पंतप्रधान कार्यालय

'विकसित भारत @2047 : युवांचा आवाज' उपक्रमाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ


''भारताच्या इतिहासातला हा असा कालखंड आहे जेव्हा भारत प्रचंड मोठी झेप घेणार आहे''

''भारतासाठी हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे''

''आपल्यासाठी आपला स्वातंत्र्यलढा ही मोठी प्रेरणा आहे, तेव्हा राष्ट्रीय प्रयत्न एकाच उद्दिष्टाभोवती केंद्रित झाले होते, ते म्हणजे -स्वातंत्र्य ''

''तुमची उद्दिष्टे, तुमचे संकल्प यांचे ध्येय एकच असायला हवे - विकसित भारत

''संकल्पनेची( 'आयडिया ' -Idea ) सुरुवात ( आय 'I') स्वतःपासून होते, जसे इंडियाची सुरुवात '‘I’आय'पासून होते, विकासाच्या प्रयत्नांची सुरुवातही स्वतःपासून होते

''नागरिक, मग ते कुठल्याही भूमिकेत असो, जेव्हा स्वतःचे कर्तव्य बजावू लागतात, तेव्हा देश पुढे जाऊ लागतो''

''या देशाचे नागरिक म्हणून आपल्यासाठी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. आपल्यासमोर अमृत काळाची 25 वर्षे आहेत, आपल्याला दिवसाचे 24 तास काम करायचे आहे''

'' युवा शक्ती परिवर्तनाचे दूत आणि परिवर्तनाचे लाभार्थी दोन्ही ठरणार आहे ''

“प्रगतीचा रोडमॅप केवळ सरकार ठरवणार नाही तर देश ठरवणार आहे. सर्वांच्या प्रयत्नांतूनच विकसित भारताची उभारणी होणार आहे ''

Posted On: 11 DEC 2023 2:15PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘विकसित  भारत @2047: युवांचा आवाज’ उपक्रमाचा प्रारंभ केला.  कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाचा प्रारंभ  म्हणून देशभरातल्या राजभवनांमध्ये  आयोजित कार्यशाळेत विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापकांना संबोधित केले.

विकसित भारत उपक्रम पुढे नेण्यासाठी  आजची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्व राज्यपालांचे आभार मानून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.  विकसित भारत  संकल्पासाठी आजचा कार्यक्रम  विशेष  असल्याचे ते म्हणाले. विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असलेल्या सर्व संबंधितांना  एकत्र आणण्याच्या त्यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी   व्यक्तिमत्त्व विकासात शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.  लोकांचा  विकास झाला तरच  राष्ट्र विकसित होते, असे त्यांनी अधोरेखित केले.  सध्याच्या युगात व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित करून पंतप्रधानांनी 'युवांचा आवाज'  कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रत्येक राष्ट्राच्या जीवनात इतिहास एक काळ प्रदान करतो, जेव्हा ते राष्ट्र त्याच्या विकासयात्रेत अभूतपूर्व झेप घेऊ शकतो. भारतासाठी, '' हा अमृत काळ सुरु आहे आणि भारताच्या इतिहासातला हाच तो काळ आहे जेव्हा भारत प्रचंड मोठी झेप घेणार आहे.'', असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. त्यांनी जवळपासच्या अनेक देशांची उदाहरणे दिली ज्यांनी निर्धारित  कालावधीत अशी अभूतपूर्व झेप  घेतली आणि ती  विकसित राष्ट्रांमध्ये रूपांतरित झाली. “भारतासाठी हीच वेळ आहे, योग्य वेळ (यही समय है, सही समय है)”,  या अमृत काळातील  प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे, असे ते म्हणाले. 

