गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्वच्छ अमृत महोत्सवात राष्ट्रपतींच्या हस्ते भारतातील स्वच्छ शहरांचा गौरव


स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत इंदूरने सलग पाचव्यांदा ‘स्वच्छ शहर’चा किताब पटकावला

5-तारांकित नऊ शहरे, 3-तारांकित 143 शहरे कचरामुक्त शहरे

इंदूर, नवी मुंबई आणि नेल्लोर या शहरांची सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजमध्ये अव्वल कामगिरी

Posted On: 20 NOV 2021 6:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2021

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज विज्ञान भवन, नवीन दिल्ली येथे स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 चा भाग म्हणून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'स्वच्छ अमृत महोत्सवा'मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला. स्वच्छ भारत अभियान  (शहरी) च्या विविध म्हणजेच स्वच्छ सर्वेक्षण 2021, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि शहरांसाठी कचरामुक्त तारांकित क्रमवारी   प्रमाणपत्रे देण्याच्या  उपक्रमांतर्गत नगरे /शहरे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेण्याच्या आणि या कामाला  ओळख देण्याच्या अनुषंगाने  या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे 300 हून अधिक पुरस्कार दिले जात आहेत.

सलग पाचव्या वर्षी, इंदूरला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून सन्मानित करण्यात आले, तर सुरत आणि विजयवाडा यांनी ‘एक लाखांहून अधिक लोकसंख्या’ असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. एक लाखांपेक्षा कमी’ लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये  महाराष्ट्रातील विटा, लोणावळा आणि सासवड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.वाराणसी ‘सर्वोत्कृष्ट गंगा नगर ’ म्हणून घोषित करण्यात आले तर अहमदाबाद छावणीने ‘भारतातील सर्वात स्वच्छ छावणी’ हा किताब पटकावला  त्यानंतर मेरठ छावणी आणि दिल्ली छावणीने अनुक्रमे दुसरा आणि  तिसरा क्रमांक पटकावला.'फास्टेस्ट मूव्हर'च्या श्रेणीत, 2020 क्रमवारीतील 361 व्या स्थानावरून यावर्षी 87 व्या स्थानावर 274 क्रमांकांनी  झेप घेऊन होशंगाबाद (मध्य प्रदेश) ने यावर्षी 'फास्टेस्ट मूव्हर सिटी' मध्ये स्थान मिळवले. ('1 लाखांहून अधिक लोकसंख्या' श्रेणीमध्ये) अशा प्रकारे या शहराने अव्वल 100 शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.

राज्य पुरस्कारांमध्ये, छत्तीसगडने   सलग तिसऱ्या वर्षी "100 पेक्षा जास्त शहरी स्थानिक स्वराज्य संस्था" श्रेणीत 'स्वच्छ राज्य' म्हणून तर झारखंडने दुसऱ्यांदा "100 पेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था" श्रेणीत " स्वच्छ राज्य पुरस्कार पटकावला. कर्नाटक आणि मिझोरम.  हे अनुक्रमे मोठ्या (100 पेक्षा जास्त शहरी स्थानिक स्वराज्य संस्था) आणि लहान (100 पेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था) राज्य श्रेणीत 'फास्टेस्ट मूव्हर राज्य ' ठरली  आहेत.

या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती म्हणाले की,आपण 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करत आहोत त्यामुळे यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांना विशेष महत्त्व आहे.कोविड महामारीच्या काळातही सफाई मित्र आणि स्वच्छता कर्मचारी सातत्याने सेवा देत होते, हे  राष्ट्रपतींनी नमूद केले. ते म्हणाले की, स्वच्छतेच्या असुरक्षित पद्धतींमुळे कोणत्याही स्वच्छता कर्मचाऱ्याचा जीव धोक्यात येऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन हा भारताच्या पारंपरिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.आज संपूर्ण जग पर्यावरण संरक्षणावर भर देत असून  यात  संसाधनांचा योग्य वापर , पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 'कचऱ्यातून संपत्ती ' या संकल्पनेतून  चांगली उदाहरणे समोर येत आहेत आणि अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात सक्रिय असल्याचे त्यांनी नमूद केले. .या क्षेत्रांमध्ये उद्योजकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य योजना विकसित केल्या जाऊ शकतात, असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यावेळी बोलताना म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान- शहरी  अंतर्गत मिळालेले  यश हे अभूतपूर्व सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. ते म्हणाले की, आज या अभियानाने लोकचळवळीचे  – खऱ्या ‘जनचळवळीचे ’स्वरूप धारण केले आहे. 2016 मध्ये प्रायोगिक तत्वावावर 73 शहरांमध्ये सुरू झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मोठी वाढ दिसून येत असून हे आजच्या घडीला  जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण आहे.ते म्हणाले की, पुढील काही वर्षे सर्वांगीण स्वच्छतेवर, म्हणजे स्वच्छ हवा, स्वच्छ जमीन आणि शुद्ध पाणी यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी समर्पित असतील. हिरवीगार आणि सर्वसमावेशक शहरे निर्माण करणे हे आपल्या भावी पिढ्यांसाठी देणे लागत आहे, असं मंत्री म्हणाले. स्वच्छ अमृत महोत्सव असे उचित शीर्षक असलेल्या या उत्सवात त्यांनी शहरी भारतातील स्वच्छता पुरस्कार विजेत्यांचे  अभिनंदन केले

