पंतप्रधान कार्यालय

बिहारमधील बेटियाह येथे विकसित भारत विकसित बिहार कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित


पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील बेटियाह येथे सुमारे 12,800 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

इंडियन ऑइलच्या 109 किमी लांबीच्या मुझफ्फरपूर - मोतिहारी एलपीजी वाहिनीचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

मोतीहारी येथे इंडियन ऑइलच्या कुपीभरण प्रकल्पाचे आणि साठवणूक टर्मिनलचे राष्ट्रार्पण

नगर गॅस वितरण प्रकल्प आणि धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पांची पंतप्रधानाच्या हस्ते पायाभरणी

विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

नरकटियागंज - गौनाहा आणि रक्सौल - जोगबनी या दोन नवीन रेल्वे सेवांना पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

''डबल इंजिन सरकारअंतर्गत आपले जुने वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी बिहार वेगाने मार्गक्रमण करत आहे''

''विकसित बिहार आणि विकसित भारत संकल्प घेण्यासाठी बेटियाह , चंपारण्यापेक्षा उत्तम ठिकाण असू शकत नाही''

''जेव्हा बिहार समृद्ध होता तेव्हा भारत समृद्ध होता, त्यामुळे विकसित भारतासाठी विकसित बिहार तेवढाच महत्त्वपूर्ण''

''रालोआचे डबल इंजिन सरकार बिहारच्या युवांना इथेच बिहारमध्ये नोकऱ्यांच्या सुनिश्चितीसाठी प्रयत्न करत आहे''

"माझ्यासाठी संपूर्ण भारत माझे घर आहे, प्रत्येक भारतीय माझे कुटुंब आहे"

''विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न, प्रत्येकाची प्रेरणा आणि प्रत्येकाचे अध्ययन आवश्यक''

Posted On: 06 MAR 2024 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मार्च 2024 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेटियाह  येथे सुमारे 12,800 कोटी रुपयांच्या रेल्वे, रस्ते आणि पेट्रोलियम व  नैसर्गिक वायूशी संबंधित अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. 

यावेळी झालेल्या सभेला पंतप्रधानांनी संबोधित केले. बेटियाहच्या भूमीने स्वातंत्र्याचा लढा पुन्हा प्रज्ज्वलित केला असून लोकांमध्ये नव्या जाणिवा पेरल्या असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. 'याच भूमीने मोहनदास जी यांच्यातून महात्मा गांधी घडवले.'' अशी टिपण्णी करत विकसित बिहार आणि विकसित भारत संकल्प घडवण्यासाठी बेटियाह , चंपारण्यपेक्षा उत्तम जागा असू शकत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.  विकसित बिहार कार्यक्रमात राज्यातील विविध लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या  उपस्थितीचे पंतप्रधानांनी कौतुक केले  आणि आजच्या विकास प्रकल्पांसाठी शुभेच्छा दिल्या.

“बिहारच्या भूमीने शतकानुशतके देशासाठी उत्तुंग नेतृत्व दाखवले आहे आणि देशासाठी अनेक महान व्यक्तिमत्त्वे निर्माण केली आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. बिहारच्या समृद्धीबरोबर भारत समृद्ध होत आला आहे आणि विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी बिहारचा विकास तेवढाच महत्वपूर्ण आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. राज्यात डबल-इंजिन सरकार स्थापन झाल्यावर  विकसित बिहारशी संबंधित विकासकामांना नवी गती मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी  आनंद व्यक्त केला आणि आजच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. यामध्ये रेल्वे, रस्ते, इथेनॉल प्रकल्प, नगर गॅस पुरवठा आणि एलपीजी गॅस व इतर प्रकल्पांचा समावेश आहे. विकसित बिहारचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ही गती कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी बिहारच्या गंभीर समस्यांपैकी एका समस्येचा उल्लेख केला, ती म्हणजे - कायदा व सुव्यवस्थेची दुरवस्था आणि घराणेशाहीचे राजकारण यामुळे राज्यातल्या युवा पिढीचे स्थलांतर. ''राज्यातल्या युवांना राज्यातच नोकऱ्या पुरवण्याचे बिहारच्या डबल इंजिन सरकारचे प्रयत्न  आहेत .'' असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या प्रकल्पांचा सर्वात मोठा फायदा रोजगाराच्या शोधात असलेल्या युवांना  होईल, असे त्यांनी नमूद केले. पाटणा येथे गंगा नदीवर  दिघा-सोनेपूर रेल्वे-तथा -रस्ते पुलाच्या समांतर  सहा पदरी  केबल पुलाच्या  उद्घाटनाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.  बिहारमध्ये गंगा नदीवरील 5 पुलांसह  22,000 कोटी रुपयांच्या तरतूदीसह डझनभर पुलांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “हे पूल आणि रुंद रस्ते विकासाचा मार्ग प्रशस्त करतात”, असे पंतप्रधान म्हणाले. आधुनिक पायाभूत सुविधा रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करतात, असेही ते म्हणाले.

देशात तयार होणारे रेल्वे मार्ग किंवा हिरवा झेंडा दाखवून रवाना होणाऱ्या गाड्या या पूर्णपणे स्वदेशी असल्याने रोजगार निर्मिती करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, बिहारमध्ये आधुनिक रेल्वे इंजिन निर्मितीचे कारखाने विद्यमान सरकारनेच सुरू केले आहेत. पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया उपक्रमाचा उल्लेख करताना त्यांनी डिजिटल सेवांचा जलद अवलंब करण्याचे श्रेय भारतातील तरुणांना दिले कारण अनेक विकसित राष्ट्रांमध्ये अशा डिजिटल सुविधा नाहीत. “प्रत्येक पावलावर भारतातील तरुणांच्या पाठीशी उभे राहण्याची हमी मोदींनी दिली आहे”, हे उद्धृत करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज मी बिहारच्या तरुणांना ही हमी देत आहे.” मोदींची हमी म्हणजे हमीच्या पूर्ततेची हमी असेही त्यांनी ठासून सांगितले.

भारतातील प्रत्येक घराला सूर्य घर बनवण्यावर सरकारचा भर आहे यावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की छतावरील सौरऊर्जा संयंत्रांद्वारे वीज निर्मिती केली जाऊ शकते आणि निर्माण केलेली अतिरिक्त वीज सरकारला परत विकून नागरिकांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. पंतप्रधानांनी घराणेशाहीच्या राजकारणाच्या वाईट गोष्टींबद्दल लोकांना सावध केले आणि जननायक कर्पूरी ठाकूर, जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या आदर्शांचे स्मरण केले.

मोफत अन्नधान्य  योजना, आयुष्मान भारत योजना, पक्की घरकुले , शौचालये, वीज, गॅस आणि नळाद्वारे पाणी, एम्स ची निर्मिती, यांचा उल्लेख करत गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याचे सरकारचे प्रयत्न, आयआयटी, आयआयएम आणि विक्रमी संख्येने इतर वैद्यकीय महाविद्यालये, शेतकऱ्यांना उर्जादाता आणि उर्वरकदाता बनवणे आणि ऊस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांनी उपउत्पादनांचा वापर करण्यासाठी इथेनॉल संयंत्राची उभारणी करणे यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. 

अलीकडेच, उसाची खरेदी किंमत प्रति क्विंटल 340 रुपये करण्यात आली आहे आणि जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना सुरू करण्यात आली आहे ज्याद्वारे देशात आणि बिहारमध्ये हजारो गोदामे बांधली जातील,  अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू झालेल्या पीएम किसान सन्मान निधीचा उल्लेख करताना मोदींनी सांगितले की, बेटियाह  येथील शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत 800 कोटी रुपये देण्यात आले आहेत. बराच काळ बंद असलेला बरौनीतील खत कारखाना पुन्हा सुरू करण्याची हमी मोदींनीच दिली होती हे देखील पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. “आज हा खत कारखाना कार्यरत असून रोजगार निर्मिती करत आहे. म्हणूनच लोक म्हणतात- मोदींची हमी म्हणजे हमीच्या पूर्ततेची हमी,” अशीही पुष्टी त्यांनी केली. 

