पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंड मधल्या माणा गाव इथे विविध विकास कामांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2022 8:31PM by PIB Mumbai
जय बद्री विशाल, जय बद्री विशाल, जय बद्री विशाल,
जय बाबा केदार, जय बाबा केदार, जय बाबा केदार,
उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह जी, इथले लोकप्रिय मृदूभाषी, ज्यांच्या चेहऱ्यावर सदैव स्मित विलासत असते असे आमचे पुष्कर सिंह धामी जी, संसदेमधले माझे सहकारी तीरथ सिंह रावत जी, भाई धन सिंह रावत जी, महेंद्र भाई भट्ट जी, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो,
आज बाबा केदार आणि बद्री विशाल जी यांच्या दर्शनाने, त्यांचे आशीर्वाद घेऊन जीवन धन्य झाले, मन प्रसन्न झाले आणि माझ्यासाठी हा क्षण चिरस्वरूप झाला. बाबाच्या सानिध्यात, त्याच्याच आदेशाने, बाबाच्या कृपेने मागच्या वेळी आलो होतो, तेव्हा माझ्या तोंडून काही शब्द निघाले होते. ते शब्द माझे नव्हते, कसे आले? का आले? कोणी दिले? माहित नाही. मात्र तोंडातून ते शब्द निघून गेले. हे दशक उत्तराखंडचे दशक असेल. माझा पूर्ण विश्वास आहे की या शब्दांवर बाबा, बद्री विशाल, गंगा माता यांच्या आशीर्वादाची सदैव छाया राहील असे माझे अंतर्मन मला सांगते आहे. आज आपणा सर्वांसमवेत, या नव्या प्रकल्पांसह त्या संकल्पाचा पुनरुच्चार करण्यासाठी इथे आलो आहे हे माझे भाग्य आहे. आपण सर्वांच्या दर्शनाची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.
माणा गाव हे भारतातले शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे इच्छा व्यक्त केली, आता माझ्यासाठीही सीमेवर वसलेले प्रत्येक गाव देशाचे पहिले गावच आहे. सीमेवर राहणारे आपणासारखे माझे सर्व मित्र, देशाचे खंबीर पहारेदार आहेत. माणा गावातल्या जुन्या आठवणीना मला उजाळा द्यायचा आहे. कदाचित काही बुजुर्गांना आठवत असेल, मी मुख्यमंत्री झालो, पंतप्रधान झालो, म्हणून सीमेवरच्या या पहिल्या पहारेदार गावाची आठवण करतो आहे असे नव्हे. 25 वर्षांपूर्वी उत्तराखंड मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो त्यावेळी मला ना कोणी ओळखत होते, ना माझे अशा प्रकारचे सार्वजनिक जीवन होते. संघटनेच्या लोकांमध्येच माझा जीवनक्रम व्यतीत होत असे, काम करत असे आणि त्या वेळी माणामध्ये मी उत्तराखंड भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. तेव्हा उत्तराखंडचे सर्व कार्यकर्ता माझ्यावर नाराज झाले होते, विचारत होते, इतक्या दूर वर पोचण्यासाठी किती कष्ट पडतील, किती वेळ लागेल. मी म्हटले, ज्या दिवशी उत्तराखंड बीजेपीच्या मनात माणाचे महत्व ठसेल तेव्हा उत्तराखंडमधल्या जनतेच्या हृदयात भाजपसाठी महत्वाचे स्थान निर्माण होईल. त्याचाच परिणाम या माणा गावच्या मातीचे हे सामर्थ्य आहे. माणा गावातल्या माझ्या बंधू- भगिनींचा आदेश आहे,आशीर्वाद आहे, आपले आशीर्वाद सदैव राहतात. उत्तराखंड मध्ये नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच मी सार्वजनिक कार्यक्रमात बोलत आहे. माणाच्या भूमीवरून मी संपूर्ण उत्तराखंडच्या बंधू-भगिनींचे, आम्हा सर्वाना सेवेची पुन्हा संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानतो.
