पंतप्रधान कार्यालय

"परीक्षा पे चर्चा 2021" मध्ये पंतप्रधानांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी केलेला संवाद

Posted On: 07 APR 2021 11:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2021

 

नमस्कार,

नमस्कार, मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहात? तुमची परीक्षेची तयारी अगदी जोरात सुरू असेल, अशी अपेक्षा आहे? ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाची ही पहिली व्हर्चुअल आवृत्ती आहे. तुम्हा सर्वांना कल्पना आहेच, आपण सर्व गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या सावटात आयुष्य व्यतीत करत आहोत आणि त्यामुळेच प्रत्येकालाच काही तरी नवनवीन कल्पनांचा वापर करावा लागत आहे, मला देखील तुम्हा सर्वांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मोह यावेळी टाळावा लागत आहे आणि एका नव्या स्वरुपात तुमच्या समोर यावे लागत आहे.

तुम्हाला प्रत्यक्ष भेटता न येणे, तुमच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहायला न मिळणे, तुमच्या आशाआकांक्षा आणि तुमच्या उत्साहाचा अनुभव घ्यायला न मिळणे ही खरोखरच माझ्या दृष्टीने एक मोठी हानी आहे. पण तरीही परीक्षा तर होणार आहेतच, तुम्ही आहात, मी आहे, परीक्षा आहेत, तर मग आपण परीक्षांविषयीच चर्चा करणे केव्हाही चांगले म्हणून आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत आणि या वर्षी देखील त्यात खंड पडू देणार नाही.

आता आपण आपल्या चर्चेची सुरुवात करत आहोत. यावेळी सुरुवातीला मला आपल्या देशवासीयांना  देखील एक गोष्ट सांगायची आहे आणि पालकांना सांगायची आहे, शिक्षकांना सांगायची आहे. ही ‘परीक्षा पे चर्चा’ आहे पण ही केवळ परीक्षेचीच चर्चा नाही आहे. यामध्ये अनेक प्रकारची चर्चा होऊ शकते. एक हलके फुलके वातावरण निर्माण करायचे आहे, एक नवा आत्मविश्वास निर्माण करायचा आहे आणि जसे तुम्ही घरी बसून गप्पागोष्टी करता, आपसात गप्पा मारता, आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारता, अगदी तशाच प्रकारे आपण देखील आज चर्चा करायची आहे.

 

प्रश्न- 1-A.

एम. पल्लवी, गव्हर्नमेंट हायस्कूल, पोडिली, प्रकासम, आंध्र प्रदेश

नमस्कार माननीय पंतप्रधान सर,( पंतप्रधान मोदीः नमस्कार, नमस्कार) माझे नाव पल्लवी आहे, मी नववी इयत्तेत शिकत आहे. सर आम्हाला नेहमी असे वाटत राहाते की आपल्या अभ्यास व्यवस्थित सुरू आहे, पण जसजशी परीक्षा जवळ येत जाते तसतसा ताण वाढत जाऊन परिस्थिती तणावाची होते. कृपा करून यावर काही तरी उपाय सांगा. धन्यवाद सर.

धन्यवाद पल्लवी, मला असे सांगण्यात आले आहे की अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न आहे.

 

प्रश्न-1-B. -

अर्पण पांडे- ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल स्कूल, मलेशिया

सादर अभिनंदन आदरणीय पंतप्रधान महोदय, माझे नाव अर्पण पांडे आहे, मी मलेशियामधील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल मध्ये 12वी चा विद्यार्थी आहे. मला  माझ्या भावी आयुष्यातील यशाविषयीच्या एका प्रश्नाबाबत तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे आणि याविषयी मला तुम्ही मार्गदर्शन कराल अशी आशा आहे. माझा प्रश्न असा आहे की परीक्षेची तयारी करताना आपल्या मनामध्ये निर्माण होणारी भीती आणि ताण यावर मात कशी करायची? काय होणार, आपल्याला चांगले गुण मिळतील की नाही, चांगले कॉलेज मिळेल की नाही? धन्यवाद

 

उत्तर-

पल्लवी, अर्पण, बघा जेव्हा तुम्ही या भीतीविषयी, दडपणाविषयी बोलता तेव्हा मला देखील भीती वाटू लागते. अहो अशी कोणती गोष्ट आहे जिला आपण घाबरले पाहिजे? आपण पहिल्यांदा परीक्षा देत आहोत का? पूर्वी कधी परीक्षा दिली नाही का? मार्च महिन्यात, एप्रिल महिन्यात परीक्षा असतात हे तुम्हाला माहीत नव्हते का?

सर्व काही माहीत आहे. पूर्वीपासूनच माहीत आहे. एक वर्ष आधीपासून माहीत आहे. अचानक तर आलेली नाही आणि जी अचानक आलेली नाही, तर काही आभाळ कोसळणार नाही.

याचा अर्थ असा झाला की तुम्हाला परीक्षेची भीती नाही आहे. तुम्हाला दुसरीच कसली तरी भीती वाटते आणि ती आहे तरी काय? तुमच्या आजूबाजूला एक प्रकारचे वातावरण तयार करण्यात आले आहे, की ही परीक्षा म्हणजेच सर्व काही आहे, हेच आयुष्य आहे आणि यामुळे संपूर्ण सामाजिक वातावरण, कधी कधी शाळेतील वातावरण देखील, कधी कधी आई वडील देखील, कधी आपले नातेवाईक सुद्धा एक अशा प्रकारचे वातावरण निर्माण करतात की जणू काही खूप मोठी घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहे, एखाद्या मोठ्या संकटातून तुम्हाला वाटचाल करावी लागणार आहे, मी त्या सर्वांना सांगेन, विशेषतः मी पालकांना हे सांगेन, तुम्ही हे सर्व काय करून ठेवले आहे?

मला असे वाटते की ही आपली सर्वात मोठी चूक आहे. आपण गरजेपेक्षा जास्त, अति सावधगिरी बाळगू लागतो. आपण जरा जास्तच विचार करू लागतो. आणि म्हणूनच मला असे वाटते की हा काही आयुष्यातील अखेरचा टप्पा नाही, हे आयुष्य खूप मोठे आहे, त्यात अनेक टप्पे येतात, हा एक लहानसा टप्पा आहे, आपल्याला दबाव निर्माण करायचा नाही आहे, मग ते शिक्षक असोत, विद्यार्थी असोत, कुटुंबीय असोत, मित्र परिवार असो, जर बाहेरचा ताण कमी झाला, तो संपला तर परीक्षेचा ताण कधीच जाणवणार नाही, आत्मविश्वास वाढीला लागेल, दबाव मुक्त होईल आणि कमी होईल आणि बालकांनी घरात तणावरहित वातावरणात वावरले पाहिजे, नेहमी ज्या प्रकारे लहान- मोठ्या हलक्या फुलक्या गप्पा मारायचात त्या सुरू ठेवल्या पाहिजेत.

हे पाहा मित्रांनो, पूर्वी काय व्हायचे, पूर्वी आई- वडील मुलांच्या सहवासात जास्तीत जास्त प्रमाणात असायचे आणि अगदी सहजपणे असायचे. आज जे काही पालक मुलांसोबत असतात त्यावेळी ते जास्त करून करियर, परीक्षा, अभ्यास, पुस्तके, सिलॅबस यातच गुंतलेले असतात. अशा प्रकारे मुलांच्या सोबत राहण्याला मी सहवास म्हणणार नाही आणि यातून त्यांना आपल्या मुलांच्या वास्तविक क्षमतेची ओळख देखील होत नाही. जर आई वडील जास्त प्रमाणात मुलांच्या सहवासात राहिले तर त्यांना बालकांच्या आवडी, निवडी, त्यांचे स्वभाव चांगल्या प्रकारे समजतात आणि त्यांच्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करतात.

आणि त्यामुळे बालकाच्या आत्मविश्वासाची पातळी देखील उंचावते. त्याची क्षमता आई वडीलांच्या लक्षात येते, त्याच्यात असलेल्या कमतरता लक्षात येतात. त्यामुळे आई वडिलांच्या हे लक्षात येते की यावेळी त्याच्यातील हा दोष बाजूला सारला पाहिजे आणि त्याच्यात असलेल्या या सामर्थ्याला जास्तीत जास्त बळ दिले पाहिजे.

पण आजकाल काही आई- वडील कामात इतके व्यग्र आहेत, इतके व्यग्र आहेत की त्यांना आपल्या मुलांसोबत वास्तविक स्वरुपात राहण्यासाठी वेळ मिळत नाही. याचा परिणाम काय होतो? आज बालकाची क्षमता माहीत करून घेण्यासाठी पालकांना परीक्षेच्या निकालाची पुस्तिका पाहावी लागते  आणि त्यामुळेच बालकांची आकलनक्षमता देखील परीक्षेच्या निकालापुरतीच मर्यादित राहिली आहे. परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या पलीकडे देखील बालकांमध्ये अशा अनेक क्षमता असतात ज्या पालकांच्या कधी लक्षात येतच नाहीत.

मित्रांनो, आपल्याकडे परीक्षेसाठी एक शब्द आहे ‘ कसोटी’. म्हणजेच स्वतःचा कस तपासणे, परीक्षा म्हणजे शेवटची संधी आहे, असे काहीही नाही. उलट परीक्षा म्हणजे दीर्घ आयुष्य जगण्यासाठी आपल्या स्वतःच्या क्षमतेची चाचपणी करण्याची अतिशय उत्तम संधी आहे.

ज्यावेळी आपण परीक्षेलाच आयुष्यातील स्वप्नांचा शेवट मानू लागतो, जीवनमरणाचा प्रश्न मानू लागतो तेव्हा खरी समस्या निर्माण होते. प्रत्यक्षात परीक्षा आयुष्य घडवण्याची एक संधी आहे.  ही संधी आपण त्या स्वरुपात स्वीकारली पाहिजे. प्रत्यक्षात आपण स्वतःला कसोटीवर पारखून पाहण्याच्या संधी शोधत राहिले पाहिजे. जेणेकरून आपण आणखी चांगली कामगिरी करू शकू, त्यामुळे आपण पळ काढता कामा नये.

चला मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया.

 

प्रश्न- 2-A.      

कु. पुनियो सुन्या- विवेकानंद केंद्र विद्यालय, पापुम्पारे, अरुणाचल प्रदेश

माननीय पंतप्रधान महोदय, नमस्कार(पंतप्रधान मोदीः नमस्कार) माझे नाव पुनियो सुन्या आहे, मी अकरावीत शिकणारी विद्यार्थ्यांनी आहे. माझ्या शाळेचे नाव विवेकानंद केंद्र विद्यालय, जिल्हा पापुम्पारे, राज्य अरुणाचल प्रदेश आहे.

माननीय पंतप्रधान महोदय असे काही विषय आहेत आणि काही धडे आहेत, ज्यांच्याबाबत मी चिंताग्रस्त असते आणि त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण कितीही प्रयत्न केले तरी मला त्यांचा अभ्यास करायला जमत नाही. कदाचित मला त्यांची जास्त भीती वाटत असल्यामुळेच कदाचित असे होत असावे. सर ही परिस्थिती कशी सुधारता येईल? धन्यवाद सर.

 

चला आता आंध्र प्रदेशातून मलेशिया आणि मलेशियातून आपण आता अरुणाचल प्रदेशामध्ये पोहोचलो आहोत आणि मला असे सांगण्यात आले आहे की अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न आहे. 

 

प्रश्न- 2-B

कु. विनिता गर्ग, एसआरडीएव्ही पब्लिक स्कूल, दयानंद विहार, दिल्ली

(पंतप्रधान मोदीः नमस्कार!) माननीय पंतप्रधान महोदय, नमस्कार, माझे नाव विनिता गर्ग आहे आणि मी एसआरडीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहे. माझा प्रश्न आहे की अनेक विषय असे आहेत ज्यांची भीती विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली असते. त्यामुळे हे विद्यार्थी त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. ही बाब इतिहास किंवा गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना चांगल्या प्रकारे माहीत असेल. शिक्षकाच्या दृष्टीकोनातून ही परिस्थिती अधिक चांगली करण्यासाठी आपल्याला काय करता येईल?

 

उत्तरः

हा एक वेगळ्याच प्रकारचा विषय माझ्या समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करण्याचा  आणि शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. तुम्ही दोघांनी कोणत्या तरी विशिष्ट विषय किंवा धड्यांच्या भीतीचा उल्लेख केला आहे. पण एक लक्षात घ्या की जगात अशा परिस्थितीचा सामना करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. वस्तुस्थिती ही आहे की जगात एकही माणूस असा नाही ज्याच्यासाठी ही बाब लागू होत नाही.

असा विचार करा की तुमच्याकडे अतिशय आकर्षक असे 5-6 शर्ट आहेत. पण तुम्ही पाहिले असेल की एक दोन शर्ट तुमच्या इतके आवडीचे असतात की तुम्ही ते वारंवार परिधान करत असता. याचा अर्थ असा नाही की बाकीचे शर्ट चांगले नाहीत, त्यांचे फिटिंग ठीक नाही. असे अजिबात नसते. पण ते दोन शर्ट इतके आवडते असतात की तुम्ही वारंवार तेच वापरत राहाता आणि कधी कधी तर त्यामुळे तुमच्या आईवडिलांना देखील राग येतो आणि ते तुम्हाला विचारत राहातात की किती वेळा ते वापरत राहाणार? आता दोन दिवसांपूर्वीच तर घातला होता ना.

पसंती- नापसंती हा मनुष्य स्वभाव आहे आणि कधी- कधी पसंतीशीच जवळीक निर्माण होते. आता यात भीतीचे, दुविधेचे कारण काय, असे काय आहे की ज्याची आपल्याला भीती वाटली पाहिजे.

खरेतर काय होते की ज्यावेळी तुम्हाला काही गोष्टी जास्त चांगल्या वाटू लागतात, त्यावेळी तुम्ही त्यांच्यासोबत खूपच चांगल्या प्रकारे रुळता, तुम्हाला त्या खूप चांगल्या वाटू लागतात. पण ज्या गोष्टींशी तुमचे जुळत नाही, त्यांच्यासोबत जुळवून घेण्याच्या ताणामध्ये तुम्ही तुमची 80 टक्के उर्जा खर्च करू लागता. म्हणूनच मी विद्यार्थ्यांना हेच सांगेन की तुम्ही तुमच्यातील उर्जेची समप्रमाणात विभागणी केली पाहिजे. सर्व विषयांमध्ये समसमान. तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी दोन तास असतील तर त्या दोन तासांमध्ये प्रत्येक विषयाचा समान भावनेने अभ्यास करा. आपल्या वेळेची समान विभागणी करा.

मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की शिक्षक, आई-वडील आपल्याला शिकवत असतात हे जे सोपे आहे ते पहिल्यांदा सोडव. सर्वसाधारणपणे हेच सांगितले जाते आणि परीक्षेत तर विशेष करून वारंवार सांगितले जाते की जे सोपे आहे ते आधी सोडवा. पण मला असे वाटते की हा सल्ला गरजेचा नाही आणि तो उपयुक्त देखील नाही. मी याकडे जरा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहातो.

माझे असे सांगणे आहे की जर अभ्यासाचा विचार करायचा असेल तर जे कठीण आहे ते सर्वात आधी करायला घ्या. तुमचे मन ताजेतवाने आहे, तुम्ही स्वतः ताजेतवाने आहात तर मग तो सोडवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा कठीण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तो आणखी सोपा वाटू लागेल. याविषयीचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, ज्यावेळी पंतप्रधान झालो, त्यावेळी मला देखील खूप अभ्यास करावा लागतो, बरेच काही शिकावे लागते, अनेकांकडून शिकावे लागते, अनेक गोष्टींची माहिती घ्यावी लागते. अशा वेळी मी काय करायचो जी गोष्ट कठीण असेल, ज्याबाबतचे निर्णय काहीसे गंभीर असायचे. त्याबाबतची सुरुवात मी सकाळी करायचो. ज्या गोष्टी कठीण असतील त्या सकाळी सुरू करायची मला आवड आहे. अतिशय कठिणात कठीण गोष्टी घेऊन माझे अधिकारी माझ्या समोर येतात. त्यांना माहीत असते की त्यावेळी माझा एक वेगळा मूड असतो, मी अतिशय जलदगतीने एखादी गोष्ट लक्षात घेतो, निर्णय घेण्याच्या दिशेने पुढे होतो. मी स्वतःचा एक नियम बनवला आहे, प्रयत्न केला आहे. आणि ज्या सोप्या गोष्टी असतात त्यांना दिवसभरच्या थकव्यानंतर जेव्हा रात्र होते त्यावेळी करतो, आता मेंदूला जास्त ताण देण्याची गरज नाही त्यामुळे चुका होण्याची शक्यता नाही. त्या गोष्टी मी रात्री उशिरा करतो. पण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा पुन्हा कठीण गोष्टींचा सामना करण्यासाठी बाहेर पडतो.

मित्रांनो आणखी एक गोष्ट आपल्याला आपल्या स्वतःकडून शिकणे गरजेचे आहे. तुम्ही पाहिले असेल की जे लोक आयुष्यात अतिशय यशस्वी होतात ते प्रत्येक विषयात पारंगत असतातच असे नाही. पण कोणत्या तरी एका विषयावर त्यांचे कमालीचे प्रभुत्व असते. 

आता लतादीदींचेच उदाहरण घ्या. लता मंगेशकर यांची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या ओठावर त्यांचे नाव आहे. पण जर त्यांना कोणी सांगितले की तुम्ही आमच्या वर्गात या आणि आम्हाला भूगोल शिकवा. तर त्यावेळी कदाचित असे होऊ शकते की त्यांना शिकवायला जमणार नाही किंवा कदाचित शिकवायला जमेल. मला नाही माहीत त्यांना शिकवायला जमेल की नाही जमणार. पण लताजी भूगोलात  पारंगत असतील किंवा नसतील पण त्यांनी संगीताच्या विश्वात जे काही केले आहे, या एकाच विषयावर त्यांनी आपले जीवन खर्ची घातले आहे, त्यामुळे त्या प्रत्येकासाठी प्रेरणेचा स्रोत बनल्या आहेत आणि म्हणूनच जरी तुम्हाला काही विषय अवघड वाटत असले तरी तुमच्या आयुष्यातील ही काही त्रुटी म्हणता येणार नाही. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कठीण वाटणाऱ्या विषयांपासून तुम्ही पळ काढू  नका.

दुसरीकडे शिक्षकांना मी असा सल्ला देईन की त्यांनी विद्यार्थ्यांशी वेळेच्या व्यवस्थापनाच्या विषयात, त्याच्या विविध प्रकारच्या पद्धतींसंदर्भात, अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन कधी तरी त्यांच्याशी चर्चा करा. त्यांना मार्गदर्शन करा. विद्यार्थ्यांना रागावण्याऐवजी त्यांना मार्गदर्शन करा. विद्यार्थ्यांना रागावण्यामुळे त्यांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. प्रोत्साहन देण्यामुळे  एकीकृत ताकदीच्या रुपात त्याचे रुपांतर होते. काही गोष्टी सार्वजनिक पद्धतीने नक्कीच सांगितल्या पाहिजेत जेणेकरून सर्वांचे प्रबोधन होते. पण बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्यावेळी  एका एका बालकाला बोलावून त्याच्या डोक्यावर हात फिरवून अतिशय प्रेमाने त्याला सांगितले की बाळ तू खूप चांगले काम करत आहेस, तुझ्यामध्ये खूप चांगली क्षमता आहे असे त्याला सांगत राहिले तर तुम्ही पाहा तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. खूपच उपयोग होईल.

एक काम करा. तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला त्यावेळी कठीण वाटल्या होत्या आणि आज तुम्ही अतिशय सहजतेने त्या करू शकता. अशा काही कामांची यादी बनवा. जसे तुम्हाला कधी काळी सायकल चालवणे कठीण वाटले असेल पण आता तीच गोष्ट तुम्ही अगदी सहजपणे करू शकत असाल. कधी पोहण्याचा विषय निघाला तर तुम्हाला त्याची भीती वाटली असेल. पाण्यात उतरण्याची देखील भीती वाटली असेल. पण आता तुम्ही चांगल्या प्रकारे पोहायला शिकला असाल. जे कठीण वाटले होते. त्यांना तुम्ही रुपांतरित केले. तुमच्या आयुष्यात अशा शेकडो गोष्टी असतील, त्या जरा आठवून तुम्ही त्या कागदावर लिहिल्या तर तुम्हाला कोणालाही कठीण वाटणारा प्रश्न मला विचारावा लागणार नाही. कारण कोणतीही गोष्ट तुम्हाला कठीण वाटणार नाही. माझ्यावर एकदा विश्वास ठेवून पाहा.

 

प्रश्न-3

नील अनंत, के एम- श्री अब्राहम लिंग्डम विवेकानंद केंद्र विद्यालय मॅट्रिक. कन्याकुमारी, तामिळनाडू

माननीय पंतप्रधान महोदय, वणक्कम( पंतप्रधान मोदीः वणक्कम वणक्कम) मी श्री अब्राहम किंग्डम विवेकानंद मॅट्रिक कन्याकुमारी या संस्थेत बाराव्या इयत्तेत शिकत आहे. माननीय महोदय, या महामारीच्या काळात ऑनलाईन राहावे लागत असल्याने आम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मोकळा वेळ मिळत आहे. या वेळेचा आम्ही कशा प्रकारे सदुपयोग करू शकतो याविषयी कृपया मार्गदर्शन करा. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो.  

 

उत्तर-

वणक्कम! परीक्षेच्या काळात तुम्ही मोकळ्या वेळेचा उपयोग करण्याबाबत बोलत आहात ही गोष्ट तुमच्या आईवडिलांना समजली तर काय होईल त्याचा विचार करा. असो तरी देखील मला हा प्रश्न खूप आवडला की परीक्षेच्या काळात देखील तुम्ही मोकळ्या वेळेवर लक्ष देत आहात, मोकळ्या वेळेवर चर्चा करत आहात. मित्रांनो, मोकळ्या वेळेला, मोकळा वेळ समजू नका तो एक खजिना आहे खजिना, रिकामा वेळ मिळणे म्हणजे अहोभाग्य आहे, रिकामा वेळ म्हणजे एक संधी आहे. तुमच्या दिनचर्येमध्ये मोकळा वेळ असलाच पाहिजे नाहीतर आयुष्य एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे होऊन जाईल.

 

फुरसतीचा वेळ दोन प्रकारचा असू शकतो-

एक म्हणजे आपल्याला सकाळपासूनच माहित असते की  आज 3 ते 4 वाजेपर्यंत आपल्याला मोकळा वेळ आहे, किंवा येत्या रविवारी आपल्याला अर्धा दिवस मोकळा वेळ आहे किंवा चार तारखेला सुट्टी आहे, दुपारपर्यंत आपल्याला काही काम नाही, हे आपल्याला माहित असते.दुसरा मोकळा वेळ असा ज्याबाबत आपल्याला अगदी शेवटच्या क्षणी कळते.आपल्याला जर आधीपासूनच माहित असते की आज आपल्याला या वेळेत काम नाही तर आपण आपल्या आई-वडिलांना, भाऊ-बहिणीला सांगितले असते की मी आपल्याला मदत करेन.आपले काय काम आहे, आपण काय करत आहात, मी काही मदत करू शकतो का ?

