अर्थ मंत्रालय
श्रीलंका आर्थिक शिखर परिषद 2020 च्या उद्घाटनप्रसंगी अर्थमंत्र्यांचे बीजभाषण
Posted On:
01 DEC 2020 11:20PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीलंका आर्थिक शिखर परिषद 2020 च्या उद्घाटनप्रसंगी आभासी पद्धतीने आज केलेल्या भाषणात अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. आर्थिक आणि व्यवसायविषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महत्वाचा मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने सिलोन वाणिज्य मंडळ दरवर्षी ही परिषद आयोजित करते. “रोडमॅप फॉर टेकऑफ: ड्रायव्हिंग अ पीपल-सेंट्रीक इकॉनॉमिक रिव्हायव्हल” ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. परिषदेच्या उद्घाटन समारंभाला श्रीलंकेचे राष्ट्रपती एच. ई. गोताबाया राजपक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली. महत्त्वाच्या आर्थिक धोरणांचा वापर करून श्रीलंकेने घेतलेल्या आर्थिक भरारीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर श्रीलंका हे दोन्ही समान आणि पूरक उपक्रम असून दोन्ही देशांच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सहकार्य दोन्ही देशांच्या शाश्वत वाढीसाठी फायदेशीर ठरेल आणि या दोन्ही देशाच्या जनकेंद्रित विकासासाठी ते आवश्यक आहे हे मुद्दे त्यांनी बोलताना अधोरेखित केले.
विकासविषयक सहकारी संबंधाच्या उभारणीसाठी भारत नेहमीच श्रीलंकेचा सशक्त सहयोगी म्हणून पाठीशी उभा राहिला याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आर्थिक सहकार्याच्या विषयात भारत श्रीलंकेला अधिक अर्थपूर्ण पाठींबा देत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्योग जगत आणि खासगी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्यपूर्ण नियामकीय वातावरण आणि शाश्वत धोरण यांचे महत्त्व सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात अधोरेखित केले.
M.Chopade/S.Chitnis /P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677561)
Visitor Counter : 242