पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ


“स्वातंत्र्योत्तर भारतात, दीर्घ काळापर्यंत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांकडे द्यायला हवे तसे लक्ष दिले गेले नाही आणि त्याकाळी नागरिकांना योग्य उपचारांसाठी धावपळ करावी लागल्यामुळे रुग्णाची परिस्थिती आणि आर्थिक ताण अधिकच वाढत जात असे”

“केंद्रातील तसेच राज्यातील सरकार यांना गरीब, पददलित, नाडलेले, मागास वर्गीय आणि मध्यम वर्गीय यांच्या वेदना समजत आहेत”

“पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक काना-कोपऱ्यात, उपचारांपासून महत्त्वाच्या संशोधनापर्यंतच्या सर्व सुविधांसाठी संपूर्ण परिसंस्था उभारण्यात येईल”

“पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियान हे आरोग्यक्षेत्राच्या विकासासह आत्मनिर्भरतेचे देखील माध्यम आहे”


“काशी शहराचे हृदय होते तसेच आहे, मन देखील तेच आहे, पण शरीर सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत”

“बनारस हिंदू विद्यापीठात आज तंत्रज्ञानापासून आरोग्य क्षेत्रापर्यंत सर्व बाबतीत अभूतपूर्व सुविधा निर्माण केल्या जात आहेत. संपूर्ण देशभरातून युवक मित्र येथे अभ्यासासाठी येत आहेत”

Posted On: 25 OCT 2021 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  25 ऑक्टोबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा प्रारंभ केला. वाराणसीच्या विकासासाठी सुरु करण्यात येणाऱ्या, सुमारे 5200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे देखील त्यांनी उद्‌घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि डॉ. महेंद्रनाथ पांडे, विविध राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या प्रसंगी, उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, कोरोना महामारीविरुद्धच्या लढ्यात देशाने कोविड प्रतिबंधक लसीच्या 100 मात्रा देण्याचा अत्यंत महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. बाबा विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने, गंगामातेच्या अतुल्य गौरवाने, काशी निवासी लोकांच्या अतूट विश्वासाने, सर्वांसाठी मोफत लस पुरविण्याचे हे अभियान यशस्वीपणे प्रगती करत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

स्वातंत्र्योत्तर भारतात, दीर्घ काळापर्यंत आरोग्य सुविधांकडे द्यायला हवे तसे लक्ष दिले गेले नाही आणि त्याकाळी नागरिकांना योग्य उपचारांसाठी धावपळ करावी लागल्यामुळे रुग्णाची परिस्थिती आणि आर्थिक ताण अधिकच वाढत जात असे याबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की अशा परिस्थितीमुळे वैद्यकीय उपचारांबाबत मध्यम वर्ग आणि गरीब वर्गातील लोकांच्या मनात सतत चिंता भरून राही. आपल्या देशात ज्यांची सरकारे दीर्घकाळ सत्तेत होती त्या राज्यकर्त्यांनी देशाच्या आरोग्य यंत्रणेचा सर्वंकष विकास साधण्याऐवजी, या क्षेत्राला सुविधांपासून वंचित ठेवले.

पंतप्रधान आयुष्मान आरोग्य विषयक पायाभूत अभियानाचे उद्दिष्ट हे त्रुटी भरुन काढणे हे होते असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.   देशातील पायाभूत वैद्यकीय सुविधांचे जाळे येत्या चार-पाच वर्षात गावापासून तालुका स्तरापर्यंत बळकट करणे, जिल्हास्तरापासून ते प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत ते मजबूत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या नव्या अभियानाअंतर्गत, सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचे तीन महत्वाचे पैलू आहेत. ज्यायोगे, देशातल्या आरोग्य व्यवस्थेत असलेल्या विविध त्रुटी भरुन काढता येतील. पाहिला पैलू निदान आणि उपचारासाठीच्या विस्तृत सुविधा तयार करण्याशी निगडित आहे. या अंतर्गत, आरोग्य आणि निरामयता केंद्र गावागावात आणी शहरात, सुरु केली जात आहे. जिथे आजारांचे लवकर निदान करण्यासाठीच्या सुविधा असतील. त्याशिवाय, मोफत वैद्यकीय सल्ला, मोफत चाचण्या, मोफत वैद्यकीय सुविधा देखील या केंद्रांवर उपलब्ध असतील. गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी, 35 हजार नवे, क्रिटिकल केअर बेड्स, 600 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध केले जातील आणि, त्यांच्या संदर्भ सेवा, इतर 125 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असतील.

या योजनेचा दुसरा पैलू, आजाराचे निदान करण्यासाठीच्या चाचण्यांच्या प्रयोगशाळांचे जाळे पसरवणे याच्याशी निगडीत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या अभियानाअंतर्गत, निदान आणि आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील. देशातल्या 730 जिल्ह्यांमध्ये, एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा विकसित केल्या जातील आणि तीन हजार तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय सार्वजनिक आरोग्य विभाग सुरु केले जातील. याशिवाय, आजार नियंत्रणासाठी,पाच प्रादेशिक राष्ट्रीय केंद्रे, 20 मेट्रोपोलीटन विभाग आणि 15 बीएसएल प्रयोगशाळा स्थापन केल्या जाऊन हे जाळे अधिक बळकट केले जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

या अभियानाचा तिसरा पैलू सध्याच्या संशोधन संस्थांचे विस्तारीकरण करणे आणि महामारीचे अध्ययन करणे ह्याच्याशी संबंधित आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 80 विषाणूजन्य निदान प्रयोगशाळा आणि संशोधनशाळा अधिक बळकट केल्या जातील, 15 जैवसुरक्षा स्तरीय प्रयोगशाळा कार्यरत केल्या जातील. चार नव्या राष्ट्रीय विषाणूजन्य आजार संशोधन प्रयोगशाळा आणि आरोग्यासाठी राष्ट्रीय संस्था स्थापन केली जाईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण आशियाई विभागासाठी, प्रादेशिक संशोधन मंचाची स्थापना केली जाईल, यामुळेही हे जाळे अधिक बळकट होईल.

याचा अर्थ, आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियान हे आरोग्यविषयक सेवा- ज्यात उपचारांपासून ते  महत्वाच्या संशोधनापर्यंत सर्वांचा समावेश असेल, अशा सुविधा, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवेल. असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी या उपायांच्या रोजगार क्षमतेवर प्रकाश टाकला आणि सांगितले की आरोग्यासोबतच पीएम आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान हे देखील आत्मनिर्भरतेचे एक माध्यम आहे. संपूर्ण आरोग्य सेवा मिळवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. याचा अर्थ आरोग्यसेवा जी सर्वांसाठी परवडणारी आणि सुलभ असेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, समग्र आरोग्यसेवा ही आरोग्याबरोबरच निरोगीपणावर लक्ष केंद्रित करते. स्वच्छ भारत अभियान, जल जीवन अभियान, उज्ज्वला, पोषण अभियान, मिशन इंद्रधनुष यासारख्या योजनांनी करोडो लोकांना रोगापासून वाचवले आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत 2 कोटींहून अधिक गरीब लोकांना मोफत उपचार मिळाले आणि आयुष्मान भारत डिजिटल अभियानाद्वारे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण केले जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आज केंद्रात आणि राज्यात गरीब, दलित, शोषित, मागासलेल्या आणि मध्यमवर्गीयांच्या वेदना समजून घेणारे सरकार आहे. "आम्ही देशातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहोत," असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, उत्तर प्रदेशात ज्या वेगाने नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जात आहेत त्याचा राज्यातील वैद्यकीय जागांवर आणि डॉक्टरांच्या संख्येवर मोठा परिणाम होईल. अधिक जागांमुळे आता गरीबांची मुलेही डॉक्टर होण्याची स्वप्ने पाहू शकतील आणि ते पूर्ण करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.

पवित्र शहर काशीच्या गतकाळातील रयाला गेलेल्या स्थितीविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, शहराच्या पायाभूत सुविधांच्या दयनीय स्थितीमुळे लोकांना शहर सोडावे लागत होते. परिस्थिती बदलली आणि आज काशीचा आत्मा तोच, मन तेच आहे, पण काया सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले, "वाराणसीमध्ये गेल्या 7 वर्षात जे काम केले गेले ते गेल्या अनेक दशकांत झाले नाही."

बनारस हिंदू विद्यापीठाने जागतिक उत्कृष्टतेच्या दिशेने केलेली प्रगती ही गेल्या काही वर्षांमधील काशीच्या महत्त्वाच्या कामगिरीपैकी एक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आज, बनारस हिंदू विद्यापीठात तंत्रज्ञानापासून आरोग्यापर्यंत, अभूतपूर्व सुविधा निर्माण केल्या जात आहेत. देशभरातील तरुण वर्ग इथे अभ्यासासाठी येत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

वाराणसीमध्ये गेल्या 5 वर्षांत उत्पादनात 60 टक्के वाढ आणि खादी आणि इतर कुटीर उद्योग उत्पादनांच्या विक्रीत 90 टक्के वाढ झाल्याबद्दल प्रशंसा करून पंतप्रधानांनी पुन्हा एकदा देशवासियांना स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आणि ‘व्होकल फॉर लोकल’ चे आवाहन केले. ते म्हणाले की, स्थानिक म्हणजे फक्त दिव्यांसारखी काही उत्पादने नव्हे तर देशवासियांच्या मेहनतीचे चीज म्हणून कोणत्याही उत्पादनाला सणासुदीच्या काळात सर्व देशवासीयांच्या प्रोत्साहनाची आणि कायमस्वरूपी ग्राहक जोडण्याची गरज असते.

 

 

JPS/MC/SRT/SC/RA/VJ/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1766319) Visitor Counter : 1087