दुसरे  म्हणजे आपण लक्षात घ्या की आपल्याला आनंद देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत ?

शब्द थोडा बोजड आहे -  स्वान्त सुखाय. ज्यातून आपल्याला सुख वाटते, आपल्याला आनंद मिळतो,आपले मन रमते, अशा गोष्टी  आपण करू शकता. आता आपण मला विचारले आहे तर मी पण विचार करत आहे की मला काय करायला आवडेल.मी माझी दिनचर्या लक्षात घेतली आणि   मला थोडी फुरसत मिळाली आणि झोपाळा असेल तर मला वाटते की थोडा वेळ झोपाळ्यावर बसू या. खूप दमलो आहे आणि पाच मिनिटाचा वेळ मिळाला तरी किंवा काही काम करत असलो तरीही थोडा वेळ मिळाला आणि  झोपाळ्यावर बसलो की माझे मन  प्रफुल्लीत होते.

जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो तेव्हा आपल्याला त्याचे मोल कळले पाहिजे. म्हणूनच आपले जीवन असे असले पाहिजे की आपल्याला मोकळा वेळ प्राप्त होईल तेव्हा आपल्याला तो सर्वात आनंद देईल.

इथे हे ही लक्षात घेतले पाहिजे की रिकाम्या वेळेत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, नाहीतर सगळा वेळ या गोष्टीतच जायचा आणि  आपल्या लक्षातही यायचे नाही, शेवटी आपण ताजेतवाने होण्या ऐवजी थकून जायचो, कंटाळून जायचो. 

एकीकडे मला वाटते की रिकाम्या वेळेत आपण आपली जिज्ञासा वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी करू शकतो, ज्या फलदायी ठरतील, यावर विचार करायला हवा. आपली आई किंवा बाबा स्वयंपाक करत असतील, त्यांच्या कामाचे निरीक्षण करा.नव्या-नव्या बाबी समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा परिणाम थेट दिसत नाही पण जीवनावर त्याचा सखोल परिणाम होत असतो.

मोकळ्या वेळेचा आणखी एक उत्तम उपयोग होऊ शकतो. आपण अशा गोष्टी करा ज्यातून आपल्याला व्यक्त होता येईल, आपल्या आगळेपणाला वाव मिळेल.  

आपल्या व्यक्तित्वाशी जोडलेले राहू. यासाठी अनेक प्रकार आहेत आणि आपल्यालाही ते माहित आहेत. खेळ आहेत,संगीत आहे, लेखन, चित्रकला,कथा लेखन आहे आपण खूप काही करू शकता.

आपले विचार, भावना व्यक्त करण्यासाठी एक सृजनात्मक संधी द्या. ज्ञानाच्या कक्षा काही वेळा, ते आपल्याला उपलब्ध आहे, आपल्या आजूबाजूला आहे, तिथपर्यंत सीमित असतात, मात्र सृजनशीलतेचा पल्ला ज्ञानापेक्षाही आपल्याला खूप दूरवर नेऊ शकतो. खूप व्यापक कक्षेत घेऊन जाऊ शकतो.  सृजनशीलता आपल्याला अशा क्षेत्रात नेऊ शकते जिथे याआधी कोणीही पोहोचले नाही, ‘जे न देखे रवी, ते पाहे कवी’, अशा अर्थाचे एक वाक्य आहे, ही सृजनशीलतेची तर बाब आहे.

 

प्रश्न 4 ए –

आशय केकात्पुरे – बेंगळूरू, कर्नाटक

नमस्ते, आदरणीय पंतप्रधान, सर, मी आशय केकात्पुरे,बेंगळूरूहून, मुलांना उत्तम मुल्ये शिकवण्यासाठी कोणती उत्तम पद्धत आहे असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद.

मला एक प्रश्न आला आहे, तो नमो ऐप वर आला आहे. त्याचे दृश्य चित्रण माझ्याकडे नाही मात्र मला तो प्रश्न चांगला वाटला, म्हणूनच मला वाटते की मी आपणा सर्वाना तो सांगावा. पाटणा इथून प्रश्न आहे, प्रवीण कुमार यांनी विचारला आहे,

 

प्रश्न 4 बी –

प्रवीण कुमार, पाटणा, बिहार

सर, आजच्या काळात, मुलांना मोठे करणे, त्यांना वाढवणे हे आई-वडिलांना थोडे कठीण झाले आहे कारण आजचा काळ आणि आजकालची मुले. अशामध्ये आमच्या मुलांचे आचरण,सवयी आणि चरित्र उत्तमच राहण्याची  आम्ही खातर जमा कशी करायची ? 

 

उत्तर-

प्रविणकुमार, एक जागरूक पिता या नात्याने कदाचित आपण मला हा प्रश्न विचारला आहात. माझ्यासाठी अतिशय कठीण प्रश्न आहे. मी तर म्हणेन आपण स्वयं चिंतन करावे, आत्म चिंतन करावे. आयुष्य जगण्यासाठी आपण जी पद्धती निवडली आहे, आपल्याला जसे हवे तसेच जीवन आपल्या मुलांनी जगावे, त्यात थोडा जरी बदल झाला तरी अधोगती झाली, मुल्यांचा ऱ्हास झाला असे आपल्याला वाटते, असे तर नाही ना ?

मला आठवतंय की स्टार्ट अपशी संबंधित युवकांसमवेत मी एक कार्यक्रम केला होता. बंगालमधली एक कन्या, जिने आपले करिअर सोडून स्टार्ट अप सुरु केला होता तिने आपले अनुभव सांगितले. ते अनुभव मला स्मरतात. त्या मुलीने सांगितले होते, मी आपली नोकरी सोडली, करिअर सोडली आणि स्टार्ट अप सुरु केला, माझ्या आईला जेव्हा हे समजले तेव्हा आई लगेच म्हणाली, सर्वनाश ! म्हणजे आईला इतका धक्का बसला, मात्र  ती मुलगी स्टार्ट अपमध्ये खूपच यशस्वी झाली.

आपण लक्षात घेतले पाहिजे की आपण आपल्या भाव विश्वात आपल्या मुलांना जखडून ठेवण्याचा  प्रयत्न तर करत नाही ना ? आणि म्हणूनच आपले कुटुंब, आपली परंपरा,मुलभूत मुल्ये यावर कसा भर द्यावा, हे आपण ओळखले पाहिजे.

जनसेवा हीच ईश्वर सेवा असे आपण म्हणतो. हे आपल्या  शास्त्रांमध्ये मूल्य म्हणून आहे. मात्र आपल्या घरात पूजा-पाठ होतात, आपण धार्मिक आहोत हे जगाला दिसते, मात्र जनसेवेत आपण कधी कुठे दिसत नाही. आपला पाल्य हा विरोधाभास जेव्हा पाहतो, तेव्हा त्याच्या  मनात गोंधळ, संघर्ष सुरु होतो. मनात प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्न निर्माण होणेही स्वाभाविकच आहे.

अशाच प्रकारे प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा वास आहे, असे आपले मूल्य आहे. आपणा सर्वाना याची शिकवण दिली गेली आहे, आपल्या जीवनात हे मूल्य म्हणून प्रस्थापित झाले आहे, प्रत्येक जीवात परमात्म्याचा वास असतो ही आपली विचार धारणा आहे. मात्र आपल्या घरी जे काम करायला येतात,केर-लादी करायला येतात, लिफ्ट चालवणारा आहे, मुलांना शाळेत सोडायला जाणारा रिक्षा चालक आहे, आपण कधी त्यांच्या सुख-दुःखाची चिंता किंवा चर्चा केली आहे का ?  त्यांच्या कुटुंबात कोणाला कोरोना तर झाला नाही ना, याची विचारपूस आपण केली आहे का ? आपण ज्या गावातून आलो आहोत त्या गावात सगळे ठीक आहे ना ? हा प्रश्न आपण विचारला आहे का? आपण असे करत असाल तर आपल्या मुलांना मुल्ये शिकवावी लागत नाहीत. 

मी आपल्याबाबत शंका उपस्थित करत नाहीतर एक सर्व सामान्य व्यवहाराची बाब सांगत आहे. काही लोक खरेच असे करत नाहीत. मुलाचा वाढदिवस असेल तर खूप तयारी करायची असते. खूप जण, आपल्या घरी काम करणाऱ्या लोकांना सांगतात, जे काही काम करायचे आहे ते पाच वाजेपर्यंत पूर्ण करा, सहा वाजल्यापासून पाहुणे यायला सुरवात होईल तेव्हा तुम्ही पण आमच्या पाहुण्यांप्रमाणे तयार होऊन आपापल्या कुटुंबा बरोबर या. आपण पहा, आपण त्यांना काय सांगतो? आज घरात पाहुणे येणार आहेत, उशिरा पर्यंत थांबायला लागेल,. असे सांगायच्या ऐवजी आपण काय सांगतो ?  खूप काम आहे, घरी सांगून या, की उशिरा येईन म्हणून. म्हणजे  ते मूल  हे पाहत असते की घरात इतका मोठा कार्यक्रम आहे मात्र माझ्यासाठी अहोरात्र काम करणारे आहेत ते यात सहभागी नाहीत. ते पाहूनच मुलाच्या मनात द्वंद्व सुरु होते.

मी आपल्याला आणखी एक उदाहरण देतो. आपण म्हणतो, मुलगा-मुलगी एक समान. त्यांच्यात भेद भाव नाही हे आपले मूल्य आहे. आपल्याकडे देवत्वाच्या रुपात ज्या कल्पना केल्या आहेत त्यामध्ये स्त्री रुपी देवाचेही तितकेच महत्व आहे. मात्र आपल्या घरी मुलगा आणि मुलगी यामध्ये कळत-नकळत जी वागणूक दिली जाते, त्यात असमानता असते. त्यानंतर तो मुलगा जेव्हा समाज जीवनात वावरतो, तेव्हा त्याच्या वागण्यातून स्त्री समानतेबाबत काही त्रुटी राहण्याची शक्यता निर्माण होते. 

कुटुंबाचे संस्कार उत्तम असतील तर वाईटपणा वरचढ ठरत नाही.  थोडाफार  फरक असतो. मुलगा, मुलगी यांच्या संदर्भात काही ना काही त्रुटी राहून जाते. म्हणूनच आपण जे भाव विश्व तयार केले आहे, ते जेव्हा व्यवहाराच्या कसोटीवर खरे ठरत नाही तेव्हा मुलांच्या मनात द्वंद्व निर्माण होते. म्हणूनच मुल्ये कधीही लादण्याचा प्रयत्न करू नका. मुल्ये आचरणात आणून त्यातून प्रेरणा देण्याचा प्रयत्न करा. 

खरे तर मुले स्मार्ट असतात. आपण जे सांगाल ते ती करतील किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. मात्र आपण जे करत आहात त्याचे ते बारकाईने निरीक्षण करत असतात आणि तसेच करण्याकडे त्यांचा कल राहण्याची शक्यता खूपच असते. या मूल्यांशी आपला इतिहास, पुराण,आपल्या पूर्वजांच्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण सहजतेने जोडतो तेव्हा मुलानाही प्रेरणा मिळेल. आचरणात आणणेही सुलभ होईल.

 

प्रश्न- 5.

प्रतिभा गुप्ता, लुधियाना,पंजाब 

नमस्कार सर, मी प्रतिभा गुप्ता, कुंदन विद्या मंदिर लुधियाना मधून,

सर, आपल्याला एक प्रश्न मला विचारायचा आहे की काम करून घेण्यासाठी आम्हाला नेहमी मुलांच्या पाठीमागे लागावे लागते.आम्ही त्यांना स्वयंस्फूर्त कसे करू शकतो ? ज्यायोगे ते आपली कामे स्वतःच करतील. धन्यवाद.

