पंतप्रधान कार्यालय

सिडनी संवादमधील पंतप्रधानांचे बीजभाषण

Posted On: 18 NOV 2021 4:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021

माझे प्रिय मित्र, पंतप्रधान स्कॉट मॉरीसन,

मित्रांनो,

नमस्कार!

सिडनी संवाद परिषदेच्या द्‌घाटन सत्रात आपण मला बीजभाषण द्यायला बोलावले, हा भारतीय लोकांचा एक मोठा बहुमान आहे. मी याकडे, उदयोन्मुख डिजिटल जगतात आणि हिंद प्रशांत प्रदेशात भारताच्या मध्यवर्ती भूमिकेला मिळालेली अधिकृत मान्यता म्हणून बघतो. हा आपल्या दोन देशांदरम्यान असलेल्या सर्वंकष धोरणात्मक भागीदारीला, या प्रदेशाच्या भल्यासाठी तयार झालेल्या शक्तीला सलाम आहे. उदयोन्मुख, महत्वाच्या आणि सायबर तंत्रज्ञानावर भर दिल्याबद्दल मी सिडनी संवाद सत्राचे चे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आपण सध्या बदलाच्या अशा काळात आहोत, जो एका युगात एकदाच घडतो. डिजिटल युग आपल्या अवतीभवती असलेले सर्वकाही बदलत आहे. त्याने राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजाची व्याख्याच नव्याने लिहिली आहे. सार्वभौमत्व, प्रशासन, मुल्ये, कायदा, अधिकार आणि सुरक्षा यावर नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धा, शक्ती आणि नेतृत्वाला नवे आयाम मिळत आहेत. त्याने विकासाच्या संधी आणि समृद्धीच्या नव्या युगाची सरुवात झाली आहे. मात्र, यात आपल्याला नवी संकटे आणि समुद्रतळ, सायबर ते अंतरीक्ष या क्षेत्रात नवीन अनेक नवनव्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. जागतिक स्पर्धा आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय परिस्थिती ठरविण्यात तंत्रज्ञान हे महत्वाचे मध्यम आणि किल्ली बनले आहे. माहिती व तंत्रज्ञान हे नवीन शस्त्र बनत आहेत. लोकशाहीची सर्वात मोठी ताकद म्हणजे पारदर्शकता, खुलेपणा. त्याचवेळी, मुठभर स्वार्थी लोकांना आपण या खुलेपणाचा, पारदर्शकतेचा गैरवापर करू देता कामा नये.

मित्रांनो,

एक लोकशाही देश आणि डिजिटल नेता म्हणून, आपल्या सामायिक समृद्धी आणि संरक्षणासाठी भागीदारांसोबत काम करण्यास भारत तयार आहे. भारताच्या डिजिटल क्रांतीची मुळे ही आमच्या लोकशाहीत, आमच्या लोकसंख्येत आणि आमच्या अर्थव्यवस्थेच्या व्याप्ती मध्ये आहेत . आमच्या युवकांची उद्योजकता आणि नवोन्मेश आमच्या अर्थव्यवस्थेला ताकद देतात. भूतकाळातील आव्हाने आम्ही आज भविष्यकाळात मोठी झेप घेण्याच्या संधीत रुपांतरीत करत आहोत. भारतात काही महत्वपूर्ण संक्रमणे होत आहेत. एक, आम्ही जगातील सर्वात व्यापक जन माहिती पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. 1.3 अब्ज भारतीयांना विशिष्ट डिजिटल ओळख मिळाली आहे. आम्ही सहा लाख खेडी ब्रॉडबँडने जोडण्याचे काम सुरु केले आहे. आम्ही, यु पी आय हे जगातील सर्वात कार्यक्षम पेमेंट पायाभूत सुविधा उभी केली आहे. भारतात 800 दशलक्ष पेक्षा जास्त लोक इंटरनेट वापरतात, त्यापैकी 750 दशलक्ष स्मार्ट फोन वापरतात. आम्ही, जगात, दरडोई माहिती वापर सर्वात जास्त असलेल्या देशांपैकी एक आहोत. दोन, राज्यकारभार, सर्वसमावेश, सक्षमीकरण, संपर्क, लोकांपार्यात लाभ पोहोचवणे आणि लोक कल्याण यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरून लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणत आहोत. भारताची आर्थिक समावेशकता, बँकिंग, डिजिटल पेमेंट क्रांती याविषयी सर्वांनी ऐकले आहे. नुकतंच., आम्ही तंत्रज्ञान वापरून, आरोग्य सेतू आणि कोविन प्लॅटफॉर्म वापरून भारतच्या विशाल भौगोलिक क्षेत्रात लसीच्या 100 कोटी मात्रा दिल्या.  आम्ही आमच्या 100 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना परवडणारी आणि सार्वत्रिक आरोग्य सेवा देण्याकरिता राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची उभारणी करत आहोत. आमचे एक देश, एक कार्ड कोट्यवधी कामगारांना देशभरात कुठेही फायदे  मिळवून देईल. तीन, भारतात जगातील तिसरे मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी स्टार्टअप प्रणाली आहे. दर काही आठवड्यांत नवीन युनिकॉर्न उदयाला येत आहेत.

