पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ


“श्री कल्की धाम मंदिर भारताच्या अध्यात्मिकतेचे नवे केंद्र म्हणून उदयाला येईल”

“आज भारत ‘विकास भी विरासत भी’-म्हणजेच वारशासह विकास या संकल्पनेसह वेगाने प्रगती करत आहे”

“भारताचे सांस्कृतिक पुनरुत्थान, आपल्या अस्तित्वाचा अभिमान आणि तो प्रस्थापित करण्यासाठीचा आत्मविश्वास यांच्यामागे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आहे”

“राम ललाच्या अस्तित्वाचा दिव्य अनुभव, ती दिव्य भावना अजूनही आम्हाला भावविभोर करते”

“जे कल्पनातीत होते ते आता वास्तवात उतरले आहे”

“आज एकीकडे आमची तीर्थस्थळे विकसित होत आहेत तर दुसरीकडे शहरांमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने पायाभूत सुविधा देखील विकसित होत आहेत”

“कल्की हा कालचक्रातील बदलाचा आरंभकर्ता आहे तसाच तो प्रेरणेचा स्त्रोत देखील आहे”

“पराभवाच्या जबड्यातून विजय कसा खेचून आणायचा हे भारत जाणतो”

“आज, पहिल्यांदाच, भारत अशा पातळीवर आहे जेथे आपण कोणाचे अनुकरण करत नसून एक उदाहरण घालून देत आहोत”

“आजच्या भारतात आपले सामर्थ्य अमर्याद आहे आणि आपल्यासाठी उपलब्ध संधी देखील असंख्य आहेत”

“जेव्हा भारत मोठे निर्धार करतो, तेव्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रुपात दिव्य जाणीव नक्कीच आमच्यासोबत असते”

Posted On: 19 FEB 2024 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ झाला.पंतप्रधानांनी यावेळी श्री कल्की धाम मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण देखील केले.आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या अध्यक्षतेखालील श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टतर्फे या मंदिराची उभारणी केली जात आहे. आजच्या कार्यक्रमात अनेक संत, धार्मिक नेते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की आणखी एका महत्त्वाच्या तीर्थस्थळाची पायाभरणी होत असल्यामुळे आज भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांची ही भूमी पुन्हा एकदा भक्ती, भावना आणि अध्यात्मिकतेने भरून गेली आहे. संभल येथील श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी हे मंदिर भारताच्या अध्यात्मिकतेचे नवे केंद्र म्हणून उदयाला येईल असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधानांनी यानिमित्त सर्व नागरिक आणि जगभरातील भाविकांना शुभेच्छा दिल्या.

या मंदिराच्या उद्घाटनासाठी कराव्या लागलेल्या 18 वर्षांच्या प्रतीक्षेचा उल्लेख करत ते म्हणाले की अनेक चांगली कार्ये त्यांच्या हातून संपन्न होण्यासाठी शिल्लक राहिली आहेत असे वाटते. ते म्हणाले की लोकांच्या आणि साधूसंतांच्या आशीर्वादाने ते अपूर्ण राहिलेली कार्ये पूर्ण करत राहतील. 

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधत त्यांनी आजघडीला झालेले सांस्कृतिक पुनरुत्थान, अभिमान आणि आपल्या व्यक्तित्वामधील आत्मविश्वास यांचे श्रेय शिवाजी महाराजांना दिले.

श्री कल्की धाम मंदिराच्या स्थापत्यावर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की या मंदिरात 10 गर्भगृहे असून त्यामध्ये भगवंताचे 10 अवतार स्थापित केले जातील. या दहा अवतारांच्या माध्यमातून शिल्पांद्वारे कशा प्रकारे मनुष्यरुपासह भगवंताची सर्व स्वरूपे सादर करण्यात आली आहेत याचे वर्णन पंतप्रधान मोदी यांनी केले. “जीवनात आपल्याला दैवी चैतन्याचा अनुभव येत असतो,” ते म्हणाले, “आपण सिंह, वराह आणि कासव यांच्या रुपात देवाचा अनुभव घेतला आहे.”  या स्वरूपांमध्ये देवाची स्थापना लोकांनी मानलेल्या देवाची समग्र प्रतिमा सादर करेल. श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांनी देवाचे आभार मानले. पंतप्रधानांनी याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व साधुसंतांना अभिवादन केले तसेच त्यांनी आचार्य प्रमोद कृष्णम यांचे देखील आभार मानले.

आजचा हा कार्यक्रम म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण क्षण आहे असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. अयोध्या धाम येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना आणि अबू धाबी येथील मंदिराचे उद्घाटन या घटनांचा संदर्भ देऊन पंतप्रधान म्हणाले, “जे कल्पनातीत होते ते आता वास्तवात उतरले आहे.”

एकामागून एक येणाऱ्या अशा कार्यक्रमांचे महत्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. अध्यात्मिक पुनरुज्जीवनाविषयी  बोलताना पंतप्रधानांनी काशीतील विश्वनाथ धाम, काशीचा कायापालट, महाकाल महालोक, सोमनाथ आणि केदारनाथ धाम यांचा उल्लेख केला.

आपण सर्वजण 'विकास भी - विरासत भी - विकासाबरोबरच वारशाचे जतन या मंत्राचे आचरण करून मार्गक्रमण करत आहोत, असे ते म्हणाले.  अत्याधुनिक शहरी पायाभूत सेवा सुविधा आणि आध्यात्मिक केंद्रांचा जीर्णोद्धार, नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना आणि मंदिरे, तर परदेशी गुंतवणुक आणि परदेशातून कलाकृती परत आणणे या गोष्टींविषयी तुलनात्मक विचार मांडला. काळाचे चक्र पुढे सरकल्याचे यावरून दिसून येते असे सांगून त्यांनी लाल किल्ल्यावरील त्यांच्या 'हीच वेळ योग्य वेळ आहे' या विधानाचा पुनरुच्चार केला आणि नव्याचा स्वीकार करण्याच्या गरजेवर भर दिला.

अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे स्मरण करून पंतप्रधानांनी सांगितले की 22 जानेवारी  2024 पासून नवे कालचक्र सुरु झाले झाले आहे.  रामराज्याचा प्रभाव हजारो वर्षे अबाधित राहिल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे, आता रामलल्ला स्थानापन्न झाल्यानंतर भारत आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात करणार असून या प्रवासात आझादीच्या अमृत काळात विकसित भारताचे स्वप्न आता केवळ एक इच्छा न राहता ते प्रत्यक्षात साकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "भारताची संस्कृती आणि परंपरा प्रत्येक कालखंडात या संकल्पातून जगली आहे." श्री कल्कीच्या रूपांबद्दलचे आचार्य प्रमोद कृष्णम जी यांचे संशोधन आणि अभ्यासाविषयी बोलताना, पंतप्रधानांनी विविध पैलू आणि शास्त्रीय ज्ञानावर प्रकाश टाकला आणि कल्कीची रूपे भगवान श्रीरामा प्रमाणेच हजारो वर्षांच्या भविष्याचा मार्ग ठरवतील, असे त्यांनी सांगितले.

“कल्की हा कालचक्रातील परिवर्तनाचे प्रणेते आहे आणि तो प्रेरणास्रोत देखील आहे”, कल्की धाम हे परमेश्वराला समर्पित असे एक स्थान असणार आहे ज्याचा अवतार अजून व्हायचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. शेकडो हजारो वर्षांपूर्वीच भविष्याबद्दलच्या या संकल्पना धर्मग्रंथांमध्ये लिहिल्या गेल्या होत्या यावर त्यांनी प्रकाश टाकला. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी या तत्वांना पूर्ण श्रद्धेने पुढे नेल्याबद्दल आणि त्यासाठी आपले जीवन समर्पित केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. कल्की मंदिराच्या स्थापनेसाठी आचार्यजींनी गेल्या सरकारबरोबर केलेल्या दीर्घ संघर्षांचा आणि त्यासाठी दिलेल्या न्यायालयाच्या भेटींचा त्यांनी उल्लेख केला. आचार्यजी यांच्यासमवेत अलीकडेच झालेल्या भेटीचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की ते आचार्यांना एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखत होते मात्र धर्म आणि अध्यात्माबाबतच्या त्यांच्या समर्पित वृत्तीचे ज्ञान आपल्याला काही काळाने झाले. “आज, प्रमोद कृष्णम जी शांत मनोवृत्तीने मंदिराचे काम सुरू करू शकतील ”, हे मंदिर सध्याच्या सरकारच्या उज्ज्वल भविष्याकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा पुरावा ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पराभवाच्या दाढेतून विजयश्री कशी खेचून आणायची हे भारताला ठाऊक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन संशोधनाच्या मालिकेत भारतीय समाजाने दाखवलेली लवचिकता वाखाणण्याजोगी आहे, भारताच्या आजच्या अमृत काळात भारताचे  वैभव, उंची आणि सामर्थ्य यांची बीजे रुजत  आहे” असे ते म्हणाले. संत आणि धर्मगुरू नवीन मंदिरे बांधत असल्याने राष्ट्राच्या मंदिराच्या उभारणीचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राष्ट्राच्या मंदिराची भव्यता आणि विस्तारासाठी मी रात्रंदिवस काम करत आहे”, असेही ते म्हणाले. आज, प्रथमच असे होत आहे की भारत अनुसरण न करता एक आदर्श निर्माण करत आहे. या वचनबद्धतेच्या फलनिष्पत्तीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की भारत डिजिटल तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचे केंद्र बनत आहे, भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत आहे, चांद्रयानचे यश, वंदे भारत आणि नमो भारत सारख्या आधुनिक रेल्वेगाडी, आगामी बुलेट ट्रेन, हायटेक महामार्ग आणि एक्स्प्रेस वेचे मजबूत नेटवर्क यांचा उल्लेख केला. या सर्व यशोगाथेमुळे भारतामध्ये अभिमानाची भावना जागृत होत आहे आणि “देशातील सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाची ही लाट विस्मयकारक आहे. म्हणूनच आज आपल्या क्षमता अमर्याद आहेत आणि आपल्यासाठी शक्यताही अपार आहे.”