अयोध्या धाममधील श्री राम मंदिराबद्दल बिहारच्या जनतेने व्यक्त केलेल्या आनंदाची पंतप्रधानांनी दखल घेतली. ते म्हणाले की, आज भारत आपला वारसा आणि संस्कृतीला स्वीकारत आहे. या भागात निसर्गप्रेमी थारू जमातीच्या उपस्थितीची पंतप्रधानांनी दखल घेतली. त्यांनी सर्वांना थारू समाजाकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले "आज भारत थारूसारख्या जमातींकडून प्रेरणा घेऊन निसर्गाचे रक्षण करत विकास करत आहे. म्हणूनच मी म्हणतो की विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचे प्रयत्न, प्रत्येकाची प्रेरणा आणि प्रत्येकाची शिकवण आवश्यक आहे.

शेवटी, पंतप्रधान मोदी यांनी भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे महत्त्व, लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढणे, तरुणांना रोजगार, गरीबांसाठी पक्की घरे, 1 कोटी घरांसाठी सौर पॅनेल, 3 कोटी लखपती दीदी आणि वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्या चालवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

बिहारचे राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा, केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय आणि खासदार संजय जयस्वाल आदी यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी यावेळी 109 कि. मी. लांबीच्या इंडियन ऑईलच्या मुझफ्फरपूर-मोतिहारी एल. पी. जी. वाहिनीचे उद्घाटन केले. यामुळे बिहार राज्य आणि शेजारील देश नेपाळमध्ये स्वयंपाकाच्या स्वच्छ इंधनाची उपलब्धता होईल. पंतप्रधानांनी मोतिहारी येथील इंडियन ऑईलचा एलपीजी बॉटलिंग प्रकल्प आणि साठवण टर्मिनलचे राष्ट्रार्पण केले. नवीन पाईपलाईन टर्मिनल नेपाळला पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीसाठी धोरणात्मक पुरवठा केंद्र म्हणूनही काम करेल. उत्तर बिहारच्या पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, गोपालगंज, सिवान, मुझफ्फरपूर, शिवहर, सीतामढी आणि मधुबानी या 8 जिल्ह्यांना ते सेवा देईल. मोतिहारी येथील नवीन बॉटलिंग प्रकल्पामुळे मोतिहारी प्रकल्पाशी संलग्न खाद्य बाजारपेठांमध्ये पुरवठा साखळी अधिक सुरळीत होईल. पंतप्रधानांनी पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, गोपालगंज, सिवान आणि देवरिया येथे शहर वायू वितरण प्रकल्पाची आणि एचबीएलच्या सुगौली आणि लौरिया येथे धान्य आधारित इथेनॉल प्रकल्पांची पायाभरणी केली.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय महामार्ग-28ए मधील पिपराकोठी-मोतिहारी-रक्सौल विभागाच्या दोन पदरी रस्त्यासह पदपथाचे; राष्ट्रीय महामार्ग-104 च्या शिवहर-सीतामढी विभागाला दोन पदरी रस्त्यासह रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले. दिघा-सोनेपूर रेल्वेला समांतर असलेल्या गंगा नदीवर सहा पदरी केबल पूल-गंगा नदीवर पाटणा येथे रस्ता पूल; राष्ट्रीय महामार्ग-19 बायपासच्या बकरपूर हाट-माणिकपूर विभागाचे चार पदरी करणे यासह अनेक प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधानांनी विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधानांनी बापूधाम मोतिहारी-पिप्रहान आणि नरकटियागंज-गौनाहा गेज परिवर्तनासह इतर 62 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे राष्ट्रार्पण केले. गोरखपूर कॅन्ट-वाल्मिकी नगर या 96 कि. मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण तसेच बेतिया रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पंतप्रधानांनी पायाभरणी केली. पंतप्रधानांनी नरकटियागंज-गौनाहा आणि रक्सौल-जोगबनी दरम्यानच्या दोन नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवला.

 

 

 

 

* * *

S.Bedekar/Sonali K/Vasanti/Vinayak/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2012025) Visitor Counter : 75