पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्सपो ''री-इन्व्हेस्ट 2020 ''चे केले उद्‌घाटन


मेगावॅटकडून गिगावॅटकडे जाण्याच्या योजना वास्तव बनत आहेतः पंतप्रधान

भारताची स्थापित नवीकरणीय उर्जा क्षमता गेल्या सहा वर्षांत अडीच पटीने वाढली: पंतप्रधान

पर्यावरणविषयक चांगली धोरणे देखील चांगले अर्थशास्त्र असू शकतात हे भारताने दाखवून दिले आहेः पंतप्रधान

Posted On: 26 NOV 2020 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  26 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिसऱ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक बैठक आणि एक्सपो (री-इन्व्हेस्ट 2020) चे उद्‌घाटन केले. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा  मंत्रालयाने ही  शिखर परिषद आयोजित केली आहे. ‘शाश्वत ऊर्जा संक्रमणासाठी नवसंशोधन ’ ही री -इन्व्हेस्ट  2020 ची संकल्पना   आहे.

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात अल्पावधीतच उत्पादन क्षमतेची मेगावॅटकडून  गिगावॅटकडे प्रगती  आणि  ज्याबाबत यापूर्वीच्या परिषदेत चर्चा झाली होती  ते एक सूर्य, एक जग, एक  ग्रिड प्रत्यक्षात येत आहे,याविषयी पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, गेल्या  6  वर्षात भारत अतुलनीय प्रवास करत आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला वीज उपलब्ध व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी  भारताची उत्पादन क्षमता आणि नेटवर्क विस्तारण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज भारताची नवीकरणीय  ऊर्जा क्षमता, जगातील चौथी सर्वात मोठी क्षमता आहे आणि सर्व प्रमुख देशांमध्ये  भारत सर्वात वेगाने वाढत आहे हे त्यांनी स्पष्ट केले. भारतात नवीकरणीय ऊर्जा क्षमता सध्या 136 गीगा वॅट्स आहे जी आपल्या एकूण क्षमतेच्या सुमारे 36% आहे.

2017 पासून भारताची वार्षिक नवीकरणीय ऊर्जा  क्षमतेमधील   वाढ कोळसा आधारित औष्णिक  उर्जापेक्षा  जास्त होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. गेल्या  6  वर्षात भारताने नवीकरणीय उर्जा क्षमतेत अडीच पटींनी वाढ केली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की परवडण्याजोगे नसतानादेखील नवीकरणीय उर्जेमध्ये लवकर  गुंतवणूक केल्यामुळे एवढे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत झाली असून यामुळे खर्च कमी होत आहे. ते म्हणाले की आम्ही जगाला दाखवून देत  आहोत की चांगली पर्यावरणीय धोरणे देखील चांगले अर्थशास्त्र असू शकतात. ते म्हणाले की आम्ही हे सुनिश्चित केले  आहे की उर्जेची कार्यक्षमता वाढवण्याचे लक्ष्य  केवळ  एक मंत्रालय किंवा विभागपुरती मर्यादित न ठेवता आम्ही  ते  संपूर्ण सरकारचे  लक्ष्य केले आहे. आमच्या सर्व धोरणांमध्ये उर्जा कार्यक्षमता साधण्याचा विचार असतो.

पंतप्रधान म्हणाले,  कामगिरीवर आधारित प्रोत्साहन (पीएलआय)  योजना इलेक्ट्रॉनिक्स  उत्पादन  क्षेत्रात  यशस्वीपणे लागू केल्या नंतर, आम्ही उच्च कार्यक्षमता असलेल्या सौर मॉड्यूलना  अशा प्रकारचे  प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. ते म्हणाले की गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य  आहे आणि गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी समर्पित प्रकल्प विकास कक्षाची स्थापना केली  आहे. पुढील दशकासाठी नवीकरणीय  ऊर्जा वापराच्या मोठ्या  योजना प्रस्तावित असून वर्षाला सुमारे 20 अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाच्या संधी निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यांनी गुंतवणूकदार, विकासक  आणि उद्योगांना व्यवसायांना भारताच्या नवीकरणीय  उर्जा प्रवासात सहभागी  होण्यासाठी निमंत्रण दिले.

 

Jaydevi P.S/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676225) Visitor Counter : 198