पंतप्रधान कार्यालय

आसाममधील जोरहट येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 09 MAR 2024 6:20PM by PIB Mumbai

 

नमोशकार, आपोनालोक भालेय कुफले आसे ?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित लोकप्रतिनिधी, इतर प्रतिष्ठित आणि आसामचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!! आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित राहिले आहात, त्याबद्दल मी अगदी नतमस्तक होवून आपल्याला वंदन करतो आणि तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो.

मला आत्ताच मुख्यमंत्री सांगत होते की, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी 200 ठिकाणांवर लाखो लोक जमा झाले आहेत आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून या विकास उत्सवामध्ये सहभागी होत आहेत. त्या सर्व सहभागीतांचेही मी स्वागत करीत आहे आणि कशा पद्धतीने गोलाघाटच्या लोकांनी हजारों दीप प्रज्वलित केले, ते समाज माध्यमांवर मी पाहिले आहे.

आसामच्या लोकांकडून मिळणारा हा स्नेह, ही आपुलकी माझी खूप मोठी संपत्ती आहे. आज मला आसामच्या लोकांसाठी साडे 17 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यास करण्याचे सद्भाग्य मिळाले आहे. यामध्ये आरोग्य, गृहनिर्माण आणि पेट्रोलियमशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे आसामचा विकास अधिक वेगाने होणार होईल. आसामच्या सर्व लोकांचे या विकास प्रकल्पांसाठी मी खूप- खूप अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

इथे येण्याआधी मला, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची भव्यता, तसेच या उद्यानाचे नैसर्गिक सौंदर्य अगदी जवळून पाहण्याची, त्याचे वैशिष्ट्य जाणून घेण्याची संधी मिळाली. काझीरंगा एकप्रकारे अनोखे राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र अभयारण्य आहे. काझीरंगातील जैव वैविध्य, इथली पर्यावरण परिसंस्था, प्रत्येकाला आकर्षून घेते. काझीरंगाला युनेस्कोने  जागतिक वारसा संरक्षित स्थान म्हणून गौरवले आहे. जगामध्ये ज्या- ज्या ठिकाणी एकशिंगी गेंडे आहेत, त्यापैकी 70 टक्के आपल्या काझीरंगा उद्यानातच वास्तव्य करीत आहेत.

इथल्या  नैसर्गिक वातावरणामध्ये वाघ, हत्ती, बाराशिंगा, जंगली म्हैस, आणि इतर अनेक प्रकारचे वन्य जीव पाहण्याचा अनुभव खरोखरीच आगळा आहे. त्याचबरोबर  काझीरंगामध्ये पक्षी निरीक्षण करण्याचा अनुभव अतिशय  सुंदर आहे. या आधीच्या सरकारांच्या असंवेदनशीलतेमुळे आणि गुन्हेगारांना सरंक्षण देण्याच्या वृत्तीमुळे दुर्दैवाने आसामची असलेली एक वेगळी ओळख पुसून टाकली जाण्याच्या मार्गावर नेली होती. त्यामुळे आसामच्या एकशिंगी गेंड्यावरही संकट ओढवले होते.

2013 मध्ये एकाच वर्षात इथे 27 गेंड्यांची शिकार झाली होती. परंतु आता मात्र आमच्या सरकारने आणि इथल्या लोकांच्या प्रयत्नांमुळे 2022 मध्ये गेंड्याच्या शिकारीची संख्या शून्यापर्यंत आणली आहे. 2024 मध्ये, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असणार आहे. यासाठी आसामच्या लोकांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आणि मी देशवासियांना आग्रहाने सांगतो की, या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी काझीरंगाला भेट दिली पाहिजे. काझीरंगामध्ये घालवलेल्या दिवसाच्या अनेक आठवणी मी बरोबर घेवून जात आहे, आणि या आठवणी  आता  जीवनभर माझ्याबरोबर राहणार आहेत.

