पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 11 MAY 2023 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2023

कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी राजनाथ सिंह जी, डॉ. जितेंद्र सिंह जी, विज्ञान आणि तंत्रज्ञान समुदायातील सर्व आदरणीय सदस्य आणि माझ्या युवा मित्रांनो!

आज 11 मे हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद दिवसांपैकी एक आहे. आज भारतातील शास्त्रज्ञांनी पोखरणमध्ये अशी कामगिरी केली होती, ज्यामुळे भारतमातेच्या प्रत्येक अपत्याची मान अभिमानाने उंचावली होती. अटलजींनी भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तो दिवस माझ्यासाठीही अविस्मरणीय आहे. पोखरण अणुचाचणीद्वारे भारताने आपली वैज्ञानिक क्षमता तर सिद्ध केलीच, पण जागतिक स्तरावर भारताला एक नवी उंचीही मिळवून दिली. अटलजींच्याच शब्दात सांगायचे तर, आम्ही आमच्या अथक प्रवासात कधी विश्रांती घेतली नाही. कोणत्याही आव्हानासमोर शरणागती पत्करली नाही. मी सर्व देशवासियांना आजच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रांनो ,

आज यानिमित्ताने अनेक भविष्यकालीन उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात आली आहे. मुंबईतील नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा आणि रेडिओलॉजिकल रिसर्च सेंटर असो, विशाखापट्टणममधील बीएआरसी संकुलातील दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबक प्रकल्प असो, मुंबईतील फिशन मॉलिब्डेनम-99 उत्पादन सुविधा असो किंवा विविध शहरांमधील कर्करोग रुग्णालये असोत, या सर्व संस्था आण्विक तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवतेच्या आणि भारताच्या प्रगतीला गती देतील. आज, टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि 'लेझर इंटरफेरोमीटर गुरुत्वीय लहरी वेधशाळा - इंडिया (LIGO-इंडिया)' ची पायाभरणीही झाली आहे. LIGO 21व्या शतकातील सर्वोत्तम विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रमांपैकी एक आहे. आज जगातील मोजक्याच देशांमध्ये अशा वेधशाळा आहेत. ही वेधशाळा भारतातील विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसाठी आधुनिक संशोधनाच्या नवीन संधी घेऊन येत आहे. या प्रकल्पांसाठी मी देशातील वैज्ञानिक समुदायाचे आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो ,

सध्या आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या सुरुवातीच्या महिन्यांत आहोत. आमच्यासमोर 2047 साठीची उद्दिष्टे स्पष्ट आहेत. आपल्याला देश विकसित करायचा आहे, देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. भारताची आर्थिक वाढ असो, शाश्वत विकासाची उद्दिष्टे असोत किंवा नवोन्मेषासाठी सर्वंकष व्यवस्था निर्माण करणे असो, तंत्रज्ञान आपल्यासाठी प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे. आणि म्हणूनच आज भारत एका नव्या विचाराने, 360 अंशाच्या सर्वांगीण दृष्टिकोनासह या क्षेत्रात वाटचाल करत आहे. भारत तंत्रज्ञानाला वर्चस्व गाजवण्याचे माध्यम मानत नाही, तर देशाच्या प्रगतीला गती देण्याचे साधन मानतो. आणि या वर्षीची संकल्पना 'स्कूल टू स्टार्टअप्स- इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट' म्हणजेच तरुणांना नवोन्मेषासाठी आणि स्टार्टअप साठी प्रोत्साहन देणे अशी ठेवण्यात आली आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. स्वातंत्र्याच्या या सुवर्णकाळात भारताचे भविष्य, आपली आजची तरुण पिढी, आपले आजचे विद्यार्थी ठरवतील. आजच्या तरुण पिढीकडे नवी स्वप्ने, नवे संकल्प आहेत. त्यांची ऊर्जा, त्यांची उर्मी, त्यांचा उत्साह, ही भारताची खूप मोठी ताकद आहे.