स्वच्छ ऊर्जेकडे परिवर्तन करण्यासाठी, स्रोतांचे परिवर्तन आणि जैवविविधतेचे संरक्षण यासाठी देखील आम्ही डिजिटल तंत्रज्ञांचा वापर करत आहोत. पाच, भारताला भविष्यासाठी तयार करण्याचे पर्यंत मोठ्या प्रमाणावर होत आहेत. 5G आणि 6G सारख्या दूरसंचार तंत्रज्ञान विकासासाठी आम्ही स्थानिक क्षमता वाढविण्यासाठी गुंतवणूक करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, विशेषतः मानव केंद्रित आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापरात भारत एक अग्रणी देश आहे. आम्ही क्लाउड प्लॅटफॉर्म्स आणि क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रात आम्ही क्षमता विकासावर अतिशय भर देत आहोत.

लवचिकता आणि डिजिटल सार्वभौमत्व याची ही गुरुकिल्ली आहे. क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रात आम्ही जागतिक दर्जाचा क्षमता विकास करत आहोत. भारताचा अंतरीक्ष कार्यक्रम आमच्या अर्थव्यवस्था आणि संरक्षणाचा महत्वाचा घटक आहे. या क्षेत्रात आता नवोन्मेष आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. भारत, जगभरातील कॉर्पोरेट क्षेत्राला सायबर सुरक्षा उपाय आणि सेवा पुरवणारे केंद्र बनले आहे. भारताला सायबर सुरक्षेचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी आम्ही आमच्या उद्योग क्षेत्रासोबत एक कृती दल तयार केले आहे. आम्हाला आमचे कौशल्य आणि जागतिक विश्वास याचा फायदा मिळत आहे. आणि आता, आम्ही हार्डवेअरवर लक्ष केंद्रित करत आहोत. महत्वाचा सेमी कंडक्टर उत्पादक बनण्यासाठी आम्ही प्रोत्साहन योजना बनवत आहोत. इलेक्ट्रोनिक्स आणि दूरसंचार क्षेत्रासाठीच्या आमच्या उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना स्थानिक आणि जागतिक उद्योगांना भारतात येण्यास आकर्षित करत आहेत.

मित्रांनो,

आज तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे उत्पादन आहे, डेटा. आम्ही डेटा संरक्षण, गोपनीयता आणि सुरक्षिततेचा एक मजबूत आराखडा तयार केला आहे.आणि, त्याचवेळी आम्ही डेटाचा प्रभावी  आपर लोकांना रोजगार देणारा स्रोत म्हणून ही करतो आहोत. भारताकडे ही दोन्ही कामे लोकशाहीच्या साचात विकसित करण्याचा तसेच हे करतांना वैयक्तिक अधिकारांचे संरक्षण करण्याचा प्रचंड अनुभव आहे

मित्रांनो,

एखादा देश तंत्रज्ञानाचा कसा वापर करतो ते त्याची मूल्ये आणि त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.  भारताची लोकशाही परंपरा प्राचीन आहे; तसेच आपल्या आधुनिक संस्था भक्कम आहेत. जग हे एकच मोठे कुटुंब आहे, यावर आमचा कायम विश्वास होता आणि आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल तंत्रज्ञाच्या मदतीमुळे आज जागतिक डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे.  तसेच  वाय टू के म्हणजे 2000 साली आलेल्या संगणकीय माहितीच्या महापुरातून निर्माण झालेल्या समस्या निस्तरण्यात देखील त्याची मदत झाली. तंत्रज्ञान आणि सेवांचा आपल्या दैनंदिन आयुष्यात होणारा वापर वाढवण्यातही त्याची मदत झाली.