 

मित्रांनो,

आज मला वीर लसित बोरफुकन यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे सद्भाग्य मिळाले. लसित बोरफुकन, म्हणजे आसामचे शौर्य, आसामचा पराक्रम यांचे जणू प्रतीक आहेत. वर्ष 2022 मध्ये आम्ही दिल्लीमध्ये लसित बोरफुकन यांच्या 400 व्या जयंतीचे वर्ष अतिशय उत्साहाने साजरे केले होते. वीर योद्धा लसित बोरफुकन यांना मी पुन्हा एकदा वंदन करतो. 

 

मित्रांनो,

वारसाही, विकासही ... असा मंत्र आमच्या डबल इंजिन सरकारचा आहे. वारसा स्थळांच्या संरक्षण, संवर्धनाबरोबरच आसामचे डबल इंजिन सरकार इथल्या विकासासाठीही तितक्याच वेगाने काम करीत आहे. पायाभूत सुविधाआरोग्यआणि ऊर्जा या क्षेत्रामध्ये आसामने अतिशय वेगाने काम केले आहे. एम्सची उभारणी करण्यात आल्यामुळे  इथल्या लोकांना खूप चांगली वैद्यकीय  सुविधा उपलब्ध झाली आहे.

आज इथे, तिनसुकिया वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे  तिनसुकियाच्या आजूबाजूला असलेल्या जिल्ह्यांमध्ये राहणा-या लोकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. मागच्यावेळी ज्यावेळी मी आसामच्या दौ-यावर आलो होतो, त्यावेळी गुवाहाटी आणि करीमगंज अशा दोन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी केली होती. आज शिवसागर वैद्यकीय महाविद्यालयाचा शिलान्यास केला आहे. तसेच या जोरहाटमध्ये एक कर्करोग उपचार रूग्णालयाची उभाराणीही केली आहे. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास केल्यामुळे आसाम आणि संपूर्ण ईशान्येकडील राज्यांमध्ये आपले आसाम राज्य वैद्यकीय सेवांचे एक खूप मोठे केंद्र बनणार आहे. 

 

मित्रांनो,

आज पीएम ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या बरौनी-गुवाहाटी  गॅस वाहिनी देशाला अर्पण करण्यात आली आहे. या गॅस वाहिनीमुळे नॉर्थ ईस्टर्न ग्रिडला नॅशनल गॅस ग्रिडने जोडले जाणार आहे. या  वाहिनीमुळे जवळपास 30 लाख कुटुंबांना आणि 600 पेक्षा जास्त सीएनजी डेपोंना गॅसचा पुरवठा होईल. बिहार, पश्चिम बंगाल आणि आसामच्या 30 पेक्षा जास्त जिल्ह्यांतील लोकांना याचा लाभ होईल.

 

मित्रांनो,

आज डिगबोई रिफायनरी आणि गुवाहाटी रिफायनरीच्या क्षमतांचा विस्तार कामांचा शुभारंभ केला आहे. अनेक दशकांपासून आसामच्या लोकांची मागणी होती की, आसाम रिफायनरीची क्षमता वाढविण्यात यावी. या मागणीच्या पूर्ततेसाठी आंदोलने, निदर्शने झाली. परंतु आधीच्या सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही, इथल्या लोकांच्या भावना कधीही समजून घेतल्या नाहीत. परंतु गेल्या 10 वर्षांमध्ये भाजपा सरकारने आसामच्या चारही रिफायनरींची क्षमता वाढविण्यासाठी सातत्याने काम केले आहे. आता आसाममधील रिफायनरींची एकूण क्षमता दुप्पट होईल. आणि यापैकी नुमालीगढ रिफायनरीची क्षमता तर तिप्पट होणार आहे. ज्यावेळी कोणत्याही क्षेत्राचा विकास करण्याचा ठाम निर्धार केला जातो, त्यावेळी ते कामही तितक्याच वेगाने केले जाते.

 

मित्रांनो,

आसामच्या माझ्या साडे पाच लाख कुटुंबांचे पक्क्या घरकुलाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की, राज्यातील साडे पाच लाख कुटुंबे, आपल्या पसंतीने, आता स्वमालकीच्या पक्क्या घरकुलामध्ये वास्तव्य करणार आहेत.  बंधू -भगिनींनो, तुमच्यासाठी सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे सद्भाग्य मानतो. 

