पंतप्रधान कार्यालय

आपत्ती जोखीम कपातीकरता राष्ट्रीय मंचाच्या तिसऱ्या सत्राच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांचे संबोधन


आपत्ती जोखीम कपात आणि व्यवस्थापन यांचे रुपांतर पंतप्रधानांच्या दृष्टीकोनानुसार लोकचळवळीमध्ये होऊ लागले आहे- पी. के. मिश्रा

‘आपत्ती जोखीम व्यवस्थापनात स्थानिक क्षमता आणि उपक्रमांची उभारणी आणि विशेषकरून महिलांचे नेतृत्व निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांच्या 10 कलमी कार्यक्रमाचा भर’

‘आपत्ती जोखीम व्यवस्थापन व्यवस्थेचे व्यावसायिकीकरण आणि लोकांच्या गरजांना प्रतिसाद देणारे कार्यक्रम आणि उपक्रम विकसित करणे हा यापुढील मार्ग आहे’

‘संकटाची सर्वाधिक झळ बसू शकणाऱ्यांना आपण पाठबळ देऊ शकत नसू आणि त्यांचा जीव आणि उपजीविका यांना वाचवू शकत नसू तर आपल्या कार्याचा संपूर्ण उद्देशच निरर्थक ठरेल

Posted On: 11 MAR 2023 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2023

 

आपत्ती जोखीम कपातीकरता राष्ट्रीय मंचाच्या(एनपीडीआरआर) तिसऱ्या सत्राच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी आज मार्गदर्शन केले.  2013 पासून एनपीडीआरआरच्या सर्व तिन्ही सत्रांना उपस्थित राहणाऱ्या मिश्रा यांनी संवादाला मिळणारा अधिक वाव आणि चर्चेची सखोलता याबाबत आनंद व्यक्त केला.

आपत्ती जोखीम कपात आणि व्यवस्थापन यांचे रुपांतर भारतभरात  पंतप्रधानांच्या दृष्टीकोनानुसार लोकचळवळीमध्ये होऊ लागले आहे, असे मिश्रा यांनी यावेळी सांगितले.

आपत्तींची जोखीम वाढत जाण्याबरोबरच या जोखमींची नवनवीन रुपे तयार होत असताना या समस्येचा विचार करणाऱ्या ‘बदलत्या हवामानात स्थानिक प्रतिरोधक्षमतेची उभारणी’ या विषयाचे महत्त्व प्रधान सचिवांनी अधोरेखित केले.

आपत्ती जोखीम व्यवस्थापनात स्थानिक क्षमता आणि उपक्रमांची उभारणी आणि विशेषकरून महिलांचे नेतृत्व निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांच्या 10 कलमी कार्यक्रमाचा भर असल्याचा संदर्भ यावेळी मिश्रा यांनी दिला.

या सत्रांच्या कार्यवाहीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पंतप्रधानांचा दहा कलमी कार्यक्रम  आणि सेन्दाई चौकटीची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

मिश्रा यांनी भागधारकांना पाठपुरावा करण्यासाठी दोन व्यापक संकल्पना सुचवल्या.

पहिली, राज्य आणि जिल्हा स्तरावरील आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्रणालीमधील व्यावसायिकतेशी संबंधित आहे, तर दुसरी, लोकांच्या गरजांना प्रतिसाद देणारे कार्यक्रम आणि उपक्रम  विकसित करणे.

पहिल्या संकल्पनेबाबत बोलताना पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणाले, “राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा या सर्व पातळ्यांवरील आपत्ती व्यवस्थापन प्रणालीशी संबंधित सर्व घटकांना, व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी, उद्देश अनुरूप  संरचना, प्रशासकीय पायाभूत सुविधा, आधुनिक कार्यक्षेत्र, आणि आपत्कालीन कारवाईसाठी केंद्र यासारख्या आवश्यक सुविधांचे सहाय्य मिळणे आवश्यक आहे.” या व्यावसायिकतेमध्ये  एसडीएमएस आणि डीडीएमए दोन्हीचा समावेश होणे आवश्यक आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या स्थापनेनंतर झालेल्या आपत्ती प्रतिसादाच्या व्यावसायिकीकरणाच्या धर्तीवर आपत्ती सज्जता आणि आपत्ती निवारणाचे व्यावसायिकीकरण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. राज्यांकडे पुरेशा साधन सामग्री आहेत आणि त्यांना एनडीएमए, एनआयडीएम आणि एनडीआरएफ च्या समन्वयाने पाठबळ दिले  जाईल, असेही ते म्हणाले.  

कार्यक्रम विकसित करण्याच्या दुसर्‍या संकल्पनेवर बोलताना मिश्रा म्हणाले की, धोरणे आणि कार्यक्रम एकमेकांशी संबंधित आहेत. “कार्यक्रम विकसित करताना आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये काम करावे लागते. यासाठी आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, जल संपदा, शिक्षण, नगर विकास, कृषी आणि सार्वजनिक आरोग्य, या सर्व क्षेत्रांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे”, असे  ते म्हणाले.

प्रधान सचिवांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आपत्ती व्यवस्थापनाचा वापर पुढे नेण्यासाठी योग्य संदर्भ म्हणून आंतर-क्षेत्रीय कार्यक्रम विकसित करण्याचा विचार करण्यास सांगितले.कारण जोपर्यंत  आपल्या नियमित उपक्रमात जोखीम कमी करण्यासाठी ते कसे लागू करायचे हे कळत नाही तोपर्यंत विकास कार्ये आपत्ती जोखीम व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य नाही.  सर्वात असुरक्षित लोकांच्या गरजांना प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

व्यावसायिकीकरण आणि कार्यक्रम विकास या दोन्ही कामांसाठी संसाधनांच्या उपलब्धतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.   चक्रीवादळ, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा यासारख्या घटनांमध्ये नवीन तंत्रज्ञान आपत्ती व्यवस्थापन साधने आणि सराव अधिक प्रभावी बनवू शकतात. पुढील तीन वर्षे अत्यंत नाजूक आहेत, आणि आपण लक्ष केंद्रित करून  या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे,असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाची सांगता करतांना प्रधान सचिवांनी आठवड्याभरात आठवा वर्धापन दिन असलेल्या  सेंडाई फ्रेमवर्कच्या संथ प्रगतीकडे संबंधितांचे लक्ष वेधले.  “ 15 वर्षांच्या चौकटीचा निम्म्याहून अधिक काळ निघून गेला आहे आणि जग सेंडाई लक्ष्य साध्य करण्यापासून फार दूर आहे.  अधिक लवचिक समुदायांसह सुरक्षित देश आणि सुरक्षित जगाच्या दिशेने काम करण्यासाठी आपत्ती जोखीम व्यवस्थापनाची अधिक प्रभावी, अधिक प्रतिसाद देणारी प्रणाली तयार करण्यासाठी आपण स्वत:ला पुन्हा झोकून दिले पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.

 

* * *

S.Kane/Shailesh/Rajshree/Gajendra/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1905976) Visitor Counter : 173