पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेश दौरा


पंतप्रधान कुनो राष्ट्रीय उद्यानात भारतातून नामशेष झालेले जंगली प्रजातीचे चित्ते सोडतील

नामिबियातून चित्ते या प्रकल्पाअंतर्गत हे चित्ते भारतात आणले जात आहेत. हा जगातील पहिला मोठा वन्य मांसभक्षक प्राण्यांचा स्थानांतरणाचा आंतरखंडीय प्रकल्प आहे.

चित्त्यांना भारतात परत आणण्यामुळे खुले जंगल आणि गवताळ प्रदेशातील परिसरसृष्टी पुनर्संचयित करण्यात मदत होईल आणि स्थानिकांसाठी उपजीविकेच्या संधी वाढतील.

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संरक्षणासाठी प्रकल्प

करहाळ, शेओपूर येथील बचतगट संमेलनात पंतप्रधान होणार सहभागी

हजारो महिला बचतगट सदस्य/सामुदायिक संसाधन व्यक्ती संमेलनाला उपस्थित राहतील

पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत विशेषकरुन चार आदिवासी गट कौशल्य केंद्रांचे उद्‌घाटनही करणार

Posted On: 15 SEP 2022 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 10:45 वाजता, पंतप्रधान कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले चित्ते सोडतील. त्यानंतर, दुपारी 12 च्या सुमारास, ते कराहल, श्योपूर येथे महिला बचतगट सदस्य/सामुदायिक संसाधन व्यक्तींसोबत बचतगट संमेलनात सहभागी होतील.

पंतप्रधानांचा कुनो राष्ट्रीय उद्यान दौरा

पंतप्रधान, कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले जंगली चित्ते सोडणार आहेत. हा भारतातील वन्यजीव आणि त्याच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन तसेच वैविध्य जपण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. 1952 मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. सोडण्यात येणारे चित्ते नामिबियातील असून त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत आणले आहे. भारतामध्ये हे चित्ते, प्रकल्प चित्ता अंतर्गत आणले आहेत. हा जगातील पहिला मोठा  वन्य मांसभक्षक प्राण्यांचा आंतरखंडीय   स्थानांतरण प्रकल्प आहे.

हे चित्ते भारतातील खुली जंगले आणि गवताळ प्रदेशातील परिसर सृष्टी पुनर्संचयित करण्यात मदत करतील. यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करण्यात मदत होईल आणि जलसुरक्षा, कार्बन कमी करणे आणि मातीतील ओलावा संवर्धन यासारख्या परिसंस्थेच्या सेवा वाढवण्यास मदत होईल. परिणामी समाजाला मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने हा प्रयत्न पर्यावरण-विकास आणि पर्यावरणीय पर्यटन उपक्रमांद्वारे स्थानिकासाठी उपजीविकेच्या संधी वाढवण्यास कारणीभूत ठरेल.

पंतप्रधान बचतगट संमेलनात होणार सहभागी

करहाल, श्योपूर येथे आयोजित करण्यात येत असलेल्या बचत गटांच्या संमेलनात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना (डीएवाय-एनआरएलएम) अंतर्गत प्रोत्साहन दिले जाणार्‍या हजारो महिला बचत गट (एसएचजी) सदस्य/सामुदायिक संसाधन व्यक्ती या संमेलनात उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत विशेषकरुन चार आदिवासी गट (पीव्हीटीजी) कौशल्य केंद्रांचे उद्घाटन देखील करणार आहेत.

ग्रामीण गरीब कुटुंबांना टप्प्याटप्प्याने बचतगटात एकत्र आणणे, त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांचे उत्पन्न आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांना दीर्घकालीन पाठबळ प्रदान करणे हे डीएवाय-एनआरएलएमचे उद्दिष्ट आहे. कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे शिक्षण आणि इतर लिंगभेदभावा संबंधित समस्या, पोषण, स्वच्छता, आरोग्य इ. यांसारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे आणि वर्तन बदल संवादाद्वारे महिला बचतगट सदस्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी हे मिशन कार्य करत आहे.

 

G.Chippalkatti /V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1859528) Visitor Counter : 237