आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सीआयआय सार्वजनिक आरोग्य परिषदेच्या उद्घाटन सत्रात डॉ हर्ष वर्धन यांचे डिजिटल पद्धतीने संबोधन


कोविड महामारीने, आपल्या देशासाठीबळकट सार्वजनिक आरोग्य संरचना पुन्हा घडवण्याची आणि संरचनात्मक रूपाने त्याचा पुन्हा विचार करण्याची संधी दिल्याचे डॉ हर्ष वर्धन यांचे प्रतिपादन

Posted On: 17 AUG 2020 6:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2020

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज सीआयआय सार्वजनिक आरोग्य परिषदेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदावरून आभासी पद्धतीने संबोधन केले. ही परिषद दोन दिवस चालणार आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे आणि नीती आयोगाचे सदस्य( आरोग्य)डॉ विनोद कुमार पॉलही डिजिटल माध्यमातून यात सहभागी झाले. यावेळी आरोग्य विषयक आभासी प्रदर्शन आणि ‘सीआयआय क्षयरोगमुक्त कार्यस्थळे अभियान’याचे उद्घाटन करण्यात आले आणि ’सीआयआय  सार्वजनिक आरोग्य अहवाल‘ जारी करण्यात आला.

कोविड महामारीच्या या काळात हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाचे आभार मानतानाच, या महामारीने, आपल्या देशासाठी बळकट सार्वजनिक आरोग्य संरचना पुन्हा घडवण्याची आणि संरचनात्मक रूपाने त्याचा पुन्हा विचार करण्याची संधी दिली आहे याचे स्मरण त्यांनी प्रेक्षकांना करून दिले.आरोग्य विषयीचा हा अकल्पित धोका नियंत्रणात आणण्यासाठी भारताच्या यशस्वी दृष्टिकोनाचे उदाहरण देत सरकारी योजनांना व्यापक सामाजिक अभियानाचे स्वरूप देण्याच्या देशाच्या क्षमतेची त्यांनी प्रशंसा केली.यातूनच एकेकाळी पोलिओच्या जगभरातल्या रुग्णांपैकी 60 % रुग्ण असणाऱ्या भारतात आता पोलिओचे आणि देवीचे संपूर्ण उच्चाटन झाल्याचे त्यांनी सांगितले.याच प्रमाणे 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत, हे पंतप्रधानांचे उद्दिष्टही, सीआयआय आणि उद्योग धुरीणांच्या सहाय्याने साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिल्ली एनसीटीचे आरोग्य मंत्री म्हणून काम करत असताना, अल्पनिधीसह मात्र आघाडीच्या उद्योगपतींच्या संपूर्ण सहकार्याने आणि उत्साहाने पोलिओ निर्मुलनासाठी अभियान आयोजित केल्याचा आपल्या अनुभवाची आठवण सांगत, देशातून क्षयरोगाचे निर्मुलन करण्यासाठी आपल्याला अशीच कटीबद्धता आणि  उत्साह दिसत असल्याचे ते म्हणाले. सुमारे 26.4  लाख क्षय रुग्ण असणाऱ्या भारतात जागतिक क्षय रोगाचे मोठे ओझे असल्याचे त्यांनी क्षयरोग मुक्तकार्य स्थळे अभियानाबाबत बोलताना सांगितले. आयुष्य, धन,आणि कामाच्या दिवसांचे होणारे नुकसान यासंदर्भात क्षय रोगाचे आर्थिक ओझे मोठे असून अस्वच्छ स्थितीत राहावे लागणाऱ्या आणि कसदार अन्न मिळू न शकणाऱ्या गरिबांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. गेल्या पाच वर्षात क्षय रोगा साठीच्या संसाधन निर्धारणात चौपट वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी 2014 मध्ये सूत्र हाती घेतल्यापासुन क्षयरुग्ण शोधासाठी मोठे सर्वेक्षण सुरु केले आहे. प्रत्येक क्षयरुग्णावर मोफत उपचार केले जात असून त्याचा सर्व खर्च सरकार द्वारे केला जात आहे तसेच क्षयरुग्ण विषयक कळवण्यासाठी डॉक्टरानाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुष्मान भारत योजने मार्फत आरोग्य संरचनेला सरकारने दिलेल्या चालने मुळे काला आजार, कुष्ठरोग यासारख्या आजारांचे निर्मुलन होईल तसेचप्रसूतीकाळातला मृत्यू दर शून्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समाजाच्या तळापर्यंत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठीच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात आरोग्य पायाभूत सुविधांचा क्रांतिकारी विस्तार झाल्याबाबत अश्विनी कुमार चौबे यांनी सविस्तर माहिती दिली. ई संजीवनी टेली मेडिसिन मंचावर 1.5 लाख सल्लामसलती नोंदवण्यात आल्या आहेत हे टेली मेडिसिनचा व्यापक उपयोग होत असल्याचे द्योतक आहे असे ते म्हणाले.

एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया,सीआयआयचे महा संचालक चंद्रजीत बनर्जीडिजिटल माध्यमातून यावेळी उपस्थित होते.


* * *

M.Iyengar/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1646489) Visitor Counter : 180