पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोटा विमानतळाची पायाभरणी, या प्रकल्पामुळे हाडोती क्षेत्राचा होणारा कायापालट पंतप्रधानांनी केला अधोरेखित
कोटा, बुंदी, बारान आणि झालावाडसह या संपूर्ण हाडोती क्षेत्रासाठी आजचा दिवस नव्या आशेचा आणि नवीन यशाचा आहे : पंतप्रधान
सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या या आधुनिक विमानतळामुळे आगामी काळात संपूर्ण क्षेत्राच्या विकासाला नवी गती मिळेल : पंतप्रधान
हे विमानतळ कार्यान्वित झाल्यावर प्रवास सुलभ होईल आणि कोटासह संपूर्ण क्षेत्रातील व्यापाराला गती मिळेल : पंतप्रधान
कोटा आज दळणवळणाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे : पंतप्रधान
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत कोटा इथली दोन्ही प्रमुख रेल्वे स्थानके आधुनिक सुविधांनी सुसज्ज केली जात आहेत : पंतप्रधान
कोटा आणि बुंदीमधून जाणारा दिल्ली-मुंबई द्रूतगती महामार्गामुळे या संपूर्ण क्षेत्रात विकासाची नवी दारे खुली होत आहेत : पंतप्रधान
Posted On:
07 MAR 2026 3:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे कोटा विमानतळाच्या पायाभरणी समारंभाला संबोधित केले. हा प्रकल्प हाडोती प्रदेशाच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. राजस्थान अभूतपूर्व वेगाने प्रगती करत असून, हे नवीन विमानतळ इथल्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा कारक घटक ठरेल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
अलीकडील अजमेर भेटीचाही त्यांनी उल्लेख केला. या भेटीत आपण हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते, तसेच 21,000 पेक्षा जास्त युवा उमेदवारांनी नियुक्ती पत्रे प्रदान केली गेल्याची माहिती त्यांनी दिली. एका आठवड्यात लागोपाठ झालेल्या या कार्यक्रमांच्या माध्यमातून, राजस्थान आज किती वेगाने पुढे वाटचाल करतो आहे, याबद्दल मोठा संदेश सर्वत्र गेल्याचे ते म्हणाले.
सुमारे 1,500 कोटी रुपये खर्चून बांधले जात असलेल्या या आधुनिक विमानतळाच्या कामाला प्रत्यक्ष आकार येऊ लागला असल्याने, आजचा दिवस हा कोटा, बुंदी, बारान आणि झालावाडच्या प्रदेशासाठी नव्या आशेचा दिवस ठरला असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पासाठी त्यांनी या प्रदेशातील जनतेला शुभेच्छाही दिल्या. या आधुनिक विमानतळामुळे येत्या काळात संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधांनानी नोव्हेंबर 2023 मध्ये दिलेल्या भेटीचेही स्मरण केले. त्या दौऱ्यात आपण विमानतळाबाबत जनतेला आश्वासन दिले होते, आता ते पूर्ण होत असल्याबद्दल आपल्याला आनंद वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जयपूर किंवा जोधपूर इथे जाण्यासाठीच्या विमान प्रवासातील अडचणी दूर होतील असे सांगताना मोदी म्हणाले, “जेव्हा हे विमानतळ सुरू होईल तेव्हा प्रवास सोपा होईल आणि कोटासह या संपूर्ण भागातील व्यापार वेगाने वाढेल.”
कोटा हे शिक्षण व उर्जा दोन्हींचे अनोखे केंद्र आहे, इथे आण्विक उर्जेसह कोळसा, वायू आणि जलविद्युत निर्मिती होते असे वर्णन पंतप्रधानांनी केले. कोटा डोरिया साडी, कोटा स्टोन आणि बुंदीचा बासमती तांदूळ यासारख्या स्थानिक उत्पादनांना मिळालेल्या जागतिक प्रसिद्धीची मोदी यांनी प्रशंसा केली. “कोटाचे हे नवीन विमानतळ ही प्रसिद्धी कित्येक पटींनी वाढवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भागातील पर्यटन व्यवसायाच्या क्षमतेबाबत बोलताना मोदी यांनी श्री मथुराधीश आणि गराडिया महादेव या आध्यात्मिक स्थळांसह मुकुंदरा हिल्स सारख्या अभयारण्याचाही उल्लेख केला. “विमान प्रवासाच्या चांगल्या सुविधेमुळे जगभरातून पर्यटक इथे येतील आणि याचा थेट फायदा युवा पिढी, व्यापारी आणि स्थानिक बाजारपेठेला होईल,” असे मोदी म्हणाले.
कोटामधील संपर्कव्यवस्थेत झालेल्या व्यापक बदलांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाचा प्रभाव याचा यामध्ये समावेश होता. कृषी आधारित उद्योगांमध्ये होत असलेल्या वाढीकडे लक्ष वेधून मोदी म्हणाले, “रेल्वे आणि रस्त्यांनंतर आता विमान वाहतुकीमुळे कोटाच्या विकासाला अधिक गती येईल.”
स्थानिक नेतृत्वाच्या प्रयत्नांची दखल घेत पंतप्रधानांनी कोटाचे खासदार आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी तिथल्या प्रगतीसाठी समर्पित वृत्तीने केलेल्या कामाची प्रशंसा केली. बिर्ला यांच्या संसदेतील भूमिकेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, “संपूर्ण वर्गाला व्यवस्थित सांभाळणारे ते एक शिक्षक आहेत. काही मोठ्या कुटुंबातील बेशिस्त सदस्यांनाही ते शिस्तीची शिकवण देतात.”
देशातील विमान वाहतूक व्यवस्थेविषयी पंतप्रधान म्हणाले की, देशातील विमानतळांची 2014 मधली 70 ही संख्या आता 160 वर गेली आहे. विकेंद्रित विकासाचे उदाहरण म्हणून त्यांनी दिल्लीजवळच्या नवीन टर्मिनल इमारतींचा आणि विमानतळांचा उल्लेख केला. “कोटा इथले हे नवीन विमानतळही अशाच प्रकारे या भागाच्या विकासाला नवीन गती देईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपले भाषण संपवताना पंतप्रधानांनी डबल इंजिन सरकारच्या महत्त्वावर भर दिला आणि गतीमान विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्याचे स्पष्ट संकेत दिले. समृद्ध व बलशाली देशाची संकल्पना मांडताना ते म्हणाले, “विकसित राजस्थानचा मजबूत पाया विकसित देशाच्या निर्धाराला अधिक बळ देत आहे.”
***
सुषमा काणे/तुषार पवार/सुरेखा जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2236391)
अभ्यागत कक्ष : 52
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam