पंतप्रधान कार्यालय

पावागड टेकडीवरील जीर्णोद्धार केलेल्या श्री कालिका मातेच्या मंदिराचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन


"हा शिखरध्वज, शतके उलटतात, युगे उलटतात, पण आस्था शाश्वत राहते याचे प्रतीक"

"आज, नवीन भारत आपल्या आधुनिक आकांक्षांसह आपली प्राचीन ओळख अभिमानाने जगत आहे"

"आई, अधिक ऊर्जा, त्याग आणि समर्पणाने लोकांचा सेवक म्हणून देशवासीयांची सेवा करत राहो असा आशीर्वाद दे"

"गर्वी गुजरात हा भारताच्या अभिमानाचा आणि गौरवाचा समानार्थी शब्द"

"पावागड हे भारताच्या ऐतिहासिक विविधतेच्या सार्वभौम सौहार्दाचे केंद्र"

Posted On: 18 JUN 2022 12:05PM by PIB Mumbai

 

पावागड टेकडीवर जीर्णोद्धार केलेल्या श्री कालिका मातेच्या मंदिराचे पंतप्रधानांनी आज उद्घाटन केले. परिसरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी  हे एक असून, मोठ्या संख्येने यात्रेकरू मंदीराला भेट देतात. मंदिराचा पुनर्विकास 2 टप्प्यात करण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिलमध्ये पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले होते. आजच्या कार्यक्रमात उद्घाटन झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते 2017 मध्ये करण्यात आली. यामध्ये मंदिराच्या पायाचा विस्तार आणि तीन स्तरांवर 'परिसर' मधे सुविधांचा विकास यात पथदिवे, सीसीटीव्ही प्रणाली यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.    

मंदिरात येण्याचे भाग्य लाभल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. 5 शतके आणि स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतरही मंदिरावर पवित्र ध्वज फडकत असताना आजच्या क्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आज शतकांनंतर पुन्हा एकदा पावागड मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकला आहे. हा शिखर ध्वजकेवळ आपल्या श्रद्धेचे आणि अध्यात्माचे प्रतीक नाही तर शतके उलटतात, युगे उलटतात, पण आस्था शाश्वत राहते याचेही प्रतीक आहे असे ते म्हणाले. आगामी 'गुप्त नवरात्री'च्या अगदी आधी हा जीर्णोद्धार म्हणजे 'शक्ती' कधीही लोप पावत नाही याचे द्योतक आहे असे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ धाम आणि केदार धामचा संदर्भ देत, आज भारताचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव पुनर्संचयित होत आहे. आज नवीन भारत आपल्या आधुनिक आकांक्षांसह आपली प्राचीन ओळख अभिमानाने जगत आहे असे पंतप्रधान म्हणाले. श्रद्धेच्या केंद्रांसोबतच आपल्या प्रगतीच्या नव्या शक्यता निर्माण होत आहेत आणि पावागड येथील हे भव्य मंदिर त्या प्रवासाचा एक भाग आहे, असेही ते म्हणाले. हे मंदिर सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास यांचे प्रतीक आहे असे त्यांनी सांगितले.

कालिमातेची कृपावचने ऐकून स्वामी विवेकानंद यांनी जनसेवेसाठी स्वतःला समर्पित केल्याचे पंतप्रधानांनी स्मरण करून दिले. जनतेच्या सेवेसाठी त्यांनीही आज देवीकडे शक्ती मागितल्याचे त्यांनी सांगितले. "देवीमाते, मला अधिक ऊर्जेने, अधिक त्याग करून आणि अधिक समर्पणभावनेने जनसेवक म्हणून देशवासीयांची सेवा अशीच सुरु ठेवता यावी, यासाठी मला आशीर्वाद दे. माझ्याकडे असलेल्या सर्व शक्तीनिशी, माझ्याकडील सर्व गुणांचा पुरेपूर उपयोग करून माझ्या देशातील माताभगिनींच्या कल्याणासाठी मला येथून पुढेही असेच समर्पित राहून काम करता आले पाहिजे", अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासंदर्भाने पंतप्रधान म्हणाले की, गुजरातने स्वातंत्र्यसंग्रामात तसेच देशाच्या विकासासाठीही उत्तुंग योगदान दिले आहे. 'गर्वी गुजरात' हे शब्द भारताच्या गौरवाशी आणि तेजाशी जोडलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले. "पंचमहल आणि पावागढ या तीर्थक्षेत्रांनीही सोमनाथ मंदिराची तेजस्वी परंपरा पुढे सुरु ठेवली आहे. आज येथील पुनर्विकास पूर्ण करून घेऊन आणि ध्वजारोहण करून घेऊन मा कालीने तिच्या भाविकांना सर्वोत्तम भेट दिली आहे." असे उद्गारही पंतप्रधानांनी काढले. या मंदिराच्या मूळ प्राचीन रचनेला आणि तिच्यातून प्रतीत होणाऱ्या अर्थाला धक्का न लावता पुनरुज्जीवन करण्यात आले आहे, असे सांगत, या देवळात जाणे आता सर्वांसाठी सहजसोपे झाल्याचीही त्यांनी नोंद घेतली. "पूर्वी पावागढची यात्रा इतकी कठीण होती, की आयुष्यात एकदा तरी मातेचे दर्शन घ्यावे, असे लोक म्हणत असत. आज वाढत्या सुविधांमुळे ते कठीण दर्शन सोपे झाले आहे." असे पंतप्रधान म्हणाले. भाविकांनी शिस्त पाळावी, असे आवाहनही त्यांनी केले. "पावागढमध्ये आध्यात्मिकता आहे, इतिहास आहे, कला आहे आणि संस्कृतीही आहे. येथे एकीकडे महाकाली मातेचे शक्तीपीठ आहे आणि दुसरीकडे जैन मंदिराची वारसावास्तूही आहे. म्हणजे, पावागढ हे एका अर्थी भारताच्या ऐतिहासिक विविधतेशी विश्वाच्या असणाऱ्या सुसंवादाचेच केंद्र आहे." असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. मातेच्या विविध मंदिरांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, "गुजरातला मातेच्या कृपाप्रसादाने सुरक्षाकवच लाभले आहे."

"तीर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबरच त्या-त्या प्रदेशात अनेक संधी निर्माण होतात, पर्यटन, रोजगार आणि स्थानिक कलाकौशल्याबद्दल जागरूकता वाढते." असे पंतप्रधान म्हणाले. पंचमहल ही विख्यात संगीततज्ज्ञ बैजू बावरा यांची भूमी आहे, याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की, "जेथे जेथे वारसा आणि संस्कृती यांचे सामर्थ्य वाढते, तेथे तेथे कला आणि प्रतिभाही उमलून येतात आणि फुलतात."

2006 मध्ये चंपानेरमधूनच 'ज्योतिग्राम' योजना सुरु केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

***

S.Tupe/V.Ghode/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835036) Visitor Counter : 196