पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-कश्मीर इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी
सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायत इथून देशभरातल्या सर्व ग्रामसभांना केले संबोधित
20,000 कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी
जम्मू आणि कश्मीरमधील प्रदेशांना जोडणाऱ्या बनिहाल काझीगुंड मार्गावरील बोगद्याचे उद्घाटन
दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगति मार्ग आणि रातले आणि केवार जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी
देशातील प्रत्येक जिल्हयातल्या 75 जलाशयांचे पुनरुज्जीवन आणि विकास करण्याच्या ‘अमृत सरोवर’ योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
“जम्मू कश्मीरमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिनाचा समारंभ साजरा होणे, हा मोठा सकारात्मक बदल”
“मग ती लोकशाही असो किंवा विकासाचा संकल्प, आज जम्मू कश्मीर नवा आदर्श घडवतो आहे. गेल्या 2-3 वर्षात, जम्मू आणि कश्मीर मध्ये विकासाचे नवे आयाम रचले गेले.”
“जम्मू कश्मीरमधल्या ज्या नागरिकांना आजवर आरक्षणाचे लाभ मिळाले नव्हते, त्यांनाही आता ते लाभ मिळत आहेत”
“अंतरे- मग ती मनांमनातील असोत, किंवा भाषा, चालीरीती किंवा नैसर्गिक स्त्रोतांमधील असो, सगळं भेदभाव आणि अंतर मिटवणे याला आमचे सर्वाधिक प्राधान्य”
“स्वातंत्र्यानंतरचा हा “अमृत काळ” भारतासाठी सुवर्ण काळ ठरेल.”
“कश्मीर खोऱ्यातील युवकांना आता त्यांचे पालक आणि त्याआधीच्या पूर्वजांनी सोसलेल्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही”
“जर आपली गावे नैसर्गिक शेतीकडे वळलीत, तर त्याचा फायदा संपूर्ण मानवतेला होईल”
“सबका प्रयास’ च्या मदतीने, कुपोषणाची समस्या दूर करण्यात, ग्रामपंचायतीची भूमिका महत्वाची ठरेल.”
Posted On:
24 APR 2022 2:56PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्रामपंचायतीतून त्यांनी देशभरातील ग्रामसभांना संबोधित केले. यावेळी, पंतप्रधानांच्या हस्ते 20,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. तसेच, ‘अमृत सरोवर’ उपक्रमाचाही त्यांनी शुभारंभ केला. जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, डॉ जितेंद्र सिंह आणि कपिल पाटील यावेळी उपस्थित होते.
आज जम्मू आणि कश्मीरच्या विकासाच्या प्रवासातील महत्वाचा दिवस आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ज्या उत्साहाने तिथली जनता या कार्यक्रमात सहभागी झाली होती, त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. जम्मू कश्मीरशी असलेल्या दीर्घकालीन विशेष संबंधांमुळे आपल्याला इथल्या समस्याची पूर्ण जाणीव आहे, असे त्यांनी सांगितले.तसेच, आज विविध प्रदेशात दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “ दळणवळण आणि वीजेशी संबंधित 20 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी आज इथे झाली. जम्मू काश्मीरच्या विकासावर विशेष भर देत,जलद गतीने विविध प्रकल्पांचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे जम्मू काश्मीरच्या युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल,” असे त्यांनी सांगितले.
