पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील धनबाद येथे केली सुमारे 35,700 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण


सिंद्री येथील हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (HURL) चे खत संयंत्र केले राष्ट्राला समर्पित.

झारखंडमध्ये 17,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण.

देवघर – दिब्रुगड रेल्वे सेवा, टाटानगर आणि बदमपहार दरम्यानची मेमू ट्रेन सेवा (दैनिक) आणि शिवपूर स्थानकावरून लांब पल्ल्याच्या मालवाहू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना.

चत्रा येथील उत्तर करनपुरा सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट (STPP) चे युनिट 1 (660 मेगावॉट) राष्ट्राला केले समर्पित.

झारखंडमधील कोळसा क्षेत्राशी संबंधित प्रकल्प केले राष्ट्राला समर्पित.

"सिंद्री संयंत्र ही ‘मोदी की गॅरंटी' होती आणि आज ही गॅरंटी पूर्ण झाली आहे"

"पुनरुज्जीवन केलेल्या आणि पुनरुज्जीवित केल्या जाणाऱ्या 5 संयंत्रामधून 60 लाख मेट्रिक टन युरियाचे उत्पादन सुरू होऊन या महत्त्वाच्या क्षेत्रात भारत वेगाने आत्मनिर्भरतेकडे जाईल"

"सरकारने गेल्या 10 वर्षात आदिवासी समाज, गरीब, तरुण आणि महिलांच्या विकासाला प्राधान्य देऊन झारखंडसाठी काम केले आहे"

"भगवान बिरसा मुंडा यांची भूमी विकसित भारताच्या संकल्पासाठी उर्जेचा स्त्रोत बनेल"

Posted On: 01 MAR 2024 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2024 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधील धनबाद शहरातल्या सिंद्री येथे 35,700 कोटी रुपये खर्चाच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण केले. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये खते, रेल्वे, वीज आणि कोळसा या क्षेत्रांचा समावेश आहे.  मोदींनी एचयूआरएल प्रारुपाची पाहणी केली आणि सिंद्री सयंत्राच्या कंट्रोल नियंत्रण कक्षाची पाहणी देखील केली.

झारखंडमध्ये आज 35,700 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना संबोधित करताना दिली. पंतप्रधानांनी राज्यातील शेतकरी, आदिवासी आणि नागरिकांचे अभिनंदनही केले.

पंतप्रधानांनी सिंद्री खत संयंत्र सुरू करण्याच्या त्यांच्या संकल्पाची आठवण करून दिली “ही मोदी की गॅरंटी' होती आणि आज ही गॅरंटी पूर्ण झाली आहे”, असे ते म्हणाले.  2018 मध्ये पंतप्रधानांनी या खत निर्मिती संयंत्राची पायाभरणी केली होती.  हे संयंत्र सुरू झाल्याने स्थानिक तरुणांना रोजगाराचे नवीन मार्ग खुले झाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आजच्या उपक्रमाचे आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील महत्त्व अधोरेखित केले. भारताला दरवर्षी 360 लाख मेट्रिक टन युरियाची आवश्यकता असते आणि 2014 मध्ये भारत फक्त 225 लाख मेट्रिक टन युरियाचे उत्पादन करत होता. मागणी आणि उपलब्धतेतील या मोठ्या तफावतीमुळे  मोठ्या प्रमाणात युरिया आयात करणे आवश्यक होते, असे पंतप्रधान म्हणाले.  “आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षात युरियाचे उत्पादन 310 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढले आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.  रामागुंडम, गोरखपूर आणि बरौनी खत संयंत्रांच्या पुनरुज्जीवनाबद्दल पंतप्रधानांनी सांगितले.  या यादीत सिंद्रीचा देखील समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दीड वर्षात तालचर येथील खत संयंत्र देखील सुरू होईल, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.  ते संयंत्रही आपणच राष्ट्राला समर्पित करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या 5 संयंत्रामधून 60 लाख मेट्रिक टन युरियाचे उत्पादन होईल आणि भारत या महत्त्वपूर्ण क्षेत्रात वेगाने आत्मनिर्भरतेकडे जाईल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. 

नवीन रेल्वे मार्गांचा प्रारंभ, विद्यमान रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण आणि इतर अनेक रेल्वे प्रकल्पांच्या प्रारंभासह झारखंडमधील रेल्वे क्रांतीच्या नव्या अध्यायाची देखील आज ही सुरुवात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. या प्रदेशाला नवीन रूप देणाऱ्या धनबाद-चंद्रपुरा रेल्वे मार्गाचा आणि बाबा बैद्यनाथ मंदिर आणि माता कामाख्या शक्ती पीठ यांना जोडणाऱ्या देवघर-दिब्रुगढ रेल्वे सेवेचा त्यांनी उल्लेख केला.

वाराणसीमध्ये, वाराणसी-कोलकाता-रांची द्रुतगती मार्गाची पायाभरणी केल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, यामुळे चतरा, हजारीबाग, रामगढ आणि बोकारो यासारख्या जोडल्या गेलेल्या ठिकाणांना चालना मिळेल. संपूर्ण झारखंडमधील प्रवासाचा वेळ कमी होईल तसेच संपूर्ण पूर्व भारता बरोबरच्या मालवाहतूक संपर्क व्यवस्थेला चालना मिळेल. या प्रकल्पांमुळे झारखंडशी प्रादेशिक संपर्क वाढेल आणि या प्रदेशातील आर्थिक विकासालाही गती मिळेल, असे ते म्हणाले.

सरकारने, "गेल्या 10 वर्षांत आदिवासी समुदाय, गरीब, युवक आणि महिलांच्या विकासाला प्राधान्य देऊन झारखंडसाठी काम केले आहे", असे पंतप्रधान म्हणाले. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या महत्त्वावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यांनी कालच्या ताज्या तिमाहीतील आर्थिक आकडेवारीवरही प्रकाश टाकला.

ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या आर्थिक तिमाहीत 8.4 टक्क्यांचा नोंदला गेलेला विकास दर हा भारताची वाढती क्षमता आणि विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वेगवान विकास दर्शवतो, असे त्यांनी अधोरेखित केले. "विकसित भारताच्या निर्मितीसाठी विकसित झारखंड बनवणेही तितकेच महत्त्वाचे आहे", असे पंतप्रधान म्हणाले. झारखंड विकसित होण्यासाठी सरकारचा सर्वतोपरी पाठिंबा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. भगवान बिरसा मुंडा यांची भूमी विकसित भारताच्या संकल्पांसाठी ऊर्जेचा स्रोत बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

धनबादला जायचे असल्याने त्यांनी छोटेखानी भाषण केले. स्वप्न आणि संकल्प अधिक बळकट होतील असे सांगत त्यांनी झारखंडच्या जनतेला अनेक शुभेच्छा दिल्या, त्यांचे अभिनंदन केले आणि भाषणाचा समारोप केला.

झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आदी यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

सिंदरी इथला हिंदुस्थान खत आणि रसायन लिमिटेडच्या (एच. यू. आर. एल.)  प्रकल्पाचे  पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पासाठी 8900 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला असून युरिया क्षेत्रातील स्वयंपूर्णतेच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. यामुळे देशातील स्वदेशी युरिया उत्पादनात दरवर्षी सुमारे 12.7 लाख मेट्रिक टनाची भर पडेल. देशातील शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होईल. गोरखपूर आणि रामागुंडम येथील खत प्रकल्पांनंतर पुनरुज्जीवित होणारा हा देशातील तिसरा खत प्रकल्प आहे. आधीचे दोन प्रकल्प अनुक्रमे डिसेंबर 2021 आणि नोव्हेंबर 2022 मध्ये पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले होते. पंतप्रधानांनी झारखंडमध्ये 17,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये सोननगर-अंदालला जोडणारे तिसरे आणि चौथे मार्ग, तोरी-शिवपूर पहिला आणि दुसरा आणि बिराटोली-शिवपूर तिसरा रेल्वे मार्ग (तोरी-शिवपूर प्रकल्पाचा भाग), मोहनपूर-हंसदिहा नवीन रेल्वे मार्ग, धनबाद-चंद्रपुरा रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील रेल्वे सेवांचा विस्तार होईल आणि या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी तीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये देवघर-दिब्रूगड रेल्वे सेवा, टाटानगर आणि बदमपहार (दैनिक) दरम्यान मेमू रेल्वे सेवा आणि शिवपूर स्थानकापासून लांब पल्ल्याच्या मालगाडीचा समावेश आहे.

चतरा येथील उत्तर करणपुरा सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या (एसटीपीपी) एकक 1 (660 मेगावॅट) सह झारखंडमधील महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांचे पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केले. 7500 कोटी रुपयांहून अधिक खर्चून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे या भागातील वीजपुरवठा सुधारेल. यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लागेल. झारखंडमधील कोळसा क्षेत्राशी संबंधित प्रकल्पाचेही पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केले.

 

 

 

 

 

* * *

NM/S.Tupe/Shraddha/Vinayak/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2010812) Visitor Counter : 55