 

बंधू - भगिनींनो,

कॉंग्रेस सरकारच्या काळामध्ये, लोकांना एक घरकूल निर्माण करण्यासाठी कितीतरी त्रास होत होता. आता तुम्ही पाहत आहात की, आमचे सरकार एका दिवसामध्ये साडे पाच लाख कुटुंबांना त्यांच्या घरकुलाचा ताबा गरीबांना देत आहे. आणि साडे पाच लाख घरे म्हणजे काही फक्त चार भिंती बांधून, अडोसा तयार केला आहे, अशी नाहीत. तर या घरांमध्ये शौचालय आहे, गॅसजोडणी दिली आहे. वीज आहे, घरामध्ये नळाव्दारे पाणी येत आहे. अशा सर्व सुविधाही या घरकुलाबरोबरच आता सर्व गरीबांना मिळत आहेत.

आसाममध्ये आतापर्यंत अशा 18 लाख कुटुंबांना कायमस्वरूपी घरे देण्यात आली आहेत. आणि मला आनंद आहे की पीएम आवास योजनेंतर्गत दिलेली बहुतेक घरे महिलांच्या नावावर नोंदवली गेली आहेत. आता माझ्या आई बहिणी घराच्या मालकिन झाल्या आहेत. म्हणजेच या घरांनी लाखो महिलांना स्वतःच्या घराच्या शिक्षिका बनवल्या आहेत.

 

मित्रांनो,

आसामच्या प्रत्येक महिलेचे जीवन सुसह्य व्हावे, एवढेच नव्हे तर तिची बचतही वाढली पाहिजे, तिला आर्थिक बचतही मिळावी हा आमचा प्रयत्न आहे. कालच जागतिक महिला दिनी आपल्या सरकारने गॅस सिलिंडरची किंमत आणखी १०० रुपयांनी कमी केली. आमचे सरकार आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार सुविधा पुरवत आहे याच्या प्रमुख लाभार्थी आमच्या माता-भगिनी, महिला आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत आसाममध्ये गेल्या ५ वर्षांत ५० लाखांहून अधिक नवीन घरांना पाण्याची जोडणी देण्यात आली आहे. अमृत सरोवर मोहिमेअंतर्गत आणि आता मला त्याच्या कॉपी टेबल बुकचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली. अमृत सरोवर अभियानांतर्गत येथे बांधण्यात आलेल्या तीन हजार अमृत सरोवराचाही भरपूर फायदा होत आहे.

भाजप सरकारने, मी तुमच्यासाठी हे म्हणतोय, देशातील ३ कोटी भगिनींनो, त्या ज्या छान टोपी घालून बसल्या आहेत, ३ कोटी लखपती दीदी बनवत आहेत, देशात ३ कोटी लखपती दीदी बनवण्याच्या मोहिमेवरही काम करत आहेत. या अभियानांतर्गत बचत गटांशी संबंधित महिलांना अधिक सक्षम बनवून त्यांना नवीन संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आसाममधील लाखो महिलांनाही या मोहिमेचा लाभ मिळत आहे.  मुख्यमंत्री मला सांगत होते की आसाममध्ये लखपती दीदी बनलेल्या सर्व ताई इथे आल्या आहेत. या लखपती दीदींचा एकदा टाळ्या वाजवून सन्मान करा. जर योग्य दिशेने धोरणे असतील आणि सामान्य माणसाला त्यात सहभागी करून घेतले तर किती मोठा बदल होईल, तुम्ही बघा, देशभरातील प्रत्येक गावात लखपती दीदी बनवण्याची मोहीम, ही मोदींची हमी आहे.

 

मित्रांनो,

 2014 नंतर आसाममध्ये अनेक ऐतिहासिक बदलांचा पाया रचला गेला. आसाममध्ये 2.5 लाख भूमिहीनांना जमिनीचा हक्क देण्यात आला. स्वातंत्र्यानंतर, चहाच्या बागेत काम करणारे कामगार 7 दशके बँकिंग प्रणालीशी जोडलेले नव्हते. आमच्या सरकारने चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या अशा सुमारे 8 लाख कामगारांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यास सुरुवात केली. बँकिंग व्यवस्थेशी जोडले म्हणजेच त्या कामगारांना सरकारी योजनांची मदत मिळू लागली. जे सरकारकडून आर्थिक लाभ घेण्यास पात्र होते, त्यांचे हक्काचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात पोहोचू लागले. मध्यस्थांसाठी आम्ही सर्व मार्ग बंद केले. आपले ऐकणारे सरकार आहे, असे गरिबांना पहिल्यांदाच वाटते आणि हे सरकार म्हणजेच भाजपचे सरकार.