मित्रहो,
21 व्या शतकातल्या विकसित भारताच्या उभारणीसाठीचे दोन मुख्य स्तंभ आहेत. पहिला म्हणजे आपल्या वारश्याबाबत अभिमान आणि दुसरा म्हणजे विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न. आज उत्तराखंड हे दोन्ही स्तंभ बळकट करत आहे. आज सकाळी मी बाबा केदार आणि त्यानंतर बद्रीनाथ विशाल यांच्या चरणाशी जाऊन प्रार्थना केली त्याचबरोबर परमात्म्याने मला जे काम दिले आहे, तेही मला करायचे आहे आणि माझ्यासाठी तर देशातली 130 कोटी जनताही परमात्म्याचे रूप आहे. म्हणूनच मी विकास कामांचाही आढावा घेतला. आपणा सर्वांमध्ये येऊन मला 2 रोपवे प्रकल्पांच्या पायाभरणीचे भाग्य लाभले. या प्रकल्पांमुळे केदारनाथ जी आणि गुरुद्वारा हेमकुंड साहेब यांचे दर्शन घेणे अधिक सुलभ होणार आहे. गुरुग्रंथ साहबची आपल्यावर सदैव कृपा राहो. सर्व पूज्य गुरूंची कृपा आपणावर सदैव राहावी, गुरूंच्या आशीर्वादाने असे पवित्र कार्य करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आहे. बाबा केदारचे आशीर्वाद कायम राहू देत. आपण कल्पना करू शकता, हे रोप वे खांब, तार, आत बसण्यासाठी कार इतकेच नाही. हा रोप वे वेगाने आपल्याला बाबांच्या दर्शनाला नेईल इतकेच नव्हे तर हा झाल्यानंतर यावर काम करणाऱ्या लोकांवर आपण कल्पना करू शकणार नाही, आपल्या देशातल्या 130 कोटी देशवासीयांच्या आशीर्वादाचा त्यांच्यावर वर्षाव होणार आहे. हेमकुंड साहब जगभरात गुरु ग्रंथ साहब ची पवित्र पूजा करणारे माझे बंधू-भगिनी आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत असतील की आज हेमकुंड साहब पर्यंत रोपवे झाला आहे. आपण कल्पना करू शकणार नाही याची काय ताकद आहे. आपण पहाल, आज ब्रिटन असू दे, जर्मनी, कॅनडा असो, तिथे उत्सव साजरा केला जाईल. कारण आता हेमकुंड साहेब पर्यंत जाण्यासाठी रोप – वे झाला आहे. वेळेची बचत तर होईलच भक्तीमध्ये मन अधिकच रमेल.
विकासाच्या या सर्व प्रकल्पांसाठी उत्तराखंडला, देश-विदेशातल्या प्रत्येक भाविकाला खूप-खूप शुभेच्छा देतो.
गुरुची कृपा सदैव राहावी, बाबा केदार यांची कृपा राहावी, बद्री विशाल यांची कृपा राहावी आणि आपल्या सर्व कष्टकरी मित्रांनाही बळ मिळावे जेणे करून ते संपूर्ण ताकदीनिशी हे काम वेळेवर पूर्ण करू शकतील. आपण प्रार्थना करूया, दररोज प्रार्थना करूया कारण हा प्रदेश दुर्गम आहे. इथे काम करणे कठीण असते. वेगवान वारा असतो आणि इतक्या उंचावर जाऊन काम करावे लागते. ईश्वराकडे प्रार्थना करू या की या संपूर्ण कामा दरम्यान कुठलाही अपघात होता कामा नये, आपल्या कोणत्याही मित्राला झळ लागू नये अशी प्रार्थना आपण करत राहूया आणि ज्या गावाजवळ ते काम करत आहेत, ईश्वराचे काम करत आहेत, आपण त्यांचा सांभाळ करा, त्यांना मजूर समजू नका, काम करत आहेत, त्यांना पैसे मिळत आहेत असे समजू नका, ते परमात्म्याची सेवा करत आहेत. ते आपल्या गावाचे पाहुणे आहेत. कठीण काम आहे. त्यांना जितके सांभाळाल तितके काम वेगाने होईल. कराल ना? त्यांना सांभाळाल ना? आपल्या मुलाप्रमाणे, आपल्या भावा-बहिणीप्रमाणे सांभाळाल.
मित्रहो,
आज बाबा केदार धाम इथे गेलो होतो तेव्हा तिथे काम करणाऱ्या श्रमिक बंधू-भगिनींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अभियंता वर्गाशीही बोलण्याची संधी मिळाली, छान वाटले. आम्ही रस्ता किंवा इमारतीचे काम करत नाही, आम्ही तर बाबाची पूजा करत आहोत आणि पूजा करण्याची आमची ही पद्धत आहे, असे ते म्हणत होते.
मित्रहो,
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण आल्यानिमित्त लाल किल्यावरुन मी एक आवाहन केले होते, गुलामीच्या मानसिकतेतून संपूर्णपणे मुक्त होण्याचे. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी मला हे सांगण्याची आवश्यकता का भासावी? का गरज भासली हे सांगण्याची? कारण आपल्या देशात गुलामीच्या मानसिकतेने इतके जखडले आहे की प्रगतीचे प्रत्येक काम काही लोकांना पराध वाटू लागले आहे. गुलामीच्या तागडीने इथे प्रगतीच्या कामाचे मोजमाप केले जाते. म्हणूनच आपल्या इथे दीर्घ काळापासून आपल्या श्रद्धा स्थळांच्या विकासाबाबत अनास्था राहिली. परदेशात त्यांच्या संस्कृतीशी संबंधित स्थळांची प्रशंसा करताना हे लोक थकत नाहीत. मात्र भारतात अशा प्रकारच्या कामांना हे लोक तुच्छ म्हणून पाहत असत. याचे कारण एकच होते, आपल्या संस्कृतीप्रती कमीपणाची भावना, आपल्या श्रद्धा स्थळांवर अविश्वास, आपल्या वारश्याविषयी द्वेषभावना आणि आपल्या समाजात हे आताच वाढले आहे असे नव्हे. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराच्या निर्मितीवेळी काय झाले होते हे आपण सर्व जाणतोच. त्यानंतर राम मंदिर निर्मिती संदर्भातला इतिहास तर आपणा सर्वाना चांगलाच परिचित आहे. गुलामीच्या या मानसिकतेने आपल्या श्रद्धा स्थळांची दुरवस्था झाली. शेकडो वर्षे ऊन- पाऊस झेलणारे हे पाषाण, मंदिर, पूजा स्थळी जाण्याचा मार्ग, पाण्याची व्यवस्था असेल तर त्याची दुर्दशा, साऱ्याची दुरवस्था. आपण आठवा मित्रहो, अनेक काळापासून आपल्या धार्मिक स्थळांची स्थिती अशी राहिली होती की तिथला प्रवास म्हणजे आयुष्यातला सर्वात खडतर प्रवास असे. ज्याच्या प्रती करोडो लोकांची श्रद्धा आहे, हजारो वर्षापासून श्रद्धा आहे, त्या धामला जाऊन नतमस्तक होण्याचे जीवनाचे स्वप्न असे, मात्र सरकारे अशी राहिली की आपल्याच नागरिकांना तिथे जाण्यासाठी सुविधा देणे त्यांना आवश्यक वाटले नाही. गुलामीच्या कोणत्या मानसिकतेने त्यांना जखडून ठेवले होते माहित नाही. हा अन्याय नाही का बंधुनो? हा अन्याय होता की नव्हता? हे उत्तर केवळ आपले नव्हे तर 130 कोटी देशवासीयांचे हे उत्तर आहे आणि आपल्या या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ईश्वराने हे काम मला दिले आहे.
बंधू-भगिनीनो,
या उपेक्षेमध्ये लाखो-करोडो जनभावनांचा अपमान दडला होता. आधीच्या सरकारचा स्वार्थ यामागे होता. मात्र बंधू-भगिनीनो, हजारो वर्षांच्या आपल्या प्राचीन संस्कृतीची शक्ती हे लोक समजूच शकले नाहीत. श्रद्धेचे हे केंद्र आमच्यासाठी केवळ एक ढाचा नव्हे तर आमच्या साठी ही प्राणशक्ती आहे, प्राणवायू प्रमाणे आहे. आमच्यासाठी ते असे शक्तिस्थान आहे जे खडतर परिस्थितीतही आम्हाला सचेत राखते. त्यांच्या घोर उपेक्षेनंतरही आपल्या आध्यात्मिक स्थळांचे महत्वही कमी झाले नाही, आणि आपला समर्पण भावही कमी झाला नाही. आज पहा काशी, उज्जैन, अयोध्या अशी अनेक श्रद्धा स्थळे आपले वैभव पुन्हा प्राप्त करत आहेत. केदारनाथ, बद्रीनाथ, हेमकुंड साहेब ही स्थळेही श्रद्धा जतन करत आधुनिक सुविधांनी जोडली जात आहेत. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जात आहे. भारताने, गुजरातच्या पावागढ मध्ये कालिका माता मंदिरापासून ते देवी विंध्याचल कॉरिडॉर अशा विविध स्थळी भारत आपल्या सांस्कृतिक स्थळांच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. श्रद्धेच्या या स्थळांपर्यंत पोहोचणे आता प्रत्येक भाविकांसाठी सुलभ होऊ लागले आहे. ज्या सुविधा विकसित होत आहेत त्या आपल्या ज्येष्ठांसाठी तर होत आहेत. मात्र देशाची नवी पिढी, 12-15-18-20-22 वर्षांच्या तरुण पिढीसाठीही ही श्रद्धेचे आकर्षण केंद्रे ठरतील असा मला विश्वास आहे. आता आपले दिव्यांग मित्रही या ठिकाणी जाऊन दर्शन करत आहेत. जेव्हा गिरनार रोप वे तयार केला तेव्हा 80-80 वर्षांचे वृध्द तिथे आल्यानंतर मला पत्र लिहित की गिरनार पर्वतावर जाऊन इतक्या ठिकाणी आम्ही पूजा आणि दर्शन करू शकू असे कधी वाटलेही नव्हते. आज त्यांचा आशीर्वाद लाभत आहे. एक रोपवे केला.
मित्रहो,
हे सामर्थ्य काही लोकांना जाणताच येत नाही. आज संपूर्ण देशात आपल्या आध्यात्मिक स्थळांबाबत अभिमानाची भावना ओसंडून वाहते आहे. उत्तराखंडची ही देवभूमी स्वतः या परिवर्तनाची साक्षीदार ठरत आहे. दुहेरी इंजिन सरकार सत्तेत येण्यापूर्वी इथे एक हंगामात जास्तीत जास्त 5 लाख भाविक येत असत. या हंगामात ही संख्या 45 लाख असल्याचे मला सांगण्यात आले आहे, आता पहा.
मित्रांनो,
श्रद्धा आणि आध्यात्म संबंधी स्थळांच्या या पुनर्बांधणीचा आणखी एक पैलू आहे, ज्याची तितकीशी चर्चा होत नाही. पर्वतीय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुकर करण्याचा, तेथील तरुणांच्या रोजगाराचा हा पैलू आहे. जेव्हा रेल्वे, रस्ते आणि रोपवे डोंगरावर पोहोचतात तेव्हा ते आपल्यासोबत रोजगार देखील घेऊन येतात. जेव्हा रेल्वे, रस्ते आणि रोपवे डोंगरावर पोहोचतात तेव्हा ते पर्वतीय भागातील जीवन अधिक जिवंत, शानदार आणि अधिक सुलभ बनवतात. या सुविधांमुळे डोंगरावरील पर्यटनालाही चालना मिळते, वाहतूकही सुलभ होते. आता तर आमचे सरकार ड्रोनला डोंगरावरील माल वाहतुकीचे मुख्य साधन बनविण्याचे काम करत आहे. कारण आजकाल ड्रोन 20 किलो, 25 किलो, 50 किलो सामान एका ठिकाणाहून उचलतात आणि वेगाने इतर ठिकाणी नेऊन उतरवतात. आम्हाला ड्रोनचे तंत्रज्ञान इथे आणायचे आहे. जेणेकरून जी फळे आणि भाज्या तुमच्या येथे पिकतील, त्या ताज्या ताज्या मोठ्या शहरांमध्ये जलद गतीने पोहोचवता येतील, आणि तुम्हाला देखील अधिक कमाई करता येईल. आणि आज मी भारताच्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या ग्रामस्थांमध्ये आलो आहे, आता आपल्यात आमच्या माता-भगिनी, उत्पादने तयार करणाऱ्या बचत गटाच्या भगिनी आहे. त्यांनी बनवलेले मसाले, डोंगराळ मीठ, हे सर्व मी पाहत होतो. आणि त्यांचे पॅकेजिंग या बाबी पाहून मी मनापासून आनंदी झालो. मी या माता भगिनींना सलाम करतो, तुम्ही किती छान काम केले आहे. इथे संपूर्ण भारतातून प्रवासी येतात, कोणी पर्यटनासाठी येतात, कोणी साहसी खेळांसाठी येतात, कोणी श्रद्धेसाठी येतात, किंवा अन्य कारणांसाठी येतात, त्यांना आवाहन करतो की, तुम्ही प्रवासात किती खर्च होईल, खाण्यापिण्याच्या खर्च किती होईल, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहण्यासाठी किती खर्च करणार याबाबत तुमच्या मनात एक आराखडा तयार करा.
चीन लगतच्या भारताच्या सीमेवर असलेल्या आणि भारताच्या या सीमेचे रक्षण करणाऱ्या गावातून मी भारताच्या सर्व 130 कोटी देशवासियांशी संवाद साधत आहे. मी त्यांच्या वतीने बोलत आहे. तुम्ही जिथे प्रवासासाठी जाल, या कठीण भागात याल किंवा पुरीला जाल किंवा कन्याकुमारी किंवा सोमनाथ, कुठेही जाल, तिथे एक संकल्प करा. जसे मी स्थानिक वस्तू खरेदी करण्याबद्दल बोलतो, अगदी त्याचप्रमाणे. आज मी आणखी एका संकल्पासाठी विनंती करतो आणि देशवासियांना विनंती करणे हा माझा अधिकार आहे. मी आदेश देऊ शकत नाही. मी विनंती करू शकतो. मी विनंती करतो
मित्रांनो,
डोंगराळ भागात राहणाऱ्या आपल्या लोकांपुढचे सर्वात मोठे आव्हान असते दळणवळण व्यवस्था. दळणवळण व्यवस्था नसेल तर डोंगराळ भागातील जीवन खरोखरच पर्वतासारखे होऊन जाते. आमचे डबल इंजिनचे सरकार या आव्हानावरही मात करत आहे. उत्तराखंडला आज बहुआयामी दळणवळण व्यवस्था प्रदान करण्यासाठी प्रत्येक आघाडीवर काम केले जात आहे. हिमालयाच्या हिरव्यागार पर्वतराजींमधे रेल्वे गाडीचा आवाज उत्तराखंडसाठी नवी विकासगाथा लिहिणार आहे. देहरादून विमानतळही आता नव्या रुपात सेवा देत आहे. नुकताच मी हिमाचल प्रदेशात गेलो होतो. तिथे मी वंदे भारत ट्रेनची सुरुवात केली. तेव्हा मला अनेकांनी सांगितले की आमच्या इथे दोन-दोन पिढ्यांआधीचे लोक आहेत. प्रत्येक गावात असे लोक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ट्रेन पाहिलेली नाही, आणि तुम्ही आमच्या हिमाचल प्रदेशात वंदे भारत ट्रेन आणली. वंदे भारत ट्रेन आता तर एका स्थानका पर्यंत पोहोचली आहे, परंतु संपूर्ण हिमाचल आणि डोंगराळ भागातील लोकांकरिता ही खूप मोठी भेटवस्तू आहे. बंधुंनो मला असेच चित्र उत्तराखंडमध्येही पाहायचे आहे. आज हिमाचलहून उत्तराखंडला जाणे-येणे असो, किंवा दिल्ली आणि उत्तर प्रदेशहून उत्तराखंडला जाणे- येणे असो, चार पदरी महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग लवकरच आपले स्वागत करणार आहे. चारधाम ऑल वेदर मार्ग उत्तराखंडच्या लोकांबरोबरच पर्यटक आणि श्रद्धाळू यांनाही एक नवीन अनुभव देत आहे. आता इतर कोणत्याही राज्यातून उत्तराखंडमध्ये येणारा पर्यटक इथून प्रवासाचा अद्भुत अनुभव घेऊन जातो. दिल्ली-देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉर पासून दिल्ली-देहरादूनचे अंतर कमी तर होईलच, यामुळे उत्तराखंडच्या उद्योगांनाही चालना मिळेल.
बंधू आणि भगिनींनो,
आधुनिक दळणवळण राष्ट्र संरक्षणाचीही हमी असते. म्हणूनच गेल्या आठ वर्षांपासून आम्ही या दिशेने एकापाठोपाठ एक पावले उचलीत आहोत. काही वर्षांपूर्वी आम्ही दळणवळणाच्या दोन मोठ्या योजना सुरू केल्या होत्या. एक भारतमाला आणि दूसरी सागरमाला. भारतमाला अंतर्गत देशाच्या सीमावर्ती भागाला उत्कृष्ट आणि रुंद महामार्गांनी जोडले जात आहे. सागरमालाच्या माध्यमातून आपल्या तटवर्ती दळणवळणाला सशक्त केले जात आहे. गेल्या आठ वर्षात जम्मू कश्मीरपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सरहद्द दळणवळणाचाही अभूतपूर्व विस्तार आम्ही केला आहे. 2014 नंतर सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) जवळपास 7 हजार किलोमीटर नवीन मार्ग तयार केले आहेत, शेकडो नवीन पूल बनवले आहेत. अनेक महत्त्वपूर्ण बोगद्यांचेही काम पूर्ण केले आहे. एक काळ असा होता, जेव्हा सरहद्द किनारी रस्ता बनवण्याकरता देखील दिल्लीहून परवानगी घ्यावी लागत असे. आम्ही केवळ ही अटच दूर केली नाही, तर सरहद्दीवर चांगले रस्ते बनवण्यावर, ते वेगाने बनवण्यावर भर दिला आहे. डोंगराळ राज्यातील दळणवळण अधिक चांगले बनवण्याकरता आता आम्ही विशेष करून, सागरमाला आणि भारतमाला यांच्या धर्तीवर, पर्वतमालेचे काम पुढे नेणार आहोत. या अंतर्गत उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये, रोपवेचे एक खूप मोठे जाळे बनणे सुरू झाले आहे. आपल्या इथे जेव्हा सरहद्दीबाबत चर्चा होते, तेव्हा मनात हेच येते की इथे फक्त लष्करातील जवानच असतील, बाकी सगळे उजाड असेल. आम्हाला ही धारणा बदलायचीच आहे आणि ती वास्तवातही बदलायची आहे. आपल्या सरहद्दीवरील गावांमध्ये वावर वाढायला हवा, तिथे विकासाच्या माध्यमातून जीवनाचा उत्सव साजरा व्हायला हवा, असा प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि आम्ही तर म्हणतोच, जे कोणी गाव सोडून गेले आहेत, त्यांना पुन्हा आपल्या गावी परतावेसे वाटले पाहिजे अशी जिवंत गावे मला उभी करायची आहेत. आणि मी फक्त हे बोलतोय असे नव्हे, तर मी हे केले आहे. गुजरात मध्ये पाकिस्तानच्या सरहद्दीवरचे शेवटचे गाव आहे कच्छच्या वाळवंटातील धोरडो हे गाव.
आज धोरडो पर्यटनाचे एक खूप मोठे केंद्र बनले आहे. दरवर्षी लाखो लोक इथे येतात. तिथल्या लोकांसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यापार होतो. शेवटचे गाव जिवंत केले, त्यामुळे संपूर्ण परिसरच जिवंत झाला आहे. गुजरात मध्ये पाकिस्तान सरहद्दीवर आणखी दुसरा एक भाग आहे, ते वाळवंटातील तीर्थस्थान होते. देवी मातेचे स्थान होते. तिथे खूप मोठे तीर्थस्थान बनवले आहे. नुकतेच उत्तराखंडच्या अधिकाऱ्यांना मी तिथे पाठवले होते, म्हटले जरा पाहून या आपण माणाच्या आसपास असे काही करू शकतो का? मी विचार करत आहे की, सरहद्दीवरच्या गावांमध्ये काही न काहीतरी व्हायला हवेच, यासाठी माझे विचारचक्र सतत सुरू असते. आणि यासाठीच मी आज आलो आहे. कारण मला याबाबत आणखी बारकाईने समजून घ्यायचे आहे. इथे माणाच्या आसपास जे रस्ते बनतील, मला ठाम विश्वास आहे की यामुळे पर्यटकांच्या येण्या जाण्यासाठी एक खूप मोठे नवीन युग सुरू होईल. लोक आता बद्री विशालहून परत जाणार नाहीत. जोपर्यंत माणाला जात नाहीत तोपर्यंत परत जाणार नाहीत अशी स्थिती मी निर्माण करणारच बंधुंनो. याच प्रकारे जोशी मठ ते मलारी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे सर्वसामान्यांसह आपल्या जवानांनाही सरहद्दीपर्यंत पोहोचणे खूपच सोपे होईल.
बंधू आणि भगिनींनो,
आपल्या डोंगराळ राज्यातील आव्हाने देखील एकसारखीच आहेत. विकासाच्या आकांक्षाही खूप प्रबळ आहेत. विशेष करून उत्तराखंड आणि हिमाचल तर भूगोल आणि परंपरेचा विचार करता, अनेक बाबतीत एकमेकांशी जोडलेले आहेत. हे गढवाल आहे, आणि उत्तरकाशीच्या, देहरादूनच्या त्या बाजूला तुमचे सिमला आणि सिरमौर येते. जौनसार आणि सिरमौरच्या पर्वतराजींमधे फरक करणेही खूप कठीण असते. मी तर आत्ताच हिमाचलच्या अनेक क्षेत्रांमध्ये जाऊन आलो. तिथे उत्तराखंडची खूप चर्चा आहे. ते म्हणतायेत की ज्या प्रकारे उत्तराखंडने गतिशील विकासाकरिता, आपला वारसा, श्रद्धास्थानांच्या विकासाकरता, सरहद्द आणि डोंगराळ क्षेत्रातील सुविधा वाढवण्याकरिता, डबल इंजिनचे सरकार पुन्हा आणले, तोच मंत्र हिमाचललाही प्रेरणा देत आहे. मी हिमाचलला पुन्हा ग्वाही देतो की आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरिता आम्ही मेहनतीची कुठलीही कसर सोडणार नाही. जनविश्वासाच्या या कसोटीवर उतरण्यासाठी बाबा केदार आणि बद्री विशाल यांचे आशीर्वाद घेण्यासाठी देखील मी इथे आलो आहे. पुन्हा एकदा विकासाकरिता, विकासाच्या प्रकल्पांकरिता मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आशीर्वाद देण्याकरिता आलात, माता भगिनी आल्या, कदाचित आज घरी कोणीच राहिले नसेल. छोट्याशा माणाचे आज संपूर्ण वातावरणच बदलले आहे. मी किती भाग्यवान आहे, जेव्हा आज या माता भगिनी मला आशीर्वाद देत आहेत. आज खरेच माझे जीवन धन्य झाले. मी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या अग्रीम शुभेच्छा देतो. आणि मी तुम्हा सर्वांच्या उत्तम आरोग्याकरिता, तुमच्या मुलांच्या उत्तम प्रगती करिता, बद्री विशालाच्या चरणी प्रार्थना करत माझ्या वाणीला विराम देतो.
माझ्यासोबत संपूर्ण शक्तीने बोला- भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय।
जय बद्री विशाल, जय बद्री विशाल, जय बद्री विशाल।
जय बाबा केदार, जय बाबा केदार, जय बाबा केदार।
***
S.Tupe/S.Thakur/N.Chitale/S.kane/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1870220)
आगंतुक पटल : 276
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam