पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ कार्यक्रमाला केले संबोधित


राजस्थानमध्ये 17,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली

राजस्थानमध्ये 5,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केले उद्घाटन

सुमारे 2,300 कोटी रुपयांच्या आठ महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांची केले राष्ट्रार्पण आणि पायाभरणी

खतीपुरा रेल्वे स्थानकाचे केले राष्ट्रार्पण

सुमारे 5,300 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या सौर प्रकल्पांचे केले राष्ट्रार्पण आणि पायाभरणी

2,100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ऊर्जा पारेषण क्षेत्रातील प्रकल्पांचे लोकार्पण

जल जीवन अभियानांतील प्रकल्पांसह सुमारे 2,400 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची केली पायाभरणी

जोधपूर येथील इंडियन ऑईलच्या एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाचे राष्ट्रार्पण

"विकसित भारताच्या उभारणीत विकसित राजस्थानची भूमिका महत्त्वाची"

"भूतकाळातील नैराश्य सोडून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची भारताला संधी"

"मी 'विकसित भारत' बद्दल बोलतो, तेव्हा तो केवळ एक शब्द किंवा भावना नसते, तर प्रत्येक कुटुंबाचे जीवन समृद्ध करण्यासाठीची मोहीम असते. 'विकसित भारत' हे दारिद्र्य दूर करण्यासाठी, दर्जेदार रोजगार निर्माण करण्यासाठी आणि देशात आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठीचे अभियान.”

"भारत आज सौर ऊर्जेतून वीज निर्मिती करण्याच्या बाबतीत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक बनला आहे"

"युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या आमच्यासाठी 4 सर्वात मोठ्या जाती आहेत आणि मला आनंद आहे की दुहेरी इंजिन असलेले सरकार या घटकांच्या सक्षमीकरणासाठी मोदींनी दिलेली हमी पूर्ण करत आहे"

"पहिल्यांदाच मतदान करणारा मतदार आज 'विकसित भारत' च्या ध्येयदृष्टीच्या सोबत उभा आहे"

Posted On: 16 FEB 2024 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  'विकसित भारत विकसित राजस्थान' कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी 17,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पेयजल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील हे प्रकल्प आहेत. 

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी, राजस्थानच्या सर्व मतदारसंघांतील लाखो लोकांच्या 'विकसित भारत विकसित राजस्थान' कार्यक्रमातील सहभागाची दखल घेतली आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. सर्व लाभार्थ्यांना एकाच छताखाली आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल त्यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन केले. राजस्थानच्या लोकांचे गुण अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील स्वागताचे स्मरण केले. आणि त्याचे प्रतिध्वनी केवळ भारतातच नव्हे तर फ्रान्समध्येही ऐकू येत असल्याचे सांगितले.

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या भेटी मधे लोकांच्या लाभलेल्या आशीर्वादांचे पंतप्रधान मोदी यांनी स्मरण केले आणि दुहेरी इंजिन असलेले सरकार स्थापन होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या 'मोदी की गॅरंटी' वरील विश्वासाचा पुनरुच्चार केला. रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पेयजल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रांमध्ये 17,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे आज उद्घाटन, पायाभरणी, लोकार्पण झाले त्याबद्दल त्यांनी राजस्थानच्या लोकांचे अभिनंदन केले आणि यामुळे राज्यात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील असे ते म्हणाले. 

लाल किल्ल्यावरून केलेल्या 'हीच वेळ आहे- हीच योग्य वेळ आहे' या आवाहनाची आठवण करून देत, सध्याचा काळ सुवर्णकाळ असल्याचे त्यांनी सांगितले आणि आता भारत मागील दशकांचे नैराश्य मागे सोडून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो असे पंतप्रधान म्हणाले. 2014 पूर्वी केल्या जाणाऱ्या घोटाळे, असुरक्षितता आणि दहशतवादाच्या चर्चांऐवजी आता आम्ही 'विकसित भारत' आणि 'विकसित राजस्थान' च्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आहे असेही ते म्हणाले.

