ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

लॉकडाऊनच्या काळात अधिक पुरवठा करुनही भारतीय अन्न महामंडळाकडे धान्याचा पुरेसा साठा :रामविलास पासवान


लॉकडाऊनच्या काळात मुक्त बाजार विक्री योजनेअंतर्गत भारतीय अन्न महामंडळाकडून 4.50 LMT गहू आणि 5.61 LMT तांदळाची विक्री

Posted On: 05 MAY 2020 7:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

केंद्रीय अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज देशात उपलब्ध असलेला धान्यसाठा आणि राज्यांना वितरीत करण्यात आलेला साठा तसेच लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारकडून अन्नधान्य वितरणाबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांची माहिती दिली.

4 मे 2020 ला मिळालेल्या अहवालानुसार, FCI म्हणजे भारतीय अन्न महामंडळाकडे सध्या 276.61 लाख मेट्रिक टन तांदूळ तसेच 353.49 लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध आहे. म्हणजेच, एकूण  630.10 लाख मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि इतर कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेसाठी प्रतिमहिना 60 लाख मेट्रिक टन धान्याची आवश्यकता असते, असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून 69.52 लाख मेट्रिक टन धान्यसाठा रेल्वेच्या 2483 मालवाहू डब्यातून देशभरात पाठवण्यात आला आहे. रेल्वेशिवाय, रस्ते आणि जलमार्गानेही धान्याची वाहतूक करण्यात आली आहे. 5.92 लाख मेट्रिक टन धान्यसाठा ईशान्य भारतात पाठवण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळात स्वयंसेवी संस्था आणि इतर समाजिक संस्था मदत शिबिरे चालवत असून त्यासाठी ते  FCI कडून मुक्त बाजार विक्री योजनेअंतर्गत थेट गहू आणि तांदळाची खरेदी करत आहेत. राज्य सरकारे देखील याच योजनेअंतर्गत थेट FCI कडून धान्य खरेदी करु शकतात, असे त्यांनी सांगितले. जी कुटुंबे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत येत नाहीत, त्यांना राज्य सरकारे शिधापत्रिकेच्या आधारावर पुढच्या तीन महिन्यांसाठी धान्य देऊ शकतात. या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. मुक्त बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदळाचा दर 22रुपये/किलो तर गव्हाचा दर 21 रुपये किलो निश्चित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लॉकडाऊनच्या काळात 4.50 104.4 मेट्रिक टन गहू आणि 5.61 मेट्रिक टन तांदळाची विक्री करण्यात आली आहे, असे पासवान यांनी सांगितले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत पुढच्या तीन महिन्यात 104.4 मेट्रिक टन तांदूळ आणि 15.6 मेट्रिक टन गव्हाची आवश्यकता असेल, यासाठी सर्व राज्यांनी 59.50 मेट्रिक टन तांदूळ आणि 8.14 मेट्रिक टन गव्हाची उचल घेतली आहे, असे ते म्हणाले. या योजनेसाठीचा 46,000 कोटी रुपये असा पूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे असेही त्यांनी सांगितले.

देशात डाळींची 5.82 लाख मेट्रिक टन इतकी उपलब्धता असून पुढच्या तीन महिन्यांसाठी ती पुरेशी आहे, असेही ते म्हणाले. आतापर्यंत 2,20,727 मेट्रिक टन डाळी वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

****

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622081) Visitor Counter : 143