केला, त्यापासून तसूभरही आम्ही डगमगलो नाही. देशवासियांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही जो निर्णय दिला आहे, तुम्ही आम्हाला सेवा करण्याचा जो आदेश दिला आहे, त्यामध्ये अशा प्रकारे येणा-या अडथळ्यांना मोदी घाबरणार नाही की हे सरकार घाबरणार नाही. ज्या संकल्पांचा निर्धार करून आम्ही वाटचाल सुरू केली आहे, त्या संकल्पांची पूर्ती आम्ही करणारच आहोत.

आदरणीय सभापती जी,

जे नवीन खासदार निवडून आले आहेत, त्यांना मी विशेषत्वताने शुभेच्छा देतो.

आदरणीय सभापती जी,

मला माहिती आहे की, खूप काही शिकायचे आहे, समजून घ्यायचे आहे, आणि देशातील लोकांच्या नजरेतून उतरण्यापासून बचाव करण्‍याचा प्रयत्नही केला जाईल. म्हणूनच त्यांनाही परमात्म्याने थोडी सद्बुद्धी द्यावी, बालक बुद्धीलाही सद्बुद्धी द्यावी, या अपेक्षेबरोबरच आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी जे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष जी, आपण मला वेळ दिली, मला विस्ताराने बोलण्यासाठी संधी दिली आणि कोणीही कितीही गोंधळ केला तरी सत्याचा आवाज काही दाबून टाकता येत नाही. अशा प्रयत्नांनी सत्य दबून जात नाही आणि असत्याला कोणत्याही प्रकारची पाळेमुळे असत नाहीत.

आदरणीय सभापती जी,

ज्या लोकांना संधी दिली नाही, त्यासाठी त्यांचा पक्ष जबाबदार आहे.  यापुढे ते पक्ष आपल्या खासदारांची काळजी घेतील, अशी मी अपेक्षा ठेवतो.

आदरणीय सभापती जी,

या सभागृहालाही मी धन्यवाद देतो. मला आज खूप आनंद वाटला, खूप आनंद मी घेतला. सत्याची ताकद काय असते, ही गोष्ट आज मी अगदी मन भरेपर्यंत  पाहिली, सत्याचे सामर्थ्य काय असते, याचा आज मला साक्षात्कार झाला. आणि म्हणूनच सभापती जी, मी आपले अगदी मनापासून-हृदयापासून आभार व्यक्त करतो.

खूप-खूप धन्यवाद!!

* * *

JPS/NM/Tupe/Ashutosh/Madhuri/ShaileshP/Sushma/Rajshree/Sandesh/Shraddha/Gajendra/Suvarna/D.Rane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030811) Visitor Counter : 34