सामूहिक कृतींमधूनच देशाला यश मिळवण्यासाठीची ऊर्जा मिळते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज आपल्या देशात सामूहिक चैतन्याचं व्यापक दर्शन होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. 'देशाचा प्रत्येक नागरिक सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या भावनेनं काम करत असल्याचं ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी आपल्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 4 कोटींपेक्षा जास्त पक्की घरं, 11 कोटी शौचालयं, 2.5 कोटी कुटुंबांना वीजेची जोडणी, 10 कोटींपेक्षा जास्त घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी, 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन, 10 कोटी महिलांना अनुदानाअंतर्गत घरगुती वापराचा गॅस सिलिंडर, 50 कोटी आयुष्मान कार्ड, 10 कोटी शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी, कोरोना काळात नागरिकांचं मोफत लसीकरण आणि स्वच्छ भारत उपक्रम इतकं व्यापक काम सरकारनं केलं असल्याचं ते म्हणाले.

सरकारनं केलेल्या या कामाचा वेग आणि व्याप्तीचं श्रेय देशाच्या नागरिकांचं असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. आज देशातले नागरिक आपल्यातल्या गरिब जनतेला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करत आहेत, तसंच त्या त्या योजना 100 पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात यासाठीच्या मोहिमेत सहभागी होत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. 'नर में नारायण' (देवाचे अस्तित्व हे लोकांमध्येच असणं) हे भारताच्या अध्यात्मिक मूल्यांनी आपल्याला दिलेली प्रेरणा आहे, आणि त्यातूनच गरिब जनतेची सेवा करण्याची भावना प्रत्येकात रुजली आहे असं ते म्हणाले. 'विकसित भारताची उभारणी' आणि 'आपल्या वारशाचा अभिमान बाळगणं' यासाठीच्या पाच तत्त्वांचं देशातल्या नागरिकांनी पालन करावं या आवाहनाचा पुनरुच्चार त्यांनी केला.

जेव्हा केव्हा आपला देश मोठे संकल्प करतो, त्या त्या वेळी या ना त्या स्वरुपात एक प्रकारचं दैवी चैतन्य आपल्यात संचारतं, आणि आपल्या संकल्पपूर्तीसाठी मार्गदर्शन करतं असं ते म्हणाले. गीतेमध्ये मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा संदर्भ देत, अथक कृती करत राहण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला. पुढच्या 25 वर्षांच्या 'कर्तव्य काळात' आपल्याला कष्टाचं शिखर गाठायचं आहे असं ते म्हणाले. देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत, आपल्याला नि:स्वार्थीपणे काम करावं लागेल. आपल्या प्रत्येक प्रयत्नातून देशाला कशाप्रकारे लाभ होऊ शकेल, असाच प्रश्न सगळ्यात आधी  आपल्या मनात यायला हवा. अशा प्रश्नातूनच आपल्यासमोरच्या आव्हानांवर सामूहिक पातळीवर तोडगे आपल्याला सापडू शककतील,' ही बाब अधोरेखीत करत पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.

यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्री कल्की धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

NM/ST/JPS/Sanjana/Bhakti/Tushar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2007093) Visitor Counter : 84