कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका व्यापार करार: शेती किंवा दुग्धव्यवसायाबाबत कोणतीही तडजोड नाही; शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे संरक्षित : शिवराज सिंह चौहान


शेतकऱ्यांचे हित सर्वोपरि आहे; मुख्य धान्य, भरड धान्य , फळे किंवा दुग्धव्यवसायाला कोणताही धोका नाही : चौहान

कमी शुल्कामुळे तांदूळ, मसाले आणि कापड निर्यातीला मिळेल चालना ; कापूस शेतकऱ्यांना होईल फायदा : शिवराज सिंह चौहान

Posted On: 05 FEB 2026 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भात विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर , केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच  ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की हा करार भारताच्या कृषी हितांचे, विशेषतः शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रांचे  पूर्णपणे रक्षण करतो. त्यांनी अधोरेखित केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली, हा करार मुत्सद्देगिरी, विकास आणि प्रतिष्ठेचा एक नवीन मापदंड ठरला आहे  आणि पंतप्रधानांनी सुरुवातीलाच  स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड होणार नाही.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना,  चौहान यांनी भारतातील सर्व मुख्य धान्ये, फळे, प्रमुख पिके, भरड धान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे सुरक्षित असल्याचा आणि त्यांना कोणताही धोका नसल्याचा पुनरुच्चार केला. छोट्या आणि मोठ्या शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे जपले आहे आणि या करारामुळे भारतीय शेतीसाठी जोखीम निर्माण होण्याऐवजी नवीन संधी निर्माण होतील.

छोट्या शेतकऱ्यांच्या चिंता  आणि अमेरिकन शेती उत्पादनांसंदर्भात स्थिती स्पष्ट

भारताची निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि छोट्या शेतकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो याबाबत व्यक्त केल्या जात असलेल्या भीतीला उत्तर देताना, कृषीमंत्र्यांनी आश्वासन दिले की भारतीय बाजारपेठेत परदेशी उत्पादनांचा अचानक किंवा विघटनकारी प्रवेश होणार नाही.  भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशा पद्धतीने कोणताही बाजार खुला केलेला नाही आणि सर्व प्रमुख पिके, अन्नधान्य, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ संरक्षित आहेत यावर त्यांनी भर दिला. अमेरिकन कृषी उत्पादने अधिक  प्रमाणात भारतीय बाजारात येतील या अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरीनी अलिकडेच केलेल्या ट्विटमुळे निर्माण झालेल्या गोंधळाबाबत  चौहान म्हणाले की, वाणिज्य मंत्री  पियुष गोयल यांनी संसदेत आधीच तथ्य स्पष्ट केले आहे. देशांतर्गत शेतकऱ्यांवर दबाव येईल अशा प्रकारे बाजारपेठ खुली केलेली  नाही आणि प्रमुख कृषी उत्पादनांचे संरक्षण अबाधित आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

तांदूळ, मसाले आणि वस्त्र निर्यातीला मोठी संधी
 
या करारामुळे खुल्या झालेल्या  निर्यात संधींबाबत बोलताना चौहान यांनी सांगितले की, भारत आधीच अमेरिकेसह अनेक देशांना तांदूळ निर्यात करतो आणि अलीकडे आपण सुमारे 63,000 कोटी रुपयांची निर्यात नोंदवली आहे. टॅरिफमध्ये  कपात झाल्यामुळे भारताच्या तांदूळ, मसाले आणि वस्त्र निर्यातीला थेट लाभ होणार असून वस्त्रोद्योगातील वाढीचा फायदा कोट्यवधी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होईल. हा करार भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, नव्या निर्यात संधी उघडणारा आहे,  असे असूनही  विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे ते म्हणाले. 
 
संसदेत या व्यापार कराराचे तपशील मांडण्याच्या विरोधकांच्या  मागणीबाबत विचारले असता, चौहान यांनी सांगितले की योग्य वेळी कराराचे सर्व तपशील सामायिक केले जातील. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे की भारतीय शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे सुरक्षित आहे.
 
“शेतकरी म्हणजे अन्नदाता - त्यांची सेवा म्हणजे उपासना”
 
कृषी क्षेत्राची व्याप्ती मोठीअसून कुठल्याही प्रकारच्या अफवेमुळे शेतकऱ्यांमध्ये अनावश्यक चिंता, भीती निर्माण होऊ शकते. यासाठी स्पष्ट संवादाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुन्हा सांगितले, “शेतकरी म्हणजे आपले अन्नदाता आहेत. त्यांचे कल्याण म्हणजेच राष्ट्राचे कल्याण असून त्यांचे हित पूर्णपणे सुरक्षित आहे.” भावनिक शब्दांत ते म्हणाले की, शेतकऱ्यांची सेवा ही उपासनेसारखी आहे आणि मोदी सरकार प्रत्येक पावलावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.
 

सोनाली काकडे/सुषमा काणे/ गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

(Release ID: 2224153) अभ्यागत कक्ष : 9