 

उत्तर-

आपण वाईट वाटून घेणार नसाल तर या विषयात माझे मत आपल्यापेक्षा वेगळे आहे. मुलांच्या पाठीमागे धावावे लागते कारण त्यांचा वेग आपल्यापेक्षा जास्त आहे. मुलांना शिकवण्याची, सांगण्याची, संस्कार देण्याची जबाबदारी सर्व कुटुंबाची आहे हे खरे आहे. मात्र अनेकदा मोठे झाल्यावरही आपल्यालाही जरा मुल्यांकन करायला हवे. आपण एक साचा तयार करतो आणि त्यात मुलांना घालून त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. समस्या तिथूनच सुरु होते. आपण त्याला आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतिक मानून घेतो. अनेकदा आई-वडील आपल्या मनात काही लक्ष्य ठरवतात, काही मापदंड   तयार करतात आणि काही स्वप्नेही बाळगतात, मग आपली स्वप्ने, आपली लक्ष्ये साध्य करण्याचे ओझे मुलांवर टाकतात. आपण आपल्या लक्ष्यासाठी, आपल्या मुलांना, माफ करा आपल्याला हा शब्द कदाचित कठोर वाटेल पण कळत-नकळत, साधन मानु लागतो. आपण त्यांना या दिशेने आणण्यासाठी जेव्हा अयशस्वी ठरतो तेव्हा म्हणू लागतो की मुलांमध्ये प्रेरणा आणि स्फूर्ती यांची उणीव आहे.

कोणालाही प्रेरित करण्यामधला पहिला भाग आहे तो म्हणजे- प्रशिक्षण. योग्य प्रशिक्षण. एकदा मुलाचे मन प्रशिक्षित झाले की  त्यानंतर प्रेरणा आणि स्फूर्तीचा काळ सुरु होईल. प्रशिक्षणाची अनेक माध्यमे, अनेक प्रकार असू शकतात.

उत्तम पुस्तके,उत्तम चित्रपट, उत्तम कथा,उत्तम कविता, म्हणी किंवा उत्तम अनुभव ! ही सर्व एका प्रकारे प्रशिक्षणाची माध्यमेच आहेत. आपल्या मुलाने सकाळी उठून वाचन करावे असे आपल्याला वाटते,आपण त्याला सांगता, ओरडताही, मात्र आपल्याला यश मिळत नाही. मात्र आपल्या घरात कधी अशा पुस्तकाची चर्चा झाली आहे का, ज्यामध्ये सकाळी उठण्याचे फायदे अप्रत्यक्ष सांगितले आहेत. आपल्या कडे आध्यात्मिक जगतातल्या लोकांचा दिवस ब्राह्म मुहूर्तावरच सुरु होतो.

दुसरीकडे आजकाल 5AM क्लब चीही चर्चा होते. आपण अशा एखाद्या पुस्तकावर चर्चा केली आहे का किंवा असा चित्रपट किंवा माहितीपट पाहिला आहे का ज्यामध्ये यावर वैज्ञानिक पद्धतीने तर्क संगत पद्धतीने आणि भावना लक्षात घेऊन सांगितले आहे ? एकदा हे करून पहा, सकाळी उठण्याचे मुलाचे प्रशिक्षण आपोआपच होईल.एकदा मनाला शिकवण मिळाली, सकाळी उठण्याचे काय फायदे आहेत हे मुलाला समजले की   त्याला स्वतःच प्रेरणा मिळेल. हीच तर  वातावरण निर्मिती आहे, ज्याची घरांना सर्वात जास्त गरज आहे.

आपल्या मुलाचे लहानपण आठवा, जेव्हा आपण त्याला उचलून  खांद्यावर घेत होतो, आपल्या खिशात पेन असेल किंवा आपण चष्मा लावला असेल तर ते मूल आपला चष्मा  ओढू लागल्यावर आपण काय करत होतो ? चष्मा परत घ्यायचा प्रयत्न करू लागताच मूल रडायला लागते किंवा पेन परत घ्यायचा प्रयत्न करू लागताच मूल रडायला लागते. अशा वेळी समजूतदार आई-वडील काय करतात ? एक मोठा चेंडू घेऊन त्याच्या समोर येतात.मूल काय करते ? तर चष्मा सोडून, पेन सोडून न रडता मोठा चेंडू खेळायला घेते. आपण सहजपणे त्यावर उपाय शोधून काढतो. आपण त्याचे मन दुसरीकडे वळवून त्याच्या आवडीची दुसरी चांगली वस्तू देऊन त्याला प्रेरित करत होतात.याआधी  मूल लहान असताना आपण जे काम केले आहे ते आपण आताही करू शकता.  

आपण ऐकले असेल ‘ एका दिव्याने दुसरा दिवा उजळला’ आपले मूल परप्रकाशित असता कामा नये. आपले मूल स्वयं प्रकाशित असले पाहिजे. आपल्या मुलात आपण जे सामर्थ्य आणि प्रकाश आपण पाहू इच्छितो, तो त्याच्या अंतरातून आला असला पाहिजे. आपल्या जागृत आणि सक्रीय प्रयत्नातून हे शक्य आहे, आपण आपल्या कृतीमध्ये जे बदल दर्शवाल त्याचे बारकाईने निरीक्षण मूल करेल.

इथे आणखी एका बाबीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. मुलांच्या मनात कधीही भीती निर्माण करून, असे झाले तर असे होईल, अशी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. एका प्रकारे ही पद्धत सोपी वाटते. मात्र या प्रकाराने एक प्रकारची नकारात्मक शक्यता वाढीला लागते. आपण निर्माण केलेला भीतीचा बागुलबुवा संपला की मुलाची प्रेरणाही नष्ट होते. म्हणूनच सकारात्मक प्रेरणेसह वेळो-वेळी  सकारात्मक सबलीकरणावर भर देत राहिला पाहिजे.

प्रेरणेसाठी मुलांकरिता जो मंत्र आहे तो एक प्रकारे आपणा सर्वांसाठी आहे. संपूर्ण मानव जगतासाठी आहे.

 

प्रश्न 6- ए-

तनय, विदेशी विद्यार्थी, सामिया इंडियन मॉडेल स्कूल कुवेत

नमस्ते, पंतप्रधान सर,  (मोदीजी : नमस्ते) माझे नाव तनय आहे.मी  सामिया इंडियन मॉडेल स्कूल कुवेतचा विद्यार्थी आहे. सर मला प्रश्न विचारायचा आहे की आयुष्याच्या लढाईसाठी स्वतःला कसे सज्ज करायचे ? धन्यवाद सर.

 

प्रश्न 6 बी

अश्रफ खान- मसुरी, उत्तराखंड 

नमो ऐपवर, उत्तराखंड मधल्या मसुरी इथल्या अश्रफ खान लिहितात  सर, आम्ही जेव्हा मोठ्या भावंडांशी किंवा मित्रांशी बोलतो तेव्हा ते म्हणतात की शाळेत तुम्ही जीवन पाहिलेच कुठे आहे ?  जीवनाची खरी परीक्षा तर शाळेतून बाहेर पडल्यानंतरच होते. माझा प्रश्न असा आहे की भविष्यातल्या आव्हानांसाठी स्वतःला कसे सज्ज राखायचे ? 

 

उत्तर-

तनय, कुवेत मधून आपण माझ्याशी बोलत आहात, मात्र तनय हे कोणाच्या लक्षात आले आहे का की तुमचा आवाज ही दैवी देणगी आहे. तुमचे आई-वडील, मित्रपरिवार, शिक्षक यांनी आपल्याला हे सांगितले आहे का ? आपले लक्ष याकडे गेले आहे का ? आपला प्रश्न ऐकल्यानंतर, भले रेकॉर्डिंग आहे, मात्र आपला वैशिष्ट्यपूर्ण आवाज परमात्म्याची देणगी आहे असे मी मानतो. हा आपला मोठा वारसा ठरू शकतो. मी तनयच्या  आवाजाकडे वळलो, आपण जो प्रश्न विचारला आहे.. 

पहिली गोष्ट म्हणजे जे लोक आपल्याला हे सांगत आहेत, त्यांच्या सांगण्याची पद्धत भले आपल्याला सल्ला देण्याची असो, मात्र मनात डोकावून पाहिले तर ते स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न करत आहेत. किंवा आपले अपयश यासाठी मोठे करून दाखवत आहेत की त्यांना एक पळवाट मिळू शकेल. म्हणूनच ते दाखवतात की त्यांच्या समोर मोठ-मोठी आव्हाने आहेत. 

या विषयात माझा सरळ सोपा मंत्र आहे-  एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या.

हो, हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे की दहावी किंवा बारावीनंतर काय ? प्रत्येक मुलाच्या मनात हा प्रश्न असतो आणि मी तो मी नाकारू शकत नाही किंवा दुसरे कोणीही नाकारु शकत नाही. अनेकांसाठी हा प्रश्न चिंता आणि निराशादायी असू शकतो. दुर्दैवाने आजच्या या झगमगत्या युगात, सेलिब्रिटी संस्कृतीमुळे, त्या प्रभावामुळे, विद्यार्थी जीवनात एक प्रवाह आला आहे की जो टीव्हीवर येतो, ज्याची वर्तमानपत्रात चर्चा होते, असे आपण बनावे, असे काही करावे. ही काही वाईट गोष्ट नव्हे मात्र जीवनातल्या वास्तवापासून  खूप दूर आहे. प्रसार माध्यमातून हजार दोन हजार लोक आपल्या समोर येतात, जग इतके लहान नाही, इतकी विशाल जागतिक व्यवस्था, इतका प्रदीर्घ मानव ऐतिहास, इतक्या वेगाने होणारे परिवर्तन, खूप संधी घेऊन येतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती हे जीवनातले सत्य आहे. जितके लोक आहेत तितक्या संधीही आहेत. आपल्या जिज्ञासेची कक्षा आपण रुंदावण्याची आवश्यकता आहे, त्याचा विस्तार करण्याची गरज आहे.

आणि म्हणूनच,  दहावी-बारावीच्या वर्गात देखील आपण आपल्या आजूबाजूच्या आयुष्याचे, सभोवतालचे निरीक्षण करत राहणं आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला इतके सगळे व्यवसाय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या-व्यवसाय, व्यवसायांचे कामाचे सतत बदलत राहणारे स्वरूप, या सगळ्यासाठी आपण स्वतःला प्रशिक्षित करत रहा. आपली कौशल्ये वाढवा आणि या नव्या संधींचा लाभ करुन घ्या. करियरची निवड करताना एक बाजू ही देखील आहे की अनेक लोक सहज-सोप्या मार्गांचा शोध घेत असतात. सगळ्यांनी कौतुक करावे, आर्थिकदृष्ट्या प्रतिष्ठा मिळावी, असा विचार देखील आयुष्यात कधीकधी, नेहमीच नाही, पण कधीकधी अंध:काराची सुरुवात होण्याचे कारण ठरु शकतो. आणि ही मनोवस्था तर अशी असते, जेव्हा स्वप्न बघणं आणि त्यांच्यात रमून जाणं खूप आवडत असतं. स्वप्नात हरवून जायला आवडतं.

स्वप्न बघणं चांगलंच आहे, मात्र स्वप्न उरात घेऊन बसून राहणे, स्वप्नांसाठी झोपेतच राहणं तर योग्य नाही. स्वप्नांच्या पलीकडे जात आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संकल्प करणं खूप महत्वाचे आहे. आपण विचार करायला हवा की आपले कोणते एक स्वप्न आहे, ज्यातून आपल्याला आपल्या आयुष्याचा संकल्प करायला आवडेल? जसा आपण हा संकल्प कराल, तसाच पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला अगदी सहज, स्वच्छपणे दिसू लागेल.

 

प्रश्न 7- अ-

अमृता जैन, मुरादाबाद, उत्तर प्रदेश.

माननीय पंतप्रधान महोदय, नमस्कार! क्षमा करा, पण माझा प्रश्न परीक्षेवर आधारित नाही. कृपया तुम्ही माझ्या प्रश्नावर हसू नका.आजकालची मुलं चांगल्या प्रकारचे, नेहमीचे खाद्यपदार्थ खायला उत्सुक नसतात. कायम त्यांना, चिप्स, चॉकलेट आणि इतर जंक फूड असेच पदार्थ हवे असतात. आपण कृपया आम्हाला सांगा की आम्ही याबद्दल काय करायला हवं?

 

प्रश्न 7-ब

सुनीता पॉल, रायपूर, छत्तीसगढ

याच विषयावरचे आणखी काही प्रश्न देखील मला आले आहेत. नरेंद्र मोदी अॅप वर छत्तीसगड, रायपूरच्या सुनीता पॉल यांनी लिहिलं आहे, सर आम्ही आमच्या मुलांना आम्ही डब्यात जे खाद्यपदार्थ देतो, ते त्यांना खायचे नसतात आणि नेहमी फास्ट फूड खाण्यासाठी हट्ट करतात. कृपया आपण आम्हाला याबद्दल मार्गदर्शन करावं.

 

उत्तर:-

मला कळत नाहीये की हे सगळे प्रश्न ऐकून मी काय प्रतिक्रिया द्यावी, मला तर खूप हसू आलं. जर आपण या प्रश्नाचा मनोविज्ञानाच्या पद्धतीनं विचार केला, तर कदाचित  यावर उत्तर शोधणं सोपं जाईल.

आपले जे  पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत, त्याबद्दल आपण त्यांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करत, त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणायला हवा. त्या पदार्थांची वैशिष्ट्ये, गुणधर्म यावर चर्चा करावी. घरात ज्या प्रकारे अन्न शिजवलं, तयार केलं जातं, त्यासाठी स्वयंपाक घरात करावी लागणारी कामं, तयारी, याबद्दल घरातल्या सर्वांना माहिती असायला हवी. जेवण तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, त्यानंतर खाद्यपदार्थ तयार होतात, याची जाणीव त्यांना करुन द्यायला हवी. अमुक पदार्थ कसा करतात? त्यासाठी किती वेळ लागतो, त्यात काय काय घालतात हे सगळं त्यांना सांगा. त्यांना याची जाणीव व्हायला हवी की स्वयंपाक करणं किती मेहनतीचं काम आहे आणि हे सगळं केल्यावर माझं ताट भरलं जातं.

दुसरी गोष्ट, आजच्या काळात खाद्यपदार्थ विषयक अनेक वेबसाईट्स आहेत. चांगल्या, सकस अन्नाची देखील काही कमतरता नाही. आपण ही सगळी माहिती गोळा करुन, त्या माहितीच्या आधारे काही खेळ तयार करु शकतो का? हा खेळ आपण आठवड्यातून एकदा खेळला पाहिजे. मग गाजर असेल, त्याचे लाभ, त्याचे गुणधर्म, महत्व याविषयी आपण बोलू. त्यात काय पोषक द्रव्य आहेत, ते मुलांना सांगू. असे प्रयोग करुन बघा.

आणखी एक म्हणजे आपले जे फॅमिली डॉक्टर असतात, ते डॉक्टर म्हणजे आपले एकप्रकारे आपले मित्रच असतात. जेव्हा केव्हा ते आपल्या घरी येतील तेव्हा त्यांच्या गोष्टी कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी ऐकायला हव्यात. कोणत्या प्रकारच्या घटकांचे, पदार्थांचे आहारात काय महत्व आहे, पोषक पदार्थ कुठून मिळतात, काय खायला हवं हे सगळं ते सांगतात. आपल्या घरात काही पिढीजात समस्या, आजार असतील तर ते त्यांना माहीत असते, त्यामुळे, त्यापासून बचाव करण्यासाठी काय खायचं, हेही ते सांगू शकतात. याचा देखील मुलांना खूप फायदा होईल.

तिसरे म्हणजे, आपण आपल्या मुलांच्या शिक्षक-शिक्षकांना विनंती करु शकता, की आपल्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी- आवडीनिवडींचा कसा त्रास होतों आहे, हे त्यांना सांगू शकता. विशेषतः खण्यापिण्याविषयी, शिक्षकांना सांगा, त्यांना विश्वासात घ्या. मग शिक्षक बघा कसे, गप्पा मारता मारता, हसत खेळत त्यांच्या डोक्यात हे भरवून देईल की काय खायला हवं आणि का खायला हवं. आणि शिक्षकांच्या सांगण्याचा मुलांवर वेगळाच परिणाम होतो. आपणही काही नवनवीन प्रयोग करत राहायला हवेत. मी अशी अनेक उदाहरणे पहिली आहेत, जिथे कुटुंबात, पारंपरिक पदार्थच मुलांना आधुनिक स्वरूपात दिली जातात. आशा आकर्षक स्वरूपात पदार्थ दिले तर त्याबद्दल त्यांच्या मनात आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. असो. तसा तर हा माझ्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय आहे, पण कदाचित मी सांगितलेल्या काही गोष्टी आपल्या कामी येऊ शकतील.

 

प्रश्न-

दिव्यांका नमस्कार ! दिव्यांका,काय शिकते तू?

नमस्कार सर, मी कॉमर्सची विद्यार्थीनी आहे.

मोदी- आणि पुष्करची राहणारी आहेस.

हो, सर

मग पुष्करच्या काही पवित्र गोष्टी मला सांगू शकतील का? मला पुष्करचं काही वैशिष्ट्य सांगू शकतील का?

हो सर, पुष्करला एक ब्रह्मा मंदिर आहे.

हो..

आणि पुष्कर राज जो आहे, तो 68 तीर्थांचा गुरु आहे.

अच्छा, ब्रह्माची भूमिका काय आहे?

सर,  त्यांनी पृथ्वीची निर्मिती केली आहे.

अच्छा, अच्छा ! मला सांग दिव्यांका, काय प्रश्न आहे तुझ्या मनात?

 

प्रश्न -8

दिव्यांका पराशर, मुखीया कॉलनी, परिक्रमा मार्ग, बडी बस्ती, पुष्कर.

सर, माझे काही मित्र असे आहेत ज्यांची स्मरणशक्ती अगदी साधारण आहे. त्यांनी कोणताही विषय कितीही वाचला तरीही परीक्षेच्या वेळी त्यांना ते आठवत नाही. सर, त्यांनी काय करायला हवं, जेणेकरुन त्यांना विषय लक्षात राहील.

 

उत्तर 8

अच्छा तर तुम्हाला स्मरणशक्तीसाठी औषध हवंय..

हो सर,

हे बघ दिव्यांका, खरंच जर आपल्याला विस्मरण होण्याची सवय असेल तर मी तुला सांगतो, तू हा प्रश्नही मला विचारलं नसता. कारण हा प्रश्नही तू विसरुन गेली असतीस. आता तू सगळ्यात आधी तुझ्या शब्दकोशातून विस्मरण हा शब्द डिलीट करुन टाक. असा विचारच करु नको की तुझी स्मरणशक्ती चांगली नाही. जर तू तुझ्याशी संबंधित काही घटनांचं स्मरण जर तू केलंस, तर तुझ्याच लक्षात येईल की खरं तर तुला अनेक गोष्टी लक्षात आहेत.

जशी तुझी मातृभाषा. तुझी मातृभाषा कोणी तुला व्याकरणासहित शिकवली होती का?

नाही नाही, नाही सर.

शाळेत आपण पुस्तकातून आपली मातृभाषा शिकलो का?

नाही सर,

आपली भाषा आपण केवळ ऐकून शिकतो. मग याच त्या गोष्टी आहेत. जरा विचार करा, आपल्याला काय आवडतंय  त्या आवडत्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपण कधी प्रयत्न केलेत का? अशा गोष्टी, ज्यांच्याशी तुम्ही समरस झाले आहेत, ज्यात पूर्ण मग्न झाले आहात, ज्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत, आपल्या विचारधारेचा भाग झाल्या आहेत, त्या आपण कधीही विसरत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर हे ‘लक्षात ठेवणं नसतं’ तर आत्मसात करणं असतं. आणि हे आत्मसात करणं हाच लक्षात ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि म्हणूनच, लक्षात ठेवण्यावर भर देण्यापेक्षा आपण ते जगण्याचा भाग बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. तो ही सहजपणे, समग्रपणे आणि सुलभतेने. आपल्याजवळ त्या सर्व शक्ती आहेत, ज्या अत्यंत गुणवंत अशा व्यक्तींकडे असतात. विचार करा, आपल्या भावंडांसोबत जर आपलं भांडण झालं असेल तर, आपल्याला ते पूर्ण आठवत असतं. आपण ते कधीही विसरत नाही. एवढंच नाही, तर आपल्याला हे ही लक्षात राहतं की त्यावेळी आपल्या  भाऊ - बहिणीने कोणते कपडे घातले होते, तुम्ही उभ्या उभ्या भांडत होता की धावत भांडत होते, हे सगळं आपल्याला आठवत असतं, एकेक वाक्य आठवत असतं.

हो सर....

म्हणजे याचा अर्थ असा आहे, की तुम्ही त्यात पूर्णपणे गुंतले होतात, तुम्ही तो क्षण पुरेपूर जगत होतात. जर तुम्हाला गोष्टी लक्षात राहत असतील, योग्यप्रकारे आठवत असतील, तर तुम्ही ज्या क्षणात आहात तो क्षण पुरेपूर जगणे, त्यात पूर्ण गुंतणं गरजेचं आहे.  म्हणजे तुम्ही अभ्यास करत असाल, हातात पुस्तक आहे आणि मन खेळाच्या मैदानात, मैत्रिणींसोबत, मित्रांसोबत, तर मग गडबड होते. भविष्यात जर तुमच्यापैकी कुणी मानसशास्त्र शिकेल, तर त्यांना स्थळ काळाशी निगडीत स्मरणशक्ती ही संकल्पना विस्तारानं शिकवली जाईल. जरा आठवा, शाळेत रोज सकाळी प्रार्थना होते, त्यात राष्ट्रगीत म्हटले जाते. आता जन-गण-मन तर सगळेच म्हणतात, मात्र कधी जन-गण-मन म्हणताना त्यासोबत कधी देशाचा प्रवास केला आहे? त्यात जे शब्द येतात, कधी ते डोळ्यासमोरून गेलं आहे की नाही? पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल.. राष्ट्रगीत म्हणताना मनातल्या मनात या ठिकाणी गेला आहात का? तुम्हाला एकदम सगळं आठवायला लागेल. मनातल्या मनात ते सगळं डोळ्यापुढे आणाल तर चांगल्याप्रकारे लक्षात राहील. याचा आणखी एक फायदा आहे, तुम्ही देशाशी देखील एकरूप होत जाल. म्हणजे, गुंतणे, आत्मसात करणे, जोडले जाणे आणि कल्पना करणे. स्मरणशक्ती तल्लख करण्यासाठी तुम्ही हे सूत्र वापरू शकता.

मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमच्याकडे वह्या-पुस्तकं असतात. वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं असतात. जेंव्हाही तुम्ही घराबाहेर पडाल, तेंव्हा हे बघून ठेवा, दप्तरात अमुक क्रमांकावर अमुक विषयाची वही आहे, तमुक क्रमांकावर तमुक विषयाची वही आहे. चौथ्या क्रमांकावर असेल, तिसऱ्यावर देखील असू शकते. आणि तुम्ही तिसऱ्या क्रमांकावर इतिहासाचं पुस्तक ठेवलं आहे, पाचव्या क्रमांकावर भूगोलाचं पुस्तक ठेवलं आहे, तर, जेंव्हा तुम्हाला इतिहासाचं पुस्तक काढायचं असेल तेंव्हा डोळे बंद करून देखील तिसऱ्या क्रमांकाचं पुस्तक काढता. बघा तुमचा आत्मविश्वास किती वाढेल.