आज अनेक गावांमध्यल्या कुटुंबांना त्यांच्या घरांची कागदपत्रे मिळाली आहेत. या स्वामित्व कार्डमुळे, गावातील लोकांना नव्या संधीसाठी प्रेरणा मिळेल. . 100 जन औषधी केंद्रे, जम्मू काश्मीरच्या सर्वसामान्य लोकांना परवडणारी औषधे आणि शस्त्रक्रिया उपकरणे देण्याचे माध्यम बनतील, असे ते म्हणाले. जम्मू काश्मीर मध्ये आज केंद्र सरकारच्या सर्व योजना राबवल्या जात असून गावातल्या लोकांना त्यांचा लाभ मिळतो आहे. एलपीजी उज्ज्वला योजना, शौचालये,वीज, जमिनीचे हक्क, नळ जोडणी अशा अनेक योजनांचा त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी यूएईच्या प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली. आज कश्मीरमध्ये विकासाचा नवा अध्याय लिहिला जातो आहे, अनेक खाजगी व्यवसायिक कश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांत, जम्मू कश्मीरमध्ये केवळ 17 हजार कोटी रुपयांचीच खाजगी गुंतवणूक होऊ शकली. मात्र आता ही गुंतवणूक, 38 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पर्यटनाला पुन्हा चालना मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जम्मू कश्मीर मध्ये, कार्यपद्धतीत कसा बदल झाला आहे, हे ही त्यांनी अधोरेखित केले. त्याचे उदाहरण देतांना, आज इथे 500 किलोवॉटचा सौरप्रकल्प तीन आठवड्यात स्थापनही केला जातो. पूर्वी तर केवळ अशा प्रकल्पांच्या फाईल्सच 2 ते 3 आठवडे फिरत असत, असे ते म्हणाले. पल्ली पंचायत मधील सर्व घरांना सौरऊर्जा मिळते आहे, ग्राम ऊर्जा स्वराजचे यापेक्षा उत्तम उदाहरण कोणते असेल, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी जम्मू कश्मीरच्या युवकांना आश्वासन देतांना सांगितले, “मित्रांनो, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. खोऱ्यातील युवकांनो, माझे शब्द लक्षात ठेवा. तुमच्या आईवडलांना आणि आजी आजोबांना इथे ज्या समस्यांचा सामना करावा लागला, त्या समस्या तुम्हाला भेडसावणार नाहीत. याची काळजी मी घेईन आणि आज मी तुम्हाला त्याची ग्वाही देण्यासाठीच आलो आहे.”
आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक तसेच हवामान बदलाच्या समस्येबाबत भारताच्या नेतृत्वाचा त्यांनी उल्लेख केला. तसेच, याचाच संदर्भ घेत, पल्ली पंचायत, देशातील पहिली शून्य कार्बन उत्सर्जन करणारी पंचायत बनत असल्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. “पल्ली पंचायत ही देशातील पहिली शून्य कार्बन उत्सर्जन करणारी पंचायत बनण्याच्या दिशेने प्रवास करते आहे. आज मला देशभरातल्या गावातील लोकप्रतिनिधींशी, पल्लीतील गावकऱ्यांशी संवाद साधण्याची परवानगी मिळाली. या उत्तम कामगिरीसाठी आणि विकासकामांसाठी जम्मू-कश्मीरचे खूप खूप अभिनंदन !”असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, ‘‘ जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय पंचायती दिन साजरा करणे, म्हणजे एक खूप मोठे परिवर्तन घडून येत आहे’’ जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाही अगदी तळागाळापर्यंत पोहोचली आहे, याबद्दल अत्यंत समाधान आणि अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकशाही असो अथवा विकासाचा संकल्प असो, आज जम्मू- काश्मीरने एक नवीन उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. गेल्या 2-3 वर्षांमध्ये जम्मू -काश्मीरमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून त्याला नवीन परिमाण लाभले आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, जम्मू -काश्मीरमध्ये पहिल्यांदाच त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि डीडीसी यांच्या निवडणुकांचा समावेश आहे.
राष्ट्राच्या विकास यात्रेमध्ये जम्मू आणि काश्मीरचा समावेश करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देऊन पंतप्रधान म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये 175 पेक्षा अधिक केंद्रीय कायदे लागू आहेत. त्याचा सर्वाधिक लाभ या भागातल्या महिला, गरीब आणि वंचित घटकांना होत आहे. आरक्षणातली विसंगती दूर करण्याविषयीही पंतप्रधान यावेळी बोलले. अनेक दशकांपासून पायात अडकविण्यात आलेल्या बेड्यांतून वाल्मिकी समाजाची सुटका झाली आहे, असे सांगून ते म्हणाले, आज प्रत्येक समाजातील मुले-मुली आपली स्वप्ने पूर्ण करू शकतात. जम्मू- काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्यांनाही आता त्याचा फायदा मिळत आहे.
