पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पश्चिम आशियातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रमुख क्षेत्रांशी संबंधित ताजी माहिती
एलपीजीचा साठा संपल्याच्या कोणत्याही घटनेची नोंद नाही, काल 52.3 लाखांपेक्षा जास्त घरगुती वापराच्या सिलेंडरचे वितरण
पश्चिम आशिया क्षेत्रातील भारतीय समुदायाची सुरक्षितता, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यावर भर देत सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच
Posted On:
12 APR 2026 4:51PM by PIB Mumbai
पश्चिम आशियातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन, केंद्र सरकार सातत्याने तिथल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, यासोबतच अत्यावश्यक क्षेत्रांच्या बाबतीत सज्जतेची सुनिश्चिती करण्यासाठी समन्वित उपाययोजना करत आहे.
ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता
- केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इंधन पुरवठ्यासंबंधीच्या सद्यस्थितीबाबतची ताजी अद्ययावत माहिती सामायिक केली. होर्मुझ सामुद्रधुनी क्षेत्राला बाधा पोहचतील अशा सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजीची विना अडथळा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्रालयाने दिली :
सरकारची सज्जता आणि पुरवठा व्यवस्थापन विषयक उपाययोजना
- सध्याची भू राजकीय परिस्थिती बिघडलेली असतानाही, सरकारने घरगुती वापराचा एलपीजी आणि पीएनजी पुरवठ्याला प्राधान्यक्रमावर ठेवले आहे, त्यासोबतच रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांनाही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
अंमलबजावणी आणि देखरेख
- एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणीत्मक कारवाई सुरू आहेत. त्याअंतर्गत दि. 11.04.2026 रोजी देशभरात 2700 पेक्षा जास्त छापे टाकण्यात आले.
- सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी विना सूचना तपासण्या अधिक तीव्र करणे सुरुच ठेवले आहे. याअंतर्गत आतापर्यंत 219 एलपीजी वितरकांवर दंड आकारला गेला आहे तर, 56 वितरकांना निलंबित केले आहे.
एलपीजी पुरवठा
घरगुती वापराच्या एलपीजी पुरवठ्याची सद्यस्थिती :
- सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठा अजूनही बाधित आहे.
- एलपीजी वितरकांकडील साठा संपला असल्याच्या कोणत्याही घटनेची नोंद झालेली नाही.
- संपूर्ण उद्योगक्षेत्राअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने एलपीजीची मागणी नोंदवण्याचे प्रमाण सुमारे 98% पर्यंत वाढले आहे.
- पुरवठा इतरत्र वळवण्यासारखे गैरप्रकार रोखण्याच्या उद्देशाने वितरण प्रमाणीकरण सांकेतांकाआधारे केल्या जाणाऱ्या वितरणाचे प्रमाण सुमारे 93% पर्यंत वाढले आहे.
- घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचे वितरण सुरळीतपणे सुरू आहे.
- दि. 11.04.2026 रोजी, 52.3 लाखांपेक्षा जास्त घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचे वितरण करण्यात आले.
व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा आणि वाटप विषयक उपाययोजना :
- सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी गेल्या 8 दिवसात 5 किलोच्या एफटीएल (Free Trade LPG) सिलेंडरशी संबंधित सुमारे 3300 जागरूकता शिबिरांचे आयोजन केले, या शिबिरांमध्ये 5 किलो एफटीएलच्या 35,800 पेक्षा जास्त सिलेंडरची विक्री देखील झाली.
- फेब्रुवारी 2026 मध्ये 5 किलो एफटीएलच्या सिलेंडर विक्रीचे दैनंदिन सरासरी प्रमाण 77,000 इतके होते, त्या तुलनेत, दि. 11.04.2026 रोजी देशभरात 5 किलो एफटीएलच्या 1 लाखांपेक्षा जास्त सिलेंडरची विक्री झाली.
- 23 मार्च 2026 पासून, 5 किलो एफटीएलच्या 13 लाखांपेक्षा जास्त सिलेंडरची विक्री झाली आहे.
- दि. 11.04.2026 रोजी, 7665 मेट्रिक टन इतक्या व्यावसायिक एलपीजीची (19-किलोच्या जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त एलपीजी सिलेंडर इतके) विक्री झाली.
- पीएनजी विस्तारातील गती कायम ठेवण्यासाठी पीएनजीआरबीने राष्ट्रीय पीएनजी अभियान 2.0 ला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
- स्वच्छ, अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने राज्यांसाठी सीबीजी धोरणाचा नमुना मसुदा तयार केला आहे. हे नमुना धोरण राज्यांना सीबीजी विकासासाठी गुंतवणूकदारांसाठी अनुकूल आणि अंमलबजावणी-केंद्रित परिसंस्था तयार करण्यासाठी एक सर्वसमावेशक आणि लवचिक मार्गदर्शक चौकट म्हणून काम करेल. जी राज्ये हे स्वीकारतील त्यांना व्यावसायिक एलपीजीच्या अतिरिक्त वाटपाच्या पुढील टप्प्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
- मार्च 2026 पासून आतापर्यंत 4.24 लाखांहून अधिक पीएनजी जोडणीना गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय, 4.66 लाखांहून अधिक ग्राहकांनी नवीन कनेक्शनसाठी नोंदणी केली आहे.