श्री हरदीप सिंग पुरी आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री श्री कौशल किशोर यांनी छत्तीसगड आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल  यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारप्राप्त शहरे आणि राज्यांचा सत्कार केला.

गेल्या काही वर्षांत,शहरी परिदृश्य बदलण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण एक प्रभावी साधन म्हणून उदयाला  आले आहे.कोविड-19 मुळे जमिनीवर आव्हाने असूनही, 2,000 हून अधिक मूल्यांकनकर्त्यांच्या पथकांनी  28 दिवसांच्या विक्रमी वेळेत 65,000 पेक्षा जास्त प्रभागांना  भेटी दिल्या. वर्षीच्या सर्वेक्षणात महाराष्ट्राने एकूण 92 पुरस्कार पटकावले आहेत  कोणत्याही राज्याने पटकावले हे सर्वाधिक पुरस्कार आहेत.त्यानंतर 67 पुरस्कारांसह छत्तीसगडचा क्रमांक लागतो.याव्यतिरिक्त, प्रेरक दौर  सन्मान या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत नवीन कार्यप्रदर्शन  श्रेणीमध्ये, इंदूर, सुरत, नवी मुंबई, नवी दिल्ली नगर परिषद आणि तिरुपती या पाच शहरांना ‘दिव्य’ (प्लॅटिनम) म्हणून वर्गीकृत करण्यात आले. 4,320 शहरांनी भाग घेतलेल्या या वर्षीच्या सर्वेक्षणात अभूतपूर्व संख्येने नागरिकांचा अभिप्रायही  मिळाला – गेल्या वर्षीच्या 1.87 कोटींच्या  तुलनेत 5 कोटींहून अधिक नागरिकांनी अभिप्राय नोंदवला. स्वच्छ सर्वेक्षण  2021 च्या माध्यमातून  संपूर्ण शहरी भारतातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनातील 6,000 हून अधिक नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धती शोधण्यात साहाय्य मिळाले आहे.

आजच्या कार्यक्रमाचे दुसरे सत्र स्वच्छ भारत अभियान -शहरीमध्ये  आघाडीवर असलेल्या  सफाई मित्रांना समर्पित होते.जागतिक शौचालय दिनाच्या (19 नोव्हेंबर) निमित्ताने , या सत्रात पहिल्याच स्वच्छतामित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना गौरवण्यात आले. गटारे आणि सेप्टिक टँकच्या धोकादायक साफसफाईपासून मानवी मृत्यूचे उच्चाटन करण्यासाठी  केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने  गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या सफाई मित्र  सुरक्षा चॅलेंजमध्ये 246 सहभागी शहरांमधील विविध लोकसंख्येच्या श्रेणींमध्ये इंदूर, नवी मुंबई, नेल्लोर आणि देवास या शहरांनी  अव्वल कामगिरी केली. राज्यांपैकी, छत्तीसगड आणि चंदीगडने या चॅलेंज अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा पुरस्कार पटकावला.गेल्या एका वर्षात, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आर्थिक विकास महामंडळ (एनएसकेएफडीसी ) मार्फत बँकांशी स्वच्छतामित्रांची  पत  जोडणी , सेक्टर स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स मार्फत नोकरीच्या ठिकाणी  प्रशिक्षण आणि 190 हून अधिक शहरांमध्ये हेल्पलाइन क्रमांक 14420 ची स्थापना - नागरिकांचे तक्रार मंच या उपक्रमांद्वारे शहरी भारतात ‘मॅनहोल टू मशीन होल’ ही क्रांती घडवून आणण्यात यश मिळवले आहे.

