कृषी मंत्रालय

कृषी यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागातर्फे आत्मनिर्भर भारत अभियान / कृषी अंतर्गत शेतकरी हितासाठी विविध उपक्रम

Posted On: 08 AUG 2020 3:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2020

 

कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी कृषी यांत्रिकीकरण हा एक महत्त्वाचा घटक आहे जो उत्पादन वाढविण्यात मदत करतो. यांत्रिकीकरणामुळे नैसर्गिक स्त्रोतांची उत्पादनक्षमता वाढते आणि शेतीच्या विविध कामांशी संबंधित कष्ट कमी होतात. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने तयार केलेल्या #AtmaNirbharKrishi अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभाग शेतकरी कल्याणसाठी विविध उपक्रम राबवीत आहेत.

वर्ष 2020-21 मध्ये अर्थसंकल्पात  कृषी यांत्रिकीकरणावरील उप-मिशन (एसएमएएम) साठी 1033 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 533 कोटी रुपये राज्य सरकारांना वितरीत केले केले आहेत. सीआरएम (पीक अवशेष व्यवस्थापन) योजनेसाठी अर्थसंकल्पात 600 कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली असून, शेतकऱ्यांना आपले उपक्रम लवकर सुरु करता यावेत यासाठी वेळेआधीच राज्यांना 548.20 कोटी रुपये वितरीत केले आहेत. देशातील उत्तरेकडील राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे उर्वरित अवशेष जाळण्यापासून परावृत्त करणे हेच यामागील उद्दिष्ट आहे. 

मंत्रालयाचे बहुभाषिक “फार्म्स अॅप” “FARMS-app” (फार्म मशीनरी सोल्यूशन्स अॅप) हे मोबाईल अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील कस्टम हायरिंग सर्व्हिस सेंटरशी जोडते. हे अॅप छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी आवश्यक असणारी महागडी उपकरणे व मशीन विकत घेण्याऐवजी भाड्याने घेण्यासाठी प्रोत्साहित करून देशातील कृषी यांत्रिकिकरणाला सहाय्य करत आहे.

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या शेतमजुरांच्या कमतरतेचा प्रश्न सोडविण्यासाठी व रब्बी पिकांची वेळेवर काढणी व शेती अवजारे व यंत्रसामग्रीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी यंत्रसामग्री क्षेत्रातील अनेक उपक्रमांना सवलत देण्यात आली आहे. 

लॉकडाऊन दरम्यान शेतात शेतकरी व शेतमजुरांना शेतीची कामे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.शेती उपकरणांशी संबंधित कस्टम हायरिंग सेंटर (सीएचसी) च्या कामकाजाला सूट देण्यात आली होती. कृषी अवजारांची दुकाने व त्यांचे सुटे भाग (पुरवठा साखळीसह) आणि दुरूस्ती केंद्र खुली ठेवण्यास परवानगी दिली होती. कृषी यंत्रणेची दुकाने व त्यातील सुटे भाग (पुरवठा साखळीसह) आणि दुरूस्ती खुल्या ठेवण्यास परवानगी होती. पेरणी आणि कापणी संबंधित उपकरणे/अवजारे जसे एकत्रित कापणी यंत्र आणि इतर कृषी /बागायती उपकरणे यांची अखंड, आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक सुनिश्चित केली होती. राज्याच्या सीमेवरील कृषी यंत्रांची मुक्त वाहतूक सुनिश्चित केली होती.

स्थानिक भागात स्थलांतरित कामगारांना रोजगाराच्या संधी वाढविण्याच्या उद्देशाने “आत्म निर्भर भारत अभियान / कृषी” अंतर्गत कृषी यंत्रणेच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कृषी यांत्रिकीकरणावरील उप-मिशन (एसएमएएम) च्या कार्यात्मक मार्गदर्शकतत्त्वांमध्ये स्थलांतरित कामगारांच्या कौशल्य कार्यक्रमांसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे देखील समाविष्ट केली आहेत. कार्यात्मक मार्गदर्शक तत्वांची प्रत  http://farmech.dac.gov.in/ या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे.


* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644379) Visitor Counter : 1053