- 11.04.26 पर्यंत, MYPNGD.in या संकेतस्थळाद्वारे 30,000 पेक्षा अधिक पीएनजी ग्राहकांनी त्यांची एलपीजी जोडणी परत केली आहे.
किरकोळ इंधन उपलब्धता आणि किंमत निर्धारण उपाययोजना
- देशभरातील किरकोळ विक्री केंद्र नियमितपणे कार्यरत आहेत.
- मध्यपूर्वेतील संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये असामान्य वाढ झाली आहे; तथापि, ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ₹10 प्रति लिटरने कमी केले आहे.
- भारत सरकारने 11.04.2026 रोजीच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे डिझेलवरील निर्यात शुल्क ₹ 55.50 प्रति लिटर आणि एटीएफवर ₹ 42 प्रति लिटरपर्यंत वाढवले आहे, जेणेकरून देशांतर्गत बाजारात या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित होईल.
- किरकोळ स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आणि त्या अपरिवर्तित आहेत.
सागरी सुरक्षा आणि सागरी वाहतूक कार्यवाही
बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने या प्रदेशात कार्यरत भारतीय जहाजे आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. मंत्रालयाने पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे:
- या प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि मागील 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी संबंधित कोणतीही घटना नोंदवलेली नाही.
- सागरी वाहतूक नियंत्रण कक्ष 24x7 कार्यरत असून सुरू झाल्यापासून 6,053 दूरध्वनी आणि 12,787 पेक्षा अधिक ईमेल हाताळले आहेत. मागील 24 तासांत 80 दूरध्वनी आणि 112 ईमेल प्राप्त झाले आहेत.
- सागरी वाहतूक महासंचालकांच्या मार्फत मंत्रालयाने आतापर्यंत 2,084 पेक्षा अधिक भारतीय खलाशांचे सुरक्षित परतणे सुलभ केले आहे. यामध्ये मागील 24 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांच्या 75 खलाशांचा समावेश आहे.
- भारतभरातील बंदर कार्यवाही सामान्य स्थितीत असून कुठेही गर्दी नोंदवलेली नाही.
- खलाशांच्या कल्याणासाठी आणि अखंड सागरी कार्यवाही सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि सागरी भागधारकांसोबत समन्वय साधत आहे.
प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षितता
- आखात आणि पश्चिम आशिया प्रदेशातील घडामोडींवर सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे.
- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांशी नियमित संपर्कात असून माहितीची देवाणघेवाण आणि समन्वय मजबूत केला जात आहे.
- या प्रदेशातील भारतीय समुदायाची सुरक्षितता, रक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
- भारतीय दूतावास आणि कार्यालये चोवीस तास हेल्पलाईन्स चालवत असून भारतीय नागरिकांना सक्रियपणे मदत करत आहेत.
- स्थानिक सरकारी मार्गदर्शक सूचना, हवाई प्रवास स्थिती आणि दूतावास सेवांबाबत नियमित अद्ययावत सूचना जारी केल्या जात आहेत.
- भारतीय दूतावास भारतीय समुदाय संघटना, व्यावसायिक गट, भारतीय कंपन्या आणि इतर भागधारकांशी सतत संपर्क ठेवत आहेत.
- ज्या देशांमध्ये हवाई क्षेत्र खुले आहे, तेथून उड्डाणे सुरू आहेत. 28 फेब्रुवारीपासून सुमारे 8,97,000 प्रवासी या प्रदेशातून भारतात परतले आहेत.
- संयुक्त अरब अमिरातमध्ये मर्यादित विशेष उड्डाणे सुरू असून आज सुमारे 95 उड्डाणांची अपेक्षा आहे.
- सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतासाठी उड्डाणे सुरू आहेत.
- कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले असून कतार एअरवेजकडून आज सुमारे 8–10 उड्डाणांची अपेक्षा आहे.
- कुवेतचे हवाई क्षेत्र बंद असून जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेजकडून सौदी अरेबियातील दमाम विमानतळावरून विशेष उड्डाणे चालवली जात आहेत. कुवेतमधील भारतीय नागरिकांचा प्रवास सौदी अरेबियामार्गे सुलभ करण्यात येत आहे.
- बहरिनचे हवाई क्षेत्र खुले असून गल्फ एअर लवकरच भारतासाठी मर्यादित उड्डाणे सुरू करणार आहे. सध्या दमाममार्गे विशेष उड्डाणे चालवली जात असून भारतीय नागरिकांचा प्रवास सौदी अरेबियामार्गे सुलभ केला जात आहे.
- इराणचे हवाई क्षेत्र बंद असून भारतीय नागरिकांचा प्रवास आर्मेनिया आणि अझरबैजानमार्गे सुलभ करण्यात येत आहे.
- इस्रायलचे हवाई क्षेत्र बंद असून भारतीय नागरिकांचा प्रवास जॉर्डन आणि इजिप्तमार्गे सुलभ केला जात आहे.
- इराकचे हवाई क्षेत्र मर्यादित स्वरूपात खुले असून भारतीय नागरिकांचा प्रवास जॉर्डन आणि सौदी अरेबियामार्गे सुरु आहे.
***
सुषमा काणे/तुषार पवार/गजेंद्र देवडा/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251322)
अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam