पंतप्रधान कार्यालय

भारतात शहरीकरणात गुंतवणूकीसाठी उत्तम संधी असल्याचे सांगत पंतप्रधानांचे गुंतवणूकदारांना निमंत्रण


कोविडोत्तर जगाला मानसिकता आणि पद्धतींची पुनर्रचना आवश्यक असेल

100 स्मार्ट शहरांनी 30 अब्ज डॉलर्स किंमतीचे प्रकल्प तयार केले आहेत

तिसऱ्या वार्षिक ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमला केले संबोधित

Posted On: 17 NOV 2020 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  17 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदारांना भारतीय शहरीकरणात गुंतवणुकीचे आमंत्रण दिले आहे.  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज तिसऱ्या वार्षिक ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले, जर तुम्ही शहरीकरणामध्ये गुंतवणूक करण्याबाबत  विचार करत असाल तर भारतात तुमच्यासाठी उत्तम संधी आहेत. जर तुम्हाला गतिशीलतेमध्ये गुंतवणूक करायची असेल तरीही भारताकडे तुमच्यासाठी रोमांचक संधी आहेत. जर तुम्ही नावीन्यपूर्ण संशोधनात गुंतवणूकीचा विचार करत असाल तर भारताकडे तुमच्यासाठी अनेक संधी आहेत. जर तुम्ही शाश्वत उपायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भारताकडे तुमच्यासाठी उत्तम संधी आहेत.  उत्साही  लोकशाहीसह  या संधी  उपलब्ध आहेत.  एक उद्योग-स्नेही  वातावरण, एक प्रचंड बाजारपेठ आणि  भारताला जागतिक गुंतवणूकीचे केंद्र बनवण्यात कुठलीही कसर न सोडणारे सरकार इथे आहे.

मोदी म्हणाले की कोविड -19  नंतरच्या जगाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. मात्र पुनर्रचना केल्याशिवाय पुन्हा सुरुवात करणे शक्य नाही. मानसिकतेची पुनर्रचना, प्रक्रियांची पुनर्रचना आणि पद्धतींची पुनर्रचना. महामारीने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची संधी दिली आहे. जर आपल्याला भविष्यासाठी लवचिक प्रणाली विकसित करायची असेल तर ही संधी जगाने साधायला हवी.  जगाच्या  कोविडनंतरच्या गरजांविषयी आपण विचार केला पाहिजे. आपल्या शहरी केंद्रांचा कायाकल्प करणे ही एक चांगली सुरुवात असेल , असे पंतप्रधान म्हणाले.

शहरी केंद्रांचे पुनरुज्जीवन करण्याच्या संकल्पनेबाबत बोलताना पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याच्या प्रक्रियेत लोक केंद्रस्थानावर  असण्यावर  भर दिला. जनता ही सर्वात मोठे संसाधन आणि समाज हा सर्वात मोठा बिल्डिंग ब्लॉक असल्याचा उल्लेख कर पंतप्रधान म्हणाले, महामारीने आपले लोक हेच आपले सर्वात मोठे संसाधन, संस्था आणि उद्योग आहेत.  या प्रमुख आणि मूलभूत संसाधनाचे संगोपन  करून कोविडोत्तर जगाची निर्मिती करायची आहे.

महामारी काळातील शिक्षण पुढे नेण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. लॉकडाऊन कालावधीतील  स्वच्छ वातावरणाविषयी बोलताना ते म्हणाले कि जिथे स्वच्छ वातावरण मापदंड असेल अशी अपवादविरहीत  शाश्वत शहरे आपण तयार करू शकतो काभारतात अशी शहरी केंद्रे बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यात शहराच्या सुविधा असतील मात्र वातावरण गावातील असेल.

त्यांनी 27 शहरांमध्ये डिजिटल शहर, स्टार्टअप इंडिया, परवडणाऱ्या घरांची निर्मिती , स्थावर मालमत्ता कायदा  (नियमन)  आणि मेट्रो रेल यासारख्या  भारतीय शहरी व्यवस्थेचे  पुनरुज्जीवन करण्याच्या अलीकडच्या  उपक्रमांविषयी यावेळी माहिती दिली. 2022 पर्यंत आम्ही  देशात सुमारे 1000  किलोमीटर मेट्रो रेल प्रणाली सुरु  करण्याच्या मार्गावर आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, आम्ही दोन टप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे  100  स्मार्ट शहरे निवडली आहेत.सहकारी  आणि स्पर्धात्मक संघवादाचे तत्वज्ञान जपणारी ही देशव्यापी स्पर्धा होती. या शहरांनी जवळपास दोन लाख कोटी रुपये किंवा 30 अब्ज डॉलर्सचे प्रकल्प तयार केले आहेत. आणि जवळपास एक लाख चाळीस हजार कोटी रुपये किंवा 20 अब्ज डॉलर्सचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत  किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673577) Visitor Counter : 184