स्वातंत्र्याच्या गौरवशाली लढ्याचा प्रेरणास्रोत म्हणून पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. त्या काळात सत्याग्रह, क्रांतिकारी मार्ग, असहकार आंदोलन , स्वदेशी चळवळ  आणि सामाजिक व  शैक्षणिक सुधारणा यासारखे प्रत्येक प्रयत्न स्वातंत्र्याच्या दिशेने होत होते,  असे ते म्हणाले. या काळात काशी, लखनौ, विश्व भारती, गुजरात विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, अन्नामलाई, आंध्र आणि केरळ विद्यापीठ यासारख्या विद्यापीठांनी राष्ट्राची चेतना बळकट  केली. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित तरुणांची एक संपूर्ण पिढी निर्माण  आली. त्यांचे  प्रत्येक प्रयत्न स्वातंत्र्याच्या ध्येयाकडे निर्देशित होते. “आज प्रत्येक संस्थेने आणि प्रत्येक व्यक्तीने हा संकल्प घेऊन वाटचाल केली पाहिजे की आपला प्रत्येक प्रयत्न आणि कृती विकसित भारतासाठीच असेल. तुमची उद्दिष्टे, तुमचे संकल्प यांचे ध्येय एकच असायला हवे - विकसित भारत.  भारताला अधिक वेगाने विकसित देश बनवण्यासाठी मार्ग शोधण्यावर अध्यापक आणि विद्यापीठांनी विचार करायला हवा आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने सुधारणा करण्यासाठी विशिष्ट क्षेत्रे देखील ओळखायला हवीत, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

‘विकसित भारताचे ' समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठातील विद्यार्थी आणि युवा पिढीच्या उर्जेला दिशा देण्याची गरज पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली. विचारांची विविधता लक्षात घेऊन पंतप्रधानांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी सर्व प्रवाहांना जोडण्यावर भर दिला.  विकसित भारत @2047 च्या संकल्पनेत  योगदान देण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या विचारांच्या विद्यमान कक्षा ओलांडून वेगळा विचार करण्याचे  आवाहन पंतप्रधान मोदी यांनी  केले. अधिकाधिक युवांना  या मोहिमेशी जोडण्यासाठी देशातील प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठात विशेष मोहीम राबवण्याची सूचना त्यांनी केली.  विकसित भारतशी संबंधित संकल्पना  पोर्टल सुरू केल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आणि  5 वेगवेगळ्या संकल्पनांवर  सूचना दिल्या जाऊ शकतात, असे सांगितले.  

“सर्वोत्कृष्ट 10 सूचनांसाठी बक्षिसे देखील ठेवण्यात आली  आहेत. तुम्ही माय गव्ह (MyGov) वर तुमच्या सूचना देखील देऊ शकता”, असेही त्यांनी सांगितले. "जशी भारत म्हणजे इंडियाची  सुरुवात 'आय' ने होते तशी कल्पना म्हणजेच आयडियाची सुरुवात देखील 'आय' ने होते ", असे नमूद करत विकासाची कल्पना केवळ स्वतः पासून म्हणजेच 'आय' पासून सुरू होऊ शकते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

सूचना मागवण्याच्या उपक्रमासंदर्भात तपशीलवार माहिती देताना, राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवणारी अमृत पिढी निर्माण करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. शिक्षण आणि कौशल्याच्या पलीकडे जाण्याच्या गरजेवर भर देत त्यांनी नागरिकांमध्ये राष्ट्रहित आणि नागरी जाणिवा जागृत ठेवण्याचे आवाहन केले.. “जेव्हा नागरिक कोणत्याही भूमिकेत आपले कर्तव्य बजावू लागतात तेव्हा देश पुढे जातो”, असे पंतप्रधान म्हणाले. जलसंधारणाच्या माध्यमातून नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, ऊर्जेची  बचत, शेतीत रसायनांचा कमी  वापर, सार्वजनिक वाहतुकीचा वापर अशाप्रकारची  उदाहरणे त्यांनी यावेळी  दिली. स्वच्छता अभियानाला नवी ऊर्जा देण्यासाठी, जीवनशैलीच्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि तरुणांसाठी भ्रमणध्वनीच्या पलीकडे जाऊन जगाचा शोध घेण्याचे मार्ग सुचवावेत असे त्यांनी शिक्षण क्षेत्रातील संबंधितांना सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतः आदर्श व्यक्तिमत्व व्हावे ,असे त्यांनी सांगितले. सामाजिक विचारप्रक्रिया शासनातही प्रतिबिंबित होते असे सांगत पदवीधारकांकडे किमान एक व्यावसायिक कौशल्य असायला हवे असे त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. “तुम्ही प्रत्येक स्तर, प्रत्येक संस्था आणि राज्य स्तरावर या विषयांवर विचारमंथन करण्याची व्यापक प्रक्रिया पुढे नेली पाहिजे”, असे ते म्हणाले.

‘विकसित  भारत’च्या विकासाच्या कालखंडाचा परिक्षेशी साधर्म्य साधून , ध्येयपूर्तीसाठी   विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, तयारी आणि समर्पण तसेच  आवश्यक शिस्त राखण्यात कुटुंबीयांच्या योगदानाचा उल्लेख पंतप्रधानांनी  केला. देशाचे नागरिक म्हणून आपल्यासाठी  परीक्षेची तारीखही घोषित करण्यात आली आहे. “आपल्यासमोर  25 वर्षांचा अमृत काळ आहे, असे त्यांनी नमूद केले. विकसित भारताच्या ध्येयासाठी आपल्याला 24 तास काम करावे लागेल. याला पोषक   वातावरण आपण एक कुटुंब म्हणून निर्माण केले पाहिजे”, यावर पंतप्रधानांनी भर  दिला.

देशाची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या ही तरुणाईला सशक्त बनवत असल्याकडे लक्ष वेधत, येत्या 25-30 वर्षात कार्यरत  वयोगटातील लोकसंख्येच्या बाबतीत भारत अग्रेसर असणार आहे आणि हे जगाने ओळखले  आहे, अशी माहिती  मोदी यांनी दिली. "युवा शक्ती ही परिवर्तनाची कार्यकारी शक्ती  आहे आणि परिवर्तनाची लाभार्थी देखील आहे", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.आजच्या काळातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील तरुणांची कारकीर्द घडवण्यासाठी  पुढील 25 वर्षे निर्णायक ठरणार आहेत, यावर त्यांनी भर दिला.  भविष्यात तरुणच नवीन कुटुंब आणि नवीन समाज निर्माण करणार आहेत, असे नमूद करून, विकसित भारत कसा असावा हे ठरवण्याचा अधिकार त्यांनाच आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या भावनेने सरकारला देशातील प्रत्येक तरुणांना विकसित भारताच्या कृती आराखड्याशी जोडायचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  विकसित भारताच्या उभारणीसाठी देशातील तरुणाईचा  आवाज धोरणात्मक योजनांमध्ये समाविष्ट  करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि तरुणांशी अधिकाधिक  संपर्क ठेवणाऱ्या शैक्षणिक संस्थांची भूमिका अधोरेखित केली.

प्रगतीचा मार्गदर्शक आराखडा केवळ सरकार ठरवणार नाही तर देश ठरवणार आहे, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना अधोरेखित केले. . "देशातील प्रत्येक नागरिकाचे  त्यात योगदान  आणि सक्रिय सहभाग असेल",असे सांगत 'सबका प्रयास'  या मंत्राने, म्हणजे लोकसहभागाने सर्वात मोठे संकल्पही पूर्ण केले जाऊ शकतात, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.  स्वच्छ भारत अभियान, डिजिटल इंडिया मोहीम, कोरोना महामारीच्या काळात लवचिकता आणि सबका प्रयासचे सामर्थ्य  अधोरेखित करणारी व्होकल फॉर लोकलची  उदाहरणे दिली. “सबका प्रयासमधूनच  विकसित भारताची उभारणी करायची आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. मोदी यांनी  यावेळी , देशाच्या विकासाच्या दृष्टीकोनाला आकार देणाऱ्या आणि  युवा शक्तीचे माध्यम असणाऱ्या उपस्थित विद्यार्थ्यांकडून  मोठ्या अपेक्षांचा पुनरुच्चार केला .पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना,  “देशाचे भवितव्य लिहिण्याची ही एक उत्तम मोहीम आहे”, असे सांगत  विकसित भारतची भव्यता आणखी वाढवण्यासाठी  सूचना पाठवण्याचे  आवाहन केले.

पार्श्वभूमी

देशाच्या राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे यांच्या निर्मितीमध्ये देशातील तरुणांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार,‘विकसित भारत @2047: तरुणाईचा आवाज ’ हा उपक्रम देशातील तरुणांना विकसित भारत  @2047 च्या दृष्टिकोनामध्ये  विचारांचे योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.विकसित भारत  @2047 साठी युवकांना त्यांच्या कल्पना आणि सूचना सामायिक करण्यासाठी  कार्यरत   ठेवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याच्या दिशेने ही कार्यशाळा हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.

विकसित भारत @2047 हा  स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा   दृष्टीकोन  आहे. या दृष्टीकोनामध्ये  आर्थिक वृद्धी  सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन यासह विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे.

***

Jaydevi PS/SK/ST/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984931) Visitor Counter : 170