"आपण आज मोठे संकल्प हाती घेत आहोत, मोठी स्वप्ने पाहत आहोत आणि ते साध्य करण्यासाठी आपण स्वतःला समर्पित करत आहोत", असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “मी 'विकसित भारत' बद्दल बोलतो, तेव्हा तो केवळ एक शब्द किंवा भावना नसते, तर प्रत्येक कुटुंबाचे जीवन समृद्ध करण्यासाठीची मोहीम असते". 'विकसित भारत' हे दारिद्र्य दूर करण्यासाठी, दर्जेदार रोजगार निर्माण करण्यासाठी आणि देशात आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठीचे अभियान आहे असे त्यांनी सांगितले. आपल्या ताज्या परदेश दौऱ्याचा दाखला देत, तिथे जागतिक नेत्यांबरोबर झालेल्या संवादावरुन स्पष्ट होते की, भारत मोठी स्वप्ने पाहू शकतो आणि ती स्वप्ने साध्यही करू शकतो, हे जागतिक नेते मान्य करत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. 

रेल्वे, रस्ते, वीज आणि पाणी या अत्यावश्यक क्षेत्रांच्या वेगवान विकासाची गरज अधोरेखित करत, 'विकसित भारताच्या विकासासाठी विकसित राजस्थानचा विकास अत्यावश्यक आहे असे ते म्हणाले. अशा क्षेत्रांच्या विकासामुळे शेतकरी, पशुपालक, उद्योग आणि पर्यटन क्षेत्र यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि राज्यात नवीन गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधीही येतील असे त्यांनी सांगितले. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विक्रमी 11 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी आधीच्या कोणत्याही सरकारच्या तुलनेत 6 पटीने जास्त आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. या तरतुदीमुळे  सिमेंट, दगड (खडी) आणि सिरामिक्स उद्योगांना मोठा फायदा होईल हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

गेल्या 10 वर्षांत राजस्थानात  ग्रामीण रस्ते, महामार्ग आणि द्रुतगती मार्गांमध्ये झालेल्या अभूतपूर्व गुंतवणुकीचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले की, आज राजस्थान, गुजरातच्या किनारपट्टीच्या भागांशी जोडले जात आहे.  महाराष्ट्र आणि पंजाब या प्रदेशांशी देखील रुंद महामार्गांद्वारे जोडले जात आहे. आज लोकार्पित होणाऱ्या  प्रकल्पांमुळे कोटा, उदयपूर, टोंक, सवाई माधवपूर, बुंदी,अजमेर, भिलवाडा आणि चित्तोडगडमधील दळणवळण सुधारेल. या रस्त्यांमुळे दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि महाराष्ट्र ही राज्येही चांगल्याप्रकारे जोडली जातील.

आजच्या कार्यक्रमाचा भाग असलेल्या रेल्वेच्या विद्युतीकरण, सुधारणा आणि दुरुस्तीच्या कामांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की बांदिकुई-आग्रा फोर्ट रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे मेहंदीपूर बालाजी आणि आग्रा येथून प्रवेश करणे सुलभ होईल. त्याचप्रमाणे, खातीपुरा (जयपूर) स्थानकातून अधिक गाड्या चालवता येण्याची क्षमता वाढेल, असेही ते  म्हणाले, 

नागरिकांनी स्वतःच्या घरात सौरऊर्जेची निर्मिती करावी  तसेच अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवावे, यासाठी सुरू असलेल्या सरकारच्या प्रयत्नांवर पंतप्रधान मोदींनी भर दिला.जिथे सरकार 300 युनिट मोफत विजेची व्यवस्था करते त्या पीएम सूर्य घर योजना किंवा मोफत वीज योजनांची माहिती यावेळी पंतप्रधान मोदींनी दिली. केंद्र सरकार 1 कोटी कुटुंबांना घराच्या गच्चीवर सौर पॅनेल उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करेल जिथे प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 75,000 कोटी रुपये असेल याची त्यांनी माहिती दिली.  याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गीय आणि निम्न-मध्यमवर्गीय समाजाला होईल, असे त्यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, यासाठी बँका कर्जाचे सुलभ वितरण देखील करतील. “राजस्थानमध्ये, सरकारने 5 लाख घरांमध्ये सौर पॅनेल बसवण्याची योजना आखली आहे”, असे गरीब आणि मध्यमवर्गीयांचा खर्च कमी करण्यासाठी दुहेरी इंजिन सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना श्री मोदी म्हणाले.

युवक, महिला, किसान आणि गरीब या चार गटांच्या विकासावर भर देण्याच्या आपल्या संकल्पांचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. "आमच्यासाठी हे चार गट सर्वात महत्त्वाचे आहेत आणि मला आनंद आहे की या वर्गांच्या सक्षमीकरणासाठी मोदींनी दिलेली हमी डबल इंजिन सरकार पूर्ण करत आहे", असे ते म्हणाले. राजस्थानच्या नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात 70 हजार नोकऱ्या प्रस्तावित केल्या आहेत. पेपरफुटीच्या घटनांसाठी एसआयटी स्थापन केल्याबद्दल त्यांनी नव्या राज्य सरकारचे कौतुक केले. तसेच पेपरफुटीच्या विरोधात करण्यात आलेल्या कठोर नवीन केंद्रीय कायद्याची माहिती त्यांनी दिली; जी प्रतिबंधक उपाय म्हणून काम करेल.

गरीब कुटुंबांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर देण्याच्या राज्य सरकारच्या हमी योजनेविषयी सांगताना पंतप्रधान म्हणाले, की याचा राजस्थानमधील लाखो महिलांना फायदा झाला आहे. मागील सरकारच्या काळात जलजीवन मिशनमधील घोटाळे निदर्शनास आणून देत आता काम वेगाने सुरू झाल्याचे  मोदींनी अधोरेखित केले. त्यांनी माहिती दिली की, राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 6,000 रुपयांच्या विद्यमान आर्थिक मदतीत 2,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. “आम्ही प्रत्येक क्षेत्रात आमची एक-एक वचने पूर्ण करत आहोत. आम्ही आमच्या हमीबद्दल गंभीर आहोत. म्हणूनच लोक म्हणतात – मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी” यांचा पुनर्च्चार  पंतप्रधानांनी  केला.

विकसित भारत संकल्प यात्रेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, “प्रत्येक लाभार्थ्याला त्यांचे हक्क लवकर मिळावेत आणि कोणीही वंचित राहू नये यासाठी मोदी  प्रयत्नशील आहेत” राजस्थानमधील कोट्यवधी नागरिकांनी त्यात सहभाग नोंदवला, आणि तेथे जवळपास 3 कोटी लोकांची मोफत आरोग्य तपासणी  करण्यात आली आहे, 1 कोटी नवीन आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहेत, 15 लाख शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डसाठी नोंदणी केली आहे,पीएम किसान सन्माननिधी योजनेसाठी सुमारे 6.5 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. पंतप्रधान पुढे म्हणाले की उज्ज्वला गॅस कनेक्शनसाठी सुमारे 8 लाख महिलांनी नोंदणी केली असून त्यापैकी 2.25 लाख कनेक्शन आधीच जारी करण्यात आले आहेत. राजस्थानमधील 16 लाख लोक प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या विमा योजनांमध्ये सामील झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

निराशेचे वातावरण निर्माण करणाऱ्या आणि देशाच्या यशाचा आनंद साजरा करण्यापासून परावृत्त करणाऱ्या शक्तींकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्धही त्यांनी इशारा दिला. असे राजकारण तरुणांना प्रेरणा देत नाही, असे ते म्हणाले. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांच्या स्वप्नांचा आणि आकांक्षांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, असे तरुण “विकसित भारत" संकल्पनेच्यासोबत उभे आहेत. विकसित राजस्थान आणि विकसित भारतचे स्वप्न याच  प्रथमच मतदान करणाऱ्यांसाठी आहे.”

राजस्थानचे राज्यपाल श्री कलराज मिश्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री,श्री भजनलाल शर्मा, राजस्थान सरकारमधील इतर मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्‍वभूमी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील  5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी आठ मार्गी  दिल्ली-मुंबई ‘ग्रीन फील्ड अलाइनमेंट’ (एनई-4)  बाओनली – झलाई मार्ग ते  मुई ग्राम विभागाच्या तीन प्रकल्पांचे उद्घाटन केले;  हरदेवगंज गाव ते मेज नदी विभाग; आणि टाकळी ते राजस्थान/ मध्य प्रदेश सीमेपर्यंतचा विभाग, या प्रदेशात वेगवान  आणि सुधारित  संपर्क व्यवस्था  प्रदान होवू  शकेल. या  विभागामध्‍ये  वन्यप्राण्यांचा अडथळा येवू नये, वाहनांना सुलभतेने प्रवास करणे शक्‍य व्हावे यासाठी ‘ॲनिमल अंडरपास’ आणि ‘ ॲनिमल ओव्हरपास’ने हा महामार्ग  सुसज्ज केला आहे. तसचे धावत्या वाहनांच्या आवाजाचा   वन्यजीवांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी, आवाज कमी करण्‍यासाठी यंत्रणा बसविण्‍यात आली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी  काया गावात एनएच -48 च्या चितोडगड-उदयपूर महामार्ग विभागातील  देबरी येथील एनएच-48 च्या उदयपूर-शामलाजी विभागाशी जोडणाऱ्या  सहा मार्गिकांच्या  हरित क्षेत्र  उदयपूर बायपासचे उद्घाटनही केले. या बायपासमुळे उदयपूर शहरातील  गर्दी कमी होण्यास मदत होईल. राजस्थानमधील झुंझुनू, अबू रोड आणि टोंक जिल्ह्यांतील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणाऱ्या इतर विविध प्रकल्पांचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

पंतप्रधानांनी राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधांना बळकटी देणारे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आणि राजस्थानमधील  आठ महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी  सुमारे 2300 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प  राष्ट्राला समर्पित केले. या  रेल्वे प्रकल्पांमध्ये जोधपूर-राय का बाग-मेरता रोड-बिकानेर विभाग (277 किमी) यासह रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाच्या  विविध प्रकल्पांचा समावेश आहे.  जोधपूर-फलोदी विभाग (136 किमी); आणि बिकानेर-रतनगड-सादुलपूर-रेवाडी विभाग (375 किमी) हा प्रकल्प आहे. तसेच  पंतप्रधानांनी खातीपुरा रेल्वे स्थानक  राष्ट्राला समर्पित केले. जयपूरचे  रेल्वे स्थानक आता उपग्रह स्थानक म्हणून विकसित करण्यात आले आहे. हे स्‍थानक आता टर्मिनल सुविधांनी  सुसज्ज आहे.  जिथून गाड्या निघतात  आणि काही गाड्यांचा प्रवास जिथे संपतो, तिथंपर्यंत प्रवाशांना जाता येणार आहे. ज्या रेल्वे प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे, त्यामध्‍ये  भगत की कोठी (जोधपूर) येथे वंदे भारत, एलएचबी बोगींची  देखभाल  करण्‍याची सुविधा आहे.  खातीपुरा (जयपूर) येथील वंदे भारत, एलएचबी इत्यादी सर्व प्रकारच्या बोगींची देखभाल करण्‍यात येते. हनुमानगड येथे गाड्यांच्या देखभालीसाठी ‘कोच केअर कॉम्प्लेक्स’ चे बांधकाम आणि बांदीकुई ते आग्रा फोर्ट रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू करण्‍यात आले आहे.  रेल्वे क्षेत्रातील प्रकल्पांचे उद्दिष्ट रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे, सुरक्षा उपाय वाढवणे, संपर्क यंत्रणा सुधारणे, त्याचबरोबर  माल, वस्तू आणि लोकांची अधिक कार्यक्षमतेने वाहतूक सुलभ करणे हे आहे.

राजस्‍थानामध्‍ये नवीकरणीय, अक्षय ऊर्जा उत्पादनाला चालना देण्यासाठी प्रकल्पाची  पंतप्रधानांनी पायाभरणी केली आणि राजस्थानमध्ये सुमारे 5300 कोटी रुपयांचे  महत्त्वाचे  सौर प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. राजस्थानमधील बिकानेर येथील बारसिंगसर औष्णिक वीज केंद्राजवळच  स्थापन करण्यात येणाऱ्या 300 मेगावॅट क्षमतेच्या एनएलसीआयएल बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्‍यात येणार आहे,  या प्रकल्पाची  पंतप्रधानांनी आज पायाभरणी केली. आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगाने भारतात उत्पादित उच्च-कार्यक्षमतेच्या ‘बायफेशियल मॉड्यूल’ सह अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सौर प्रकल्प उभारण्‍यात येत आहे.

पंतप्रधानांनी सीपीएसयु (CPSU) योजना  टप्पा -II (ट्रांच-III)  अंतर्गत एनएचपीसी लि. च्या 300 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली, हा प्रकल्प राजस्थान मधील बिकानेर येथे विकसित केला जाणार आहे. राजस्थान मधील बिकानेर येथे विकसित करण्यात केलेला 300 मेगावॅटचा एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड नोखरा सोलर पीव्ही प्रकल्पही पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला. या सौर प्रकल्पाच्या माध्यमातून हरित उर्जा निर्माण होईल, कार्बन डायऑक्साइड वायूचे  उत्सर्जन कमी करण्यास मदत मिळेल आणि एकंदरीत या  क्षेत्राचा आर्थिक विकास साध्य होईल .

पंतप्रधानांनी राजस्थानमधील 2100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे वीज पारेषण क्षेत्रातील प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. हे प्रकल्प राजस्थानमधील सौरऊर्जा क्षेत्रातून वीज वाहून नेण्यासाठी उपयोगी पडतील जेणेकरुन या क्षेत्रामध्ये निर्माण होणारी सौर ऊर्जा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल. या प्रकल्पांमध्ये, टप्पा-II भाग अ अंतर्गत राजस्थानमधील सौरऊर्जा क्षेत्रांतून (8.1 गिगावॅट ) वीज वाहून नेण्यासाठी पारेषण व्यवस्था बळकटीकरण योजना,टप्पा-II भाग- ब1 अंतर्गत राजस्थानमधील सौरऊर्जा क्षेत्रांतून (8.1 गिगावॅट) वीज वाहून नेण्यासाठी पारेषण व्यवस्था बळकटीकरण योजना; आणि बिकानेर ( पीजी ), फतेहगढ-II आणि भाडला-II येथे आर इ अर्थात नवीकरणीय  ऊर्जा  प्रकल्पांना जोडणी देण्यासाठी पारेषण व्यवस्था इत्यादी प्रकल्पांचा यात समावेश आहे .

जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 2400 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी यावेळी पंतप्रधानांनी केली, ज्याचा उद्देश राजस्थानमधील लोकांना नळाद्वारे  पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे हा आहे. हे प्रकल्प देशभरात वैयक्तिक घरगुती नळ जोडण्याच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याच्या पंतप्रधानांच्या समर्पणाचे द्योतक आहेत.

यावेळी पंतप्रधानांनी जोधपूर येथे इंडियन ऑइल कंपनीचा एलपीजी बॉटलिंग प्लांट राष्ट्राला समर्पित केला. परिचालन  आणि सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि ऑटोमेशन सिस्टीमसह बॉटलिंग प्लांट, रोजगार निर्मितीला कारणीभूत ठरेल आणि या भागातील लाखो ग्राहकांच्या एलपीजी गरजा पूर्ण करेल.

राजस्थानमधील या विकास प्रकल्पांच्या शुभारंभाने  राजस्थानमधील पायाभूत सुविधांचे परिदृश्य बदलण्यासाठी आणि विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांचे अथक प्रयत्न अधोरेखित केले आहेत . जयपूर येथील या मुख्य कार्यक्रमासह राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 200 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या राज्यव्यापी कार्यक्रमात विविध शासकीय योजनांचे लाखो लाभार्थी सहभागी झाले होते. तसेच या  कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री, राजस्थान सरकारचे इतर मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

 

 

 

 

 

 

* * *

JPS/Tupe/NM/Kane/Vinayak/Sampada/Suvarna/Vikas/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2006557) Visitor Counter : 82