चला, तुमच्याशी बोलायला मिळालं त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आता मी राजस्थानच्या लोकांना देखील आणि पुष्करच्या पवित्र धरतीला देखील इथून नमन करतो. अनेक अनेक धन्यवाद.

चलिए मुझे अच्छा लगा, आपसे बात करने का मौका मिला और मैं राजस्थान के लोगों को भी और पुष्कर की पवित्र धरती को भी आज यहां से नमन करता हूं. बहुत-बहुत धन्यवाद.

धन्यवाद.

 

प्रश्न 9.

सुहान सहगल, अल्कॉन इंटरनॅशनल, मयूर विहार, दिल्ली

नमस्कार,

नमस्कार सर,

हं, बोला,

माझा प्रश्न हा आहे की जेंव्हा आपण कुठल्या प्रश्नाचं उत्तर पाठ करतो, तेंव्हा ते आपल्याला चांगल्या प्रकारे पाठ होतं. पण जेंव्हा शाळेत लिहायला सुरवात करतो, तेंव्हा प्रश्नपत्रिका बघूनच आपण सर्वकाही विसरून जातो. सर, कृपया, असं का होतं हे सांगाल का?

आपलं शुभनाव काय आहे?

सुहान सहगल.

ठीक. सहगलजी आपण कुठे शिकता?

अल्कॉन इंटरनॅशनल स्कूल.

ठीक. हा प्रश्न आधी कुणाला विचारला आहे का?

नाही सर...

नाही विचारला?

आई - वडलांना विचारला?

नाही सर..

शिक्षकांना विचारला?

नाही सर...

घ्या, कमाल करतो यार, मीच सापडलो का तुला?

 

उत्तर -

पण तुझा प्रश्न मला समजला आहे, बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असतो. जेंव्हा मी तुझ्यासारखा शिकत होतो, तेंव्हा हि गोष्ट माझ्या मनात देखील असायची, देव जाणे, आठवत का नाही?

बघा, परीक्षा केंद्रात जाताना मन पूर्णपणे शांत ठेऊन जायला हवं.

मी आत्ता टीव्हीच्या पडद्यावर तुम्हाला बघतो आहे, किती शांत चेहरा आहे. इतक्या आत्मविश्वासानी बसला आहेस, हसतो देखील आहेस, परीक्षेला जाताना देखील हीच अवस्था असायला पाहिजे, मग तुम्ही कधीच विसरणार नाहीस.

तुमचं मन अशांत असेल, चिंताक्रांत असेल, तुम्ही घाबरले असाल तर तुम्ही प्रश्नपत्रिका बघताच काही वेळासाठी सगळं विसरून जाल, असं होऊ शकेल. यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे, तुम्ही सगळे ताण तणाव परीक्षा केंद्राच्या बाहेरच सोडून जा. आणि तुम्ही असा देखील विचार करायला हवा की, जितकी तयारी करायची होती, ती केली आहे. आता तुमचं लक्ष प्रश्नांची उत्तरं देण्यावर असायला हवं. तुम्ही या गोष्टीने घाबरून नको जायला की काही नवीनच विचारलं तर काय होईल, ज्याचा अभ्यासच केला नाही तेच विचारलं तर काय होईल?

आणि मी सर्वांना सांगेन, परीक्षेचा तणाव कमी करायला, तणावमुक्त परीक्षा द्यायला, परीक्षा योद्धा या पुस्तकात अनेक उपाय, क्रियाकलाप सांगितले आहेत. आणि गेल्या काही दिवसांत परीक्षा योद्धा पुस्तकात मी आणखी काही गोष्टी समाविष्ट केल्या आहेत, मला कोरोनामध्ये थोडा वेळ मि ळाला, तर मी यात काही सुधारणा देखील केल्या आहेत. यावेळी यात मुलांसाठी मंत्र नाहीत, तर मी पालकांसाठी देखील खूप काही लिहिलं आहे. नमो अॅपवर देखील अनेक क्रियाकलाप दिले आहेत. तुम्ही याचा सराव करून, आपल्या मित्रांना देखील सांगू शकता.  आणि मला विश्वास आहे, थोडा प्रयत्न करा, तुमच्या मनातून हे निघून जाईल आणि तुम्हाला सर्व पक्कं लक्षात राहील. आणि मित्रांनो, तुम्हाला जेंव्हाही फायदा झाला, तर मला जरूर कळवा. परीक्षा योद्धा वाचून मला पत्र लिहा. लिहिणार ना?

हो सर

वाह... शाबास...

धन्यवाद सर.

 

प्रश्न क्रमांक 10.

धारवी बोपट- ग्लोबल मिशन इंटरनॅशनल स्कूल, अहमदाबाद.

नमस्ते जी, माझं नाव धारवी बोपट आहे. मी गुजरातमधल्या अहमदाबादच्या ग्लोबल मिशन इंटरनॅशनल स्कूलच्या संस्कार धाममध्ये शिकणारी इयत्ता अकरावीची विद्यार्थीनी आहे. सर, या कोरोना काळामध्ये उद्योग, व्यापार, सरकार यांनाही खूप अडचणी निर्माण झाल्या असतील. परंतु विद्यार्थी वर्गाला नेमक्या कोणत्या समस्या जाणवत असतील, याचा आपण विचार केला आहे का? या संकटाला मी आपल्या जीवनातली कोणत्या स्वरूपातली आठवण मानू? असे वाटते की, आम्हा विद्यार्थी मंडळींचे एक वर्ष निरर्थक गेले आहे. माझ्या जागी तुम्ही असता,  तर काय केले असते? आपण केलेले मार्गदर्शन आम्हाला एक दिशा देणारे ठरेल. धन्यवाद.

 

उत्तर -

धारवी, तुला लहान भाऊ आहे, मोठा भाऊ- छोटा भाऊ आहे?

सर, मला लहान बहीण आहे.

आहे. लहान बहीण आहे.... छान. लहान बहिणीला अशीच रागवतेस, आत्ता जसे बोलतेस तसे?

बहीण लहान आहे सर, नाही सर.

असे डोळे मोठे करून बोलत होतीस. बरं साबरमती आश्रम आधी आली होतीस, की आज पहिल्यांदा आली आहेस?

सर आज पहिल्यांदाच आले आहे.

पहिल्यांदाच आली आहेस?  अहमदाबादमध्ये कधीपासून राहतेस?

सहा वर्षांपासून.

छान, सहा वर्षापासून अहमदाबादमध्ये राहतेस आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने इतके महत्वपूर्ण असलेले स्थान आपण पहावे, तिथे जावे असे तुला मनातून कधी वाटले नाही? आज तर सकाळपासूनच तुम्ही लोक आलेले असणार.

हो सर, बरोबर.

तर मग, तुम्ही आज सगळे काही पाहिले का? सर्व गोष्टी पाहिल्या?

हो सर, पाहिल्या.

मनाला शांत करणारा अनुभव आला का?

हो सर, खूप शांत वाटलं.

आता संस्कार धामच्या मित्र-मैत्रिणींनाही हा अनुभव तू जरूर सांगावास. साबरमतीच्या आश्रमामध्ये गेले पाहिजे. आणि आपल्या कुटुंबियांना , मित्रांनाही सांगितले पाहिजे की, त्यांनी जरूर साबरमती आश्रमाला भेट दिली पाहिजे. तिथल्या शांतीचा अनुभव घेतला पाहिजे.

काही क्षण मौन ठेवून, काही क्षण तिथं मौन धारण करून बसले पाहिजे, करणार ना असे?

हो सर, नक्की करणार सर.

छान. आता आपण तुझ्या प्रश्नाकडे वळू या. मी तर एकदम धारवीला उपदेश द्यायला निघालो होतो.

असे आहे, तू विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे.

कोरोनाचा प्रश्न उत्पन्न झाला आहे,  मला तर याकडे पाहताना असे वाटते की, जी चूक आपण केलेली नाही, तरीही त्याचे परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागत आहेत. हा एक आपल्याला जीवनात मिळालेला धडा आहे. अनेकवेळा जीवनात अशा काही घटना अचानक घडतात. अगदी अकल्पनीय, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा घटना घडतात. आणि या घटनांवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण असत नाही. कोरोनाकाळामध्ये आपण म्हणू शकतो की, मुलांचे, युवकांचे जे काही नुकसान झाले आहे, ते खूप मोठे आहे. बालपणातल्या एका पूर्ण वर्षाचे नुकसान होणे, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. एका मोठ्या इमारतीच्या पायामध्ये एक प्रकारची रिक्तता येण्यासारखे आहे. ही कमतरता भरून काढणे काही सोपे नाही.

शालेय वय म्हणजे?

हसणे, खेळणे, माती उडवणे, उन, वारा, पाऊस, थंडी अशा प्रत्येक गोष्टींचा, ऋतूंचा आनंद घेणे, मित्रांबरोबर, वर्गामध्ये शिक्षकांबरोबर, गप्पा मारणे, बोलणे, घरातली अगदी छोटीशी गोष्टही सर्वांना सांगणे, मित्रांमध्ये राहणे, या सर्व गोष्टी जीवनाच्या विकास यात्रेसाठी खूप गरजेच्या, अनिवार्य असतात. अशा सर्व गोष्टींमध्ये तुम्ही अगदी सहजतेने खूप काही शिकू शकता.

तुम्हालाही आता वेगळे वाटत असेल. कोरोनाकाळाच्या आधीचे दिवस तुम्हाला नक्कीच आठवत असतील. आणि तुम्ही विचार करीत असणार, आपण कितीतरी गोष्टींना मुकलो आहोत. परंतु कोरोना काळामध्ये जरी आपण खूप काही गमावले असले तरीही आपण सर्वांनी खूप काही कमावलेही आहे, असा विचार सर्वांनी केला पाहिजे. कोरोनाने सर्वात पहिला धडा दिला तो म्हणजे, ज्या गोष्टींना, ज्या ज्या लोकांना आपण गमावले आहे, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये किती महत्वाच्या आहेत. हे या कोरोना काळामध्ये सर्वात जास्त समजले. आपण कधीही कोणालाही सहज गृहीत धरून चालणार नाही, या गोष्टीची आपल्या सर्वांना या काळामध्ये जाणीव झाली आहे. खेळणे असो, शाळा असो, प्रत्यक्ष वर्ग होणे असो, अथवा आपल्या घराजवळच भाजी विकणारा असो, कपडे इस्त्री करणारे, आजूबाजूच्या परिसरातले दुकानदार, ज्या लोकांबरोबर आपण अगदी सहजपणे, येता-जाता बोलतो. असे बोलणे आपल्या दैनंदिन कामाचा एक साधा भाग असतो. त्यापैकी आपण काही करू शकलो नाही,  त्यावेळी मात्र त्या सर्व लोकांचे महत्व आपल्याला लक्षात येते. हा अनुभव आपण या काळात घेतला असणार. म्हणूनच आता यापुढे आपण या दिशेने सातत्याने जागरूक राहिले पाहिजे. आणि या काळातला हा अनुभव आपण अगदी जन्मभर स्मरणात ठेवला पाहिजे.

कोरोना काळानंतरही या गोष्टींची, आजूबाजूच्या व्यक्तींची उपेक्षा करू नये. त्याचबरोबर आपण सर्वांनी हेही लक्षात ठेवायचे आहे की, जीवनात ख-या अर्थाने नेमक्या किती कमी गोष्टींची गरज असते. दुसरे म्हणजे, या एक वर्षामध्ये आपल्याला कधीना कधी तरी आपल्या अंतमर्नामध्ये डोकावून पाहण्याची, स्वतःशी संवाद साधून, स्वतःला जाणून घेण्याची एक संधी मिळाली असेल.