कचरामुक्त शहरांच्या तारांकित क्रमवारी  नियमाअंतर्गत निर्धारित  केलेल्या 3-तारांकित आणि 5-तारांकित   शहरांचे निकाल जाहीर करून स्वच्छ भारत अभियान -शहरी 2.0 अंतर्गत कचरामुक्त भारताच्या दृष्टिकोनाला आणखी चालना मिळाली आहे. इंदूर, सुरत, नवी दिल्ली नगरपरिषद, नवी मुंबई, अंबिकापूर, म्हैसूर, नोएडा, विजयवाडा आणि पाटण  या एकूण 9 शहरांना 5 तारांकित शहरे, तर 143 शहरांना  3 तारांकित  शहरे म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या  मापदंडांमध्ये शहरांचे समग्र मूल्यमापन करण्यासाठी 2018 मध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे कचरामुक्त शहरांचे  तारांकित क्रमवारी नियम अद्ययावत आराखडा  म्हणून सादर करण्यात आले. 2018 मध्ये, केवळ 56 शहरांना  स्टार रेटिंगचे म्हणजेच तारांकित क्रमवारीचे  प्रमाणपत्र देण्यात आले. या वर्षी, 2,238 शहरांनी मूल्यांकनासाठी अर्ज केल्याने ही संख्या अनेक पटींनी वाढली आहे.कोविड-19 चे निर्बंध असूनही हे मोठ्या प्रमाणातील मूल्यांकन यशस्वीरीत्या पूर्ण झाले हे मूल्यांकन कालावधी दरम्यान 14.19 लाख नागरिकांचे  प्रमाणीकरण आणि 1 लाख स्थानांसह  3.5 कोटी डेटा पॉइंट्सवरून संकलित करण्यात आलेले 1.4 कोटी छायाचित्र  पुराव्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते.

राष्ट्रपतींनी स्वच्छ भारत अभियान -शरी  2.0 साठी देशाच्या  वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत ‘हर धडकन स्वच्छ भारत की –’ या शीर्षकगीताच्या प्रकाशनाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा  उत्साह द्विगुणित झाला.हे गाणे स्वच्छता चळवळीचे भावविश्व उलगडते आणि हे गाणे स्वच्छतेच्या  प्रवासातील सर्व नागरिकांच्या, विशेषत: लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बांधिलकीला मानवंदना आहे. स्वच्छ, हरित आणि आधुनिक शहरी भारताचे चित्रण असणारी ही चित्रफीत स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 च्या प्रवासाला आगामी  दिवसात पुढे नेण्यासाठी लोकांना पुन्हा चैतन्यशील करण्याचा प्रयत्न आहे.

गाण्याची लिंक आहे : https://www.youtube.com/watch?v=CY_ejy6ifwE.

1 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0, हे सर्वांना  स्वच्छता सुविधा  सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करेल.स्वच्छ भारत अभियान -शहरीच्या गेल्या सात वर्षांच्या प्रवासाअंतर्गत परिणाम साध्य करण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.या डिजिटल प्रवासात एक मोठी झेप घेत मंत्रालयाने सुधारित स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 संकेतस्थळ आणि एकात्मिक एमआयएस पोर्टल ‘स्वच्छतम’ सुरु केले आहे.

याव्यतिरिक्त, भविष्यासाठी  एक अत्याधुनिक अवकाशीय जीआयएस व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे.हे व्यासपीठ या अभियानाला अद्ययावत , डेटा आधारित निर्णय घेण्याच्या दिशेने पुढे नेईल. या नवीन डिजिटल सक्षमीकरणांमुळे कागदविरहित अभियान मजबूत आणि पारदर्शक  होईल, तसेच स्वच्छता पंक्तीतील  राज्ये, शहरे आणि हितसंबंधीयांशी  चोवीस तास संपर्क साधला जाईल.

अशा प्रकारे स्वच्छ अमृत महोत्सव हा स्वच्छ भारत अभियान -शहरीच्या  गेल्या सात वर्षांतील शहरांच्या कामगिरीचा उत्सव होता आणि स्वच्छ भारत अभियान -शहरी  2.0 च्या माध्यमातून स्वच्छतेच्या पुढील टप्प्यात नव्या जोमाने पुढे जाण्यासाठी शहरे आणि नागरिकांच्या बांधिलकीचा उत्सव होता.

तपशीलवार निकाल , अहवाल आणि प्रकाशन स्वच्छ भारत अभियान-शहरीवर उपलब्ध आहेत: https://www.ss2021.in/#/home

या कार्यक्रमाचे वेबकास्ट स्वच्छ भारत अर्बन या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे.

 

 

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773515) Visitor Counter : 958