‘एक भारत- श्रेष्ठ भारत’ या व्हिजनचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, हा दृष्टिकोण एकमेकांमध्ये संपर्क साधला जावा आणि अंतर दूर व्हावे यावर केंद्रीत आहे. याविषयी ते पुढे म्हणाले, ‘‘ अंतर मग ते मन-हृदय, भाषा, चाली- रीती, किंवा स्त्रोत यांच्यामधील असेल, हे अंतर दूर करण्याला आम्ही आज प्राधान्य देत आहोत.’’
देशाच्या विकासामध्ये पंचायतींची भूमिका किती महत्वाची आहे, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले, ते म्हणाले, ‘‘ स्वातंत्र्याच्या अमृत काळ भारताचा सुवर्ण काळ असणार आहे. ‘सबका प्रयास’च्या संकल्पातून साकारले जाणार आहे. यामध्ये ग्रामपंचायत, लोकशाहीतील सर्वात तळागाळातला घटक आणि आपण सर्व सहकारी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणार आहात.’’ ते पुढे म्हणाले, गावाच्या विकासासाठी प्रत्येक प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारचे नियोजन आणि अंमलबजावणी यांच्यामध्ये पंचायतीची भूमिका सखोल असणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला. त्याचबरोबर राष्ट्रीय संकल्पाच्या सिद्धीसाठी पंचायती या एक महत्वाच्या दुवा म्हणून उदयास येतील, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 75 सरोवरांच्या निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. या सरोवरांना हुतात्मा वीर, स्वातंत्र्य सैनिकांची नावांसह वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामपंचायतींचा व्यवहार पारदर्शक असावा असे सांगून पंचायतीच्या सक्षमीकरणासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे महत्व विशद केले. यामध्ये ई-ग्राम स्वराज सारख्या उपाय योजना पेमेंट प्रक्रियेला जोडण्यात येणार असल्याचे सांगितले. पंचायतींचे ऑनलाइन ऑडिट केले जाईल आणि सर्व ग्रामसभांसाठी नागरिक सनद देणारी प्रणाली सुरू केल्यानंतर सभांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी कार्यप्रणाली तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. पंचायत संस्था आणि ग्राम प्रशासन यामध्ये, विशेष करून जल प्रशासनामध्ये महिलांची भूमिका महत्वाची असावी, असे सांगितले.
नैसर्गिक शेती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचा पुनरूच्चार करून पंतप्रधानांनी मातृभूमीला रसायनांपासून मुक्त करणे गरजेचे आहे, रसायनांमुळे भूजलाची हानी होत असल्याचे सांगितले. आपल्या अनेक गावांमध्ये शेतकरी बंधूंचा नैसर्गिक शेती करण्याकडे कल वाढत असून त्याचा संपूर्ण मानवजातीला लाभ होणार आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेतीला कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल, यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले. तसेच सर्वांच्या प्रयत्नातून कुषोषणाच्या समस्येचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायती महत्वाची भूमिका बजावू शकतील, असे सांगितले. ‘‘देशाला कुपोषण आणि रक्ताल्पताच्या प्रश्नापासून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. या प्रश्नावर समाजातल्या सर्वात खालच्या स्तरावरील लोकांना जागरूक करण्याची आवश्यकता आहे, असे सांगून आता सरकारी योजनेअंतर्गत दिला जाणारा तांदूळ लोकांचे चांगले पोषण करणारा आहे, असेही त्यांनी सांगितले.
ऑगस्ट 2019 पासून जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भामध्ये घटनात्मक सुधारणां सुरू झाल्यापासून, सरकारने अभूतपूर्व वेगाने प्रशासन सुधारण्यावर भर दिला आहे. आणि या प्रदेशातल्या लोकांचे जीवनमान अधिक सुलभ व्हावे यासाठी विस्तृत सुधारणा करण्यात आल्या आहेत. ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली होती त्यांचे उद्घाटने करण्यात आली आहेत. त्यामुळे मूलभूत सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे गतिशीलता सुलभ होईल हे सुनिश्चित केले आहे. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे या राज्यातल्या लोकांना खूप चांगली मदत होणार आहे.
याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते बनिहाल काझीगुंड मार्ग बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. या कामासाठी 3100 कोटींपेक्षा जास्त रूपये खर्च झाले आहेत. या 8.45 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामुळे बनिहाल ते काझीगुंड यांच्या दरम्यानचे अंतर 16 किलोमीटरने कमी झाले आहे. तसेच इथल्या नागरिकांना या प्रवासासाठी लागणारा वेळ सुमारे दीड तासाने कमी होणार आहे. हा दुहेरी बोगदा असून प्रवासाच्या दोन्ही दिशांना प्रत्येकी एक देखभाल आणि आपत्कालीन स्थलांतरासाठी 500 मीटर अंतरावर दुहेरी मार्ग एकमेकांना जोडण्यात आले आहेत. हा बोगदा जम्मू आणि काश्मीर यांच्या दरम्यान असून सर्व प्रकारच्या हवामानामध्ये यावरून वाहतूक होवू शकणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रदेशांना जवळ आणण्याचे काम झाले आहे.
पंतप्रधानांनी यावेळी दिल्ली -अमृतसर- कटरा या द्रूतगती मार्गाच्या तीन रस्त्याच्या ‘पॅकेज’ची पायाभरणी केली. या महामार्ग प्रकल्पासाठी सुमारे 7500 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. 4/6 नियंत्रित मार्गिकांचा हा महामार्ग असणार आहे. एनएच-44 वरील द्रूतगती मार्ग बाल्सुआ ते गुरहाबैलदारन, हिरानगर, गुरहाबैलदारन, हिरानगर ते जाख, विजयपूर आणि जाख, विजयपूर ते कुंजवानी, जम्मू हे सर्व मार्ग जम्मू विमानतळाशी जोडण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज रातले आणि क्वार जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. किश्तवाड जिल्ह्यात चिनाब नदीवर सुमारे 5300 कोटी रूपये खर्चून 850 मेगावॅटचा रातले जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर क्वार जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 540 मेगावॅट विज निर्मिती करण्याची आहे. हा प्रकल्पही चिनाब नदीवर उभारण्यात येत असून यासाठी 4500 कोटी रूपये खर्च अंदाजित आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे राज्याची विजेची गरज पूर्ण होवू शकणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये जनौषधी केंद्रांचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी चांगल्या दर्जाची जेनेरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी, 100 केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आली. ही केंद्रे केंद्रशासित प्रदेशातल्या दुर्गम भागांमध्ये आहेत. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते पल्ली इथल्या 500 किलोवॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल. या प्रकल्पामुळे पल्ली ही शून्य कार्बन उर्त्सजन करणारी देशातली पहिली पंचायत असणार आहे.
याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थींना ‘स्वामित्व’ पत्रिका सुपूर्द करण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त विविध श्रेणींमध्ये पुरस्कार विजेत्या पंचायतींना पुरस्काराचा निधी त्या त्या पंचायतींकडे हस्तांतरित करण्यात आला. प्रदेशातील ग्रामीण वारसा दर्शविणा-या ‘आयएनटीएसीएच’ छायाचित्र दालनाला पंतप्रधानांनी भेट दिली. भारतात आदर्श स्मार्ट गावे निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेल्या ग्रामीण उद्योजकतेवर आधारित ‘मॉडेल नोकिया स्मार्टपूर’लाही त्यांनी भेट दिली.
या परिसरातल्या जलस्त्रोतांचे पुनरूज्जीवन करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी अमृत सरोवर उपक्रमाचा प्रारंभ केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 जलस्त्रोतांचा विकास आणि त्यांचे पुनरूज्जीवन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
***
S.Kane/R.Aghor/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819584)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam