कृषी मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन “देशाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने एक व्यापक राष्ट्रीय मिशन” असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन
अनावश्यक परदेश प्रवास टाळून आम्ही देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देऊ : शिवराज सिंह चौहान
शिवराज सिंह चौहान यांचे आपल्या विभागाला कार्यक्षमता कमी न होऊ देता 'वर्क फ्रॉम होम' मॉडेल अंगिकारण्याचे निर्देश
Posted On:
14 MAY 2026 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसाधनांच्या विवेकपूर्ण वापराच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी नवी दिल्लीत कृषी भवन इथे कृषी मंत्रालय, भारतीय कृषी संशोधन परिषद, ग्रामीण विकास मंत्रालय आणि भूमी संसाधन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बैठकीत, कृषी मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशबांधवांना केलेल्या विविध आवाहनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन द्यावे तसेच किमान पाच कुटुंबांनाही त्यांचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन चौहान यांनी केले. ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘स्वदेश अभियान’ उपक्रमांतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.मंत्रालय स्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोन्याची अनावश्यक खरेदी टाळावी, तसेच प्रत्येक अधिकाऱ्याने किमान पाच जणांना सोन्याची खरेदी करण्यापासून परावृत्त करावे, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, अनावश्यक परदेश प्रवास टाळायला हवा, आणि जेव्हा अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच तो करावा. केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आभासी माध्यमांद्वारे जास्तीत जास्त काम करण्याचे, तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि ई-ऑफिस प्रणालीला प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले. कामाच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन, अधिकाऱ्यांनी 'वर्क-फ्रॉम-होम' किंवा 'हायब्रीड वर्क मॉडेल' स्वीकारण्याच्या शक्यतेचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. चौहान यांनी त्यांच्या अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या देखील कमी केली असून, आता त्यांच्या ताफ्यात केवळ तीनच वाहने असतील.
चौहान म्हणाले की, उन्हाळ्याच्या सुट्टीत लोकांनी परदेशात जाण्याऐवजी देशातील पर्यटनाला चालना द्यावी, कारण भारत नैसर्गिक सौंदर्य आणि विविधतेने समृद्ध आहे. सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
शेतीमध्ये रासायनिक खतांच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त करताना, ते म्हणाले की, या खतांचा अती वापर जमिनीचे नुकसान करत असून, तिच्या सुपीकतेवर परिणाम करत आहे. हे टाळण्यासाठी खतांचा संतुलित वापर आणि नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
निलीमा चितळे/राधिका अघोर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2261264)
अभ्यागत कक्ष : 7