 

मित्रांनो,

विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ईशान्येचा विकास आवश्यक आहे. काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीत ईशान्य भारताला अनेक दशकांपासून सरकारकडून उपेक्षा सहन करावी लागली.  काँग्रेस सरकारने अनेक विकास प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर फोटो काढले, लोकांची दिशाभूल केली आणि नंतर तिथून पोबारा करून हात खेचले. पण मोदी संपूर्ण ईशान्येला आपले कुटुंब मानतात. त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेले, कागदावर लिहिलेले आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावरही आम्ही भर दिला. भाजप सरकारने सराईघाट येथील दुसऱ्या पुलाचे, ढोला सादिया पूल आणि बोगीबील पुलाचे काम पूर्ण करून ते देशसेवेला समर्पित केले. आमच्या सरकारच्या काळात ब्रॉडगेज रेल्वे संपर्क सेवा बराक व्हॅलीपर्यंत विस्तारली.

2014 नंतर येथे विकासाला गती देण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू झाले. जोगीघोपा येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम सुरू झाले. ब्रह्मपुत्रा नदीवर 2 नवीन पूल बांधण्यास मंजुरी देण्यात आली. 2014 पर्यंत आसाममध्ये एकच राष्ट्रीय जलमार्ग होता, आज ईशान्येत 18 राष्ट्रीय जलमार्ग आहेत. पायाभूत सुविधांच्या या विकासामुळे नवीन औद्योगिक शक्यता निर्माण झाल्या. आमच्या सरकारने उन्नती योजनेला नवीन स्वरूपात मान्यता दिली आहे आणि ईशान्येकडील औद्योगिक परिसंस्था मजबूत करण्यासाठी तिचा विस्तार केला आहे. आसाममधील जूट शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने यावर्षी ज्यूटसाठी 285 रुपये प्रति क्विंटलने एमएसपी वाढवली आहे. आता ताग शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे पस्तीस रुपये प्रतिक्विंटल भाव  मिळणार आहे.

 

मित्रांनो,

माझ्या या प्रयत्नांमध्ये आमचे विरोधक काय करत आहेत? देशाची दिशाभूल करणारे काय करत आहेत? आजकाल मोदींना शिव्या देणारे काँग्रेस आणि त्यांचे मित्र मोदींना घराणे नाही असे म्हणू लागले आहेत. त्याच्या या शिवीगाळांच्या प्रत्युत्तरात संपूर्ण देश उभा राहिला आहे. सारा देश म्हणतोय - 'मी मोदींचा परिवार आहे', 'मी मोदींचा परिवार आहे', 'मी मोदींचा परिवार आहे', 'मी मोदींचा परिवार आहे', 'मी मोदींचा परिवार आहे'. हे प्रेम आहे, हे आशीर्वाद आहे. मोदींना हे देशप्रेम मिळतं कारण मोदींनी 140 कोटी देशवासीयांना आपले कुटुंबच मानले नाही तर त्यांची रात्रंदिवस सेवा केली आहे. आजचा कार्यक्रमही त्याचेच प्रतिबिंब आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, धन्यवाद. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास काम केल्याबद्दल मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो.

दोन्ही हात वर करा आणि माझ्यासोबत म्हणा भारत माता की जय.

हा आवाज आज संपूर्ण ईशान्येपर्यंत पोहोचला पाहिजे.

भारत माता की जय, भारत माता की जय.

या लखपती दीदींचा आवाज मोठा असावा.

भारत माता की जय, भारत माता की जय.

भारत माता चिरंजीवी होवो. खूप खूप धन्यवाद.

***

H.Akude/S.Bedekar/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013144) Visitor Counter : 48