कोरोना काळामध्ये आणखी एक गोष्ट अशीही झाली आहे, आपण सर्वजण आपल्या कुटुंबियांना एकमेकांच्या जास्त जवळचे समजायला लागलो. कोरोनामुळे सामाजिक अंतर राखणे आवश्यक केले असले तरीही कुटुंबामध्ये भावनिक नाते अधिक दृढ बनवले आहे. कोरोना काळाने संयुक्त, एकत्र असलेल्या कुटुंबाची ताकद किती असते, हे दिसून आले. घरातल्या मुलांचे आयुष्य घडविण्यासाठी घरातल्या इतर सर्व लोकांची किती महत्वाची भूमिका असते. मला असेही वाटते की,  सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणा-या लोकांनी, आपल्या विद्यापीठांनी यावर संशोधन केले पाहिजे. कोरोना काळामध्ये कौटुंबिक जीवनावर अभ्यास केला जावा. या संकटाचा सामना  करताना संयुक्त परिवारांनी समाजाला एक प्रकारे बळकटी दिली, या पैलूवर प्रकाश टाकला पाहिजे.

कोरोना आल्यानंतर जे आयुर्वेदिक काढे, पौष्टिक भोजन, स्वच्छता, रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे, अशा अनेक महत्वपूर्ण विषयांकडे आपल्या सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या सगळ्या गोष्टींसाठी लोकांनी जे जे काही केले, ते जर पहिल्यापासूनच करीत आले असते तर कदाचित आपल्या सर्वांनाच हा त्रास कमी झाला असता. परंतु चांगलेही झाले आहेच. हे परिवर्तन आता लोकांनी आपल्या जीवनात केले आहे.

आणि म्हणूनच मी असे सांगू इच्छितो की, ही खूप मोठी गोष्ट आहे की, कुटुंबातली मुले अशा गंभीर मुद्यांवर विचार करीत आहेत. बोलत आहेत.

धन्यवाद बेटा, धन्यवाद.

 

प्रश्न क्रमांक -11

कृष्टी सैकिया- केंद्रीय विद्यालय, आय आय टी गुवाहाटी.

माननीय पंतप्रधान महोदय, मी कृष्टी सैकिया. केंद्रीय विद्यालय, आय आय टी गुवाहाटी. दहावीच्या वर्गातली विद्यार्थिनी आहे. आणि आसामवासियांच्यावतीने तुम्हाला नमस्कार. सर, नवीन पिढीतली एक मुलगी या नात्याने, आपल्या पालकांच्या आणि आमच्यामध्ये जी पिढीचे अंतर आहे, ते कमी व्हावे, असे आम्हाला नेहमीच वाटत असते. पंतप्रधान सर, ही गोष्ट आम्ही नेमकी कशी करावी? कृपया याविषयी आपण मार्गदर्शन करावे.

बेटा, नाव काय सांगितलेस?

सर, कृष्टी सैकिया.

हिंदीमध्ये इतके छान कसे काय बोलू शकतेस?

धन्यवाद सर.

 

उत्तर -

तू विचारलेला प्रश्न तर खूप चांगला आहे. एक विद्यार्थी म्हणून तू जो काही प्रश्न विचारला आहे, त्याचे खूप कौतुक वाटले. या प्रश्नावरून एक गोष्ट लक्षात येते की, या विषयी तू खूप संवेदनशील आहे. हा विषय नेमका काय आहे, हे काही फक्त जाणून घ्यायचे नाही तर दोन पिढ्यांमध्ये असलेले अंतर कमी व्हावे, असे मनापासून तुला वाटतेय. आणि त्यासाठी प्रयत्नही करीत आहे.

परंतु मला तर या विषयावर पालकांशी बोलायचे आहे. एक गोष्ट पालकांना निश्चित करायची आहे. ती म्हणजे त्यांना म्हातारपणाकडे जाण्याची इच्छा आहे की, त्यांना आपले वय कमी व्हावे असे वाटते? आणि बेटा, तूही आपल्या आई-वडिलांना हा प्रश्न जरूर विचारावा. जर पालकांना वृद्धत्वाच्या दिशेने जाण्याची इच्छा असेल तर त्यांनी अगदी जरूर आपल्या मुलांपासून अंतर ठेवावे. दोघांमध्ये गॅप वाढवीत रहावे. मात्र जर पालकांना नवजीवनाच्या दिशेने पुढे जायचे असेल, आपले वय कमी करायचे असेल तर त्यांनी मनाने कायम युवा, तरूण रहावे. असे तरूण राहिले तर, मुलांच्यात आणि त्यांच्यामध्ये असणारे अंतर कमी करावे.

मुलांबरोबर जवळिक वाढवावी. ही गोष्ट आपल्याच लाभाची ठरणार आहे. आपण एक गोष्ट आठवावी. ज्यावेळी आपले मुल एक वर्षाचे  होते, त्यावेळी आपण त्याच्याबरोबर कसे बोलत होतो? त्यावेळी ते छोटे मूल हसावे म्हणून आपण किती नाना त-हेचे आवाज कसे काढत होते? आपण आपल्या चेह-यावर किती प्रकारचे भाव आणून, तोंड वाकडे-तिकडे करून त्याच्याशी बोलत होतो. हे सगळे करीत असताना, कुणी तरी आपल्याला पाहील, आणि काही तरी म्हणेल, असा विचार तरी कधी केला होता का?

असे करताना आपल्याला लोक पाहतील तर काय म्हणतील? हा कसा तोंड करतोय, कसे-कसे आवाज काढतोय? आपल्या मुलाच्या मनामध्ये नेमकं काय विचार सुरू आहेत, याचा विचार कधी तुम्ही त्यावेळी केला का? तुम्हाला मुलाला हसवताना, त्यावेळी खूप आनंद वाटत होता. म्हणूनच तुम्ही ते सगळे काही करीत होता. त्यावेळी कोण काय म्हणेल, याची कधीच पर्वा केली नाही. याचाच अर्थ सगळे काही सोडून तुम्ही त्यावेळी स्वतःच एक मूल बनलात आणि आपल्या मुलाला हसवले आहे.

मुलांबरोबर खेळण्यासाठी स्वतःच एक खेळणेही बनला होतात आणि त्यावेळी या खेळण्याबरोबर अतिशय मुलेही आनंदाने त्यावेळी खेळले होते. मुले लहान असतान तुम्ही कधी घोडा बनलात, आठवण करा. कधी मुलाला पाठीवर तर कधी खांद्यावर बसवून संपूर्ण घरभर फिरले असणार, कधी हात मुडपून आपले चार पाय बनवून चालले असणार, मुल रडायला लागले तर त्याला शांत करण्यासाठी तुम्हीही खोटे-खोटे रडले असणार, त्यावेळी तुम्हाला काहीही, कशाचाही फरक पडला नाही. कोण पाहील, कोणी काहीतरी म्हणेल, हसेल, घरातले इतर लोका काय म्हणतील, समाजात लोक काय बोलतील, मित्र काय म्हणतील, याविषयी त्यावेळी तुम्ही कसलाही विचार केला नाहीत. याविषयी कधी विचार केला होता? तुम्ही लहान मुलाबरोबर मूल होण्याचा आनंद घेत होता. आणि हे सगळे मूल जोपर्यंत 5-6 वर्षापर्यंत होते, तोपर्यंत तुम्ही करीत असता. ज्यावेळी मूल थोडेसे मोठे होते, त्यावेळी मुलावर हक्क गाजवण्याची, एक प्रकारची मानसिकता पालकांची तयार होते. ते मुलांना प्रत्येक गोष्ट शिकवायला लागतात. जे मूल इतके दिवस मस्त मित्र असते, ते अचानक पालकांचे मित्र रहात नाही. त्या मुलाचे पालक हे ‘इंस्ट्रक्टर’- सर्व सूचना देणारी व्यक्ती बनतात. आणि कधी कधी तर पालक इन्स्पेक्टरही बनतात.

मित्रांनो, ज्यावेळी मूल बाहेरच्या जगात पाऊल ठेवते, त्यावेळी ते अनेक गोष्टींचे निरीक्षण करीत असते. घरामध्ये जे काही मुलाने पाहिलेले असते, त्यापेक्षा खूप वेगळे आणि खूप जास्त, नवनव्या गोष्टी तो पहायला लागतो. त्यावेळी आपण जागरूक राहून एक जबाबदारी पार पाडली पाहिजे. ती म्हणजे नवीन वातावरणामध्ये आपले मूल अधिकाधिक फुलून आले पाहिजे. एखाद्या फुलाप्रमाणे ते सर्व बाजूंनी विकसित झाले पाहिजे. आणि त्यासाठी उत्तम पद्धत म्हणजे आपण त्याच्या मनाशी जोडले गेले पाहिजे. त्याच्या मनात काय आहे, हे जाणून घ्या. आणि त्याची प्रत्येक गोष्ट भावनिक जवळिकता साधून, लक्ष देऊन ऐकली पाहिजे. तो फोन करतोय आणि फोनवर केवळ तो एकटाच बोलतोय. असे चालणार नाही. त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्या, जोडले जा. त्याचे म्हणणे काय आहे, हे नीट ऐका. तर एखादे तुम्हाला जे पसंत नाही, असे काम करून तुमचा मुलगा आला तर त्याला रागवू नका, रोखू नका, फक्त त्याचे काय म्हणणे आहे ते ऐका. तुम्ही ज्यावेळी त्याचे बोलणे ऐकत असाल, त्यावेळी त्याला विश्वास वाटला पाहिजे की, तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करता, तुमची त्याच्यावर माया आहे. मात्र जी गोष्ट चांगली नाही, त्या गोष्टीची मनाने पक्की नोंद ठेवून घ्या. वाढत्या वयाच्या मुलांसाठी असे वागणेच खूप आवश्यक  आहे.

मुले काय बोलतात, त्या सर्व गोष्टी तुम्ही जितक्या ऐकणार आहात, तितक्या त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. तुम्ही इन्स्ट्रक्टर बनून सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या मुलाने काय करावे, हे त्याला सांगत बसू नका. मी काय करायला सांगितले होते, त्यापैकी काय काय झाले? असे विचारूही नका. फक्त आपले डोळे उघडे ठेवा. कान उघडे ठेवा. त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये सुधारणा काय घडवून आणायच्या आहेत, यासंबंधीच्या गोष्टी जाणून, मनात, डोक्यात नोंदवून ठेवा. तुम्हाला मुलाची एखादी गोष्ट नाही पटली, नाही आवडली तर त्यामध्ये कसे बदल करावेत, याविषयी भरपूर विचार करून, त्याप्रमाणे एकप्रकारे वातावरण निर्मिती करावी. त्यामुळे त्या मुलाला आतूनच आपण केलेली चूक लक्षात येईल.

ज्यावेळी माता-पिता मुलांबरोबर समवयस्क बनून जोडले जातील, त्यावेळी कोणतीही समस्या राहणार नाही.

जर एखादा मुलगा नवीन गाणे ऐकत असेल, नवीन संगीत ऐकून त्याचा आनंद घेत असेल, तर तुम्हीही ते संगीत त्याच्याबरोबर ऐकून त्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. तीस वर्षांपूर्वी आमच्या काळामध्ये जे गाणं, संगीत होते, तेच आत्ताही आम्ही लावणार, असे तुम्ही कधीच म्हणू नका आणि करूही नका. त्याला जे कोणते गाणे, संगीत आवडते, त्याला जे पसंत आहे, त्याच्याबरोबर जोडले जा आणि त्याच्या आवडीच्या, नवीन संगीताचा तुम्हीही आनंद घ्या.

आता हे सगळे असे का, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलाला आवडणा-या या नवीन गाण्यामध्ये नेमके आहे काय, हेही जाणून घेतले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात होते काय की, ज्यावेळी मुलगा नवीन गाणे, संगीत ऐकत असतो, त्याचवेळी माता-पिता म्हणतात, काय बेकार गाणी ऐकता तुम्ही, खरे चांगले संगीत तर आमच्या काळात होते. आता जे काही संगीत म्हणून बनते ते फक्त गोंधळ-गोंधळच असतो. मुलगा आपल्याला येऊन सांगतो की, आज शाळेमध्ये आम्ही अमूक एक गोष्ट केली. त्यावेळी त्याने काय केले ही गोष्ट लक्ष देवून ऐकण्यापेक्षा आपण आपली कथा सांगत राहतो. अरे ही नवीन गोष्ट आहे मग.... ती अशीच असणार... असे आपण सांगत राहतो.

आपल्या मुलाबरोबरच त्याच्या पिढीतल्या गोष्टींमध्ये, तितकाच रस दाखविण्याची गरज आहे. तुम्ही त्याच्या आनंदामध्ये सहभागी झालात तर हे पिढीतले अंतर संपुष्टात येणार आहे. आणि कदाचित जी गोष्ट तुम्ही सांगू इच्छिता, ती गोष्ट त्याला समजूही शकेल. म्हणूनच असे पिढीतले अंतर कमी करण्यासाठी मुलांना आणि माता-पित्यांनाही एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. मोकळ्या मनाने गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत. मुक्त संवाद साधला गेला पाहिजे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे, एकमेकांचे ऐकले पाहिजे आणि मग आपल्या विचारांमध्ये बदल करण्याची तयारीही केली पाहिजे. चला तर, आसाममधून इतका चांगला प्रश्न माझ्याकडे आला, त्यामुळे मी थोडे जास्तच लांब उत्तर दिले आहे. मला हा प्रश्न खूप आवडलाही. खूप- खूप धन्यवाद बेटा.

धन्यवाद सर.

 

प्रश्न क्रमांक 12 –

श्रेयान रॉय, सेंट्रल मॉडेल स्कूल.

नमस्ते सर,

नमस्ते.

मी श्रेयान रॉय. कोलकाताच्या बराकपूर इथल्या सेंट्रल मॉडेल स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे.

सर, परीक्षेच्या काळामध्ये प्रत्यक्ष परीक्षेपेक्षाही आम्हाला जास्त भीती वाटतेय ती, परीक्षेनंतर नेमके काय होईल याची! आमचा निकाल आला आणि परीक्षेत फार चांगले गुण मिळाले नाहीत तर नेमके काय होईल, याचीच जास्त भीती वाटते. जर एखाद्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालो म्हणजे मग काय उर्वरित आयुष्यातही आम्ही अनुत्तीर्णच राहणार का?

 

उत्तर –

असे मित्रा, असा कसा काय विचार करतोस? जर तुम्ही ‘परीक्षा योद्धा’ हे पुस्तक वाचले असते तर, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुला आपोआपच मिळाली असती. तरीही तुम्ही विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे. आणि कदाचित असे प्रश्न वारंवार येतही असतातच. आणि त्या प्रश्नांना वारंवार उत्तर द्यावे लागतेच. एकदा सांगून ही गोष्ट समजणारी नाही.

आणि मला या गोष्टीविषयी अगदी मोकळ्या मनाने चर्चा केली जावी, असे वाटते. दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रामध्ये आणि कौटुंबिक जीवनामध्ये विचार करण्याचा परीघ आता आकुंचित पावला आहे. परीक्षेमध्ये आपण जे गुण आणता, त्यावरून तुमची योग्यता दिसून येत नाही. भारतच नाही तर दुनियेमध्ये असे अनेक लोक आहेत, त्यांना शिक्षणाच्या वर्गामध्ये भलेही चांगले गुण मिळाले नाहीत, परंतु ते आज ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, तिथे सर्वश्रेष्ठ योगदान देत आहेत. ही परीक्षा म्हणजे एक टप्पा आहे. या परीक्षेत गुण कमी येणे म्हणजे त्याचा अर्थ तुमचे जीवनात खूप मोठे नुकसान झाले आहे असा नव्हे.

हं, एकमात्र गोष्ट आहे की, भविष्यात तुम्हाला एका गोष्टीपासून स्वतःचा बचाव करावा लागणार आहे. त्याविषयी मी आपल्याशी नक्कीच बोलणार आहे. अलिकडे समाजामध्ये एक नवीन पद्धतीची कुरिती येत आहे. ज्याला आपण ‘डेस्टिनेशन फिव्हर’ असे म्हणू शकतो. याचा अर्थ असा आहे की, जर आपल्याला कोणत्या तरी एका स्थानी पोहोचायचे आहे, एखादे स्थान गाठायचेच आहे, तर मग ते निश्चित झाल्यानंतर, ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण काय करायचे याची दिशा निश्चित करणे. त्या क्षेत्रात जर आपला कोणी नातेवाईक यशस्वी झाला असेल तर तुम्हालाही वाटते की, आपणही असेच यशस्वी होवू. जर कोणी अयशस्वी झाले असेल तर आपल्या मनात विचार येतो की, आपणही त्या क्षेत्रात अयशस्वी होणार. हा विद्यार्थी या क्षेत्रात गेला. तो अमूक एका क्षेत्रात गेलार, त्या क्षेत्रात अमक्याने नाव कमावले. मग आपणही तसेच केले तर आपले जीवन यशस्वी होईल. मित्रांनो, असा विचार करणे अजिबात योग्य नाही. अशा विचारांचा परिणाम म्हणजे आज अनेक विद्यार्थी तणावाखाली जगत आहेत.

आपण जो काही अभ्यास करता, जे शिक्षण घेता, त्यामुळेच केवळ आपण जीवनात यशस्वी होणार की अयशस्वी, हे अवलंबून नसते. तर जीवनामध्ये आपण जे काही करणार आहे, त्यावर तुम्ही यशस्वी होणार की अयशस्वी हे निश्चित होणार आहे. तुम्ही सर्वांनी अशा तणावातून, समाजाच्या तणावातून, माता-पित्यांच्या अपेक्षांच्या तणावातून बाहेर आले पाहिजे.

अनेकवेळा आपल्यामध्ये नेमकी किती प्रचंड क्षमता आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात मैदानातच उतरावे लागते. मला वाटते की, या चर्चेतून तुम्हा आपोआपच उत्तर मिळाले असेल.

मित्रांनो, तुम्हा सर्वांची आभासी भेट घेण्याची संधी मला मिळाली, याचा मला खूप आनंद वाटत आहे. मी तुम्हा सर्वांना खूप-खूप धन्यवाद देतो. खरोखरीच मला तुमच्याबरोबर संवाद साधताना खूप छान वाटले, आनंद वाटला. तुम्हा सर्वांबरोबर बोलणे म्हणजे माझ्यासाठीही एक उत्साहवर्धक अनुभवापेक्षा काही कमी नाही. यातून निर्भेळ आनंद मला मिळाला. मला वाटते की, आजच्या आपल्या चर्चेतून आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही नवीन माहिती नक्कीच मिळाली असेल. आज झालेल्या गोष्टी पुढे जावून नक्कीच उपयोगी ठरतील. वास्तविक, मी जे काही बोललो, त्यानुसारच तुम्ही वाटचाल केली पाहिजे, याची गरज नाही. मात्र तुम्ही विचार करा, आपल्या पद्धतीने सर्व गोष्टींचा विचार करा आणि पुढची वाटचाल करा.

मित्रांनो, तुम्ही एका मोठ्या, महत्वाच्या परीक्षेसाठी तयार व्हावे, असे मला वाटते. या मोठ्या परीक्षेत आपण सर्वांनी अगदी शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण व्हायचेच आहे. ही परीक्षा आहे- आपल्या भारताला आत्मनिर्भर भारत बनविण्याची!!

ही आहे- व्होकल फॉर लोकल हा जीवनाचा मंत्र बनविण्याची परीक्षा.

माझा आग्रह आहे की, ज्यावेळी तुमची बोर्डाची परीक्षा संपेल, त्यावेळी कुटुंबातल्या लोकांबरोबर बसून एक यादी तुम्ही तयार करावी. अगदी सकाळपासून ते रात्री झोपायला जाईपर्यंत तुम्ही कोणकोणत्या गोष्टी वापरता, त्यापैकी किती गोष्टी विदेशी भूमीमध्ये तयार होता आणि किती गोष्टींना भारत मातेच्या भूमीचा सुगंध आहे. कोणत्या आणि किती गोष्टी देशवासियांच्या परिश्रमातून बनतात.

याशिवाय परीक्षेनंतर करण्यासाठी एक टास्क आपल्याला देण्याची इच्छा माझी आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहेच, आपल्या देशाल स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. त्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. देशासाठी कार्य करणा-या आपल्या स्वातंत्र सैनिकांविषयी अमृत महोत्सवामध्ये तुम्ही जाणून  घ्यावे, असे मला वाटते. स्वातंत्र्य आंदोलनाविषयी सर्व माहिती घ्यावी. यासाठी देशामध्ये एक अभियान सुरू करण्यात आले आहे. तुम्ही या अभियानामध्ये सहभागी व्हावे. तुम्ही आपल्या राज्यातल्या स्वांतत्र्य आंदोलनाविषयीच्या 75 घटनांची माहिती शोधून काढावी. ही माहिती कोणा एखाद्या व्यक्तीच्या संघर्षाविषयी असू शकेल, कोणा क्रांतिवीराचे कार्य असू शकेल. या घटना तुम्ही आपल्या मातृभाषेतून विस्तारपूर्वक लिहून काढाव्यात. याशिवाय हिंदी आणि इंग्लिशमध्येही लिहिले तर अधिक चांगले होईल.

तुम्ही हा एक वर्षभराचा प्रकल्प म्हणून काम करू शकता आणि डिजिटल पद्धतीने केलात तर जास्तच चांगले होईल. यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. आपल्या शिक्षकांबरोबर याविषयी जरूर बोला, चर्चा करा. आपल्या पालकांशी बोला, घरामध्ये आजी-आजोबा यांच्याबरोबर संवाद साधा. या प्रकल्पाचे काम तुम्ही कसे करणार याविषयी चर्चा करा.

मित्रांनो, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे -

‘‘मैंने स्वप्न देखा कि जीवन आनंद है

मैं जागा और पाया  कि जीवन सेवा है

मैंने सेवा की और पाया कि सेवा में ही आनंद है’’

आता आपण स्वतःच त्याचा अनुभव घ्या. ज्यावेळी आपल्या इच्छा, आपले लक्ष्य, देशाच्या सेवेसोबत जोडले जाते, त्यावेळी आपण कोट्यवधी  जीवनांबरोबर जोडले जातो. म्हणूनच मोठी स्वप्ने पहायची आहेत, देशाचा विचार करायचा आहे. तुम्ही सर्वजण या परीक्षेमध्ये खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार आहात  आणि तुम्ही जीवनात खूप मोठे, यशस्वी होणार, खूप पुढे जाणार, प्रगती करणार असा मला संपूर्ण विश्वास आहे. तुम्ही जीवनात पुढे जाण्यासाठी खूप अभ्यास करावा, खूप खेळावे, तितकीच मस्तीही  करावी. निकाल आल्यानंतर मला संदेश करून तो जरूर कळवावा. मी तुमच्या संदेशाची वाट पाहतोय.

अनेक शुभेच्छांसह, माझ्या सर्व युवा मित्रांना, लहान-लहान मित्रांना, खूप- खूप धन्यवाद!

अनेक - अनेक सदिच्छा !!

 

* * *

JPS/MC/NC/SP/RA/SB/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710530) Visitor Counter : 3723