आज आम्ही आमचा कोविन प्लॅटफॉर्म संपूर्ण जगालाच  मोफत देऊ करतो आहोत आणि आम्ही ते 'ओपन सोर्स सॉफ्टवेअर' म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध अशीही तरतूद केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा भारताचा प्रदीर्घ आणि व्यापक अनुभव आणि लोककल्याणकारी धोरण,सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाचेही धोरण याचा वापर विकसनशील देशांना नक्कीच होऊ शकतो. आपण एकत्र काम करून देशांना आणि देशातील लोकांना सक्षम करु शकतो आणि  या शतकातील संधींसाठी आपण त्यांना तयार करु शकतो. आपल्या लोकशाही व्यवस्थेतून प्रतिबिंबित होत असलेल्या संकल्पना आणि मूल्यांच्या आधारावर  या जगाचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने देखील हे महत्वाचे आहे. तसेच, आपली राष्ट्रीय सुरक्षा आणि समृद्धीसाठी देखील हे तेवढेच महत्वाचे आहे.

मित्रांनो ,

म्हणूनच, लोकशाही राष्ट्रांसाठी एकत्र काम करणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यातील तंत्रज्ञानात एकत्रित गुंतवणूक करणे आवश्यक आहे; एक विश्वासार्ह उत्पादन आधारभूत व्यवस्था आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी विकसित करणे आवश्यक आहे; सायबर सुरक्षेबाबतची गुप्तहेर यंत्रणा अधिक सखोल करणे आणि कार्यान्वयात सहकार्य वाढवणे आवश्यक आहे, महत्वाच्या माहितीचा साठा असणाऱ्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे आवश्यक आहे; जनमत पाहिजे तसे वळवण्याच्या प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे, तंत्रज्ञान आणि प्रशासकीय कार्यात आपल्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत एक दर्जा, प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, सीमापार व्यवहारांसाठी आणि देशातही वापरल्या जाणाऱ्या डेटा व्यवस्थेसाठी देखील एक दर्जा/प्रमाण आणि नियम निश्चित करणे आवश्यक आहे, ज्यामुळे, डेटाचे संरक्षण केले जाऊ शकेल. अर्थातच, यात राष्ट्रीय अधिकारांना स्थान दिले गेले पाहिजे, त्याचवेळी व्यापार, गुंतवणूक आणि व्यापक सार्वजनिक हिताला देखील प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. उदाहरणार्थ, क्रिप्टो-करन्सी किंवा बिटकॉईन. सर्व देशांनी याबाबत एकत्रित काम करणे आणि हे डिजिटल आभासी व्यवहार चुकीच्या लोकांच्या हातात पडणार नाही, आणि युवाशक्तीचे भवितव्य बिघडणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो,

आज आपल्यासमोर पर्याय निवडण्याचा ऐतिहासिक क्षण येऊन ठेपला आहे. आपल्यासमोर असलेल्या तंत्रज्ञानाच्या विविध शक्ती या आपल्यासाठी सहकार्याचे साधन बनू शकतात की संघर्षाचे, परस्पर सहकार्याचे की बळजबरी करण्याचे साधन, दबावाचे धोरण की विकासाचे? भारत, ऑस्ट्रेलिया आणि हिंद-प्रशांत प्रदेशातले आपले इतर भागीदार, आणि त्याही पलीकडे, आपल्या सर्वांनी हा विचार करायला हवा, स्वतः आत्मचिंतन करुन यातील पर्याय निवडायला हवा आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पडण्याच्या उत्थानासाठी आम्ही सज्ज आहोत. या दृष्टीने सिडनी संवाद, आपल्या भागीदारीला नवा आकार देण्यासाठी मदत करु शकेल आणि आपल्या देशाच्या आणि एकूणच जगाच्या  सुरक्षित भवितव्याची जबाबदारी पार पाडण्यातही आपल्याला यामुळे मदत मिळेल.

धन्यवाद !

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772929) Visitor Counter : 243