युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि दिग्गज खेळाडूंनी फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या राज्य फेरीतील सहभागींचे वाढवले मनोबल

Posted On: 08 FEB 2022 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या राज्य फेरीपूर्वी दिग्गज खेळाडूंसह विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 189 अनोख्या जिल्ह्यांतील 360 शाळा या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी फिट इंडिया चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यांचा दृष्टिकोन पुढे नेत, आम्ही फिट इंडिया क्विझ - भारतातील पहिली शालेय तंदुरुस्ती आणि क्रीडा प्रश्नमंजुषा सुरू केली. प्रश्नमंजुषेच्या प्राथमिक फेरीत भाग घेतलेल्या भारतभरातील सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि राज्य फेरीतील सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि आशा करतो की तुम्ही तुमची शाळा, जिल्हा आणि राज्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी कराल, असे ते म्हणाले.

राज्य फेरी ही वेब-आधारित फेरी असेल ज्यामध्ये 8 ते 32 संघ राज्य स्तरावर अजिंक्य बनण्यासाठी स्पर्धा करतील. हा कार्यक्रम युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि फिट इंडियाच्या सोशल मीडिया हँडलवर देखील वेबकास्ट केला जाईल. क्विझमध्ये 3.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम आहे जी क्विझच्या विविध टप्प्यांवर विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना दिली जाईल.

ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी सहभागी विद्यार्थ्यांना आगामी फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती मीराबाई चानू यांनीही सहभागींना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व विद्यार्थी आपले सर्वोत्तम देतील आणि प्रत्येक जण त्यांच्या राज्याला पहिल्या वहिल्या फिट इंडिया क्विझमध्ये अजिंक्य बनण्यासाठी मनोबल उंचावेल अशी आशा टोकियो पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेता शरद कुमार यांनी व्यक्त केली. नामवंत टेबल टेनिसपटू मनिका बत्रा म्हणाली, "मी सहभागींना शुभेच्छा देते. सर्वोत्तम राज्य विजयी होवो."

13,502 शाळांतील एकूण 36,299 विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेच्या प्राथमिक फेरीत भाग घेतला आणि त्यात मुलांबरोबरच मुलींचाही समान सहभाग दिसून आला. उत्तर प्रदेशातील दोन विद्यार्थ्यांनी इतर सर्व राज्यांतील विद्यार्थ्यांना मागे टाकत प्राथमिक फेरीत सर्वाधिक गुण मिळवले. ग्रेटर नोएडाच्या दिल्ली पब्लिक स्कूल मधील दिव्यांशु चमोलीने अव्वल स्थान पटकावले, तर वाराणसीच्या लाहरतारा येथील सनबीम स्कूलचा शाश्वत मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर होता. या दोघांच्या पाठोपाठ बेंगळुरूच्या बाल्डविन गर्ल्स हायस्कूलच्या अर्कामिता हिने कर्नाटक राज्यासाठी सर्वाधिक गुण पटकावले.

राज्य फेऱ्यांनंतर, 36 शालेय संघ (प्रत्येक राज्य आणि/किंवा केंद्रशासित प्रदेशातील विजेते) या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या राष्ट्रीय फेरीत जातील आणि स्टार स्पोर्ट्सवर याचे प्रसारण केले जाईल आणि अनेक सोशल मीडिया चॅनेलवर वेबकास्ट केले जाईल.

 

* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1796516)