मित्रांनो ,

आपल्या देशाचे महान शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. कलाम म्हणायचे- ज्ञानाधारित कृती, प्रतिकूलतेचे समृद्धीमध्ये रूपांतर करते. आज भारत एक ज्ञानी समाज म्हणून सशक्त होत असताना तितक्याच वेगाने कृतीही करत आहे. भारतातील तरुण मनांना नवनिर्मितीसाठी प्रेरित करण्यासाठी, गेल्या 9 वर्षांत देशात एक मजबूत पाया घातला गेला आहे. काही वर्षांपूर्वी सुरु केलेल्या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा - एटीएल, आज देशाच्या नवोन्मेष निर्मितीला प्रोत्साहन देणारी भूमी  बनत आहे. आज देशातील 35 राज्यातील 700 जिल्ह्यांमध्ये 10,000 हून अधिक अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. आणि असे नाही की विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि इन्क्युबेशन चे हे मिशन फक्त मोठ्या शहरांपुरते मर्यादित आहे. सुमारे 60 टक्के अटल टिंकरिंग लॅब सरकारी आणि ग्रामीण शाळांमध्ये सुरू आहेत. तुम्ही कल्पना करू शकता, व्यापक स्तरावर मुलांसाठी शिक्षणाचा अर्थ बदलत आहे, त्यांना नवोन्मेषासाठी प्रेरणा मिळत आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की आज 75 लाखांहून अधिक विद्यार्थी अटल टिंकरिंग प्रयोगशाळांमध्ये 12 लाखाहून अधिक अभिनव प्रकल्पांवर मनापासून काम करत आहेत. म्हणजेच येत्या काळात लाखो कनिष्ठ शास्त्रज्ञ शाळांमधून घडून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहेत. त्यांना हाताशी धरून, त्यांना प्रत्येक प्रकारे मदत करणे, त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत करणे, ही आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे. आज शेकडो स्टार्टअप्स आहेत ज्यांचा उगम अटल इनोव्हेशन सेंटर्समध्ये झाला आहे. अटल टिंकरिंग लॅबप्रमाणे, अटल इनोव्हेशन सेंटर्स - एआयसी देखील नवं भारताच्या प्रयोगशाळा म्हणून उदयास येत आहेत. तुम्ही पाहाल, आम्ही हे टिंकर-प्रीन्युअर्स, उद्योजक पाहायचो, हे टिंकर-प्रीन्युअर्स म्हणून बघायचो. उद्या ते अग्रगण्य उद्योजक बनणार आहेत.

मित्रांनो ,

महर्षी पतंजलीचे एक सूत्र आहे - परमाणु परम महत्त्व अन्त: अस्य वशीकारः।। म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित होतो तेव्हा अणूपासून विश्वापर्यंत सर्व काही नियंत्रणात येते. 2014 पासून भारताने ज्या प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर देण्यास सुरुवात केली आहे, ते मोठ्या बदलांचे कारण बनले आहे. आम्ही सुरू केलेली स्टार्टअप इंडिया मोहीम, आम्ही सुरू केलेली डिजिटल इंडिया मोहीम, आम्ही बनवलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानेही तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या यशाला नवी उंची दिली आहे. पूर्वी जे विज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित होते, ते आता प्रयोगांच्या पलीकडे जाऊन अधिकाधिक पेटंटमध्ये परिवर्तित होत आहे. 10 वर्षांपूर्वी भारतात एका वर्षात सुमारे 4000 पेटंट मंजूर करण्यात येत होते. आज त्याची संख्या वार्षिक 30 हजारांहून अधिक झाली आहे. 10 वर्षांपूर्वी भारतात दरवर्षी 10,000 डिझाईन्सची नोंदणी होत होती. आज भारतात दरवर्षी 15 हजाराहून अधिक डिझाईन्सची नोंदणी केली जात आहे. 10 वर्षांपूर्वी भारतात दरवर्षी 70 हजारांपेक्षा कमी ट्रेड मार्क्सची नोंदणी होत होती. आज भारतात दरवर्षी अडीच लाखांहून अधिक ट्रेड मार्क्सची नोंदणी केली जात आहे.

मित्रांनो ,

आज भारत तंत्रज्ञानात अग्रेसर देशासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक दिशेने पुढे जात आहे. तुमच्यापैकी बर्‍याच मित्रांना माहित आहे की 2014 मध्ये आपल्या देशात सुमारे दीडशेच्या जवळपास इन्क्युबेशन केंद्रे होती. आज भारतातील इन्क्युबेशन केंद्रांची संख्या 650 च्या पुढे गेली आहे. आज भारत जागतिक नवोन्मेष निर्देशांक क्रमवारीत 81 व्या क्रमांकावर होता आणि तिथून प्रगती करत 40 व्या स्थानावर पोहोचला आहे.

आज देशातील तरुण , आपले विद्यार्थी स्वतःच्या डिजिटल कंपन्या उभारत आहेत, स्टार्टअप सुरू करत आहेत 2014  मध्ये आपल्याकडे स्टार्ट अप्स ची संख्या साधारणपणे 100 च्या आसपास होती आज आपल्या देशात अधिकृत स्टार्ट अप्सची संख्या सुद्धा जवळपास एक लाखांपर्यंत पोहोचली आहे. आज भारत जगातील तिसऱ्या नंबरचा स्टार्टअप व्यवस्था असलेला देश आहे आणि ही वाटचालसुद्धा जग आर्थिक अनिश्चिततेच्या काळातून प्रवास करत असतानाच्या कालावधीमधली आहे. यातूनच भारताचे सामर्थ्य दिसून येते, भारताची बौद्धिक संपदा दिसून येते आणि यासाठी पुन्हा एकदा मी सांगतो की धोरणकर्त्यांसाठी,आपल्या वैज्ञानिक समूहासाठी, देशभरात पसरलेल्या आमच्या हजारो संशोधन प्रयोगशाळांसाठी , आपल्या खाजगी क्षेत्रासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपले विद्यार्थी शाळा ते स्टार्ट-अप्स हा प्रवास करतील पण आपल्याला त्यांना सतत मार्गदर्शन करावे लागेल, प्रोत्साहन द्यावे लागेल आणि त्यामध्ये माझा आपणा सर्वांना संपूर्णपणे पाठिंबा राहील.

मित्रांनो,

तंत्रज्ञानाचे सामाजिक संदर्भ समजून घेत आपण वाटचाल केली तर तंत्रज्ञान हे सक्षमीकरणाचे एक मुख्य माध्यम म्हणून वापरता येते. तसेच ते सोशल जस्टिस म्हणजेच सामाजिक न्याय देण्याचे तसेच असमानता दूर करण्याचेही साधन ठरू शकते. आपल्या लक्षात असेल की एक काळ असा होता जेव्हा तंत्रज्ञान हे सर्वसामान्य भारतीयांच्या आवाक्यात नव्हते. खिशात क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असणे म्हणजे प्रतिष्ठेचे वाटायचे असाही एक काळ होता. पण आज मात्र भारतातील UPI वापर त्यातल्या सुलभतेमुळे न्यू नॉर्मल बनले आहे. आज फेरीवाल्यांपासून रिक्षावाल्यांपर्यंत प्रत्येक जण डिजिटल पेमेंट वापरत आहे. जगातील ज्या देशांमध्ये इंटरनेट डेटाचा उपयोग सर्वाधिक होत असतो अशा देशांमध्ये आज भारत गणला जातो. त्यातही विशेष म्हणजे, शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात इंटरनेटचे वापरकर्ते जास्त आहेत. इंटरनेटमुळे माहिती, संसाधने आणि संधींचे नवे जग समोर उभे आहे. JAM Trinity असो, GeM पोर्टल असो, कोविन पोर्टल असो किंवा E-Nam हे शेतकऱ्यांसाठीचे डिजिटल मार्केट, आमच्या सरकारने सर्वसमावेशकतेचे माध्यम म्हणून तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

मित्रांनो,

तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वेळेवर केलेला उपयोग समाजाला नवीन शक्ती प्रदान करतो. आज भारताच्या जीवन चक्रातील प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञान आधारित उपाययोजना आकाराला येत आहे. मूल जन्म घेतं तेव्हा ऑनलाईन जन्म प्रमाणपत्राची सुविधा आहे. मूल शाळेची पायरी चढायला सुरुवात करते तेव्हा त्याच्याकडे ई-पाठशाळा आणि दीक्षा यासारखे विनामूल्य ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि अजून मोठे झाल्यावर ते राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकते. तेच मूल मोठे होऊन आपल्या नोकरीला सुरुवात करते तेव्हा त्याच्याजवळ सार्वत्रिक ओळखक्रमांक ही सुविधा आहे ज्यामुळे नोकऱ्या बदलूनही त्याला कोणतीही अडचण येणार नाही. कोणत्याही आजारात तो आज ई-संजीवनीच्या मदतीने आपल्या उपचाराची व्यवस्था करू शकतो. मोठ्यांसाठी बायोमेट्रिक डिजिटल सेवा म्हणजेच जीवन प्रमाणपत्राची सुविधा आहे. लक्षात घ्या की आधी वृद्धांना निवृत्ती वेतनासारख्या कामांसाठी स्वतः हयात असण्याचा दाखला द्यावा लागत असे. मग प्रकृती बिघडलेली असो की चालण्याची समस्या असो, त्यांना पडताळणीसाठी स्वतः जाणे आवश्यक होते. आता या सर्व समस्या तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर करता येऊ लागल्या आहेत. दैनंदिन जीवनात प्रत्येक पावलावर तंत्रज्ञानातून उपलब्ध होणारी सुविधा देशवासीयांना मदतीचा हात देत आहे. एखाद्याला लवकर पासपोर्ट मिळवायचा असेल तर एम- पासपोर्ट सेवा आहे. त्याला विमानतळावर अडचणी अनुभवायच्या नसतील तर DigiYatra अॅप  आहे. त्याला महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवायचे असतील तर डीजी लॉकर आहे. या सर्व प्रयत्नांमुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि जीवन सुलभतेत वाढ करण्यासाठी सहाय्य होत आहे.

मित्रांनो,

आज तंत्रज्ञानाच्या विश्वात दिवसागणिक वेगाने बदल होत आहेत. भारतातील तरुणवर्गच हा वेग गाठण्याच्या कामी, या वेगाला मागे टाकण्याच्या कामी देशाचं नेतृत्व करेल. आज कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक साधने, नवीन गेम चेंजर्स म्हणून आकाराला आले आहेत. आरोग्य क्षेत्रातही किती अमर्याद शक्यता आहेत ते आपल्याला दिसत आहे . ड्रोन तंत्रज्ञानात दर दिवशी नवनवीन शोध लागत आहेत. त्याच प्रकारे उपचारशास्त्र हे क्षेत्र हे वेगाने प्रगती करत आहे. अशा क्रांतिकारक तंत्रज्ञानामध्ये आपण पुढाकार घ्यायला हवा.

आज भारत आपल्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करत आहे. यामुळेसुद्धा आपल्या तरुण स्टार्टप्सकडे संधींचा ओघ वाढत आहे. संरक्षण क्षेत्रातील संशोधनासाठी आम्ही इनोवेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजे iDEX सुरू केले आहे संरक्षण मंत्रालयाने iDEX  कडून साडेतीनशे कोटी रुपयांहून जास्त असलेल 14 संशोधने खरेदी केली आहेत.

मित्रांनो,

i-create असो किंवा डीआरडीओ च्या वैज्ञानिक प्रयोगशाळा असोत यासारखे उपक्रम आज या प्रयत्नांना नवी दिशा देत आहेत. अंतराळ क्षेत्रात सुद्धा नवीन सुधारणांच्या माध्यमातून भारत एक जागतिक पातळीवर एक महत्वाची भूमिका घेऊन समोर येत आहे. आत्ताच मी SSLV आणि PSLV orbital प्लॅटफॉर्म अशा टेक्नॉलॉजी बघत होतो. आपल्या अंतराळ क्षेत्रात आपल्या स्टार्ट अप साठी तरुणांसाठी नवीन संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. आपल्याला कोडींग पासून गेमिंग आणि प्रोग्रामिंग पर्यंत प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घ्यायला हवा. याचवेळी भारत सेमीकंडक्टर सारख्या नवीन क्षेत्रातही आपल्या पाऊलखुणा वाढवत आहे. धोरणात्मक स्तरावर आपण पीएलआय योजनांसारखे उपक्रम राबवत आहोत. या क्षेत्रांमध्ये बुद्धिमान तरुणांच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी उद्योगांची आणि संस्थांची आहे.

मित्रांनो,

आज संशोधनापासून संरक्षणापर्यंत सर्वच बाबतीत हॅकेथॉन महत्वाची भूमिका पार पाडत आहे. सरकार त्यांना सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. आपल्याला हॅकेथॉन संस्कृतीला बळ द्यायला हवे, स्टार्ट अप्सना नवीन आव्हाने घेण्याच्या दृष्टीने तयार करायला हवे. या प्रतिभेला हात देता यावा, त्यांना पुढे जाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी आपल्याला एक आराखडा तयार करावा लागेल.  विशेषतः अटल टँकरिंग लॅबमधून चे तरुण बाहेर पडत आहेत त्यांना कार्यरत ठेवण्यासाठी हे एक संस्थात्मक नेटवर्क असायला हवे.

पण याचप्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातील देशातील अशा शंभर प्रयोगशाळा सांगू शकतो का ज्या तरुणांच्या हातात देता येतील? स्वच्छ ऊर्जा आणि नैसर्गिक शेती यासारख्या क्षेत्रांमध्ये जिथे देशाचे लक्ष आहे अशा क्षेत्रात आपल्याला संशोधन आणि तंत्रज्ञान यांना उत्तेजना द्यायला हवी. त्यासाठी तरुणांना मिशन मोड मध्ये सहभागी करून घेणे खूप आवश्यक आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था या संधीना प्रत्यक्षात साकार करण्यात एक महत्त्वाची भूमिका निभावेल याची मला खात्री आहे्. याच अपेक्षा आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या आयोजनासाठी खूप खूप शुभेच्छा !

धन्यवाद !

R.Aghor/Vasanti/Vijaya/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923650) Visitor Counter : 173